Monday, October 23, 2023

 हेरगिरीच्या सम्राटाला बेसावध गाठले!!!

तरूणभारत, नागपूर मंगळवार दि २४ .१०.२०२३हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

हेरगिरीच्या सम्राटाला बेसावध गाठले!!!

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


   इस्रायलला आपल्या गुप्तहेर यंत्रणेचा सार्थ अभिमान आहे. पण हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा तिला सुगावा लागू नये, ही आश्चर्यकारक घटना 7 ऑक्टोबर 2023 ला घडली  आणि इस्रायलचे जगभर हसे झाले.  असे म्हणतात की, हमासने अगोदर इस्रायलची सर्व संपर्क यंत्रणाच उध्वस्त केली. सद्ध्या सुरू असलेले युद्ध इस्रायल जिंकेल यात शंका नाही. पण या विजयाने सद्ध्या झालेली बेअब्रू आणि फजिती कधीही विस्मृतीत जाणार नाही. कारण कुंपणापलीकडे असलेल्या गाझापट्टीत हमासची सर्वंकष स्वरुपाच्या हल्ल्याची, ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ची तयारी निदान काही महिने अगोदरपासून सुरू असली पाहिजे. पण हे इस्रायलला कळू नये, ही बाब आश्चर्यकारक आहे. हल्ल्यांसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा इराणने व तुर्कीने केला याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. डझनावारी फायटर विमाने इस्रायलच्या हद्दीत घुसली. रॅाकेट्सना हवेतच नष्ट करणारी ‘आयर्न डोम’ यंत्रणा/व्यवस्था इस्रायलने विकसित केली आहे. पण यावेळी तिला यश मिळाले नाही. हल्ल्यात दूरवरच्या जेरुसलेम आणि तेलअविव मधल्या इमारती सुद्धा जमीनदोस्त झाल्या.

  गाझा पट्टीवर आहे हमासची सत्ता 

   गाझा पट्टीत सध्या हमास हा दहशतवादी गट सत्तेवर आहे. गाझा पट्टीतून आधी हजारो छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि नंतर जमीन व समुद्रमार्गे हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले. त्यांनी  वेगवेगळ्या किबुत्झमध्ये  योम किप्पूरची सुट्टी साजरी करणाऱ्या नागरिकांवर बेछुट गोळीबार केला. नंतर सीमा ओलांडून आत घुसलेल्या दहशतवाद्यांनी  परततांना अनेक महिला आणि मुले यांना ओलीस म्हणून गाझा पट्टीत नेले आहे.

अनेक किबुत्झचा नाश 

   किबुत्झ हा इस्रायलमधील सामूहिक जीवन जगणारा गट आहे. बहुतेक स्थलांतरित ज्यू असे गट करून ठिकठिकाणी राहतात. एका किबुत्झमध्ये अनेक कुटुंबे असतात. एक हजारपर्यंतच्या व्यक्तींचे ‘सांघिक’ स्वरुपाचे सामूहिक जीवन हे स्थलांतरित लोक जगत असतात. किबुत्झमधील सामूहिक एकजिनसीपणा  टोकाला पोचलेला असतो. इतका की आपल्या कोणत्याही मुलाचे पितृत्व नक्की कुणाकडे आहे, हे कोणतीही आई सांगू शकत नाही, असे म्हणतात. स्थलांतरितांच्या या किबुत्झकडे आजच्या सांस्कृतिक मापदंडाने पाहण्यात अर्थ नाही. उलट किबुत्झ हा एखाद्या ग्रंथाचा आणि समाजशास्त्रज्ञांसाठीचा संशोधनाचा विषय असू शकेल. विशेष हे आहे की, इस्रायलमधील 3% लोक असे एकत्र जीवन जगतात!  हमासच्या हल्ल्यात अनेक किबुत्झ नष्ट झाले आहेत. भूतलावरच्या वाटेवेगळ्या सामूहिक जीवनाचे प्रतीक असलेली एक जीवन पद्धती हमासच्या हल्ल्यात फार मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. या हल्ल्याची ही एक वेगळ्याच प्रकारची पण अपरिमित हानी म्हणावी लागेल. 

  हिजबुल्ला गट 

   लेबॅनॅान मध्ये मूळ धरून बसलेल्या हिजबुल्ला गटानेही इस्रायल बरोबर संघर्ष करायला सुरवात केलेली आहे. हिजबुल्ला म्हणजेच शियांचा ‘अल्लांचा पक्ष’. हा राजकीय गट जसा आहे तसाच तो एक लष्करी गट सुद्धा आहे. मौलवीही असलेला हसन नसरल्ला हा या गटाचे नेतृत्व करतो. हिजबुल्लाचा राजकीय गट लेबॅनॅान मधील रेझिस्टन्स ब्लॅाक या राजकीय पक्षासोबत असतो तर लष्करी  दहशतवादी गट हल्ले करतो.  सद्ध्याच्या लष्करी संघर्षात छुपेपणाने इराण, तर उघडपणे हमास आणि हिजबुल्ला गट हे तिघे सक्रिय आहेत. पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवून इराण आणि तुर्कस्तान हे गटाचे महत्त्वाचे छुपे साथीदार बनले आहेत. 

 हमास या दहशतवादी संघटनेची शाखा लेबॅनॅानमध्येही सक्रिय असून ओसामा हमदान हा या शाखेचा प्रमुख आहे. इस्रायलवर हमासने हल्ला करताच लेबॅनॅानमधूनही हल्ले होण्यास सुरवात का झाली ते लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल असा आहे. अशाप्रकारे इस्रायलला लागून असलेल्या लेबॅनॅानमधून हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायलला दुसऱ्या आघाडीवरही लढावे लागत आहे. अरबांनी इस्रायलशी शांतता करार करावेत म्हणून अमेरिका प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना यशही येत चालले होते. अमेरिकेशी या बाबतीत स्पर्धा करीत चीनही अशाच खखटपटीत आहे. लेबॅनॅानशिवाय सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्याही सीमा इस्रायलला लागून आहेत. पैकी इजिप्तने इस्रायलला मान्यता दिलेली आहे. पण या तिघांपैकी सीरिया आणि जॉर्डन  यांनी जर इस्रायलशी युद्ध सुरू केले तर या संपूर्ण आखातात दीर्घ काल संघर्ष सुरू राहील आणि तो अतिशय रक्तरंजित असेल. सद्ध्या इराणचे विदेश मंत्री सीरियाला भेट द्यायला निघाले असतांना इस्रायलने दमास्कस विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली. त्यांना विमानातून उतरता आले नाही व परत जावे लागले.  युद्धाच्या कक्षा वाढू नयेत म्हणून अमेरिकेने आपली शस्त्रदले भूमध्य सागरात आणून ठेवली आहेत आणि या युद्धात आणखी इतर कुणी दखल देऊ नये, असा दम दिला आहे. सद्ध्या सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये शांतता व सहकार्याचा करार व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत. इतर अरब राष्ट्रांनीही असे शांतता करार इस्रायलशी करावेत म्हणूनही अमेरिका प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही येत चालले होते. ही प्रक्रिया थांबावी म्हणून इराणला हाताशी धरून चीनच्या चिथावणीने हा संघर्ष सुरू झाला आहे, यात शंका उरलेली नाही.  इराण आणि चीन यात सद्ध्या व्यापार आणि अन्य बाबतीत सहकार्याचे वातावरण आहेच. या संघर्षाचा बोलविता धनी म्हणून चीनकडे अंगुली निर्देश का केला जातो, यावर या तपशीलामुळे प्रकाश पडू शकेल. आता एका अरब राष्ट्राविरुद्ध युद्ध करणाऱ्या इस्रायलशी करार करण्यापूर्वी सौदी अरेबिया दहादा विचार करील. इस्रालयमध्ये हल्ला करतांना हमासच्यावतीने पत्रके टाकण्यात आली आहेत.  ‘पॅलेस्टाईनला वगळून इस्रायल सोबत शांतता करार कसा काय केला जाऊ शकतो अशा आशयाचा मजकूर या पत्रकात आहे. तसेच हमासच्या प्रवक्त्यांनी सर्व अरब विश्वाला इस्रायलविरुद्ध एक होण्याबाबत आवाहन केले आहे. पण इस्रायलच्या निर्धारावर या आवाहनाचा परिणाम होणार नाही, हे नक्की. इस्रायलची चिंता वेगळीच आहे. हमासने आपल्यासोबत जे नागरिक आणि इस्रायली सैनिक नेले आहेत त्यांच्याबरोबर अनेक महिला व मुलांनाही ओलीस म्हणून  नेले आहे. यांची सुखरूप सुटका हा इस्रायलसमोरचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. इस्रायलने म्हणूनच गाझा पट्टीची कोंडी केली असून वीज आणि जीवनावश्यक सर्व घटकांचा गाझा पट्टीला होत असलेला पुरवठा थांबवला आहे. ओलिसांना सोडाल तरच कोंडी उठेल, असा इशारा इस्रायलने हमासला दिला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजांनी लेनिनग्राडची अशीच कोंडी केली होती. यामुळे थंडी आणि उपासमारीमुळे लाखापेक्षा जास्त लोक मेले होते, 

