Monday, May 22, 2023

 राजेशाही राज्याभिषेकाचा थाट अन् ब्रिटनचा रिकामा माठ!

तरूण भारत मुंबई २०/२१ मे २०२३


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

 “काय वाटेल ते झाले तरी जगात पाच राजे राहणारच. चार पत्त्यातले आणि पाचवा ब्रिटनचा”, हे विधान खूप महत्त्वाचे  आहे. ब्रिटिशांचे आपल्या राजावर प्रेम असते, राजवंशाबद्दल त्यांच्या मनात आदराची, निष्ठेची भावना असते, हे जसे सर्वमान्य आहे तसेच ब्रिटिशांचे देशप्रेमही असेच प्रसिद्ध आहे. ब्रिटनमधील अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करून ऑस्ट्रेलियात पाठविले जायचे. असे सांगतात की, गुन्हेगारांनी भरलेले जहाज  जेव्हा ऑस्ट्रेलियासाठी नांगर उचलायचे तेव्हा हे अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडायचे.

   ब्रिटिश राजवटीचा इतिहास हा एकापेक्षा अधिक ग्रंथांचा विषय आहे. ब्रिटिश राजवटीला आकार दहाव्या शतकात मिळाला आणि हे श्रेय स्कॅाटलंडला जाते, असे एक मत आहे. 1066 मध्ये नॅार्मन लढवैय्यांनी इंग्लड जिंकले. नंतर वेल्स आले आणि त्यानंतर अॅंग्लो-नॅार्मन यांचा अम्मल  या भूभागावर सुरू झाला. ब्रिटिश राजेशाहीला एका अलिखित घटनेनुसार मान्यता आणि घराणेशाहीला रीतसर मान्यता मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला. पुढे राजा आणि राजाबरोबर राजाचे कुटुंबीय यांच्याकडेही यथावकाश काही अधिकार आणि कर्तव्ये  सोपविण्यात आली. त्यांना अधिकृत, औपचारिक, राजनैतिक आणि प्रातिनिधिक अधिकार व कर्तव्येही सोपविण्यात आली. राजाला प्रधान मंत्री नेमण्याचा अधिकार मिळाला. आज प्रधानमंत्री लोकशाही पद्धतीने निवडला जात असला तरी त्याची औपचारिक नेमणूक राजा करतो, तेव्हा राजेशाही परंपरा आणि आधुनिकता यांचे संतुलित पालन होत असते. राजेशाहीवर परिणाम करणाऱ्या कायद्यांबाबत मतप्रदर्शन करण्याचा अधिकार राजाला असतो. राजा सैन्यदलांचा प्रमुख असतो. भलेही युद्ध पुकारण्याचा आणि तह करण्याचा प्रत्यक्ष अधिकार प्रधानमंत्री आणि संसदेला असला तरी. प्रथा, परंपरा आणि प्रत्यक्ष अधिकार यांचा संगम ब्रिटिश राजेशाहीत पहायला मिळतो.  ‘युनिक सॅाफ्ट पॅावर अँड डिप्लोमॅटिक अॅसेट’, या शब्दात ब्रिटिश राजेशाहीचे वर्णन केले जाते. या ब्रिटिश राजेशाहीने ब्रिटिश हितसंबंध आणि मूल्ये यांची जपणूक केली, पर्यटनाला प्रोत्साहन दिले आणि धर्मादाय उद्दिष्टांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या निमित्ताने एक महत्त्वाचा तपशील मात्र नोंदवायलाच हवा. तो असा की, हे सर्व ब्रिटिशांपुरतेच मर्यादित होते. इतर राजेशाहीत हे या प्रमाणात घडल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत, हेही ध्यानात घेतले पाहिजे.

  ब्रिटनमध्ये आजवर 38 सम्राट होऊन गेले आहेत. एडवर्ड पाचवे यांचा 15 व्या शतकात खून झाला होता. तर आठव्या एडवर्ड यांनी एका अमेरिकन विधवेशी- वॅलिस सिम्पसनशी- प्रेमाखातर लग्न करण्याचे ठरविले आणि त्यांनी सम्राटपदावर पाणी सोडले. ‘सम्राट असलात म्हणून काय झाले? काही रीतीनियम तुम्हालाही लागू असतील’, अशी रूढीवादी ब्रिटिशांची भूमिका होती तर ‘मी प्रेमापुढे सम्राटपदाचा त्याग करण्यासही तयार आहे’, ही आठव्या एडवर्डची भूमिका होती. दोघेही ब्रिटिशच!

  ब्रिटनची उठून दिसणारी  राणी - एलिझाबेथ

   सध्या चिरविश्रांती घेत असलेली ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिचा जन्म 21 एप्रिल 1926 चा. तिचा मृत्यू  8 सप्टेंबर 2022 चा.  म्हणजे 96  वर्षांचे दीर्घ आयुष्य तिच्या वाट्याला आले होते.  ब्रिटनच्या राणीचा 70 वर्षांचा दीर्घ राज्यकाळ प्लॅटिनम ज्युबिली म्हणून जून 2022 मध्ये साजरा करण्यात आला. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा समारंभ होता. 2 जून ते 5 जून 2022 या काळात हा ब्रिटिश राजघराण्यातला पहिला ज्युबिली समारंभ होता. मुख्यत: ॲास्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पापुआ न्यूगिनी, मलायाशिया, पाकिस्तान   आणि ब्रिटन   यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केले.  चीन, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल अमेरिका यांनी  शुभेच्छा पाठविल्या. खास टपाल तिकिटे, नाणी प्रसारित करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.

   राणीची कारकीर्द 6 फेब्रुवारी 1952 सुरू झाली होती. ती 8 सप्टेंबर 2022 ला संपली. म्हणजे एकूण 70 वर्षे 214 दिवस होतात. राणीचा कार्यकाळ ब्रिटिश सम्राटांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा कार्यकाळ मानला जातो. एलिझाबेथ यांचा पती  प्रिन्स फिलिप हा तसा ड्यूक ॲाफ एडिंबरो! जन्म दिनांक 10 जून 1921 आणि मृत्यू दिनांक 9 एप्रिल 2021. म्हणजे शतक 2 महिन्यांनी हुकले होते.  

    बीबीसीचा दुटप्पीपणा?

