Monday, August 7, 2017

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप?

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    युवाल नोह हरारी हा एक आधुनिक इस्रायली  इतिहासतज्ञ असून त्याने ‘सेपियन्स ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमनकाइंड’  या नावाचा ग्ंथ लिहला आहे. बिग बॅंग झाल्याची घटना एक वैज्ञानिक व ऐतिहासिक सत्य मानून व ते गृहीत धरून त्याने हा इतिहास लिहिला असून १३.५ अब्ज वर्षापासूनच्या इतिहासातील घडामोडींचा कथाभाग तपशीलवार वर्णन करून सांगितला आहे. त्याने वर्तमानकाळातील मानवापर्यंतचा तपशीलही त्याने शास्त्रज्ञ व इतिहासकार या दोन्ही भूमिका स्वीकारून कथन केला आहे. हा ग्रंथ मुळातून वाचावा अशा योग्यतेचा  असून त्यात भारताचा इतिहास मात्र पुरेसा व बरोबर मांडलेला नाही.  ही उणीव म्हणा किंवा याबाबतचे लेखकाचे अज्ञान म्हणा, बाजूला ठेवले तर हा ग्रंथ वाचनीय नक्कीच आहे.
अधिक प्रतिभावान जीव पृथ्वीचा ताबा घेणार? - ग्रंथाचा शेवट करतांना लेखकाने एक निरीक्षण नोंदविले आहे. गेली २/३ हजार वर्षे वगळली तर पृथ्वीवर झालेले बदल नैसर्गिक निवडीच्या (नॅचरल सिलेक्शन)  आधारे होत होते. निसर्गात तोपर्यंत अनेक प्राणी व वनस्पती वंश निर्माण व्हायचे व जीवन कलहात नष्टही व्हायचे. या निर्मिती व विनाशाच्या प्रक्रियेवर निसर्गाशिवाय अन्य घटकांचा परिणाम होत नसे.  मानवाला बुद्धीची जाणीव झाल्यानंतर त्याने प्रथम नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेला आपल्या बौद्धिक क्षमतेची जोड दिली. पण पुढे मानव आपल्या बुद्धीचा वापर करून ही निर्मिती व विनाशाची प्रक्रिया नियंत्रितही करू लागला. याचा परिणाम म्हणून नैसर्गिक प्रक्रिया बाधित झाली व हिचा परिणाम भविष्यात असा होईल की मानवाऐवजी आणखी एखादा अधिक प्रतिभावान जीव पृथ्वीचा ताबा भविष्यात घेऊ शकेल, असे भाकीत त्याने वर्तविले आहे. एका प्रचंड तपशीलाच्या ग्रंथातील  ही माहिती पुष्कळशी अपूर्ण व अनेक प्रकारे तपशीलात चुकीची असल्याचे गृहीत धरले/ मान्य केले  तरी सध्या ती आधाराला घेऊन विचार करायला हरकत नाही.
 कृत्रिम बुद्धी - मानवाने बुद्धीचा वापर करून कॅल्क्युलेटर तयार केला. जे गणित सोडवायला बुद्धी वापरावी लागायची ते काम एक यांत्रिक प्रक्रिया करू लागली. पुढे तर ० व १ हे दोनच अंक वापरून त्याने एक संगणकप्रणाली विकसित केली. त्याचे आजचे, आधुनिक व विकसित स्वरूप म्हणून यांत्रिक मानव (रोबोट) त्याने निर्माण केला व त्याच्या करवी अनेक बौद्धिक कामे मानव आज करून घेतो आहे. हा सर्व प्रकार कृत्रिम बुद्धिमता म्हणून ओळखला जातो. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन अशक्यप्राय वाटणाऱ्या बाबी साध्य केल्या आहेत. ही कृत्रिम बुद्धिमता वरदान स्वरुपात जशी सिद्ध झाली आहे तशीच ती शाप स्वरुपात काम करते आहे किंवा कसे अशी शंका यावी असा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे.