  सद्ध्या इस्रायलकडून हमासच्या तळांवर जबरदस्त हल्ले होत आहेत. इस्रायसचे पंतप्रधान नेतान्याहू त्यांनी हमासविरुद्ध युद्धाचीच घोषणा केली आहे.  


Monday, October 16, 2023

 कॅनडाची मुजोरी कायमच!

तरूण भारत, मुंबई  रविवार, दिनांक15.10.2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो


वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


कॅनडाची मुजोरी कायमच!  

लेखांक 3 रा


   खलिस्तान चळवळीमुळे आज भारत आणि कॅनडाचे संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये सुरू झालेली आणि काहीशी मंदावलेली  ही खलिस्तान चळवळ कॅनडात मात्र अजूनही सक्रिय आहे. 1970 पासून कॅनडात मोठया प्रमाणात भारतीय स्थलांतरित होत आले आहेत. या भारतीयात शिखांची संख्या पार मोठी आहे.  

ट्रुडो पितापुत्र आणि शीख समाज 

 राजस्थानातील पोखरण येथे भारताने केलेल्या अणुचाचणीवरून कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान पियरे टड्रो नाराज झाले होते. त्यांनी तेव्हा भारताविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती.  याच काळात खलिस्तान समर्थकांना कॅनडात मोठ्या प्रमाणात राजकीय आश्रय मिळायला सुरवात झाली. ही खलिस्तान चळवळीची कॅनडातील सुरुवात मानली जाते.

1968 ते 1984.  या कालखंडात पियरे ट्रुड्रो दोनदा कॅनडाचे पंतप्रधान होते. कॅनडात क्युबेक प्रांतात  ब्रिटिश आणि फ्रेंच यांचे प्रमाण जवळजवळ समसमान आहे. फ्रेंचांना भाषिक आधारावर फाळणी हवी होती पण सार्वमतात फ्रेंचाची मागणी फेटाळली गेली. 1982 मध्ये कॅनडाने नवीन घटनेचा स्वीकार केला. पियरे ट्रुड्रो यांच्या कारकिर्दीत त्यांच्या लिबरल पक्षांने शिखांना आपल्याकडे वळवण्यासाठी खलिस्तवाद्यांबाबत बोटचेपे धोरण स्वीकारले.    1982 मध्ये भारताला हवा असलेल्या कुख्यात खलिस्तानी दहशतवादी तलिवंदर सिंग परमार याच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती पियरे ट्रुड्रो सरकारने फेटाळली होती. 

 गेल्या 40 वर्षांत खलिस्तानवाद्यांना कॅनडामध्येच सर्वाधिक प्रोत्साहन  मिळाले आहे. कॅनडात खलिस्तानवाद्यांना आश्रय तर मिळालाच त्याच बरोबर कायदेशीर आणि राजकीय अनुकूलताही मिळाली. खलिस्तानवाद्यांच्या बाबतीत कॅनडाच्या सौम्य धोरणामुळे भारतीय नेते कायमच नाराज राहत आले आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1982 मध्ये ही नाराजी व्यक्त करत कॅनडा सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. कॅनडाने ज्या दहशतवादी तलिवंदर सिंगचे प्रत्यार्पण नाकारले त्याने एअर इंडियाच्या कनिष्क विमानात बाँबस्फोट घडवून आणला. या दुर्घटनेत विमानातील सर्व 329 प्रवासी ठार झाले. त्यात सर्वाधिक 268 कॅनडाचे नागरिक होते. कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात भीषण-वेदनादायी हल्ला आहे.

  2015 मध्ये जस्टिन ट्रुड्रो सत्तेवर आल्यानंतर खलिस्तानच्या  मागणीने पुन्हा डोके वर काढले. खलिस्तान समर्थकांची आंदोलने सतत सुरू आहेत. सर्व खलिस्तान समर्थक गट ट्रुड्रो यांच्या लिबरल पक्षाला पाठिंबा देतात. त्यामुळे कॅनडा सरकार त्यांच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करते. गेली अनेक वर्षे भारत कॅनडाला याबाबत बजावत आला आहे. पण व्यर्थ! यावेळी तर कॅनडा सरकारने संसदेत निवेदन करून भारतावर उगडउघड निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग होता असा आरोप केला आहे. म्हणूनच भारतानेही कठोर कारवाईला प्रारंभ केला. तेव्हा मात्र जस्टिन ट्रुडो यांचा सूर नरमलेला दिसतो. आम्हाला भारताबरोबर स्नेह आणि सहकार्याचे वातावरण हवे आहे, असा सूर ट्रुडो आळवू लागले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान सुनक आणि ट्रुडो यातही भारताबरोबरचे संबंध कसे सुधारतील याबाबत चर्चा झाली आहे. कॅनडाचे स्पीकर पी20 (जी20 अंतर्गत) च्या बैठकीसाठी भारतात येणार आहेत. पण मुख्य म्हणजे निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग होता याबाबतच्या कथित पुराव्यासंबंधात मात्र ते बोलायचे टाळततात. 

 जस्टिन ट्रुड्रो यांनी खलिस्तानवाद्यांचा अनुनय करण्याचे बाबतीत पित्याला मागे टाकले  आहे. जस्टिन ट्रुड्रो हे सुमार योग्यतेचे मानले जातात. मठ्ठ, जोकर, हलक्या कानाचे, अल्प बुद्धिमत्ता असलेले अशी विशेषणे राजकीय विश्लेषक त्यांच्यासाठी अनेकदा योजतात. अशा राष्ट्रप्रमुखाशी समजुतदारपणाने, मित्रभावाने व्यवहार करणे कठीणच आहे.

  फाईव्ह आईज 

  सद्ध्याची कॅनडाची जी अडमुठी भूमिका आहे, तिच्या मुळाशी असलेले कारण समजून घेण्याचीही आवश्यकता आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका या इंग्रजी भाषा बोलणाऱ्या पाच देशांनी आपापसात एक करार केला आहे. हा करार ‘फाईव्ह आईज इनटेलिजन्स अलायन्स’(एफव्हिइवाय) या नावाने ओळखला जातो. ‘एकमेकांना मिळणारी गुप्त माहिती परस्परांना कळवायची/एकमेकात वाटून घ्यायची ’, ही या करारातील मुख्य तरतूद आहे. निज्जरच्या हत्येत भारतीय यंत्रणांचा हात आहे, असे कॅनडाला म्हणे एकाने (अमेरिका?) कळविले आहे, यावर विसंबून जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर ठपका ठेवणारे भाषण केले, अशी कॅनडाची भूमिका आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन  हे देश कॅनडाची बाजू का घेतात, यामागे हे कारण आहे. परंतू  वस्तुस्थितीच वेगळी असल्यामुळे ही बाब गंभीर आहे. समजा कॅनडाजवळ काही माहिती असेलच तर या माहितीबाबत भारताशी योग्यस्तरावर चर्चा करून शंकानिरसन करून घेणे, हे एक मित्र देश या नात्याने कॅनडाचे कर्तव्य होते. पण असे न करता संसदेत भाषण करणे आणि भारताच्या वकिलातीतील एका अधिकाऱ्याला भारतात परत जाण्यास सांगणे हा काही याबाबतचा योग्य मार्ग नव्हता. भारताला ही बाब अतिशय लागली, याचे कारण अशा प्रकारच्या हत्या करणे हे भारताचे धोरण नाही. म्हणून भारताने ‘जशास तसे’ या न्यायाने कॅनेडियन वकिलातीतील एका अधिकाऱ्याला भारत सोडण्यास सांगितले आणि नंतर 41 अन्य अधिकाऱ्यांनीही भारत सोडून जावे असा आदेश दिला. भारत आणि कॅनडा या दोन देशातील वकिलातीत समसमान संख्येत अधिकारी राहतील, ही भूमिका अगोदरपासूनच भारताने घेतली आहे.  कॅनडाच्या वकिलातीत कितीतरी जास्त अधिकारी आहेत, ही बाब भारताने यापूर्वीही कॅनडाच्या निदर्शनाला आणली होती. 

