Monday, December 17, 2018

लोकशाहीत नोटाचे स्थान

लोकशाहीत नोटाचे स्थान
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभांच्या निवडणुकीत नोटाने चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक दिग्गजांना धूळ चाखायला लावली आहे, असे वृत्त बाहेर आले आहे. त्यात जसे सत्ताधारी आहेत, तसेच अन्य पक्षांचे उमेदवारही आहेत. नोटा हा ‘नन आॅफ द अबाव्ह’,(यापैकी कुणीही नको)  या शब्दप्रयोगाचे लघुरूप आहे. मतदाराला मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या यादीत जेव्हा एकही उमेदवार मत देण्यायोग्य वाटत नसेल, तेव्हा नोटा हा पर्याय असलेले बटन दाबण्याची तरतूद मतदानयंत्रात केलेली असते. या शस्त्राचा वापर केल्यामुळे अनेक बड्यांना धाराशाही व्हावे लागले आहे.
   मध्यप्रदेश राज्यात नोटाचे प्रमाण सर्वातजास्त असावे, ही बाब अनेकांना अंतर्मुख करावयास लावणारी आहे. तब्बल 22 मतदारसंघात याचा प्रभाव दिसून आला आहे. अ व ब मध्ये जेव्हा समजा, 100 मतांचा फरक असतो व नोटाच्या पारड्यात 150 मते पडलेली असतात, (तेव्हा म्हणजे पहिल्या दोन उमेदवारात जे मतांचे अंतर असते, त्यापेक्षा जास्त मते जेव्हा नोटाच्या पारड्यात पडतात), तेव्हा नोटामुळे निकाल बदलला असल्याची शक्यता सर्वात जास्त असते. यावेळी जर नोटाची तरतूद मतपत्रिकेत नसती तर ही नोटाला पडलेली मते बह्वंशी या पहिल्या दोन उमेदवारातच विभागली गेली असती, असे गृहीत धरले आहे.
   यावेळच्या पाच राज्यांच्या निवडणुकीत नोटाला पडलेल्या मतांची टक्केवारी 1.4 टक्के असून प्रत्यक्षात आकड्यात ही संख्या 5 लक्ष 40 हजार आहे, असे बाहेर आलेले आहे.
   यावेळी मतगणना होत असतांना अनेक उमेदवारांना आशानिराशेचे हेलकावे सहन करावे सहन करावे लागले असतील तर अनेकांना काळजाचा ठोका चुकल्याचा अनुभवही आला असेल. याचे कारण असे की, संभ्रमात पडलेल्या किंवा असंतुष्ट असलेल्या शेकडो/हजारो मतदारांनी नोटाचा वापर केला होता व सर्वच उमेदवारांना अपात्र ठरविले होते. आजवर सामान्यत: निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात (ॲंटिइनकंबन्सी) किंवा बाजूने (प्रोइनकंबन्सी) मतदान होत असे/असणार. पण आता नोटाचा सर्वच उमेदवारांना अपात्र/अयोग्य ठरविण्याचा तिसरा पर्याय उपलब्ध झाला असून हा पर्याय या निवडणुकीत 5 लक्ष 40 हजार मतदारांनी वापरला आहे. सत्ताधाऱ्यांबरोबर अन्यांनाही अपात्र ठरविणारे हे ब्रह्मास्त्रच आहे असे म्हटले पाहिजे. समजा एखाद्या मतदारसंघात नोटालाच सर्वात जास्त मते पडून नोटाच निवडून आल्यासारखे झाले असते तर त्या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्याची वेळ आली नसती का? सुदैवाने आपल्या येथे राजकारणाचा स्तर अजूनतरी इतका प्रगत(?) झालेला नाही, ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हणायला हवी. हे समाधान किती दिवस टिकते, हेच पहायची वेळ मात्र आता आली आहे, असे म्हणावेसे वाटते.
    या प्रश्नाला दुसरीही बाजू आहे. ती अशी की,  मतदार निवडणुकीत सगळ्यात चांगल्या उमेदवाराला मत देतो याचाच अर्थ तो सर्वात कमी वाईट असलेल्या  उमेदवाराला मत देत असतो, असे म्हटले तर त्यात काय चुकले? याप्रकारे विचार केला तर नोटाचा वापर केल्यामुळे नक्की काय घडते, याचा विचार करायला हवा. यामुळे नोटाचा वापर करणाऱ्या मतदाराच्या दृष्टीने जास्त वाईट असलेला उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढणार नाही काय? त्यापेक्षा सर्वात चांगला आणि कमीतकमी वाईट हे शब्दप्रयोग समानार्थी आहेत हे मानून आणि जाणून मतदान करणे श्रेयस्कर ठरणार नाही का? मध्यंतरी दिल्लीला झालेल्या तीन दिवसांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमात सरसंघचालक श्री डाॅ. मोहनजी भागवत यांनी हीच भूमिका मांडली होती.
    हा प्रश्न आपल्याच देशात आहे, असे नाही. अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी देशातही हा प्रश्न आहे. पण अमेरिकन लोक अनेकदा वेगळ्याच प्रकारे विचार करतांना आढळतात. तसेच याही प्रश्नाबाबत पहायला मिळते. तिथे मतपत्रिकेवर एक रिकामा रकाना ठेवलेला असतो. मतपत्रिकेत ज्यांची नावे आहेत, त्यापेक्षा वेगळे नाव नोंदवण्याचा अधिकार मतदाराला असतो. तात्त्विक दृष्ट्या विचार करता हे एकवेळ बरोबर आहे, असेही म्हणता येईल. पण असा उमेदवार निवडून येण्याची शक्यता लाखात एक इतकीही असणार नाही. कारण उघड आहे. बहुसंख्य मतदार (ज्यांना मतपत्रिकेवरील एकही उमेदवार पसंत नाही असे मतदार) एकाच व्यक्तीचे नाव आपल्या पसंतीचा उमेदवार म्हणून नोंदवण्याची शक्यता खूपच कमी असेल आणि तो निवडून येण्याची शक्यता तर त्याहूनही कमी असेल. लोकशाहीला मान्य व संमत असलेला एक अधिकार (आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्याचा अधिकार) मिळाल्याचे तात्त्विक समाधान मात्र या तरतुदीमुळे मिळते.
    प्रत्यक्ष जीवनात काय आढळते? आवडीची निवड जेव्हा करता येत नाही (वि.सू. आवडी हे भाववाचक नाम समजावे) तेव्हा मनुष्य त्यातल्यात्यात आवडीचीच निवड करीत नाही काय? यालाच ‘जीवन ऐसे नाव’ असे म्हणता येणार नाही का? मग मतदान करतांनाच वेगळा निकष कशाला लावायचा? सगळ्यात चांगला म्हणजेच कमीतकमी वाईट हा अर्थ जाणून/ समजून/ उमजून/ पत्करून/स्वीकारून अशाच उमेदवाराला मतदान करावे यातच शहाणपणा नाही काय?