  इंग्लंडमध्ये गत आठवडय़ाच्या अखेरीस राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची लगबग सुरू होती. बहुतांश जगाचे लक्ष या सोहळय़ाकडे लागलेले होते. याच काळात प्रसार माध्यमांशी संबंधित अशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ज्या घटनेकडे कुणाचेच फारसे लक्ष गेलेलले दिसत नाही. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे बीबीसी ही प्रसार माध्यमाशी संबंधित एक जगप्रसिद्ध वृत्तसंस्था आहे. ती माध्यम स्वातंत्र्याच्या नावाने सतत डंका पिटित असते. ‘आम्ही कुणालाही भीत नाही’, असा तिचा नारा असतो. कदाचित म्हणूनच तिची भीती वाटत नाही, असे घटक फारसे सापडत नसावेत. या बीबीसीच्या रथाची चाके जमिनीला कधीच टेकली नसावीत असा सर्व वृत्तसृष्टीचाही समज होता. पण माध्यम स्वातंत्र्याची ध्वजा सतत मिरवणाऱ्या या वृत्तसंस्थेने ब्रिटिश राजघराण्यापुढे मात्र गुढगे टेकले. ब्रिटनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या होणाऱ्या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाचे सेन्सॉरशिप करण्याचा अधिकार बीबीसीने राजघराण्याला देऊन टाकला. राज्यारोहण समारंभातील कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या आणि कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या नाहीत, हे ठरवण्याचा अधिकार बीबीसीने निमूटपणे राजघराण्याच्या प्रतिनिधींच्या हाती सोपविले. ‘रॅायल फॅमिली हॅज पॅावर टु सेन्सॅार  बीबीसी कोरोनेशन कव्हरेज’, असे आठ कॅालमी हेडिंग देऊन काही प्रसार माध्यमांनी बीबीसीला वेदनादायी चिमटा काढला आणि बीबीसीच्या रथाची चाके जमिनीला टेकली. यासोबत प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी असणाऱ्या क्लेरी पॉपेलवेल या बीबीसीच्या संपादकीय अधिकारी महिलेला ब्रिटिश राजघराण्याने “द व्हिक्टोरियन ऑर्डर” या किताबाने सन्मानित केले, हा केवळ योगायोग समजावा, हेच शहाणपणाचे ठरेल! जी व्यक्ती ब्रिटिश राजघराण्याची विशेष सेवा बजावेल, तिलाच हा किताब प्रदान केला जातो, हाही योगायोगच समजावा, हे चांगले.

  प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहणाचा मुख्य कार्यक्रम अर्थातच बकिंगहॅम पॅलेस मध्ये होणार होता.’ वेस्ट मिन्स्टर अबे आणि रॉयल चर्च इथे प्रेयर सर्व्हिसेस संपन्न झाल्या. यातील निवडक प्रसंगांचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण अर्थातच बीबीसीने केले. पण त्या प्रक्षेपणाची “निवड” करण्याचे अधिकार मात्र बीबीसीच्या प्रशासनाने राजघराण्यातील प्रतिनिधींना प्रदान केले होते. काही जळकुकडे बीबीसीच्या या भूमिकेला दुटप्पी म्हणून नावे ठेवत असतील तर तिकडे आपण दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.

  हुजूरपक्षाला धोबीपछाड

   याच या काळात ब्रिटनमध्ये स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाला (कन्झर्वेटिव्ह पार्टी) मजूरपक्षाने (लेबर) धोबीपछाड दिली. मजूर पक्षाने 71 नगरपालिका जिंकल्या. हुजूर पक्षाला फक्त 33 नगरपालिकाच जिंकता आल्या. मजूर पक्षाचे 2674 उमेदवार विजयी झाले. याउलट हुजूर पक्षाचे 2296 उमेदवार विजयी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून राष्ट्रीय निवडणुकांचा कल दिसतो किंवा कसे हे जो तो आपल्या सोयीनुसार ठरवत असतो. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाने या निवडणुकांच्या निकालांचा विचार करण्याचे ठरविले, हा नित्याच्या अभ्यासाचा भाग होता/आहे, असे आपणही मानावे हेच बरे. 

   जॅान्सन, ट्रस आणि सुनक 

  भरपूर संख्येत खासदारांसह निवडून आलेल्या बोरिस जॅान्सन यांना हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला तो त्यांच्या अपात्रतेमुळे, भ्रष्टाचारामुळे आणि खुशालचेंडूपणामुळे. शेवटी जॅान्सन यांच्या 50 सहकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊ केले, यात तीन मंत्रीही होते. ‘राजीनामा द्या’, हीच या सर्वांची मागणी होती. त्यामुळे या निगरगट्ट नेत्याला पायउतार व्हावेच लागले. टंचाई आणि महागाई यांनी या काळात ब्रिटनला ग्रासले होते. जनता त्रस्त आणि संतप्त झाली होती. 

  जॅान्सन यांच्यानंतर एलिझाबेथ ट्रस या पंतप्रधान पदावर आरूढ झाल्या. पण दिलेली आश्वसाने पूर्ण करू न शकल्यामुळे त्यांनाही हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या केवळ 44 दिवसच पंतप्रधानपदावर होत्या.  चुकीच्या आर्थिक धोरणांचे होणारे राजकीय परिणाम किती भयंकर असू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून ट्रस यांची अत्यल्पकालीन राजवट अढळपदी असेल. रेवडीवाटपामुळे विकसित देशांचीही कशी दैना होत असते हे या निमित्ताने स्पष्ट झाले. जनतेचा संताप, निराशा, अपेक्षाभंग, हालअपेष्टा वाढतच जात चालल्या होत्या. या पृष्ठभूमीवर ऋषी सुनक हे हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान झाले. पण त्यांच्या हातीही काही जादूची कांडी नव्हती. तरीही ते आपल्या परीने ब्रिटनचे अर्थकारण रुळावर यावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते/आहेत. ब्रिटनमध्ये नवीन राज्याचे राज्यारोहण कोणत्या परिस्थितीत होत होते हे लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल. सुनक हे जॉन्सन यांच्यासारखे बेफिकीर, बेजबाबदार, बालबुद्धीचे नाहीत नाहीत किंवा एलिझाबेथ ट्रस यांच्यासारखे ऱ्हस्व दृष्टीचेही नाहीत, ही त्यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा अजस्र डोंगर आहे. सुनक यांना पक्षांतर्गत विरोधकांशीही सामना करावा लागत असतांना स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाच्या मोठय़ा पराभवामुळे पक्षांतर्गत विरोधकांचे बळ मात्र वाढणार आहे. ब्रिटनच्या आजच्या स्थितीला सुनक जबाबदार नसतीलही, नव्हे ते नाहीतच, पण वारसा हक्काबरोबर आलेली जबाबदारी ते नाकारू शकत नाहीत. बिघडलेली अर्थकारणाची घडी, जोडीला  कोरोनाच्या उथळ हाताळणीमुळे ढेपाळलेले आरोग्य क्षेत्र,  ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंचे कडाडलेलेले दर आ वासून सुनक यांच्यासमोर उभे असतांना सरकारी उत्पन्नाच्या स्रोतांनी मात्र कूस बदललेली दिसत नाही.  

