Wednesday, July 2, 2025

 2025 ची जी7 देशांची कॅनडा परिषद 

तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक 03/07/2025 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

2025 ची जी7 देशांची  कॅनडा परिषद  

 वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com  Blog - kasa mee? 


कॅनडातील अल्बार्टा प्रांतातील कनानास्किस येथे दोन दिवसीय 2025 ची G7 शिखर परिषद नुकतीच पार  पडली. यजमान कॅनडाचे नुकतेच निवडून आलेले पंतप्रधान मार्क कार्नी हे अर्थ आणि बॅंकिंग क्षेत्रातले तज्ञही आहेत. या काळात सुरू असलेल्या संघर्षांचे सावट  जी-7 गटाच्या परिषदेवर फार मोठ्या प्रमाणात पडले होते.  अमेरिका, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, जपान  आणि ब्रिटन या सात देशांचे नेते  शिखर परिषदेत सहभागी झाले होते.  पण इस्रायल आणि इराणमधील संघर्ष  तीव्र झाला आणि डोनाल्ड ट्रंप शिखर परिषद सोडून निघून गेले. जी7 शिखर परिषदेच्या कामकाजावर या जाण्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम झाला. ती जी6 परिषदच झाली. मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॅाडिया शेनबॅाम, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फावल्या वेळात होऊ शकणाऱ्या ट्रंप यांच्या सोबतच्या समोरासमोरच्या चर्चा झाल्या नाहीत. क्लॅाडिया शेनबॅाम यांच्याशी मेक्सिकोतून अमेरिकेमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरासंबंधात चर्चा होणे अपेक्षित होते. नाही म्हणायला कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर, बेकायदेशीर स्थलांतरला विरोध, मानवी तस्करीविरोधात कठोर कारवाई या मुद्यांवर मात्र एकमत झाले. तसेच दुर्मिळ खनिजांना पर्याय शोधण्याच्या योजनेवर विचार, संघटित गुन्हेगारीवर प्रभावी उपाययोजना यावरही सहमती झाली. दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत आज चीनची मक्तेदारी आहे. चीनने अडवणुकीचे धोरण स्वीकारले की, उद्योगक्षेत्रातील एक मोठा भाग अडचणीत येतो. त्यामुळे त्यांना पर्याय शोधून काढण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तसेच युद्धजन्य स्थितीवर एक औपचारिक  संयुक्त निवेदन, इस्रायलला पाठिंबा आणि इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती विरोधात ठराव, ही 'जी-7' नव्हे प्रत्यक्षातल्या जी 6 गटाच्या कॅनडातील परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. 

  सदस्यदेश, नेते, लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि जीडीपी  

अमेरिका: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, लोकसंख्या 34 कोटी, क्षेत्रफळ 98 लाख चौकिमी आणि जीडीपी 30.51 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी  89.11 हजार 

कॅनडा: पंतप्रधान मार्क कार्नी, लोकसंख्या 4 कोटी, क्षेत्रफळ 99 लाख चौकिमी, आणि जीडीपी 2.23 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी  53.56 हजार 

इटली: पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, लोकसंख्या 5.9 कोटी,  क्षेत्रफळ 3 लाख चौकिमी आणि जीडीपी 2.42 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी  41.09 हजार

जर्मनी: चांसेलर फ्रेडरिक मर्झ, लोकसंख्या 8.3 कोटी, क्षेत्रफळ 3.57 लाख चौकिमी आणि जीडीपी 4.74 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी 55.91 हजार

फ्रान्स: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, लोकसंख्या 8.83 कोटी, क्षेत्रफळ  5.51 लाख चौकिमी आणि जीडीपी 3.21ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी 46.39 हजार

जपान: पंतप्रधान  शिगेरू इशिबा, लोकसंख्या   12.5 कोटी, क्षेत्रफळ 3.8 लाख चौकिमी आणि जीडीपी 4.2 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी 33.96 हजार

ब्रिटन: पंतप्रधान केयर स्टारमर, 6.8 कोटी, क्षेत्रफळ 2.43 लाख, आणि जीडीपी 2.8 ट्रिलियन डॅालर, पर कॅपिटा जीडीपी 54.95 हजार


