Monday, January 30, 2023

 पाकिस्तानचे नकली हृदय परिवर्तन !

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक३१/०१/२०२३

 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.    

        

पाकिस्तानचे नकली हृदय परिवर्तन !

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    नुकतीच अनेकांना आश्चर्य वाटावे अशी एक घटना घडली आहे ती ही की, आर्थिक दिवाळखोरीच्या काठावर लटलट पाय कापत उभ्या असलेल्या आणि 1971 नंतरच्या दुसऱ्या फुटीच्या उंबरठ्यावर कसाबसा तोल सांभाळणाऱ्या पाकिस्तानने आपला आजीवन वैरी मानलेल्या भारताला मैत्रीसाठी भावनिक साद घातली आहे. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आर्थिक मदतीसाठी हातात कटोरा घेऊन पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे खरेतर हे भावनिक आवाहन फारसे आश्चर्यकारक आणि वार्तामूल्य असलेले नव्हते तरीही त्याला वृत्तसृष्टीत वरचे स्थान मिळाले, ही बाब मात्र आश्चर्य वाटावे अशी आहे. ‘1965, 1971 आणि 1999 असे तीनदा आम्ही भारताशी लढलो आहोत आणि या कृत्याने आम्हाला चांगलाच धडा मिळाला आहे’, अशा आशयाचे त्यांचे उद्गार होते. योगायोगाची बाब ही आहे की, भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणारा पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले तेही त्याच दिवशी! 

  ‘चर्चा करूया’, इति शाहबाज शरीफ 

  ‘टेबलाशी समोरासमोर बसूया आणि काश्मीरसह सर्व ज्वलंत प्रश्नांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकूया’, असे शरीफ मोदींना उद्देशून म्हणाले आहेत. मात्र त्यांची एक लहानशी, लहानशीच बरं का, अपेक्षा ही आहे की,  एकतर ते काढून टाकलेले 370 कलम पुन्हा प्रस्थापित करा आणि दुसरे असे की, भारतात होत असलेली अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांची चुकीची हाताळणी (मिसहॅंडल्ड) थांबवा की झाले! अल्पसंख्यांकांना कसे वागवावे, हे पाकिस्तानने भारताला सांगावे, यासारखा विनोद कुठे सापडेल का? दोन्ही देशांशी बंधुभाव बाळगून असलेल्या संयुक्त अरब अमिरातने या दिशने प्रयत्न करावेत, असेही शाहबाज शरीफ यांनी सुचविले आहे. पण लगेचच वाटाघाटी व्हायच्या असतील तर अगोदर 5 अॅागस्ट 2019 ची बेकायदेशीर कृती (कलम 370 काढून करणे) भारताने रद्द केली पाहिजे, असे पाकिस्तानकडून  इस्लामाबादमध्ये स्पष्ट करण्यात आले. काश्मीरसह कोणत्याही प्रलंबित मुद्दय़ावर तिसऱ्या देशाची मध्यस्थी भारत कधीही मान्य करणार नाही, हे  काय शाहबाज यांना  माहीत नसेल होय ?    

   2021मध्ये जून महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांना सुद्धा  भारताशी चर्चा केली पाहिजे, असा साक्षात्कार झाला होता. पाकिस्तान जगात एकटा पडला असून त्याच्या तक्रारीची कोणीही दखल घ्यायला तयार नाही, अशा अवस्थेत भारताशी संबंधविच्छेद केल्यास हाती काहीच लागणार नाही, हे त्यांना जाणवले होते. पण लगेच इस्लामाबादहून सरकारी स्पष्टीकरण आले की, चर्चा होण्यापूर्वी कलम 370 बाबतचा निर्णय फिरवण्याची आवश्यकता आहे. मंत्री एक बोलतात आणि त्यांच्या खात्याचे अधिकारी अगदी वेगळाच सूर लावतात.  पाकिस्तानच्या बाबतीत असे यापूर्वीही अनेकदा घडले आहे. 