  तब्बल सात दशकांची राजसत्ता भोगून राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे देहावसान झाले आणि एक आगळीवेगळी कारकीर्द काळाच्या पडद्याआड गेली. ब्रिटनच्या सिंहासनावर राजे चार्ल्स तृतीय यांचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा कोणत्या पार्श्वभूमीवर पार पडला हे लक्षात घेतल्याशिवाय त्याला विरोध का झाला ते समजणार नाही. ब्रिटिश पिढ्या राजशिष्टाचाराबाबत कमालीच्या एकनिष्ठ असतात. राजघराण्याच्या झगमगाटावर कोट्यवधींचा खर्च झाला, तरी बेहत्तर अशी त्यांची भूमिका असते.  खानदानी परंपरेला तडा गेलेला त्यांना चालत नाही. आपले खानपान, संस्कृती आणि वारशाबद्दल ते केवळ जागरूकच नसतात तर आपले हे वैशिष्ट्य जगभर पोचावे यासाठी ते तत्परही असतात. राजेशाहीसह  लोकशाही ब्रिटनने निवडली ती या भूमिकेतून. पण यावेळी मात्र चार्ल्स तिसरे जेव्हा सम्राटपदी आरूढ झाले तो मुहूर्त साधून ब्रिटनमध्ये ऊग्र आंदोलने झाली.

एकीकडे अनुपम सोहळा तर दुसरीकडे …

   सन १९३७ नंतर राजनिष्ठ ब्रिटनला पहिल्यांदाच राजा लाभला आहे. नवे राजे तसे अवघे ७४ वर्षांचे आहेत.  हे सम्राट आहेत पण यांचे साम्राज्य मात्र लयाला गेलेले आहे. त्यांच्यासोबत राणी म्हणून त्यांच्या पत्नी कॅमिला यांचेही पदग्रहण झाले, हे ओघानेच येते. भारतीय वंशाचे खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बायबलचे पठण करून, नवसम्राटांचे अभीष्टचिंतन केले. एरवीही ब्रिटिश सम्राटांकडे अख्खे जग कौतुकाने आणि कुतुहलाने पाहते. म्हणूनच पर्यटकांची पावले  ब्रिटनकडे प्रथम वळतात, असे म्हणतात.  राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला चार हजार किलोग्रॅम सोन्यापासून तयार केलेल्या शाही बग्गीत आरुढ होऊन, बकिंगहम राजवाड्यात रवाना झाले, हे दृष्य जगातील अनेकांनी आवर्जून पाहिले. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य एकेकाळी मावळत नसे. आज ती स्थिती नाही. तरीही जगातील 39 देशांच्या चार हजार सैनिकांनी नव शाहीदाम्पत्याला मानवंदना दिली. ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते. तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात.  रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॅाट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.

  राजेशाही ही टिकवावी अशी परंपरा नाही

  आज जगात राजेशाहीचा पुरस्कार करणारा क्वचितच कुणी असेल. राजा म्हणजे नायक ही भूमिका संपल्यातच जमा झाली आहे. उलटपक्षी तो खलनायकाच्या पदवीला पोचला आहे. ज्या ब्रिटिश लोकशाहीचे नाव जगात आज आदराने घेतले जाते, अशा या ब्रिटिश लोकशाहीने आजवर प्रतीक स्वरुपात का होईना ‘राजेपण’ जपलेले आढळते. भविष्यात प्रतीक स्वरुपात तरी ‘राजेपण’ जपले जाईल का, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. तशीही ब्रिटिशांची इतिहासकाळातील राजघराणी आदर्श मानावीत अशी स्थिती नाही. जुलमी,  लहरी, अपात्र, क्रूर राजघराणी ब्रिटिश राजघराण्यांमध्ये काही कमी नाहीत.  त्यांच्यातील कलह, क्लृप्त्या इतिहासाच्या प्राथमिक अभ्यासकालाही जाणवाव्यात अशा आहेत. कदाचित म्हणूनच ब्रिटिश जनतेत यावेळी मात्र अनेकांनी राजनिष्ठेच्या सीमा ओलांडत, ‘नॅाट माय किंग’, या घोषणा दिल्या असतील. जोडीला सध्याची ब्रिटिशांची झालेली हालाखीची स्थितीही बऱ्याच प्रमाणात कारणीभूत झाली असावी. अशा परिस्थितीत या सोहळ्यावर झालेला वारेमाप खर्च ब्रिटिश नागरिकांच्या टीकेचा विषय ठरावा हे समजण्यासारखे आहे. निदान सद्ध्या तरी दर दहातले चार लोक  राजेपद्धतीला विरोध करतांना दिसत आहेत. राज्यभिषेकाच्यावेळीही हा विरोध नोंदविण्यात आला, एवढेच. 

असे आहेत चाल्स तृतीय

   चार्ल्स तृतीय यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 चा. हे आज ब्रिटनच्या राजपदावर आरूढ झाले आहेत. हे राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.  यांचा जन्म बकिंगहॅम पॅलेसमधला असून त्यावेळी त्यांचे आजोबा (आईकडून) 6 वे जॅार्ज यांची राजवट सुरू होती. त्यांची आई एलिझाबेथ द्वितीय यांचे राज्यारोहण झाले तेव्हा म्हणजे 1952 मध्ये ते तीन वर्षांचे होते. ते पुढचे राजे असतील हे तेव्हाच निश्चित झाले होते. त्यांचे संगोपन हे लक्षात ठेवूनच झाले आहे. पण राजपदासाठी 2023 हे वर्ष उजाडावे लागले. यावेळी ते 74 वर्षांचे आहेत. राज्यावर येणारे हे पहिलेच एवढे मोठे ‘राजकुमार’ असतील.

