Thursday, October 10, 2019

कथा ही जगन्मित्र भारत आणि कृतज्ञ पोलंडची!

कथा ही जगन्मित्र भारत आणि कृतज्ञ पोलंडची!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   1939 च्या सप्टेंबर महिन्यात हजारो पोलिश नागरिकांची जीवनरेखा एकदम पुसली गेली. दोन लांडगे पोलंडवर तुटून पडले. जर्मनी आणि पाठोपाठ रशिया. परिणामस्वरुप जेमतेम दोन महिन्यातच जगाच्या नकाशात पोलंड नावाचा देश दिसेनासा झाला. पोलिश नागरिक जिद्दीने उठाव करायचे. पण रशियाने अशा हजारो नागरिकांना हद्दपार करून सैबेरियात आत खोलवर डांबले. त्या वाटेवर असतांना अर्ध्यांचा प्रवास तर अर्ध्यातच आटोपला. उरलेले बहुतेकांचे पुढच्या 18 महिन्यात भूक, रोगराई व काबाडकष्ट यामुळे गलितगात्र होऊन कडाक्याच्या थंडीत थिजून लाकूड झाले.
   भारतात आश्रयाला
   कुठे रशिया, कुठे पोलंड आणि कुठे भारत? गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी 500 ते1000 निराधार पोलिश पोरक्यांना आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला. या पाठोपाठ अनुकंपा आणि सहृदयतेची लाटच निर्माण झाली. पूर्व आफ्रिका, न्यूझिलंड, लेबॅनाॅन, मेक्सिको आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानानेही पोरक्या पोलिशांचे यजमानपद स्वीकारले.
   बायकापोरांसह दरकोस दरमजल करीत भारतात आलेल्यांचपैकी 1000 नागरिकांची सर्व जबाबदारी गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी स्वीकारली व त्यांना जमिनीचा तुकडा तोडून दिला. ही वार्ता जगभर पसरली आणि निर्वासितांचा ओघ भारताच्या दिशेने यायला सुरवात झाली. काही खुष्कीच्या मार्गाने चालत, तर काही पोराबाळांना ट्रकमध्ये बसवून अफगाणिस्तानमार्गे, तर काही समुद्रमार्गे भारतात आले. देशांच्याच नव्हे तर खंडांच्याही सीमा ओलांडून आश्रयाला आलेल्या या पाहुण्यांमुळे तेव्हापासून भारत आणि पोलंड यात सांस्कृतिक पातळीवर जे स्नेहानुबंध निर्माण झाले आहेत, ते आजही पिढ्या न पिढ्या टिकून आहेत.
  मिनी पोलंड - वलिवडे उर्फ गांधीनगर
   मुळात एकूण 1000 निर्वासितांना आश्रय देण्याचे ठरले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिबीरच मुळी 5000 संख्येचे म्हणजे सर्वात मोठे होते. शिबिराचे स्थान होते कोल्हापूरजवळचे वलिवडे गाव. या गावातच रेल्वे स्टेशन लगतच्या जागेतील शिबिरात 1942 ते 1948 या काळात हे 5000 आश्रयार्थी आश्रयाला होते.
      शिबिराची रचना पोलिश खेड्याच्या धर्तीवर होती. वलिवडे येथे त्यांची शाळा, महाविद्यालये आणि चर्चच नव्हे तर सिनेमा थिएटर सुद्धा गावकरांच्या सहकार्यातून व स्नेहातून उभे राहिले. त्यांची प्रशासकासह स्वतंत्र प्रशासनव्यवस्था होती. गावाच्या मध्यभागी बाजारपेठ सजली होती. खास व्यवस्था म्हणून पोलंडमध्ये असतात तशी  डुकरे मांसाहारासाठी आणवली होती. भारतीयांचीही दुकाने असत. पण ती गावाच्या परिघाच्या बाहेर असत.
   पोलिश नागरिकांना स्वातंत्र्याची चव मायदेशानंतर प्रथम भारतातच चाखता आली. आजही त्यांच्यातील जीवित असलेल्यांपैकी कुणीना कुणी दरवर्षी वलिवडेला भेट देत असतात. ग्रामस्थ व सरपंच त्यांना सर्व संबंधित जागांची सफर घडवून देतात व त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या वेळी, 2019 मध्ये, 29 जणांनी आपल्या भारतातील आगमनाचा 80 वा वाढदिवस साजरा केला.
     80 वा वाढदिवस
  यावेळी 80 वर्षांनी स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण 14 सप्टेंबर 2019 ला  करण्याचे निमित्ताने 12 आश्रयार्थी व त्यांचे कुटुंबीय मिळून 29  व्यक्ती आल्या होत्या. आश्रयार्थींचा एकतर जन्म तरी भारतात झाला होता किंवा त्यांचे बालपण तरी भारतात गेले होते. स्मृतीस्तंभाचे अनावरण करतांना  पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मारसिन प्रिझ्डॅक म्हणाले, ’आमचे लोक इथे आले तेव्हा या भागात दुष्काळ पडला होता. आजही इथली सगळी चीजवस्तू पुराने पार धुवून नेली आहे. तरीही आपण आमचे स्वागत करीत आहात. तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे, तेच मला कळत नाही’. पोलंडचे भारतातील राजदूत ॲडॅम बुराकोव्हस्की म्हणाले, ’आमच्या संकटकाळी तुम्ही आम्हाला आश्रय दिला होता. एक शांतताप्रिय व मानवतावादी देश ही तुमची आठवण आमच्या हृदयात कायमस्वरुपी कोरली गेली आहे’. कार्यक्रमात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आवर्जून उपस्थित होते. आश्रयार्थींना भावनेचे उमाळे आवरत नव्हते. सैबेरिया आणि उरल पर्वतांच्या रांगा पार करून कझकस्थान व तुर्कमेनिस्तान ओलांडून आपण भारतात कसे आलो ते त्यांनी कथन केले. वाटेत त्यांना इतर कोणत्याही देशांनी आश्रय दिला नव्हता. जामनगरचे संस्थानिक जामसाहेब दिग्विजयसिंगजी जडेजा यांनी त्यांना आश्रय दिला.