    मूजोरी कायमच! 

  कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगणे, हे आम्हाला मान्य नाही, असे कॅनडाने आत्ता 12 ऑक्टोबरला पुन्हा म्हटल्याचे वृत्त आहे, हा मुद्दा ते इतर देशांसमोरही मांडीत आहेत. तर व्हिएन्ना कनव्हेंशनवर बोट ठेवत आपली भूमिका बरोबर असल्याचे भारताने ठासून सांगितले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, कॅनडा दहशतवादी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालतो आहे, ते थांबलेच पाहिजे. निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा सहभाग होता, हे आपण मोदींना दिल्लीत आल्यानंतर सांगितले होते, असे जस्टिन ट्रुडो आता म्हणत आहेत. हे वस्तुस्थितीला सोडून आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले होते. आपण नेमकी आणि घटनेशी संबंधित माहिती पुराव्यादाखल द्या असेही त्यांना बजावण्यात आले होत. पण असे काहीही न करता देशोदेशीच्या नेत्यांना निज्जरच्या हत्येत भारताचा हात होता असे सांगत सुटणे अत्यंत हास्यास्पद (अॅबसर्ड) आणि गैर आहे. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला, हे म्हणाले आहेत की, आपण काही मुद्दे कॅनडाच्या संसदेच्या स्पीकरसमोर उपस्थित करणार आहोत. पण स्पीकर रेमंड गॅगने यांनी पी20 परियदेला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे,असे वृत्त आहे. यावर टिप्पणी न करणेच बरे.

   देशात आणि पंजाबात खलिस्तानवाद्यांना शीख जनमताचा पाठिंबा नाही. पण एकटा एक उपद्रवी सुद्धा मोठाले उत्पात घडवून आणू शकतो. त्यासाठी संबंधित सर्व सुरक्षायंत्रणांना  डोळ्यात तेल घालून शोध घेणे सुरू केले आहे. त्यामुळेच कॅनडातील खलिस्तानवादी बिथरले आहेत आणि त्यांनी कॅनेडियन सरकारवर दबाव आणायला सुरवात केली आहे. त्यांना जपायचे की भारताबरोबरचे संबंध सुरळीत ठेवण्यासाठी कॅनेडियन खलिस्तान्यांना आवरायचे असा पेच आता कॅनडा  सरकार समोर उभा झाला आहे. याबाबत त्यांना आज ना उद्या निर्णय घ्यावाच लागणार आहे.  कॅनडाशी राजनैतिक पातळीवर सुरू झालेला लढा  कितीकाळ चालणार, हे यथावकाश कळेलच.  


Saturday, October 14, 2023

बेसावध इस्रायलवर हमासचा कुठाराघात!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


  इस्रायल हा मध्यपूर्वेतील एक चिमुकला देश असून तो भूमध्य समुद्र, लाल समुद्र, लेबेनॉन, सीरिया, जॅार्डन, पॅलेस्टिनियन प्रदेश (वेस्ट बॅंक), गाझा पट्टी, इजिप्त यांनी वेढलेला आहे. तेल अवीव हे आर्थिक व कारखानदारीचे केंद्र आहे. राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा इस्रायलने केली असली तरी त्याला जगाची मान्यता नाही. अनेक देशांच्या वकिलाती तेलअविव मध्येच आहेत.  ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म हा जगातील एक प्राचीन धर्म आहे. हा धर्म अनुसरणाऱे ते ज्यू किंवा यहूदी. ज्यू धर्माची स्थापना 3000 वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असे मानले जाते.  ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी एक मानला जातो. एका पाहणीनुसार 2010 मध्ये, जगामध्ये 1.43 कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी होते. म्हणजे जगात 0.2% लोक ज्यू आहेत. ]जगातील 41 % ज्यू हे अमेरिकेत राहतात तर 40 % ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये 76% ज्यू असून,  उरलेले बहुतेक इस्लामधर्मी आहेत. इस्रायलमध्ये फक्त ज्यूच राहतात, हा समज बरोबर नाही. अमेरिकेतील ज्यू श्रीमंत, कर्तबगार असून त्यांच्यातील अनेक शस्त्रास्त्रांशी संबंधित उद्योगात आहेत. अमेरिकन ज्यूंच्या प्रभावामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्यात घनिष्ट संबंध आहेत.

     इस्रायलचे मूळ रहिवासी ज्यूच! 

   आज भूतलावर ज्या जागी इस्रायल आहे, तो प्रदेश मुळात ज्यूंचा होता. ज्यू धर्म इसवीसनपूर्व काळापासून याच प्रदेशात अस्तित्वात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली. नंतर ख्रिश्चनांनी ज्यूंचे सक्तीने व धाक दाखवून धर्मांतर करण्यास सुरुवात केली. पुढे सहाव्या शतकात ख्रिश्चन असलेल्या रोमन साम्राज्याने आजचा इस्रायल जिंकून घेतला आणि ज्यूंना देशोधडीला लावले. कुठेही गेले तरी ज्यूंनी आपल्या धर्माचे कसोशीने पालन केले. आज मायभूमीत परतलेल्या ज्यूंना हिब्रूखेरीज ते इतकी वर्षे ज्या देशांत होते, त्या देशांची म्हणजे रशियन, जर्मन, आफ्रिकन, अरबी भाषा येतात. त्या त्या देशांच्या संस्कृतीचाही त्यांच्यावर प्रभाव आढळतो. असे असले तरी ते ज्यू धर्माचे कसोशीने पालन करतात.

   1948 साली जगाच्या नकाशावर इस्रायल नावाचा देश अस्तित्वात आला. इजिप्त, इराक, लेबनॉन, सौदी अरेबिया, जॉर्डन आदी अरब देशांनी इस्रायलचे  अस्तित्वच नाकारले. हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच लहान आहे. त्याचे क्षेत्रफळ पक्त 22,770 चौरस किमी आहे. अरब देशांनी या चिमुकल्या इस्रायलला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण व्यर्थ! इस्रायल टिकून आहे, सन्मानाने मान वर करुन उभा आहे.  1948 पासून इस्रायलला अमेरिकेचाही पाठिंबा मिळत आलेला आहे. अमेरिका इस्रायलला शस्त्रे विकते आणि  आर्थिक मदतही देते. जगात इस्राईलने चौफेर प्रगती करून आज स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. इस्रायलला आपल्या गुप्तहेर यंत्रणेचा सार्थ अभिमान आहे. देशांतर्गत गुप्तहेर यंत्रणा ‘शिन बेट’ या नावाने तर आंतरराष्ट्रीय यंत्रणा ‘मोसाद’ या नावाने सर्वज्ञात आहे. पण 7 ॲाक्टोबर 2023 ला हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा तिला सुगावाही लागू नये, ही आश्चर्यकारक घटना घडली  आणि इस्रायलचे जगभर हसे झाले. विशेष असेही आहे की, अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेलाही काहीतरी विपरित घडणार आहे, हे कळले नाही. आयर्न डोम शील्ड ही संरक्षण यंत्रणा भेदून दहशतवादी हमासचे सैनिक सीमा ओलांडून आत इस्रायलमध्ये  आले. इस्रायलवरील हल्ल्यात हमासचे 30 ते 40 हजार दहशतवादी सहभागी झाल्याचे म्हटले जाते. असे असले तरी सद्ध्या सुरू असलेले युद्ध इस्रायल जिंकेल यात शंका नाही. पण त्याने झालेली बेअब्रू आणि फजिती कधीही विस्मृतीत जाणार नाही.

