जी7 आणि ब्रिक्स; एक तुलनात्मक अभ्यास
तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक ३१/०७/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जी7, आणि ब्रिक्स; एक तुलनात्मक अभ्यास
राजकीय पटलावर अमेरिकेत ट्रंप यांचा उदय हा जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा मुद्दा व टप्पा ठरेल. आज सामरिक, आर्थिक आणि वैज्ञानिक अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. पण दिशादिग्दर्शन आणि वैचारिक प्रवर्तन या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्यासारखी स्थिती उद्भवली आहे. इराण व इस्रायल यात उद्भवलेले आणि प्रचंड उत्पात घडून शमलेले (?) युद्ध, रशिया आणि युक्रेन यातील रेंगाळलेले युद्ध, गाझा पट्टीतील इस्रायलची लष्करी सरबत्ती, दर दिवशी ‘दे धक्का’ स्वरुपाचे डोनाल्ड ट्रंप यांचेकडून कोसळणारे लष्करी आणि आर्थिक आघाडीवरचे उत्पात, यामुळे कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कनानास्किस या ठिकाणी 15 जून ते 17 जून 2025 या काळातली जी7 परिषद तशी महत्त्वाची होती पण ती कशीबशी उरकावी लागली. युद्धजन्य स्थितीवर एक औपचारिक संयुक्त निवेदन, इस्रायलला पाठिंबा आणि इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती विरोधात ठराव, हीच कायती 'जी-7' गटाच्या परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मनीचे चांसेलर फ्रेडरिक मर्झ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर हे प्रचंड धनशक्ती आणि शस्त्रास्त्रशक्तीचे धनी असलेले सात दिग्गज सदस्य शिखर परिषदेत सहभागी असून सुद्धा ही परिषद परिणामकारक भूमिका पार पाडू शकली नाही. या सात बड्या राष्ट्रांची मिळून एकत्रित लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के इतकीच आहे. परंतू एकूण जागतिक उत्पादनातला यांचा वाटा मात्र भला मोठा म्हणजे जवळजवळ निम्मा आहे. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जी7 शिखर बैठकीतून घाईघाईने लवकर परत गेले. त्यांच्या जाण्याचा जी7 शिखर परिषदेच्या कामकाजावर अतिशय प्रतिकूल परिणाम झाला. ते मायदेशी गेले आणि जी7ची नंतर जी6 परिषद झाली. पुढे कोणत्याही युद्धसंबंधित ठरावावर एकमत होऊ शकले नाही, की करार होऊ शकले नाहीत. नाही म्हणायला कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर, बेकायदेशीर स्थलांतराला विरोध, मानवी तस्करीविरोधात कठोर कारवाई या मुद्यांवर एकमत झाले. तसेच दुर्मिळ खनिजांना पर्याय शोधण्याच्या योजनेवरही विचार झाला. संघटित गुन्हेगारीवर प्रभावी उपाययोजना आवश्यक आहे, यावरही सहमती झाली. याहून बरेच काही होऊ शकले असते पण तसे झाले नाही.
जागतिक शक्तिसंतुलन नव्याने रचले जात असल्याच्या या काळात ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या शहरात दिनांक 6 व 7 जुलै 2025 रोजी भरविण्यात आलेली ब्रिक्स संघटनेची सतरावी परिषद ही मात्र जी7 च्या तुलनेत नव्या युगाची दिशा ठरवण्याच्या बाबतीत उजवी ठरली. ब्राझील, रशिया, इंडिया (भारत), चीन, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इराण, इथिओपिया, संयुक्त अरब अमिरात आणि इंडोनेशिया हे ब्रिक्सचे सदस्य आहेत. याशिवाय नायजेरिया, युगांडा आणि व्हिएतनाम हे देश देखील भागीदार देश म्हणून या बैठकीला आमंत्रित होते. रशियाचे अध्यक्ष पुतिन आभासी पद्धतीने तर चीनचे पंतप्रधान ली कियांग अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वतीने परिषदेत सहभागी झाले होते. अमेरिकाकेंद्रित जागतिक व्यवस्थेला पर्याय उभारण्याच्या दिशेने ‘ब्रिस’ची वाटचाल सावधरीतीने पण ठामपणे होते आहे, हे एक शुभचिन्ह ठरते आहे. चीनच्या कुरघोडीच्या राजकारणावर मात करीत भारत केवळ सहभागी सदस्य म्हणूनच नव्हे, तर विचारप्रवर्तक आणि सूत्रधार म्हणून ब्रिक्समध्ये पुढे येतो आहे. ब्रिक्स चे सदस्यदेश हे जी 7 च्या सदस्यदेशांच्या तुलनेत बलशक्ती आणि संपन्नता या बाबतीत खूपच मागे आहेत. तरीही ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला. दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध घालावेत, असेही सुचविले. ब्रिक्सने प्रसिद्ध केलेल्या अतिविस्तृत जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथबद्दल म्हणजेच विकसनशील देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी इतर महत्त्वाच्या विषयांबरोबरच ब्रिक्स देशांनी मिळून विज्ञान आणि संशोधनविषयक रिपॉझिटरी भांडाराची स्थापना करावी असे सुचवले. महत्त्वाची खनिजे, पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी क्षेत्रांवर अशाप्रकारे भर राहील. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या सुरक्षा समितीसकट अन्य सर्व संस्थांमधे तातडीने सुधारणा करण्याची गरज मोदी यांनी परिषदेत मांडली.