 ते राज्यारोहणापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखले जायचे. समाज जीवनाच्या विविध अंगांशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. गेल्या 20 वर्षात त्यांचा 40 धर्मादाय प्रकल्पाशी सक्रीय आणि निकटचा संबंध राहिलेला आहे. प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड (पीडब्ल्यूसीएफ) चे नाव ब्रिटनमध्ये आदराने घेतले जाते. पर्यावरण संगोपन, कलांना उत्तेजन, ग्रामोद्धार, आरोग्य संवर्धन आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘होम स्कूलिंग’  (घरच्याघरीच सर्व शिक्षण) ऐवजी त्यांनी शाळेच्या वर्गखोलीत इतर मुलांसोबत शिक्षण घेतले आहे. ते वर्गनायकही होते. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न ट्रिनिटी कॅालेजमध्ये त्यांनी आर्किॲालॅाजी व ॲंथ्रॅापॅालॅाजीचे पदवीस्तरापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सैनिकी शिक्षणही संपादन केले आहे.

  ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर ते म्हणाले की, 'मी इथे सेवा घ्यायला आलेलो नाही, सेवा करायला आलोय'. राज्यारोहणप्रसंगी आर्चबिशप यांनी वाकून चार्ल्स तृतीय यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केला, त्यांनी राजे चार्ल्स यांच्या प्रति निष्ठेची शपथ घेतली. क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांनाही यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. पण त्यांना कोणतीही शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. ब्रिटनच्या राजघराण्यात 1953 नंतर पहिल्यांदाच हा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. जगातल्या या सर्वांत लक्षवेधी राजेशाहीचा थाट पदोपदी लक्ष वेधून घेत होता. त्याची तयारी जशी काटेकोरपणे केली गेली होती तशीच अंमलबजावणीही झाली.

  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जिल बायडेन, भारताचे उपराष्ट्रपती धनकड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनकड, फ्रान्सचे एमॅन्युअल मॅक्रॅान, अॅास्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲंन्थोनी अॅबॅनीझ, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस स्मॅहाल, युरोप, आशिया आणि आफ्रिकन देशांचे प्रमुख वा प्रतिनिधी, भारतीय चित्रसृष्टीतले कलाकार अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर, विशेष म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांचे दोन प्रतिनिधी यासह जगभरातून अनेक दिग्गज व्यक्ती या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.

   या राज्यारोहणप्रसंगी फक्त 2300 च पाहुणे उपस्थित होते. याउलट यांच्या मातोश्री  एलिझाबेथ  यांच्या 1953 मधील राज्यारोहणप्रसंगी 8000 पाहुणे आले होते. दोन्ही कार्यक्रमांना 100 राष्ट्रप्रमुख उपस्थित असले तरी यावेळी त्यातला एकही ‘मांडलिक’ नव्हता.

  ‘मी सेवा करायला आलोय!’ ह्या आपल्या उद्गारांना अनुसरून ब्रिटनचे साम्राज्य नसलेले नवे सम्राट चार्ल्स तृतीय खरंच वागले आणि सम्राटपण विसरून वावरले, तर कुणी सांगावे, तेही ब्रिटिश जनतेच्या गळ्यातले ताईत होऊ शकतील! आज निदान तशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

 चीनची शांतीदूतगिरी 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २३/००५/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


चीनची शांतीदूतगिरी 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    इराण आणि सौदी अरेबिया हे दोन्ही मुस्लीमबहुल देश आहेत. इराणचा अधिकृत धर्म शिया-मुस्लीम हा असून 95% लोक शिया पंथाचे आहेत. फक्त 5% लोकच सुन्नीमधील सुफी शाखेचे आहेत. इराणची लोकसंख्या जवळजवळ 9 कोटी आणि क्षेत्रफळ 16 लक्ष  40 हजार चौकिमी आहे.  इराणमध्ये जगातील खनिज तेलाचा 10% साठा आणि इंधन वायूचा 15% साठा आहे. इतर महत्त्वाच्या खनिजांचे साठेही आहेत. 

      सौदी अरेबियाचा अधिकृत धर्म सुन्नी-मुस्लीम असून जवळजवळ 90% लोक सुन्नी पंथाचे आणि 10% शिया पंथाचे आहेत. यातील 30% लोक मूळचे सौदीचे रहिवासी नाहीत. ते कामधंद्यानिमित्त बाहेरून आलेले मुस्लीमच आहेत. सौदीची लोकसंख्या फक्त 3.5  कोटी म्हणजे इराणपेक्षा 5.5 कोटीने कमी आहे.  आणि क्षेत्रफळ मात्र 21, 50 हजार चौकिमी म्हणजे इराणपेक्षा 5 लक्ष चौकिमीनी जास्त आहे.

  सौदीमध्ये जगातील खनिज तेलाचा 17% साठा आहे. याशिवाय औद्योगिक महत्त्वाची अन्य खनिजेही आहेत.

    अशा या दोन देशातून विस्तव जात नसे. याचे प्रमुख कारण या दोन पंथातील परंपरागत वैर आहे. प्रेषित महंमदांच्या नंतर वारसा कुणाचा या प्रश्नावर मतभेद होऊन मुस्लिमांमध्ये हे दोन गट पडले. नंतरच्या काळात इस्लामिक जगतात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी इराण आणि सौदी या दोन राष्ट्रात सातत्याने स्पर्धा होत आहे/असते. या दोन वैऱ्यात चीनने नुकताच समेट घडवून आणला आहे.

समेट टिकेल का?

  या दोन देशातील सततच्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील वातावरण अस्थिर बनले होते. आता या दोन देशात तडजोड झाल्यामुळे लगेचच सुधारात्मक बदल घडून येतील का? अशी परंपरागत वैरे झटपट संपत नसतात, संपवताही येत नसतात. जसे की, येमेनमधील हौती बंडखोरांना सौदीवर  हल्ले करण्यासाठी इराण उचकवत असतो आणि नामानिराळा राहतो. हे थांबणार आहे का?  इस्रायल, यूएई, बहारीन यांमध्ये घडलेला अब्राहम अकॉर्ड, इस्राइल-सुदान आणि इस्राइल-मोरोक्को करार,  वेगळ्या तपशीलाचे, स्वरुपाचे आणि अमेरिकेच्या प्रेरणेने झालेले आहेत. यांची तुलना चीनने घडवून आणलेल्या इराण आणि सौदीतील कराराशी करता येणार नाही. शिवाय जोपर्यंत अमेरिका आणि रशिया या कराराला मनापासून स्वीकारत नाहीत, तोपर्यंत या कराराचे स्वरुप अधांतरीच असणार आहे. चिनी कर्जाच्या ओझ्याखाली आलेल्या या दोन देशात केवळ पैशाच्या जोरावर मैत्री घडवून आणता येईल का/ अशी मैत्री टिकत असते का, हा प्रश्न कायमच आहे. 