                 पूर्वेतिहास

  पॅलेस्टाईन या नावाने ज्या भूभागाचा बोध होत असे तो प्रदेश पश्चिम आशियात असून तो लेबॅनॅान, सीरिया, ट्रान्स जॅार्डन, आणि इजिप्त या देशांनी वेढलेला आहे आणि उरलेला भाग भूमध्य समुद्राला लागून आहे. 1947 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या योजनेनुसार या भूभागाची मुलखावेगळी फाळणी करण्यात आली. विखुरलेल्या अरबबहुल भागांना पॅलेस्टाईन आणि तशाच ज्यूबहुल भूभागांना इस्रायल हे नाव दिले गेले. तसेच जेरुसलेम या शहरावर मात्र आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे, असे ठरले. कारण एकतर ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांची पवित्र स्थळे जेरुसलेममध्ये आहेत म्हणून आणि दुसरे म्हणजे, जेरुसलेममध्ये ज्यू, ख्रिश्चन  आणि अरब यांची संख्या जवळजवळ समसमान असल्यामुळेही जेरुसलेमबाबत असा वेगळा निर्णय केला गेला. 1947 च्या युनोने प्रसिद्ध केलेल्या नकाशांमध्ये ज्यूबहुल खंडित इस्रायल आणि अरबबहुल पॅलेस्टाईन आणि आंतरराष्ट्रीय नियंत्रित जेरुसलेम दाखवले आहेत. अरबबहुल पॅलेस्टाईनमधील वेस्ट बॅंक (पश्चिम किनारा) आणि गाझा पट्टी हे दोन विलग प्रदेश मिळून पॅलेस्टाईन तयार झालेले दिसतात.   जन्मल्या जन्मल्याच संकट  

   ही व्यवस्था ज्यूंनी स्वीकारली पण अरब राष्ट्रांनी ती फेटाळली. संयुक्त राष्ट्रांनी ही घोषणा करताच इजिप्त, सीरिया, इराक, ट्रान्स जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. नुकत्याच जन्मलेल्या इस्रायलने बहाद्दुरी दाखवीत या सर्व देशांना हकलून तर लावलेच शिवाय त्यांच्याकडील काही जमीनही हिसकावून घेतली. ही जिंकलेली जमीन त्यांच्या वाट्याला आलेल्या मूळ भूभागापेक्षाही जास्त होती. या युद्धानंतर  इस्रायलचे क्षेत्रफळ दुप्पट आणि आकार पुष्कळसा सलग झाला. या युद्धाच्या काळात लाखो अरब लोकांनी पलायन केलं आणि आजूबाजूच्या अरब देशांमध्ये आश्रय घेतला. याचवेळी गाझावर इजिप्तने ताबा मिळवला तर पश्चिम किनाऱ्यावर (वेस्ट बँकवर) जॉर्डनने कब्जा केला, मात्र पॅलेस्टाईनचा उरलेला जवळजवळ सर्व भाग  इस्रायलच्या ताब्यात आला. 

     1967 मधील इस्रायलचा अपूर्व पराक्रम 

    सीरिया, जॅार्डन आणि इजिप्त यांनी 1967 मध्ये पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला. या 6 दिवसांच्या युद्धातही इस्रायलने ब्रिटन आणि फ्रान्स या मित्रांच्या साह्याने या तिन्ही देशांना धोबीपछाड दिली. इजिप्तकडून गाझापट्टी आणि सिनाई वाळवंट जिंकून घेतले. सीरियातील गोलन हाईट्स या सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या उंच टेकड्या ताब्यात घेतल्या. शिवाय जॅार्डनला वेस्ट बॅंकमधून हकलून लावले. पुढे मात्र फक्त सिनाई वाळवंटच इस्रायलने इजिप्तला परत केले.  

        1978 चा कॅंप डेव्हिड करार 

  या नंतरही  इस्रायलवरचे शेजारच्या देशांकडून होणारे हल्ले काही थांबत नव्हते. 1973 मध्येही इजिप्त आणि सीरियाने इस्रायलवर हल्ला केला. पण व्यर्थ!  मात्र या निमित्ताने एक चांगली गोष्ट घडून आली ती अशी की, इजिप्त आणि इस्रायल यांच्यात युद्धानंतर संवाद घडून आला आणि इजिप्तने म्हणजे पहिल्या अरब देशाने इस्रायलला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तर इस्रायलनेही इजिप्तचा हिसकावून घेतलेला भाग परत केला. 1978 च्या कॅम्प डेव्हिड करारानुसार हे घडून आलं. पण खुद्द इजिप्तने  इस्रायलला मान्यता दिल्यामुळे संतापाची लाट उसळली आणि  पुढे तर इजिप्तच्या राष्ट्रपतींची  हत्याही करण्यात आली. इस्रायल कुणालाही हार जात नाही याची तीन ते चारदा खात्री पटल्यामुळे इराण, तुर्कस्तान आणि आता लेबॅनॅान वगळता अन्य अरब देशांनी वरवर शांत राहण्याचे ठरविले.  पण त्यांच्या कुरापती चालूच राहिल्या.

      अंतर्गत संघर्षाला प्रारंभ आणि ओस्लो करार

 बहुतेक अरब देशांकडून होणारे  बाहेरचे हल्ले थांबले, हे  इस्रायलचे मोठेच यश होते. पण आता अंतर्गत संघर्षाला प्रारंभ झाला. पॅलेस्टाईनचे जे जे भाग इस्रायलने जिंकून घेतले होते, त्या भागातील अरबांनी उठाव केला. त्यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ॲार्गनायझेशनची (पीएलओ) स्थापना केली. सशस्त्र संघर्ष करून पॅलेस्टाईनमधील त्यांच्यामते मूळनिवासी असलेल्या अरबांच्या हक्कांचे रक्षण करायचे  एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. इथे एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा आहे, तो हा की, पॅलेस्टाईन लिबरेशन ॲार्गनायझेशन (पीएलओ) इस्रायलमध्ये राहणाऱ्या अरबांच्या हक्कांसाठी भांडत होती. ते हक्क अरबांना मिळत असतील तर तिचा इस्रायलला फारसा विरोध नव्हता. 

  1993 साली अमेरिकेने इस्रायल आणि पीएलओ यात ओस्लो शांतता करार घडवून आणला. या करारानुसार इस्रायल आणि पीएलओ यांनी एकमेकांच्या काही मागण्या मान्य केल्या आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