  भुट्टो, बीबीसी एकाच माळेचे मणी

   हेच बिलावल भुट्टो  नुकतेच मोदींना ‘गुजराथ का कसाई’ म्हणाले आहेत. 2002 च्या दंगलीत 2000 मुस्लिमांची कत्तल झाली, अशा एका तथाकथित जुन्या वृत्ताचा उल्लेख करीत  भुट्टो म्हणाले की, मोदींना शिक्षा करण्याऐवजी भारताने त्यांना पंतप्रधान केले. बीबीसी या वृत्तवाहिनीनेही गुजराथ दंगलप्रकरणाशी संबंधित अशीच ‘मोदी क्वश्चन’ या नावाची एक खोटी वृत्तपट मालिका नुकतीच प्रसृत केली आहे. भारताने हा प्रचारतंत्राचा भाग आहे, या मालिकेला वसाहतवादाचा दुर्गंध आहे, ती एकतर्फी आणि  पक्षपाती आहे, ही मालिका प्रसारित करण्याचे आज ना औचित्य नव्हते, ना काही कारण होते, असे ठणकावून सांगितले आहे.  या वृत्तपट मालिकेचे गोडवे गाणाऱ्यांमध्ये, भारतातील  नेहमीचे मोदी विरोधी आणि असत्य रेटणारे घटकही आहेत. बीबीसीनेही आपला वृत्तपट सत्याधारितच आहे, अशी भारतविरोधी भूमिका नेहमीप्रमाणे निगरगट्टपणे घेतली आहे. ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांनी मात्र मोदींना क्लीनचीट तर दिलीच, शिवाय हा प्रश्न पार्लमेंटमध्ये उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या इम्रान हुसेन या ब्रिटिश खासदाराला ‘मोदींचे प्रतिमाभंजन करू नका’, असे म्हणत शहाणपणाच्या दोन गोष्टीही ऐकवल्याआहेत. 

    देशात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की, भारताविरुद्ध गरळ ओकणे हा पाकिस्तानच्या राजकारण्यांचा ठरलेला राजमार्ग आहे. हा मार्ग चोखाळला की, क्षुब्ध जनमताला एकदम भारत  विरोधी वळण लागते आणि मग दुसरे कोणतेही स्पष्टीकरण पाक जनतेला द्यावे लागत नाही. शांततेचा उदो उदो करणे सोपे आहे. शांततेच्या मार्गाचा अवलंब करणे  हे मात्र तसे सोपे नाही.  त्यासाठी धारिष्ट्य, शहाणपण, राजकीय शक्ती आवश्यक असते. विशेष म्हणजे परिस्थितीचे आकलन आणि प्रश्नांची समज  असावी लागते. या सर्वांचा पाकिस्तानी राजकारण्यांमध्ये अभाव आहे. म्हणून कोणतीही अडचण  निर्माण झाली की तिचे खापर ते भारताच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. शांतताविषयक बोलणी सुरू होणार असे दिसताच शब्द फिरवणे किंवा चिथावणीखोर कृत्ये करून ती सुरूच होऊ न देणे हे पाकिस्तानचे ठरीव साच्याचे हातखंडे राहिलेले आहेत.

   त्रिकुटाचे कुटिल डाव 

   पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताशी चर्चेचा घाट घालावा आणि लष्कर, आयएसआय आणि दहशतवादी या त्रिकुटापैकी एकाने किंवा तिघांनीही मिळून भारतात दहशतवादी कृत्ये घडवून चर्चेचा डाव सुरू होण्याआधीच उधळून लावावा, असेच आजवर घडत आले आहे. या पार्श्वभूमीवर भारत शाहाबाज शरीफ यांना किती गंभीरतेने  घेईल, हे सांगण्याची गरज नसावी. शिवाय असे की, अशा अतिसंवेदनशील राजकीय वाटाघाटी जाहीर रीतीने योजल्या जात नसतात. सर्व काही अगोदर गाजावाजा न करता ठरते आणि मगच सर्व तपशील जाहीर करण्याची रीत असते. असे जेव्हा नसते, तेव्हा ते निव्वळ सोंग असते.