  औपचारिक तडजोड 

    सौदी आणि इराण वादात शांतता करारासाठी चीनच्या मध्यस्थीनंतर या दोन राष्ट्रात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. या  तिन्ही देशांनी एक संयुक्त  निवेदनही प्रसिद्ध केले. यानुसार  इराण आणि सौदी  यांनी  बंद झालेले दूतावास सुरू करण्याचे ठरविले आहे. तसेच, हे दोन्ही देश एकमेकांच्या कारभारात ढवळाढवळ करणार नाहीत व एकमेकांच्या भूमीवर आक्रमणही करणार नाहीत. युद्धाची खुमखुमी अशी करार करून जिरवता येत असेल/असती तर आणखी काय हवे? 

  जग आज इराण आणि सौदी यातील चीनने घडवून आणलेल्या कराराकडे आश्चर्याने आणि संशयाने पाहत आहे. दोन देशात शांतता घडवून आणणे हा विषय चीनच्या अजेंडावर आजवर कधीच नव्हता. हे कौशल्य चिनी डीएनएमध्येच नाही. आजवर चीनचा मध्यपूर्वेशी खनिज तेलाचा घाऊक खरेदीदार एवढाच संबंध होता. या खरेदीदाराची या पुढची भूमिका मात्र मध्यपूर्वेतील अस्थिर राजकारणात अमेरिका आणि रशिया यांच्यासारखी ढवळाढवळ करणाऱ्याची असणार आहे, हे मात्र नक्की. यातून शांतता निर्माण होणार किंवा कसे ते बघायचे! 

    अमेरिकेने इराणची कोंडी बंधने लादून आणि इराण न्युक्लिअर करारातून बाहेर पडून केली आहे. इराण हिजाब-सक्तीच्या विरोधातील आंदोलनामुळे घायकुतीला आला आहे. सौदीचेही अमेरिकेशी बिनसले आहे. चीन ही वेळ साधून चतुर खेळी खेळतो आहे. इराण आणि सौदी या दोन परस्पर वैऱ्यांचे एकाचवेळी अमेरिकेशी बिनसल्यामुळे चीनला शांतीदूताची भूमिका वठवण्याची संधी आयतीच चालून आली आणि चीनने ती अचूक  साधली.

   भारतासमोरचे प्रश्न

   या पार्श्वभूमीवर भारताचे इराण आणि सौदी यांच्याशी द्विपक्षीय संबंध कसे आहेत असतील, याला खूप महत्त्व आले आहे. ‘सौदी अरामको’ आणि ‘अबू धाबी नॅशनल ऑईल रिफायनरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात एक भलीमोठी ऑईल रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यात उभारली जाणार आहे. पण स्थानिक राजकारण आणि एकमेकांचे पाय ओढण्याची घातक प्रवृत्ती यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडतो आहे. ही बाब गंभीर आणि देशहितविघातक आहे. अशाने उद्या सौदी हा प्रस्तावच मागे घेऊ शकेल. असे असले तरीही भारत व सौदी यांचे संबंध आज चांगलेच आहेत. भारताने 2016 मध्ये सौदीशी इतरही अनेक सर्वसमावेशक करार केले आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम भारत-सौदी आणि भारत-इराण यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर होणार नाही, याची काळजी भारताने घेतली पाहिजे. इराणशी  भारताचे संबंध सद्ध्या पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. कारण भारताने सध्या इराणकडून खनिज तेलाची आयात अमेरिकेच्या दबावामुळे थांबविली आहे आणि याला उत्तर म्हणून की काय, भारताच्या सहकार्याने सुरू असलेल्या चाबहार बंदरबांधणीप्रकल्पाचे काम इराणने थांबवले आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तरीही ही कोंडी नजीकच्या काळात सुटेल, अशी चिन्हे दिसत नाहीत.

 खरा शांतीदूत भारत!

   जगाच्या राजकीय पटलावर नुकताच आणखी एक बदल घडून आला आहे. युक्रेनयुद्ध प्रकरणी रशियाने सबुरीने घ्यावे, अशी आजवर भारत आणि चीन या दोघांचीही जाहीर भूमिका होती. भारत आणि चीन यातील तणाव सीमावादामुळे कमालीचा वाढलेला असतांना आत्तापर्यंत युक्रेनप्रकरणी आशियातील या दोन महाशक्तींची भूमिका मात्र सारखी असायची. आता चीनने आपली भूमिका बदलली आहे. चीनने रशियाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय सोंगट्यांची नव्याने मांडणी करावी लागणार आहे/होणार आहे. युक्रेनप्रकरणी आता चीन शांतीदूत राहिलेला नाही. कर्जबाजारी करून चीनने श्रीलंका आणि युगांडा यांचे कसे भजे केले, हे जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. चीन-पाकिस्तान एकॅानॅामिक कोरिडॅारलाही स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. 

   सीमाप्रश्नी भारताने चीनबाबत कडक भूमिका घेणे चीनला अपेक्षित नव्हते. अमेरिका, जपान, अॅास्ट्रेलिया आणि भारत यांचा चतुष्कोण (क्वाड) तयार होईल याची तर चीनला मुळीच अपेक्षा नव्हती. तसेच आय टू यू टू हा इंडिया, इस्रायल, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड अरब अमिरात यांचा  गट  जल, उर्जा, दळणवळण, अंतराळ, आरोग्य, आणि अन्नसुरक्षा या सुदृढ पायावर आधारित आहे. मध्यपूर्वेतील भारताचा हा सहभाग, चीनच्या घुसखोरीच्या तुलनेत कितीतरी अधिक आश्वासक आहे. भारताची आफ्रिकेशी संबंध प्रस्थापित करण्याची भूमिकाही अशीच प्रामाणिक आणि स्नेहाधिष्ठित आहे. गरज आहे ती याच मार्गाने वेगाने पुढे जाण्याची!


Monday, May 15, 2023

  गुगलचे तिखट भावंड ‘चॅट जीपीटी’ 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?   

   जागतिकस्तरावर चॅट ‘जीपीटी’ किंवा ‘जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर’, हे नाव नुकतेच ऐकायला यायला लागले आहे. सुरवातीला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ते पाहूया.

 कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक तंत्रज्ञान आहे. आज याचा उपयोग निरनिराळ्या क्षेत्रात होतांना दिसतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम आपल्या काम करण्याच्या शैलीवर झाला आहे.  यंत्रे आपली कामे सरळ आणि सोपी करतात. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करणाऱ्या कॅलक्युलेटरचा उल्लेख उदाहरणादाखल करता येईल. अशी यंत्रे आपल्या समस्याही जेव्हा सोडवतात, तेव्हा ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करीत असतात. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक विज्ञानाची विकसित शाखा आहे, असे म्हटले जाते.  चॅट जीपीटी हाही असाच एक पण सुधारित प्रकार आहे. 

   समजा आपल्याला भाषण कसे द्यावे हे शिकायचे आहे. तर हा  विषय समजून घेण्यासाठी आपण एखाद्या तज्ञाची शिकवणी लावू. 

  1. मशीन लर्निंग आणि एआय -  मशीन लर्निंग म्हणजे  यंत्रानेच (मानवाने नव्हे) एखाद्या प्रक्रियेचे अध्ययन करून स्वत:हून काम करणे होय. आपण भाषण करायला कसे शिकतो?    एखादा तज्ञ आपल्याला भाषणाचा विषय कसा निवडावा, विषयाला अनुसरून कशा प्रकारची  बोलण्याची पद्धत ठेवावी, योग्य शब्दांची योजना कशी करावी, असा सर्व तपशील सोदाहरण समजावून सांगेल आणि आपल्याला गृहपाठ देईल. असे अनेकदा शिकवून आणि तपासून झाले की आपण भाषण द्यायला शिकू.  तसेच वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळाचे नियम हा तज्ञ  अगोदर सांगेल. नंतर त्यांच्या आधारे दिलेल्या वाक्यांचे वर्गीकरण तर्काच्या आधारे करायला सांगेल .

  2.  जनरेटिव्ह एआय -  दुसरा एखादा तज्ञ असे काहीही करणार नाही. तो आपल्याला निरनिराळ्या प्रकारची भाषणे ऐकवील. ती ऐकून पहिल्या प्रकारात नमूद केलेले मुद्देच आपल्या मनात ठसतील आणि आपण विषयाला अनुसरून भाषण देऊ शकू. वाक्यांचे बाबतात हा दुसरा तज्ञ या तिन्ही प्रकारची अनेक वाक्ये आपल्या समोर ठेवील. त्यांचे साम्यानुसार वर्गीकरण करायला सांगेल. पहिल्या गटासाठी वर्तमानकाळातली वाक्ये, दुसऱ्यासाठी भूतकाळातली आणि तिसऱ्या गटासाठी भविष्यकाळातली वाक्ये आपण निवडू. यात अनेक निरीक्षणांच्या आधारे नियम सिद्ध केला जातो. विदेचे (डेटाचे) विश्लेषण करून उत्तरे शोधण्याचा हा प्रकार आहे. चॅट ‘जीपीटी’ हा असाच प्रकार आहे. जी प्रक्रिया एरवी मनात व्हायची ती संगणक करतो.                       

           चॅट जीपीटीचे विशेष                               

     गुगल नवीन माहिती तयार करू शकत नाही. पण चॅट ‘जीपीटी’ गुगलच्या पुढची पायरी आहे. प्रश्नांचे विश्लेषण करून उत्तरे  देण्याची क्षमता चॅट जीपीटी मध्ये आहे. चॅट जीपीटी अॅप स्वरुपात संगणकावर ‘लोड’ करता येईल. उत्तरे ‘तयार’ करण्यासाठी हे  अॅप  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सद्ध्यातरी इंग्रजी भाषाप्रणालीचा वापर करील.  गरजूंनी प्रश्न लिहून पुरवताच (फीड करताच) तात्काळ त्याचे उत्तर देणारी माहिती ही प्रणाली स्पष्टीकरणाह पुरवील. 

   विषय स्पष्ट होण्यासाठी बॅंकेचे उदाहरण घेऊया. बॅंकांकडे कर्जासाठी अर्ज येतात. कर्ज मागणारा, कर्ज देण्यायोग्य आहे किंवा नाही, हा बॅंकेसमोर प्रश्न असतो. त्याची माहिती चॅट जीपीटीला पुरवताच (फीड  करताच) तिचे विश्लेषण करून संबंधित अर्जदार कर्ज देण्यास योग्य आहे किंवा नाही, याचे अचूक उत्तर  बॅंकेला क्षणार्धात चॅट जीपीटी सांगू शकेल. हेच काम करण्यास बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सादर केलेल्या कागदपत्रांचा  अनेक दिवस अभ्यास करावा लागला असता.

   एखादा प्रकल्प उभारण्यासाठीचे अथ पासून इतिपर्यंतचे सर्व तपशील चॅट ‘जीपीटी’  क्षणार्धात पुरवील. पण सायबर क्राईम सारख्या एका नवीन गुन्हेगारीक्षेत्राला जन्म देण्यास चॅट जीपीटी कारणीभूत होण्याचा धोकाही नजरेआड करता येणार नाही.

  इंटरनेट आणि संगणकातील या क्रांतीमुळे अध्ययन व अध्यापन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. या क्रांतीने शिक्षणाचा प्रसार तृणमूल स्तरापर्यंत सहज होईल. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग यांची ज्ञानदानाच्या क्षेत्रातील  मक्तेदारी संपेल. शिक्षकांना ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे भाग पडेल. शिक्षकाचे ज्ञान आणि त्यांच्या जवळची माहिती तपासण्याची सोय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध असेल. हे म्हणजे भलतेच झाले की! धबधब्यातून जसे पाणी सतत कोसळत असते तशाप्रकारे माहिती कोसळत राहणार आहे. यातले काय आणि कसे निवडायचे, एवढेच शिक्षकांना सांगावे लागेल. ‘न्यून ते पुरते’ करण्याची आवश्यकता असणार नाही. कारण न्यून असणारच नाही.  ‘अधिक ते सरते’ करण्याची गरज मात्र कदाचित निर्माण होईल, ‘

   मोठमोठे ग्रंथ, विद्वत्तापूर्ण प्रबंध, न्यायालयीन निवाडे, समित्यांचे अहवाल यांचा सखोल अभ्यास करावा लागतो.  त्यांचा सारांश काढायला माणसांना कित्येक तास लागू शकतात, हे काम चॅट जीपीटी काही सेकंदात करील. 