हमासचा उदय आणि संघर्षाचे बदललेले स्वरुप

‘हमास’ची स्थापना 1987 साली गाझा पट्टीत झाली. पॅलेस्टिनी धर्मगुरू शेख अहमद यासिनने हमासची स्थापना केली. इराण, सीरिया आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाचे अनुयायी एकत्र आले आहेत.  हमासही या त्रिकुटात सामील झाला आहे.  हे तीन देश मात्र स्वत: नामानिराळे राहून यांना सर्वतोपरी मदत करीत असतात.  हमास  स्वत:ला मुस्लीम ब्रदरहुडची राजकीय शाखाही म्हणवतो.  ‘हमास’चा अर्थ ‘इस्लामिक प्रतिकार चळवळ’ असा आहे. हमासला इस्रायल नष्ट करायचे आहे.  पॅलेस्टाइनमध्ये कडव्या इस्लामिक राष्ट्राची स्थापना करायची आहे. इस्रायलच्या ताब्यातला पॅलेस्टिनी प्रदेश मुक्त करायचा आहे. या गटाचे सुमारे 365 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या गाझा पट्टीवर राजकीय नियंत्रण आहे. गाझा पट्टी ची लोकसंख्या सुमारे 23 लाख इतकी आहे. इस्रायलने आता हमासला कोणत्याही वस्तूचा पुरवठा होणार नाही, अशी व्यवस्था  केली आहे. अन्न, पाणी आणि औषधे गाझा पट्टीत पाठवू द्या अशी विनंती रेड क्रॅासने केली आहे. अमेरिकेने इतर राष्ट्रांनी हमासला मदत करू नये,अशी जणू ताकीदच हिली आहे. इस्रायलने मात्र लेबॅनॅान आणि सीरियावर रॅाकेट्स डागली असून सीरियातील दोन विमानतळांवर रॅाकेट डागली आहेत. त्याचवेळी इराणचे विदेश मंत्री दमास्कस विमानतळावर उतरणार होते. पण ते विमानतळावर न उतरता आल्या पावली परत फिरले आहेत. वेळेचा नेमकेपणा हा योगायोग समजावा की कसे? एक गोष्ट नक्की आहे की इराणचे विदेशमंत्री हवापाण्याच्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच आले नसणार.  युद्धाच्या कक्षा वाढणार असतील तर वाढू देत, असे तर इस्रायलला सुचवायचे नसेल ना? हमासला इस्रायल, अमेरिका, युरोपीय महासंघ, कॅनडा, इजिप्त आणि जपान आदींनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. भारताने इस्रायलवरील हमासच्या आक्रमणाला ‘दहशतवादी हल्ला’,असेच संबोधले आहे आणि इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला आहे. भारताने योजलेला शब्दप्रयोग नोंद घ्यावा असा आहे. अशाप्रकारे अनेक देशांनी दहशतवादी ठरविलेल्या हमासची विचारधारा पीएलओपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. हमासला इस्रायलचे अस्तित्वच मान्य नाही. हे लोक धर्मग्रंथांना शब्दश: मानणारे कडक सनातनी आहेत. स्थानिक निवडणुकीत उतरून पूर्ण गाझापट्टीवर आणि इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बॅंकमधील अनेक ठिकाणी हमासने स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा मिळवला आहे. यांना ओस्लो करार अमान्य असून त्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचा विडाच उचलला आहे. सहाजीकच तसाच निश्चय इस्रायलनेही हमासबाबत केला आहे. आजवर हमास गनिमी काव्याने लढत असे. यावेळी तसे न करता एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण करावे तशी पद्धत हमासने  स्वीकारलेली दिसते. कुणी सांगावे, कदाचित या नंतरची इस्रायलवरील आक्रमणे याच पद्धतीची असतील. असे झाल्यास मध्यपूर्वेतील युद्धतंत्र वेगळ्याच स्वरुपात पुढे येईल.  या मुद्याचीही नोंद घेतली पाहिजे.

वेस्ट बॅंकची आजची स्थिती 

   सध्या वेस्ट बॅंकवर जरी आज इस्रायलचा ताबा असला, तरी फक्त 42 टक्के भागावरच इस्रायलला मान्य असलेल्या पॅलेस्टेनियन ॲथॅारिटीचा अंमल चालतो. पण उरलेल्या 58 टक्के भागात इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसलेल्या हमासचाच वरचष्मा आहे आणि 40x10 चौरस किमी क्षेत्रफळाची गाझा पट्टी तर पूर्णपणे हमासच्याच ताब्यात आहे. काही वर्षांपूर्वीही या गाझा पट्टीतच  टोकाचा संघर्ष सुरू झाला.  इराणच्या न्युक्लिअर प्रकल्पांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराण खूपच भडकला. 2022 मध्ये जेरुसलेममधील धार्मिक संघर्षाचे निमित्त मिळताच इराणच्या चिथावणीला बळी पडून हमासने इस्रायलवर अचानक रॅाकेट हल्ला सुरू केला पण तेव्हाही हमासला याची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. इस्रायलने हा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा हेतू समोर ठेवून कृती केली होती असे दिसते आहे. इस्रायलच्या आयर्न डोम शील्डने हमासची मनुष्यवस्तीवर पडू शकणारी बहुतेक रॅाकेट्स हवेतच निष्प्रभ केली होती. गाझा पट्टीतील महत्त्वाची सैनिकी केंद्रे इस्रायलने मनुष्यहानी टाळण्यासाठी पूर्वसूचना देऊन मगच नष्ट केली. याला अपवाद आहे तो नागरी वस्त्यांची ढाल करून रॅाकेट डागणाऱ्या हमासच्या सशस्त्र केंद्रांचा!

   जेरुसलेमचा तिढा 

   जेरुसलेम शहरात ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांची समसमान संख्या आणि महत्त्वाची धार्मिकस्थळे आहेत. 2020 ते 2022 च्या सुमारास मध्ये इस्रायलने हे संपूर्ण शहर नियंत्रणाखाली घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद आणि स्थानिकस्तरावर गृहयुद्ध, सुरू झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या 1947 च्या करारानुसार, जेरुसलेम हे शहर इस्रायलला देण्यात आले नव्हते. आतातर इस्रायलने राजधानीही तिथेच नेली आहे. पण अमेरिका वगळता इतर सर्व देशांच्या वकिलाती मात्र अजूनही तेल अविव मध्येच आहेत. 

  विस्थापितांना परत घेण्यास नकार का म्हणून?

   देश सोडून गेलेल्या लाखो मुस्लिमांना इस्रायलमध्ये परत घेतले जावे अशी मागणी आज ना उद्या पुढे येईलच. इस्रायलची आजची लोकसंख्याच मुळी  90 लाख आहे, त्यात या मुस्लिमांना प्रवेश दिला तर ज्यू आणि मुस्लिम यातील संख्येच्या प्रमाणात होणारा बदल ज्यूंसाठी खूपच त्रासदायक ठरेल. आजच इस्रायलमध्ये 21 टक्के मुस्लिम आहेत. त्यात ही भर, म्हणजे विचारायलाच नको. त्यामुळे या प्रश्नी तडजोडीची शक्यता मुळीच दिसत नाही. इस्रायलचा ताबा असलेल्या वेस्ट बॅंकमध्ये अनेक छोटी स्थाने अशी आहेत की, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हमासचे प्रतिनिधी निवडून आले आहेत. नकाशात ही स्थाने ठिपक्यात दाखविली आहेत. तिथेही कटकटी, भांडणे आणि चकमकींच्या स्वरुपात गृहयुद्ध सुरू आहे. हमासने काढलेल्या कुरापतीमुळे गाझामध्ये सध्याचा भडका उडाला आहे. तेल उत्पादनक्षेत्राजवळील हा संघर्ष पुन्हा तेल भाववाढीचे संकट निर्माण करू शकेल. म्हणून विचारसरणी जपणारे या नात्याने हमासला किंवा इस्रायला पाठिंबा देणारे असोत वा हितसंबंधांवर नजर ठेवून हमासची किंवा इस्रायलची पाठराखण करणारे असोत, या सर्वांनाच हा संघर्ष लवकर संपायला हवा आहे. पण उद्या संघर्ष शमला तरी जेरुसलेम, वेस्ट बॅंक आणि गाझा पट्टी हे समिश्र लोकसंख्या असलेले भाग धुमसतच राहणार आहेत. पुढेमागे संघर्षविराम करावाच लागला तर त्यापूर्वीच प्रतिपक्षाचे जास्तीतजास्त नुकसान करण्याचा दोन्ही पक्षांचा विचारही स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे आता संघर्ष थांबावा, निदान विस्तृत युद्धात परिवर्तित होऊ नये आणि  जागतिकस्तरावर झालेले तडजोडीचे प्रयत्न यशस्वी व्हावेत, असा मध्यममार्गी विचार पुढे केला जात आहे. 

इस्रायलमधील भारतीय

आज  भारताचे अंदाजे १८ हजार नागरिक इस्रायलमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. यातील साधारण १४ हजार भारतीय नागरिक हे इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून नोकरी करतात. वृद्ध तसेच इतर लोकांची काळजी घेण्याची या रुग्णसेवकांची जबाबदारी असते. इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविकेला साधारण प्रतिमहिना 1.25 लाख रुपये पगार मिळतो. यासह जेवणाची, राहण्याचीही व्यवस्था केली जाते. तसेच रुग्णसेवकाला इतर आरोग्यविषयक सुविधाही पुरवल्या जातात. या18000 भारतीय नागरिकांपैकी ज्यांना भारतात परत यायचे असेल त्या परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन ‘अजय’, सुरू केले आहे.  

इस्रायलप्रश्नी कुणाची साथ कुणाला

   अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने मंगळवारी 10 ऑक्टोबरला  ऑक्टोबरला संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इस्रायलला पाठिंबा दिला आहे. भारतानेही इस्रायलला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.  एक सार्वभौम देश आणि एक दहशतवादी संघटना यांच्यात कुणाची बाजू घ्यायची याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत स्वत: अशा दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरला आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्रांचीही मदत देण्यास सुरवात केली आहे. 