परिषदेमध्ये मोदींनी ग्लोबल साऊथचे प्रश्न आग्रहाने मांडले. ग्लोबल साऊथ मध्ये सामान्यत: आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देश, आशियातील इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया यांना वगळून उरलेले इतर देश आणि ओशियानियातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वगळता अन्य देश येतात. हे वर्गीकरण युनायटेड नेशन्स कॅानफर्न्स ऑन ट्रेड अॅंड डेव्हलपमेंटने (युएनसीटीएडी) केलेले असल्यामुळे प्रमाण मानले जाते. हे सर्व मिळून 69 देश होतात. यातील बहुतेक देश अविकसित, गरीब, दाट लोकसंख्या असलेले, पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असलेले म्हणजे राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या खरेखुरे वंचित देश आहेत. हा एक विस्कळित आणि विखुरलेल्या देशांचा समूहच आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान देश म्हणून भारतच या देशांची बाजू मांडणारा देश ठरतो. ‘विकसित देशांसाठीच्या दुहेरी मापदंडांचा फटका सातत्याने गरीब देशांना म्हणजे ग्लोबल साउथमधील देशांना बसतो आहे. या देशांना निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या स्थानांपासून वंचित ठेवले जात आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विकसित देशांना सुनावले. अशाप्रकारे, भारत, ब्राझील आदी देशांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे, हा मुद्दा मोदींनी मोठ्या खुबीने मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद तसेच अन्य प्रमुख जागतिक संस्था यांचे स्वरूप जोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक होणार नाही तोपर्यंत इतर सर्व बाबी व्यर्थ आहेत, अशी आग्रही भूमिकाही मोदी यांनी मांडली. गरीब देशांकडे सतत दुर्लक्ष होत असते. त्यामुळे गरीब देशांचा विकास खुंटतो आहे, साधनसंपत्तीचे समान वाटप होऊ शकत नाही. किंवा गरीब देशांचे सुरक्षा व आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत, ही बाब मोदींनी अधोरेखित केली.
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत सातत्याने दहशतवादाच्या विरोधात जागतिक जनमत जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताच्या या प्रयत्नांना यश मिळत असून अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळतो आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा निषेध, ही भूमिका सिद्धान्त म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता प्रभावीपणे मांडली. त्याचाच परिणाम म्हणून पहलगाम हल्ल्याचा निषेध, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि रसद पुरविणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध आणि दहशतवाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण, या मुद्द्यांवर परिषदेत सहमती घडून आली. पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीनने यावेळी मौनव्रत धारण केले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’, असा नारा कंठरवाने देत असतात. अशी भूमिका असणाऱ्याची दृष्टी आणि वागणूक खरे तर सामोपचाराची असावयास हवी. पण तसे दिसत नाही. सतत दंडुका आपटत खेकसणाऱ्या शिपायासारखी अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका असते. ब्रिक्सच्या सदस्यदेशांच्या बाबतीतही त्यांची हीच भूमिका होती. ‘ब्रिक्स’ देशांवर दहा टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याच्या त्यांच्या धमकीचे सावट रिओ दी जानिरोमधील परिषदेवर होते. ब्रिक्सचे स्वतंत्र चलन हा मुद्दा तर सोडाच पण स्थानिक चलनांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन देतानाही आपला हेतू अमेरिकाविरोधी नाही, असे ब्रिक्सने स्पष्ट केले हे बरे झाले. ‘अरेला कारे’ म्हणणाऱ्या खुद्द चीननेही हीच सौम्य भूमिका स्वीकारली ती काही उगीच नाही.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांबाबत ‘गंभीर चिंता’ ब्रिक्सने व्यक्त केली. अमेरिकेची भीती वाटली म्हणून कठोर शब्द वापरायचे टाळले, अशी टीका ब्रिक्सवर केली जाते आहे. भीती आणि सावधगिरी यातल्या सीमारेषा धूसर असतात, ही जाणीव असल्यामुळेच ब्रिक्सने सावधगिरीचा पर्याय स्वीकारला, असे दिसते. आज जागतिक रचनेत वेगाने बदल होतो आहे. आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देऊनच जागतिक भूमिका निश्चित करण्याकडे सर्वच देशांचा कल असतो. बड्या धेंडांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल ही जाणीव ठेवूनच ब्रिक्सच्या भूमिका नरम होत्या, हे स्पष्ट आहे.
परिषदेचे अतिविस्तृत म्हणजे 1600 शब्दांचे संयुक्त निवेदन आकांक्षा व्यक्त करणारे आहे, इकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विस्तृतपणाच्या मुळाशी जागतिक शांतता, सौहार्द, बंधुभाव, व्यापारास उत्तेजन, दहशतवादाला प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पर्यावरण प्रदूषण निर्मूलन, हवामान बदल, पृथ्वीवर गारवा यावा म्हणून करावयाचे विविध प्रयत्न, अशा जवळपास सर्व विषयांस या संयुक्त निवेदनात स्थान देण्यात आले आहे, हे अमान्य करता यायचे नाही. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, 'नाटो' आदी एकापेक्षा एक प्रभावशाली संघटना हळूहळू निष्क्रिय, निष्प्रभ आणि निराधार होत चालल्या आहेत. या उलट ब्रिक्स'मधील चर्चा विस्तृत पण तरीही नेमक्या, कृतीवर भर देणाऱ्या आणि पुरेशा गांभीर्ययुक्त वातावरणात पार पडल्या आहेत, याचे श्रेय अर्थातच मुख्यतहा भारताकडे जाते.