यंत्रमानवात स्वयंनिर्णयक्षमतेचा विकास  - घटना अशी आहे की, एक विशिष्ट काम करण्याकरता दोन यंत्रमानवांची (रोबोट) ची योजना करण्यात आली होती. त्यांना आपापली कामे नेमून दिली होती. ती दोघे आपापली नेमून दिलेली कामे अचुकपणे व निमूटपणे पार पाडीत होती. पण एक दिवस यापेक्षा काहीतरी वेगळे घडते आहे, असे वाटू लागले. अधिक खोलवर अभ्यास केल्यावर लक्षात आले की, या यंत्रमानवांनी परस्परांशी स्वतंत्र संपर्कव्यवस्था प्रस्थापित केला आहे. कमांडसाठी वापरली जाणारी इंग्रजी भाषा त्यांनी झुगारून दिली. पुढे असेही जाणवू लागले की या दोन यंत्रमानवांनी परस्परांशी संपर्क करण्याकरिता स्वत:ची अशी भाषाही विकसित केली आहे. तिचा बोध इतरांना काही केल्या होईना. यंत्रमानवांनी दिलेली चाकोरी ओलांडून स्वत: निर्णय घ्यायला सुरवात केली आहे, हे कळताच, सर्व संबंधितांना एकच हादरा बसला. यंत्रमानवात स्वयंनिर्णयक्षमता येऊ शकेल, असे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते.
कविकल्पना प्रत्यक्षात अवतरली - ही घटना फेसबुक सारख्या एका सोशल मिडिया कंपनीच्या बाबतीत घडून आली आहे, असे वृत्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) निर्मितीक्षेत्रात यामुळे एकच खळबळ उडाली असून रोबोट निर्मितीबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे किंवा कसे याबाबत विचार सुरू झाला आहे. यापूर्वी कथा कादंबऱ्यात व चित्रपटात अशा कल्पना करून अनेक कथा रचलेल्या आपल्याला माहीत आहेत. पण हा प्रकार प्रत्यक्षात घडतो आहे की काय हा प्रश्न आज शासत्रज्ञांना भेडसावत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे काय? - कृत्रिम बुद्धीमत्तेला यंत्रात आढळून येणारी बुद्धिमत्ता असे म्हणता येईल. आजवर ही क्षमता सजीवातच असते, असे मानले जात असे. संगणक शास्त्रात बौद्धिक साधनांचा ( एजंट्स) अभ्यास  व उपयोग अपेक्षित आहे. जे यंत्र परिस्थतीचे आकलन करून विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करते, ते यांत्रिक बौद्धिक साधन म्हणून ओळखले जाते. शिकणे व समस्या हाताळणे या परिस्थितीच्या आकलनावर व तर्कावर अवलंबून असलेली कार्ये असून ही क्षमता मानवी मनालाच साध्य असते, असे आजवर आपण आजवर मानत होतो.
रोबोटचा सर्वसंचार - रोबोट ही विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एक प्रणाली (मेकॅनिझम) असून ती चाकोरी सोडून जात नाही. चाकोरीच्या शिस्तीचे पालन ती प्रामाणिकपणे करते. आज्ञा (कमांड) पालन हा तिचा धर्म असतो. संगणकशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, भाषाविज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या सारख्या शास्त्रात या प्रणालीचा वापर करतात. आज्ञापालनाचे बाबतीत (फाॅलोइंग कमांड) या प्रणालीची शंभर टक्के प्रामाणिकता गृहीत धरलेली असते. पण रोबोटचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर रोबोटयुगाची निर्मिती तर होणार नाही ना? या प्रश्नाने शास्त्रज्ञांची मती गुंग झाली आहे. इन्पेक्टर राज जाईल तेव्हा जावो. पण त्या अगोदरच मशीनराज निर्माण झाले तर काय करायचे? आपण एका नवीन भस्मासुराला तर जन्माला घालीत नाही आहोत ना? अशी शक्यता गृहीत धरून मोहिनीचे रूप घेऊ शकणाऱ्या श्रीकृष्णाची आराधना करायला सर्वसामान्यांनी आतापासूनच सुरवात केलेली बरी.

No comments:

Post a Comment