इराण, सौदी अरेबिया, येमेन,  लेबॅनॅान, कतार यांनी इस्रायल पॅलेस्टाइनींवर अन्याय करीत असल्याचा आरोप ठेवीत इस्रायल विरोधीभूमिका घेतली आहे. खरेतर इस्रायलचा आणि ज्यूंचा द्वेष करण्याचे इस्लामी देशांनी सोडून देऊन सहअस्तित्वाला मान्यता द्यावयास हवी आहे  हीच भूमिका इस्रायलचीही असायला हवी होती पण जगातील  शीतयुद्धांची जागा प्रत्यक्ष युद्धे  घेत आहेत, असे चित्र उभे होते आहे.  अशा युद्धांचा परिणाम दोन्ही पक्षांच्या विनाशातच होणार हे मानवाला कळायला खूप वेळ लागतो आहे

    हमासची आश्चर्यकारक धडक

  अभेद्य संरक्षक भिंत हमासने कशी भेदली याबाबत अनेक अंदाज व तथ्ये समोर येत आहेत आणि कदाचित पुढेही येत राहतील. इस्रायलच्या इतिहासात शनिवार 7 ऑक्टेबर 2023 हा दिवस काळ्या अक्षरात लिहिला जाईल. सीमेवरची तटबंदी भेदून आणि आकाशातील अभद्य आयर्न डोमला न जुमानता  हमासने इस्रायलवर हल्ला या दिवशी केला आहे. इस्रायची प्रचंड जीवित हानी आणि वित्त हानी या निमित्ताने झाली आहे. गेले दहा महिने नेत्यानाहू सरकार इस्रायली जनतेचा असंतोष शमवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्याप्रयुक्त्या योजण्यातच गुंतले होते. जनतेबरोबर देशातील सैन्यदलांनाही सरकारची लोकशाहीविरोधी भूमिका 

अमान्य होती. सामान्यत:   एवढी टोकाची भूमिका सैन्यदले घेत नाहीत. न्यायपालिकेच्या अधिकारांवर मर्यादा घालण्याची सरकारी कृती सैन्यदलांनाही सहन होत नव्हती. हमासने ही संधी साधून हल्ला केला, असे एक मत आहे. हमासचा हल्ला प्रामुख्याने दक्षिण इस्रायलमध्ये झाला आहे. इस्रायली गुप्तहेर व्यवस्थेला याची चाहूलही लागली नाही, हे एक विदारक सत्य आहे. त्यातून हा भाग अशांत गाझा पट्टीला लागून आहे, हे विशेष. ड्रोन्स, सॅटलाईट, बलून्स, यातील कॅमऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून हमासची गेले काही महिने सुरू असलेली तयारी टिपली जात नाही, याला काय म्हणावे? हमासने योम किपूर या महोत्सवाचा मुहूर्त निवडला, हे खरे आहे. पण म्हणून इतका बेसावधपणा समर्थनीय ठरू शकत नाही. अचूक माहिती नसेल तर बिनचूक व योग्य कृतिपर राजकीय निर्णय घेता येणे अशक्यप्राय आहे. खरेतर इस्रायली गुप्तहेर खाते अख्या जगात वाखाणले जाते. तरी एवढा बेसावधपणा? लेबॅनॅानमधील इराणची मदत आणि चिथावणी असलेला  हिजबुल्ला गट दुसरी आघाडी उघडतो आहे. म्हणजे आता दोन आघाड्यांवर लढावे लागणार त्याचे काय? तरीही इस्रायलच जिंकेल यात शंका नाही. ‘पर बुंदसे गईना!’,असे डाग पुसायला कठीण असतात.

 हमासला चिथवणारे कोण? आणि कोण कोण?

या हल्ल्यामागे इराणची चिथावणी तर आहेच. अशी संधी इराण बरी सोडेल? इराणला इस्रायल बरोबरचे अनेक जुने हिशोब चुकते करायचे आहेत. चीन आणि रशियाने निरपराध नागरिकांच्या मृत्यूबदल दु:ख व्यक्त केले आहे. संघर्ष थांबवा, असे आवाहनही केले आहे. पण हमासबद्दल एक शब्दही उच्चचारलेला नाही. यावर टिप्पणी करायलाच हवी का? युक्रेनच्या सोबतीने आणखी एक आघाडी उघडली गेली तर रशियाला ते हवेच आहे. पाश्चात्यांची मदत आता युक्रेन आणि इस्रायल यात विभागली जाईल. चीनला तैवानवर ताबा मिळवायचा आहे. अमेरिका तैवानच्या पाठीशी उभी आहे, ही चीनची मुख्य अडचण आहे. आता अमेरिकेची मदत तैवान, युक्रेन आणि इस्रायल यात विभागली गेली तर ते चीनला नको असेल होय?

 नवीन मध्यपूर्व उभारण्याच्या प्रयत्नांना खीळ 

मध्यपूर्वेतील अशांतता दूर व्हावी, इस्रायल आणि अरब राष्ट्रे यात समेट घडवून आणावा यासाठी पाश्चात्यांचे विशेषत:  अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यशही येत चालले होते. सौदी अरेबिया समेटासाठी तयार होत होता. आता तो इस्रायलसोबत मैत्री करण्यास अनुकूल राहील का? इतर अरब राष्ट्रेही बिचकणार नाहीत का? अरबांसोबत यापूर्वी झालेल्या मैत्रिकरारांनाही या हल्ल्याची झळ लागणार नाही का? चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या सारखा एक जमीन, जल आणि वायूमार्ग यांचा उपयोग करून भारत, आखाती देश आणि युरोप जोडले जाणार आहेत. जी20च्या दिल्ली बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाबाबत सहमती झाली होती. यात इस्रायल आणि जॅार्डनही असणार होते. आता ते सहमत होतील का? हमासने इस्रायली नागरिक सैनिक, विशेषत: महिला आणि मुले यांना ओलिस म्हणून नेले आहे. हल्ला कराल तर यांना ठार मारू, अशी धमकी हमासने दिली आहे. हा मुद्दा प्रतिहल्ला करतांना इस्रायलला विचारात घ्यावा लागणार नाही का?

  हा हल्ला होताच सर्व शेअर बाजार गडगडले. अगोदरच जगभर मंदीचे वातावरण आहे. हमास आणि इस्रायलमधला संघर्ष म्हणजे दुष्काळातला तेरावा महिनाच ठरणार आहे. या युद्धात उद्या इराणने उडी घेतली तर अमेरिकेला इस्रायलच्या बाजूने प्रत्यक्ष संघर्षात उतरावेय लागेल. अशा परिस्थितीत तिसरे महायुद्ध कितीसे दूर असेल?

Monday, October 9, 2023

                                       निज्जरचा मारेकरी कोण?

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक १०/१०/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो

निज्जरचा मारेकरी कोण?

लेखांक२ रा

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

निज्जरचा मारेकरी कोण?

    खलिस्तानवादी चळवळीचा एक नेता हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाली. ही हत्या एकतर आपापसातील वैमनस्यातून तरी झाली असावी किंवा तो टोळीयुद्धातला एक टप्पा तरी असावा. टोळ्यांमध्ये हे असे प्रकार अधूनमधून होत असतात. अशाप्रकारे अनेकदा दोन टोळ्याच एकमेकींना संपवतात सुद्धा! एक मात्र नक्की की, याचा भारताशी काहीही संबंध नाही. भारतात अनेक उत्पात घडवून आणणारा  हरदीपसिंग निज्जर याला कॅनडाने काही वर्षांपूर्वीच नागरिकत्व बहाल केलेले होते. तर इकडे भारतात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते आणि तो भारतालाही हवा होता. त्याला कायदेशीर मार्गाने भारतात आणून त्याच्यावर रीतसर व कायदेशीर मार्गाने शिक्षा करण्यासाठीच्या हालचाली  भारताने सुरू केल्या होत्या. पण त्याची अशाप्रकारे मारेकऱ्याकरवी हत्या करणे भारताला साफ नामंजूर असून तसे भारताचे धोरण नाही. पण या हत्येशी भारताचा संबंध जोडून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठविण्याचा निर्णयही घेतला. याचे कारण काय ? तर आपल्या सेवाकाळात हा अधिकारी भारताची गुप्तहेर  संघटना रॅा मध्ये काही काळ काम करीत होता म्हणून! भारताने कॅनडाचा हा आरोप फेटाळून तर  लावलाच,  शिवाय प्रत्युत्तरादाखल कॅनडाच्याही एका राजनैतिक अधिकाऱ्यास पाच दिवसांत देश सोडून जाण्यास सांगितले. तेव्हापासून भडकलेले  हे प्रकरण दिवसेदिवस पेटतच चालले असून आता चीन आणि पाकिस्तान या भारताच्या  वैऱ्यांच्या रांगेत कॅनडाही जाऊन बसतो की काय असे वाटू लागले आहे.