 फेब्रुवारी 2020 पासून  भारत-पाक सीमेवर तुलनेने पाहता बऱ्यापैकी शांतता आहे, असे म्हणतात. हे जर खरेच असे घडले असेल, तर ते राज्यकर्त्यांना जसे वाटते, तसे ते घडले नसून, सैन्यदलप्रमुखांना  तसे घडावे असे वाटते, म्हणूनच घडले असणार! ‘सीमेवर युद्धविराम घडून यावा म्हणून भारताशी वेगळ्या स्तरावर बोलणी सुरू होती, असे पाकचे सेवानिवृत्त लष्करप्रमुख नुकतेच म्हणाले आहेत. भारताने अजूनतरी या विधानाची पुष्टी केलेली नाही. पण असे गृहीत धरून विचार करायचे ठरविले तरी या मार्गात बरेच अडथळे संभवतात. पहिले असे की, शाहाबाज शरीफ आणि इम्रानखान यातून सद्ध्यातरी विस्तव जात नाही. तसेच यापैकी कोण कुणावर केव्हा कुरघोडी करील याचाही नेम नाही. अशा परिस्थितीत एकाशी झालेला करार दुसरा पाळीलच याचा काय नेम? खुद्द इम्रानखान यांच्या पक्षातही काश्मीरबाबत वेगवेगळी मते आहेत. हिंसक कृत्ये आणि चर्चा एकाच वेळी घडू शकत नाहीत, कलम 370 पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानला बाहेर पडावेच लागेल, यावर भारत ठाम आहे.  त्यामुळे वाटाघाटीला खूपच मर्यादा पडतील. 

   पाकिस्तानमध्ये आजमितीला परस्परांनाच विरोध करणारे घटक राजकीय पक्षात, जनतेत आणि सैन्यातही  खूप आहेत. ते एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. एक जबाबदार राष्ट्र अशी पाकिस्तानची जगमानसात प्रतिमा नाही, ती यामुळेच. पाकिस्तानची वायव्य सीमा अफगाण तालिबान्यांमुळे सतत धगधगती आहे. तर सद्ध्याची सत्तेवरची  आघाडी तकलादू आहे. इम्रानखान त्यांच्या मागे हात धुवून लागले असून त्यांना जनतेत वाढत्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. पंजाब आणि सिंध ही खरेतर पाकिस्तानची धान्यकोठारे पण आज ‘आटा’ आणि तत्सम रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी लोकांची देशभर एकच झुंबड उडत असते. मालमोटारींच्या मागे सैरावैरा धावणाऱ्यांच्या चित्रफिती जगभर दाखविल्या जात आहेत. आज पाकजवळ जेमतेम साडेचार अब्ज डॉलरची गंगाजळी शिल्लक आहे. इंधन तुटवडा, वीज तुटवडा आणि अन्नतुटवडा यामुळे पाकचे कंबरडेच मोडलेले आहे. अशा प्रभावहीन आणि मरायला टेकलेल्या पाकिस्ताननचा विरोध झुगारून  पाकिस्तानचे खास दोस्त असलेले सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि  कतार या सारखे देश व्यापारासाठी भारताच्या जवळ आले आहेत. अमेरिका, रशिया हे देश भारताला शस्त्रसामग्री पुरवण्यासाठी परस्परांशी स्पर्धा करीत आहेत. युरोपीयन युनीयन, ब्रिटन, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे देश भारताकडे अपेक्षेने पाहू लागले आहेत. एकटा चीन पाकिस्तानला मदत करतोय पण त्या मदतीची पुरेपूर किंमत वसूल करूनच! शिवाय त्यालाही भारताशी व्यापारी संबंध हवेच आहेत. 

   ‘लष्कराला बिगर राजकीय स्वरूप देईन’, इति मुनीर

   पाकिस्तानात लष्कराची राजकारणात सतत ढवळाढवळ सुरू असते नवीन लष्करशहा असिम मुनीर अहमद यांनी लष्कराला बिगरराजकीय स्वरूप (आपोलिटिकल)  देईन असा संकल्प सोडला आहे खरा पण त्याचे काय होते ते पहावे लागेल. पाकिस्तानातील वार्तामाध्यमांचीही स्वत:ची अशी वेगवेगळी राजकीय भूमिका असते. त्यातली काही पराकोटीची भारतद्वेष्टी आहेत, ती भारताविरुद्ध सतत गरळ ओकत असतात  तर काही, भारताकडून आजवर खाल्ला एवढा मार पुरे झाला, आता नमते घेऊन आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यासाठी भारताचा कित्ता गिरवा, असे कट्टरवाद्यांच्या कानीकपाळी ओरडत असतात. ज्येष्ठ विश्लेषक शहजाद चौधरी यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या पाकिस्तानी वृत्तपत्रात या आशयाचा एक विस्तृत लेख लिहिला आहे. तो मुळातूनच वाचायला हवा. म्हणून काय तर भारत सद्ध्या या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे (वेट अँड वॅाच) आणि तेच योग्य आहे. 

 





No comments:

Post a Comment