 चिरविश्रांती घेणारे 78
  गुजराथमधून वलिनडे येथे आलेल्यांपैकी काहींनी भारतातच देह ठेवला. अशा 78 जणांची थडगी मात्र कोल्हापूरच्या चर्चच्या सोबतीने असलेल्या स्मशानभूमीत (सिमेटरी) आहेत. ते या थडग्यामध्ये आजही न्यायाच्या दिवसाच्या प्रतीक्षेत शांतपणे विसावले आहेत. प्रत्येक थडग्यावर त्या त्या व्यक्तीच्या नावाची शीला तेव्हा जशी होती तशीच आजही जपून ठेवली आहे. मातृभूमी सोडून परागंदा झालेल्या या व्यक्ती होत्या. त्यांची आपल्या मातृभूमीत परत जाण्याची इच्छा अपुरीच राहिली. 2014 मध्ये भारतात सत्तांतर झाल्यानंतर या वास्तू व परिसराची (मूळ स्वरुप कायम ठेवून) सुशोभिकरणासह पुनर्रचना करण्यात आली.. कोल्हापूरच्या महावीर गार्डन क्लबमध्ये इजिप्तमध्ये असतो तसा एक आॅबेलिस्क नावाचा दगडीस्तंभ आहे. त्यावर भारतीयांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे. या स्तंभावर टोकावर आश्रयार्थींनी भेट म्हणून दिलेले एक गरूडशिल्प आहे.
    भेट देणाऱ्या 12 व्यक्तींपैकी काहींच्या आठवणी
  80 वर्षांच्या  लुडमिला जॅकुटोविच यांनी आपल्या बरोबर त्यांना तेव्हा भरवलेल्या कोल्हापुरी बांगड्या आणल्या होत्या. 1943 मध्ये वलिवडे शिबिरात आल्या त्यावेळी त्यांचे वय अवघे 4 वर्षांचे होते. त्यांच्या बालपणीच्या आठवणी मुख्यत: भारतातल्याच आहेत. त्या सांगतात की, त्यांच्या आईने ख्रिसमससाठी त्यांच्यासाठी या बांगड्या भरवल्या होत्या. त्यांनी या बांगड्या आजवर कधीही काढल्या नाहीत. एकदा शस्त्रक्रियेच्या वेळी डाॅक्टरांनी या न निघणाऱ्या बांगड्या कापून काढण्याचा विचार मांडताच, त्यांनी याला सपशेल नकार दिला. या बांगड्यासोबत माझ्या कोल्हापुरातील आठवणी आहेत, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
 तेरेसा लॅंकुका यांच्या नेत्रातून अश्रूंचा अनावर पूर वाहत होता. छळांच्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर भारताने दिलेल्या आश्रयाने त्यांना गहिवरून आले होते. त्या म्हणाल्या, 1940 साली कात्यन जंगलात सर्व बुद्धिमंतांची एनकेव्हिडीने (सोव्हिएट गृहखाते) कत्तल केली. आम्ही कसेबसे सुटलो म्हणून वाचलो व ठिकठिकाणी आश्रयाला मिळालेला नकार ऐकत शेवटी इथे येऊनच स्थिरावलो.
   उमेश काशीकर हे (आता) दिवंगत वॅंडा नोविक्का यांच्या 5 मुलांपैकी एक आहेत. त्यांचा विवाह भारतातील वसंत काशीकर यांच्याशी वलिवडे येथे झाला होता. त्यांनी 1948 नंतरही भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. उमेश सध्या मुंबईच्या एका सहकारी बॅंकेत नोकरी करीत आहेत.
   कृष्णेचा जन्मही वलिवडे शिबिरातलाच. त्या आता पोलंडमध्ये रोक्लाॅ येथे राहतात. डेनिस व्यापिजेवास्का भारतात आला तेव्हा एक पोरसवदा मुलगा होता. तो आपल्या तीन मुलींना भारत दाखवायला घेऊन आला होता. आपण चांदोली व पन्हाळ्याला भेट दिल्याचे तसेच त्यावेळी एका नदीत पोहण्याचा मनमुराद आनंद आपण व आपल्या मित्रांनी लुटल्याचे त्याला आजही आठवते.
  स्मृती जपणार, भारतात तशाच पोलंडमध्येही
   दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित फोटो व पेंटिंग्ज यांनी समृद्ध असलेल्या एका म्युझियमचे औपचारिक उद्घाटन कोल्हापूरमध्ये पार पडले.  पोलंडचे या अगोदरचे अध्यक्ष ब्रोनिस्लाॅ कोमोरोव्ह्सकी यांनी महाराजा दिग्विजयसिंगजींचा कमांडर क्राॅस देऊन मरणोत्तर सत्कार केला होता. हे झाले भारतातले. पोलंडमधील वाॅर्सा जिल्ह्याच्या ओकोटा गावातील एका चौकाला पुतळा उभारून महाराजांचे नाव दिले एक शाळाही महाराजांचे नावाने ओळखली जाते. भारतातील चिमुकले पोलंड (ए लिटिल पोलंड इन इंडिया) या नावाचा भारत व पोलंड यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकाराला आलेला चित्रपट जग्नमित्र भारताच्या उदार आश्रयाची व आश्रयार्थींच्या कृतज्ञतेची  ही गाथा संपूर्ण जगाला कथन करतो आहे, करीत राहणार आहे.

No comments:

Post a Comment