  कॅनेडियन पंतप्रधानांचा बेजबाबदार आरोप 

   भारताला सतत उपद्रव देणाऱ्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना कॅनडा कायमच आश्रय देत आलेला आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंध पूर्वीपासूनच काहीसे तणावाचेच राहिले आहेत. आताच्या आततायी कृतीने तर त्या देशाने भारतासोबतचे संबंध पार बिघडवून टाकले आहेत. याचा परिणाम म्हणून भारत-कॅनडा यांच्यात होऊ घातलेली मुक्त व्यापार करारावरील चर्चाही भारताकडून स्थगित करण्यात आली आहे.

 कॅनडा हा शिखांची वस्ती असणारा सगळ्यांत मोठा देश आहे. लाखो शीख तेथे पिढ्यानुपिढ्या राहतात आणि आज कॅनडाचे अर्थकारण, राजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी यात शिखांचा फार मोठा सहभाग निर्माण झाला आहे. कॅनडामधील राजकीय पक्ष आणि नेते यांना तेथील शिखांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात, त्यांचे म्हणणे ऐकावेच लागते,  त्यांचे मत दुर्लक्षून  राजकारणात काहीच करता येणार नाही कारण एक जबरदस्त मतपेढी शिखांनी उभी केली आहे. 

हरदीपसिंग निज्जर

   आत्ता ज्या व्यक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे तो हरदीपसिंग निज्जर हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख होता. भारताच्या दृष्टीने तो फक्त एक दहशतवादी होता. भारतीय तपास यंत्रणांनी त्याची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अशा या निज्जरची 18 जून 2023 रोजी व्हँकुअरचे उपनगर सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या बाबत तपास चालूच आहे. तो संपलेला नाही. मात्र, या हत्या प्रकरणात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. कोणताही पुरावा नसताना ट्रुडो यांनी या हत्येचे खापर भारतावर फोडणे, योग्य नव्हते. कॅनडा सरकारकडे अशा स्वरुपाचे काही पुरावे असतीलच तर ते त्याने भारत सरकारकडे आधी सोपवायला हवे होते. तसे न करता ट्रुडो जाहीरपणे का बोलले? पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि सद्ध्याचे भाजपनेते अमरिंदर सिंह यांच्या मते  यामागे कॅनडामधील राजकारण आहे. भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर एका वर्षाने 2025 मध्ये कॅनडात निवडणुका होऊ घातल्या आहेत. ट्रुडो यांना आता सत्तेत येऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्यांना आता स्पष्ट, निर्विवाद बहुमत मिळणार नाही, असा राजकीय पंडितांचा कयास आहे. अशा वेळी श्रीमंत, प्रभावी आणि बलदंड शीख समुदायाची मतपेढी  आपल्यासोबत असावी, असे ट्रुडो यांना वाटते आहे.  त्यामुळे त्यांनी भारतविरोधी आणि शिखांना खूश करतील अशी विधाने  बेछूट  असली तरी केली असणार यात शंका नाही. 

 शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांची घुसखोरी 

   भारतात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात काही कॅनेडियन शिखांनी स्थानिक शिखांना भरपूर मदत केली होती. एवढेच नव्हे तर कॅनडा सरकारने घेतलेली भूमिकाही कॅनेडियन शिखांसारखीच  संशयास्पद होती. आणि दिल्लीच्या सीमेवरील तंबूंमध्ये घुसलेल्या खलिस्तानी समर्थकात कॅनेडियन खलिस्तानी शीखही होते.  निज्जर आणि इतरही अनेकांनी तेव्हा या आंदोलनात चिथावणीखोर भूमिका वठवली होती. या सर्व आंदोलकांना आणि कॅनडात राहून उघडपणे खलिस्तानवादी संघटना चालविणाऱ्यांना, भारताचा मित्र या नात्याने  कॅनडा सरकारने प्रतिबंध करायला हवा होता. या उलट कॅनडा सरकार त्यांची वकिली करीत होते. कॅनडा आणि भारत यांच्यातील या संघर्षाचा आर्थिक परिणाम काय होतो हे भविष्यात दिसेलच. जी-20  परिषदेसाठी ट्रुडो राजधानीत आले, तेव्हा त्यांनी भारताला न आवडणारी काही विधाने केली होती. मसूर डाळींबाबत भारतात पडणारी तूट कधी कधी कॅनडा भागवतो. दोन लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडातील अनेक विद्यापीठांमध्ये शिकत आहेत. लाखो भारतीय कुटुंबे कॅनडाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांच्यासारखे पोरकट नेते हे संबंध गेली अनेक वर्षे क्रमाक्रमाने बिघडवत आले आहेत. मात्र, यातून जगातील काही देशांमध्येच नाहीत तर  भारतातही खलिस्तानी कट्टरवाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतांना दिसत आहेत.  भारत हे मुळीच खपवून घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी कॅनडा सरकारला हे समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याला दुसरा काहीही पर्याय दिसत नाही. 

  पंजाबमधून पूर्वीपासूनच कॅनडात स्थलांतर होत आले आहे. कॅनडात शीख समुदायाची संख्या मोठी आहे आणि आता तेथे हा एक प्रभावी समाजघटक ठरला आहे. इतकेच काय, कॅनडाच्या पंतप्रधानपदी लवकरच शीख व्यक्ती दिसू शकेल, असेही काही निरीक्षक म्हणतात. जालंदर येथे जन्मलेला हरदीप निज्जर 1997 मध्ये कॅनडाला गेला. तिथे तो सुरुवातीला प्लंबर म्हणून काम करायचा. तिथे त्याचा संबंध ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानवादी संघटनेशी आला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स, अर्थात ‘आयएसआय’ने सुरुवातीपासूनच ‘बब्बर खालसा’ला बळ दिले आहे. तर भारताने ‘बब्बर खालसा’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून तिच्यावर बंदी घातली आहे. हरदीप नंतर ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख बनला. व्हॅँकुअरचे उपनगर असलेल्या सरे येथील गुरुद्वारात राहून तो भारतविरोधी कारवाया करायचा. अगदी अलीकडे तो या गुरुनानक गुरुद्वाराचा प्रमुख म्हणून निवडूनही आला होता. एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. 18 जून रोजी याच गुरुद्वाराच्या दारात अज्ञात मारेकऱ्यांनी निज्जरची गोळ्या घालून हत्या केली. त्याचे खापर कॅनडा भारतावर फोडतो आहे. एक मित्रराष्ट्र या नात्याने कॅनडाची ही भूमिका निषेधार्य आहे.


Monday, October 2, 2023

 पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक ०३/१०/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )


    1940 मध्ये मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी  करण्यात आली. हिंदूंसाठी  हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान असे दोन देश झाल्यास शिखांना स्वतंत्रस्थान कुठेच मिळणार नाही, अशी भावना शिखांमध्ये निर्माण झाली. म्हणून शिखांचेही स्वतंत्र राष्ट्र असले पाहिजे अशी मागणी करण्यास शिखांनी सुरवात केली. 1940 मध्येच डॉ. वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली. त्यांना यापासून परावृत्त करण्याच्या हेतूने स्वतंत्र भारतात शीख समुदायाला अर्ध-स्वायत्तता देण्याची ग्वाही महात्मा गांधी यांनी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही 1946 च्या कलकत्त्याच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हीच भूमिका कायम ठेवली. त्यामुळे स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा तेव्हा काहीसा मागे राहिला.