   याचे शिक्षणक्षेत्रावर काय परिणाम होतील?  विद्यार्थी जर होमवर्क चॅट जीपीटीकडूनच सोडवून घेणार असतील तर यामुळे होमवर्क देण्याच्या उद्देशालाच अर्थ राहणार नाही. विद्यार्थ्याने आपली बुद्धी वापरावी, माहिती मिळविण्यासाठी दोन पुस्तके अधिकची  वाचावीत हा गृहपाठ देण्यामागचा उद्देश असतो.  

   कोणतेही यंत्र शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही, हे कोरोनाकाळात आपल्याला कळले आहे. अॅान लाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. यंत्रे हवीत पण ती शिक्षकाला साथ देण्यासाठी हवीत, मदत करण्यासाठी हवीत. ती शिक्षकाऐवजी नकोत. इंटरनेट आणि संगणक यांना शिक्षणक्षेत्राने स्वीकारले आहे. पण आपल्या डोक्याचा वापर न करता एखादे काम यंत्राकडून करून घेतले जाणार असेल तर शिक्षणप्रक्रियाच ठप्प होईल.

   एखादे शिल्प तयार करण्यासाठी शिल्पकार किती कष्ट घेतो, हे आपल्याला माहीत आहे.  ते काम चॅट जीपीटी काही क्षणातच पूर्ण करील. चॅट जीपीटी निरनिराळे लोगो झटपट तयार करून देतील. काही कंपन्यांनी तर चॅट जीपीटीचे असे मॅाडल तयार केले आहे की ते दिलेल्या विषयावर ग्रंथ सुद्धा  लिहून देईल. काव्यही रचून देईल. असे होत असेल तर लेखक आणि कवी हवेतच कशाला?

   सावधानता आवश्यक 

    आपली बुद्धिमत्ता ही जैविक प्रणाली आहे. ती व्यक्तिगणिक वेगळी असते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मात्र डिजिटल प्रणाली असल्यामुळे एका प्रणालीला जे कळले ते ती दुसरीबरोबर ‘शेअर’ करू शकेल.

  काळ बदलला की अनेक बदल स्वीकारावे लागतात. पण हे बदल स्वीकारण्याची आपली तयारी नसते. लिहिण्यासाठी बोरू ऐवजी टाक आला तेव्हा अक्षर खराब होईल, असे म्हणत विरोध झाला होता, टाकाऐवजी पेन आले तेव्हा आणि पेन ऐवजी डॅाटपेन आले तेव्हा असेच कारण पुढे करण्यात आले होते. आज एकेकाळी असा वाद झाला होता, यावर काहींचा विश्वासच बसणार नाही. चॅट जीपीटी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॅा जेफ्री हिंटन यांनी आपण हे तंत्रज्ञान विकसित केले याबाबत पश्चाताप व्यक्त केला आहे. पण यंत्राचा/तंत्राचा आंधळा विरोध किंवा आंधळा पुरस्कार हे दोन्ही वाईटच! योजक: तत्र दुर्लभ: हेच खरेतर!



Monday, May 8, 2023

 हक्की-पिक्कीबाबतही राजकारण नक्की!

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०९/०५/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

हक्की-पिक्कीबाबतही राजकारण नक्की!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee? 

   कन्नड भाषेत हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे पकडणे. म्हणून हक्की-पिक्की याचा अर्थ पक्षी पकडणारे असा आहे. हक्की-पिक्की ही आदिवासी जमात भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये जंगली भागात आढळते. भटक्या जमातीत (नोमॅडिक ट्राइब) या जमातीचा समावेश करण्यात आलेला आहे. पक्षी पकडणे आणि शिकार करणे, हा या जमातीचा वंशपरंपरेने सुरू असलेला व्यवसाय  आहे. यांचा राणा प्रतापांशी संबंध सांगितला जातो. हा समाज मातृसत्ताक पद्धती आणि एक भार्या संबंध मानतो. हिंदू सणवार आणि परंपरांचे पालन करणारा हा समाज आहे. हक्किपिक्की आदिवासी लोक स्वत:ला देवी चामुंडेश्वरीचे  अनुयायी  मानतत.

   हक्की-पिक्कींचे स्थलांतर 

   फार पूर्वी हक्की-पिक्की यांचे मूळ निवासस्थान हे गुजरात आणि राजस्थान यांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये होते, असे सांगतात. त्यांनी दक्षिणेच्या दिशेने  स्थलांतर करायला सुरवात केली. ते अगोदर आंध्रात पोचले. पुढे कर्नाटकात जाऊन स्थिरावले. आज गुजराथ आणि राजस्थान ही त्यांची मूळ निवासस्थाने  त्यांना आठवत नाहीत. आपण आंध्रातले असेच ते सांगतात. आपले मूळ गाव जलापल्ली होते, असे म्हणतात. एक बाब खरी आहे की जलापल्लीमध्येच त्यांच्या बऱ्याच पिढ्या राहिलेल्या आहेत. आज मात्र देशभरातील अनेक राज्यात हे पोचले आहेत. प्राचीन काळी मानवाचे स्थलांतर कसे झाले असावे, याची थोडीफार कल्पना यांच्या स्थलांतराच्या अभ्यासाने येऊ शकते.

  वनौषधींचे जाणकार हक्की-पिक्की

   हक्की-पिक्की जमातीचे लोक उपजीविकेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गटाने प्रवास करतात. आपली चार कुळे असल्याचे ते सांगतात. गुजरातिया, पनवार, कालिवाला आणि मेवारस अशी या चार कुळांची नावे आहेत. ही चारही कुळे पारंपरिक पद्धतीने हिंदू संस्कृतीचे आचरण करतात. या चारही कुळांमध्ये जातीची उतरंड पाहायला मिळत होती. गुजरातिया हे वरच्या श्रेणीत होते. तर मेवारस सर्वात खालच्या श्रेणीत होते. जंगलात मिळणारे पदार्थ हे हक्की-पक्की यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.

  म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजापुरा हे हक्की-पिक्की जमातीचे निवासस्थान आहे. पूर्वी या जमातीमधील पुरुष शिकार करायचे पण आता वन्यजीव संरक्षण कायदे अधिक कडक झाल्यामुळे हक्की-पिक्की जमातीची शिकार बंद झाली. त्यामुळे त्यांनी  आयुर्वेदिक वनौषधी वनस्पती, जास्वंदाची पावडर, मसाले, नैसर्गिक तेले अशा वस्तू विकण्याचे काम सुरू केले आहे. आता ठिकठिकाणी तात्पुरती दुकाने मांडून या जमातीच्या लोकांनी लहान-मोठे व्यवसाय करण्यासही सुरुवात केली आहे. 

  2011 च्या जनगणनेनुसार, कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीची लोकसंख्या सुमारे 12 हजार आहे. कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते. उत्तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात या जमातीला मेल-शिकारी या नावाने ओळखले जाते. कर्नाटकमधील हक्की-पिक्की या आदिवासी जमातीचे 181 लोक सुदानमधील गृहयुद्धात अडकले आहेत. ते व्यापाराच्या निमित्ताने सुदानमध्ये गेले होते. गेली वीस वर्षे कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीचे लोक व्यापारानिमित्त आफ्रिकेत जात आहेत. तिथे आयुर्वेदिक औषधांना चांगली मागणी असते. 

   पक्षीराजापुरा येथील हक्की-पिक्की जमातीमधील स्थानिक रहिवाशांना आफ्रिकन देशामुळे गरिबीतून बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग सापडला आहे. आफ्रिकन देशांमध्ये भारतीय वनौषधीला खूप मागणी आहे. या व्यापारात पैसा दुप्पट किंवा तिप्पट होतो. म्हणून हक्की-पिक्की वनौषधी आफ्रिकेत नेऊन विकतात. 

    सुदान आणि सुदानमधील गृहयुद्ध 

   सुदान हा ईशान्य आफ्रिकेतील देश असून तो मोजून 7 देश आणि लाल समुद्र (रेड सी) यांनी वेढलेला भूभाग आहे. हे 7 देश आहेत, इजिप्त, लिबिया, छड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सुदान, इथिओपिया आणि  इरिट्रिया. यानंतर येतो, लाल समुद्र. सुदानचे क्षेत्रफळ भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि लोकसंख्या मात्र फक्त 4.5 कोटी इतकीच आहे.

   आफ्रिकेतील सुदानमध्ये एका आठवड्यापासून गृहयुद्ध पेटले आहे. देशावर ताबा मिळविण्यासाठी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. राजधानी खार्टूम येथे गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. यात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. कर्नाटकातील हिक्की-पिक्की जमातीचे 30 जण खुद्द खार्टूममध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थिती इतकी भीषण आहे की,  घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे आणि अनेक कुटुंबांकडे दिवसभर पुरेल इतकाही अन्न व पाणीसाठा शिल्लक नाही. बाहेरून तातडीने मदत पोचविणेही अशक्य झाले आहे.

राजकारणी आपण

   सुदान देशातील युद्ध निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यामध्ये सुरू आहे. भारताचे हजारो नागरिक सुदानमध्ये अडकून पडले आहेत. यातच मूळचे कर्नाटकचे आदिवासी नागरिकही अडकले आहेत. या सर्व नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र पातळीवर सुरू आहेत. पण याच मुद्द्यावरून देशात सध्या कर्नाटक राज्यात राजकारण सुरू झाले आहे. कारण कर्नाटकात विधानसभा निवडणुकी होऊ घातल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर दुर्लक्ष करीत असल्याची टीका केली आहे. म्हणून म्हणायचे की,  ‘हक्की-पक्कीबाबतही राजकारण नक्की!’ हा प्रकार उद्विग्नता वाढवणारा वाटतो. संघर्षाची स्थिती आणखी काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता असल्याने तसेच  तिथे लूटमारीच्या घटनाही घडत असल्यामुळे भारतीयांनी घराबाहेर पडू नये आणि रोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवावा, अशा सूचना भारताने दिल्या आहेत.  

  ‘ऑपरेशन कावेरी’ 

    सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची नावे आणि त्यांची ठिकाणे सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक केली जाऊ शकत नाहीत. सुदानमधील भारतीय दूतावास या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे, असा धीरही भारताने सर्व नागरिकांना दिला आहे. तिथे अडकलेल्या सुमारे तीन हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जाहीर केले आहे. सुमारे पाचशे भारतीय सुदानच्या बंदरावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारतीय हवाई दलाची दोन विमाने आणि नौदलाची ‘आयएनएस सुमेधा’ ही नौका जेद्दाह येथे सज्ज ठेवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू झाल्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या नातेवाइकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुखरूप परतलेले भारतीय भारतमातेचा जयजयकार करीत आहेत.  पण सुदानमधील संघर्षाची तीव्रता वाढत असून, ती कमी होण्यासाठी भारताच्या पूर्वानुभवी चमूचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वीप्रमाणेच जिद्दीने प्रयत्न सुरू असतांना भारतात मात्र यावर राजकारण केले जावे, हा प्रकार  दुर्दैवी आणि करंटेपणाचा परिचायक म्हटला पाहिजे. 

   सर्वांबाबत सारखाच आपलेपणा हवा

  युक्रेनच्या मदतीसाठी जिवाचे रान करणाऱ्या अमेरिकादी पाश्चिमात्य देशांनी सुदानमधील जनतेविषयी तेवढा आपलेपणा दाखविलेला नाही. सर्व अरब बंधू बंधू अशा  घोषणा देणारे  आखाती देशही गप्प आहेत. आफ्रिकेचे खरे मित्र आम्ही म्हणणारा  चीनही मूग गिळून गप्प बसला आहे. भारताच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांच्या या पृष्ठभूमीवर आपल्याकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करीत ट्विटरयुद्धच सुरू झाले आहे. मदतीच्या मुद्दय़ावरून राजकारण करण्याची ही वेळ नव्हे, ही जयशंकर यांची भूमिका या पृष्ठभूमीवर उठून दिसते. या प्रश्नी भारताने सौदी अरेबियाची मदत घेतली आहे. मोदी आणि सौदीचे राजपुत्र सलमान यांची मैत्री या निमित्ताने उपयोगी पडते आहे. तसेच फ्रान्सबद्दलही म्हणता येईल. अर्थात मोदींच्या परदेश दौऱ्यांवर उठसूठ टीका करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांची जपणूक कशी करावी लागते, हे समजणे कठीण जाते, हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही. त्यांची समजच तोकडी आहे, याला ते बिचारे तरी काय करणार?

(टीप-सुदानहून परत आणलेल्या हक्की-पिक्की समुदायाच्या सदस्यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत.)