  पण पुढे  एका पत्रकार परिषदेत नेहरू यांनी या भूमिकेत बदल केला आणि त्यामुळे शीख समुदाय नाराज झाला. हिंदूंच्या राज्यात आपल्यावर अन्याय होईल, ही  भीती शिखांच्या मनात निर्माण झाली. खलिस्तानचा प्रश्न अशाप्रकारे नव्याने निर्माण झाला, असे काहींचे मत आहे. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 

प्रचंड रक्तपातासह 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. 1966 मध्ये पंजाबची स्थापना झाल्यावर अकाली दलाच्या नेत्यांनी खलिस्तानची मागणी पुढे केली. इंग्लंडमधील चरणसिंह पंथी आणि आणि डॉ. जगजित सिंह चौहान यांनी सत्तरच्या दशकात ही मागणी केली होती. 

डॉ.चौहान सत्तरच्या दशकात ब्रिटनमध्ये राहत असत आणि अमेरिका आणि पाकिस्तानला भेटी देत असत. काही तरुणांनी 1978 मध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी ‘दाल खालसा’ या पक्षाची स्थापना केली होती. 

1955 मध्ये हरमंदिर साहिब म्हणजेच अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई झाली. या कारवाईमुळे शिखांच्या अस्मितेला धक्का पोहोचला, असे इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन यांचे मत आहे.

   1973 मध्ये आनंदपूरला साहिब शिरोमणी अकाली दलाने एक ठराव मंजूर केला त्यानुसार शीख धर्माला एक वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हिंदू धर्मापासून शीख धर्म वेगळा करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. याच बरोबर केंद्र-राज्य संबंधाचा पुनर्विचार करून घटनेत  राज्याला जास्त अधिकार मिळावेत अशीही मागणी करण्यात आली होती. पुढच्या काळात अनेक  संस्था खलिस्तानच्या समर्थनासाठी उभ्या राहिल्या पण यथावकाश बहुतेक अस्तंगतही झाल्या. 

  नंतर स्वतंत्र खलिस्तानच्या चळवळीत 1970 च्या दशकात जर्नैलसिंग भिंद्रनवालेचा उदय झाला. अकाली दलाचा पंजाब मधील प्रभाव कमी करण्यासाठी कॅांग्रेसनेच भिंद्रानवाले याला उभे केले होते. पण पुढे तोच कॅांग्रेसच्याही विरोधात गेला, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या घटनेला ‘नवीन भस्मासुराच्या जन्माची कथा’,  असे काही  संबोधतात.  भिंद्रानवाले तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. त्याने खटपटी लटपटी करून थेट सुवर्ण मंदिरातच आपले बस्तान ठेवले. 

  1970 ते 1980च्या दशकात पंजाबात हिंसक कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. यामागे भिंद्रनवाले यांचा हात होता, असे म्हटले जात होते. ते उगीच नव्हते. याच काळात पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या झाली. निरंकारी समाजाच्या लोकांवर हल्ले होऊ लागले. पंजाबात प्रचंड  अस्थिरता निर्माण होणार, अशी चिन्हे दिसू लागली. त्यातही फक्त हिंदू समाजावरच नव्हे तर  सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या  शिखांवरही हल्ले होत.  

ऑपरेशन ब्लू स्टार 

   परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं बघून भारत सरकारने लष्कराची मदत घेत ऑपरेशन ब्लू स्टार आखून  या मोहिमेत सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवले गेले. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्यांचे अनेक अनुयायी मारले गेले. या कारवाईदरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीलाही आग लागली. त्यात अनेक जुनी हस्तलिखिते आणि ग्रंथ जळून राख झाले. या संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी केवळ संशयावरून ताब्यात घेतले होते, असे म्हणतात. भारताच्या इतिहासातली शिखांच्या संबंधातली ही अतिशय धक्कादायक घटना ठरली. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना प्रचंड दुखावल्या. 

  इंदिरा गांधींची हत्या 

  ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली. या हत्येनंतर दिल्लीत प्रचंड प्रमाणात दंगली उसळल्या आणि हजारो निरपराध शिखांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या घटनेमुळे शीख अन्य भारतीयांपासून खूपच दुरावले. यानंतर पुढची 12 वर्षे शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही, तर संपूर्ण भारतदेशच अस्थिर झाला होता.             

                  कॅनडातील खलिस्तानी 

   सुवर्ण मंदिरातील ॲापरेशन ब्ल्यू स्टार आटोपते न आटोपते तोच कॅनडामध्ये अतिरेकी शिखांनी उचल खाल्ली. विमान अपघात घडवू, हिंदूंची कत्तल करू, अशा धमक्याही त्यांनी दिल्या.  कॅनडाच्या संसदेचे मवाळ सदस्य उज्जल दोसांग यांनी अतिरेक्यांविरुद्ध विचार व्यक्त करताच त्यांना धमक्या देण्यात आल्या.

  1998 च्या नोव्हेंबर महिन्यातील 18 तारखेला कॅनडामधल्या एका पत्रकाराची - तारासिंग हायेर यांची- हत्या करण्यात आली. याही वेळी संशयाची सुई खलिस्तानी अतिरेक्यांच्याच दिशेने वळत होती. कॅनेडियन शीख असलेले तारासिंग हे इंडो-कॅनेडियन टाईम्सचे प्रकाशक होते. एकेकाळी ते खलिस्तानसमर्थक होते. पण त्यांनी एअर इंडियाची फेरी क्रमांक 182 च्या बाबतीतल्या घातपातावर कडक टीका केली होती. हा कट रचला जात असतांनाचा संवाद आपल्या कानावर पडला असून तशी साक्ष आपण देणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. या अगोदर 24 जानेवारी 1995 ला तरसेम सिंग पुरेवाल यांचीही हत्या करण्यात आली होती. ते ब्रिटनमधील पंजाबी साप्ताहिक देस परदेसचे संपादक होते. तरसेम सिंग पुरेवाल यांच्या हत्येच्या मुळाशी सुद्धा खलिस्तानवादीच असावेत, असे मानले गेले. शीख जहालवादाबाबतीतली त्यांची शोधपत्रकारिता या हत्येला कारणीभूत असल्याचे मानले गेले. 

   यानंतर कॅनडामधील ज्यांनी ज्यांनी खलिस्तानविरोधी लिखाण केले त्या सर्वाना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत गेल्या. 2008 मध्ये डॅा मनमोहनसिंग यांनी शीख दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली  होती. 2017 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर ते खलिस्तानला सहानुभूती दाखवीत असल्याचा आरोप करीत  त्यांची भेट घेण्यास नकार दिला होता. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी, खलिस्तान हा मुद्दा न कॅनडात आहे न पंजाबात, असे ठणकावून सांगितले. तेव्हा जस्टिन ट्रूडो यांनी भूमिका जाहीर केली की, कॅनडा खलिस्तान चळवळीच्या पुनरुज्जीवनाला समर्थन देणार नाही. पण कॅनडात शिखांची व्होट बॅंक आहे. कॅनडातील बहुसंख्य शीख समाज खलिस्तान चळवळीच्या पाठीशी नाही, हे खरे . पण खलिस्तानवाद्यांच्या दंडेलीमुळे ते गप्प आहेत. जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला शिखांची व्होट बॅंक आपल्या बाजूने हवीच आहे. त्यासाठी खलिस्तानवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य ते करतात. त्यांना हवी तशी वक्तव्ये देतात. बोलवित्या धन्याची भूमिका खलिस्तानी नेतृत्वाकडे असते. सर्वसामान्य कॅनेडियन समाजाला हे आवडत नसून जस्टिन ट्रूडो यांची लोकप्रीयता झपाट्याने कमी होत चालली आहे. 2025 ची  निवडणूक जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला जड जाणार, असे भाकीत राजकीय पंडितांनी आजच वर्तविले आहे. पण भारतासाठीचा जास्त गंभीर मुद्दा हा आहे की, जो शीख समाज एकेकाळी भारताचा खड्गहस्त मानला जात होता, त्यातला एक घटक,  लहानसा असला तरी,  आज खलिस्तानी समर्थक होऊन भारताच्याच जीवावर उठला आहे.

(अपूर्ण)