 भारत: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसंख्या 140 कोटी, क्षेत्रफळ  33  लाख चौकिमी  आणि जीडीपी 4.19 ट्रिलियन डॅालर,  पर कॅपिटा जीडीपी  2.88  हजार

मोदीही निमंत्रित म्हणून शिखर परिषदेत उपस्थित होते. भारताच्या जीडीपीची 2024-2025 मधील अपेक्षित वाढ 6.2% असून ही जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी आर्थिक व्यवस्था आहे. त्यामुळे  आयोजकांना जी7 च्या शिखर परिषदेला भारताची उपस्थिती आवश्यक वाटली यात आश्चर्य नाही. वाटेकरी 140 कोटी असल्यामुळे पर कॅपिटा जीडीपी 2.88  हजार एवढाच येतो. पण भविष्यात 140 कोटींचे 280 हात योग्य कौशल्य प्राप्तीनंतर केवढा चमत्कार घडवतील, हे सांगावयास हवे का?

   भारत 'जी-7' चा सदस्य नसूनही गेली काही वर्षे पंतप्रधान मोदी हे या परिषदांना निमंत्रित म्हणून उपस्थित राहात आले आहेत. मात्र, कॅनडात होणाऱ्या यंदाच्या परिषदेत भारताला आमंत्रण मिळण्याचे बाबतीत शंका व्यक्त केली जात होती.  कारण खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या आणि कॅनडामध्ये खलिस्तान्यांना मिळणारा आश्रय या मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या संबंधांत फार मोठा कडवटपणा निर्माण झाला होता. पण कॅनडात झालेला सत्ताबदल आणि इतर सहभागी राष्ट्रप्रमुखांचे शहाणपण प्रभावी ठरले आणि भारताला या परिषदेचे रीतसर निमंत्रण मिळालेले दिसते. कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी याबाबत निषेध नोंदविल्याचे वृत्त कानी आले आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेस उपस्थित राहिले आणि त्यांनी दहशतवाद, ऊर्जा, सुरक्षा आणि कृत्रिम प्रज्ञेच्या वापर याबाबत ठाम भूमिकाही मांडली. एकीकडे दहशतवादाविरोधात एकजुटीची गरज व्यक्त करायची आणि लगेच दहशतवाद्यांचे हुकमी आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला प्रतिष्ठेची पदे आणि वित्तसाह्य कसे उपलब्ध होईल, तेही पहायचे, यातील विसंगती मोदींनी नामोल्लख न करता स्पष्टपणे मांडली. जगभरातील युद्धे असोत वा दहशतवादाला आवर घालण्याचा मुद्दा असो, दरवेळी संतुलित भूमिका एकट्या भारताचीच  असते. कॅनडातील नवीन शासन खलिस्तान्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही.  खलिस्तानी पूर्वीसारखे प्रभावी राहिलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही देशात सामान्य स्थिती पुन्हा निर्माण करण्याबाबत सहमती झाली. जी7 राष्ट्रांची मिळून एकत्रित लोकसंख्या जगभरातील एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के इतकीच असली तरी या आधुनिक शस्त्रास्त्रधारक देशांच्या एकूण जागतिक उत्पादनातला यांचा वाटा मात्र जवळजवळ निम्मा आहे. 


  रशिया-युक्रेन युद्धात हे देश अप्रत्यक्षपणे सामील आहेत. या बहुतेक सर्वांनी युक्रेनला  आर्थिक, लष्करी आणि अन्य प्रकारची मदत केली आहे.    जी7 गट रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यासाठी रशियावर दबाव आणत आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्न आणि ऊर्जा पुरवठा साखळ्या पार खिळखिळ्या झाल्या आहेत.  दोन डझनांपेक्षा जास्त देश नाटो या संघटनेचे सदस्य आहेत. रशियाचे गुलाम व्हायची वेळ येऊ नये म्हणून यातील बहुतेक राष्ट्रे अमेरिकेच्या छत्रछायेच्या आधाराला नाटोमध्ये आली आहेत.  पण या राष्ट्रांच्या भवितव्याचा किंचितही विचार न करता, ज्या रशियाच्या विरोधात नाटो संघटना आहे त्या राष्ट्राच्या प्रमुखाशी, म्हणजे पुतिनशी, करार करण्यासाठी चर्चा करण्यास ट्रंप उद्युक्त झाले. असा प्रकार यापूर्वी क्वचितच कधी झाला असेल. युक्रेनमध्ये आढळणाऱ्या दुर्मीळ खनिजांच्या बाबतीत अमेरिकेने एकट्यानेच वेगळा करार (?) केल्याच्या वार्ता कानावर येत होत्या.  

  इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्याची सबब पुढे करून  इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्घाला तोंड फुटले. तेव्हापासून मध्यपूर्वेतील या दोन युद्धमान राष्ट्रात वारप्रतिवार  झालेले दिसत होते. उभयपक्षी प्रचंड वित्तहानी आणि जीवित हानी झाली आहे. इराणचे रणनीतीप्रमुख, शास्त्रज्ञ व सेनाधिकारी तर फार मोठ्या संख्येत प्राणाला मुकले आहेत. एवढी मनुष्यहानी इस्रायलची झालेली नसली तरी आता इस्रायललाही शस्त्रांची चणचण भासू लागली आहे. महत्त्वाची शहरे बॅाम्बहल्ल्यांमुळे क्षतिग्रस्त झाली आहेत.  पण या विषयावर चर्चा झाली नाही.

  G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन केले, तसेच ग्लोबल साऊथचा आवाज अधिक लक्षपूर्वक  ऐकला जावा यावरही भर दिला. दहशतवादाविरुद्धची  भारताची भूमिका जोरकसपणे मांडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 च्या नेत्यांना दहशतवादाविरुद्धच्या जागतिक कारवाईला चालना देण्याचे आवाहन केले. आज दहशतवादाला  प्रोत्साहन, प्रतिष्ठा आणि समर्थन देण्याचे  काही बड्या राष्ट्रांचे उरफाटे प्रकार थांबले पाहिजेत, असे ठासून सांगितले.  इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे मध्यपूर्वेत अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे.  तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे सुरू झालेले वाद  व्यापारयुद्धाचे रूप घेणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे, इकडे सर्वांचे लक्ष वेधले.  “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-7 शिखर परिषदेत उपस्थिती ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचे आणि गतिमानतेचे आणि भारताच्या नेतृत्वाच्या भूमिकेचे प्रतिबिंब आहे”, असा भारताचा गौरवपूर्वक उल्लेख  कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी करून या दोन देशातील पुढील  सुसंबंधाबाबतचे सूतोवाचच केले. एवढ्यात मोदी G7च्या प्रत्येक परिषदेत खास निमंत्रणावरून सहभागी झाले आहेत”, श्री. कार्नी यांनी G7 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या समारोपानंतर घेतलेल्या  पत्रकार परिषदेत हा मुद्दा आवर्जून मांडला. कार्नी यांची मोदींसोबतची द्विपक्षीय बैठक अतिशय महत्त्वाची ठरली.  "ही बैठक म्हणजे  मूलभूत आणि म्हणून  आवश्यक असे  पहिले पाऊल होते. विचारांची देवाणघेवाण, कायद्याची अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय दडपशाही याविषयी स्पष्ट आणि विचारांची देवाणघेवाण, परस्पर आदर, परस्परांच्या सार्वभौमत्वाला मान्यता आणि विश्वासावर आधारित संबंध पुन्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला पाया या बैठकीत घातला गेला”, कार्नी यांनी व्यक्त केलेले हे विचार भविष्यातील स्नेहाची सुरवात ठरावी, असे आहेत.

       परिषदेचे निमित्त साधून भारताला द्विपक्षीय प्रश्नांबाबत मध्यस्थी अमान्य असल्याचे मोदींनी अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे. 'भारत आणि पाकिस्तानने गेल्या महिन्यात कोणत्याही मध्यस्तीविना आपापल्या सैन्यदलातील थेट चर्चेनंतर कारवाई स्थगित केली,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडात बोलतांना स्पष्ट करत मध्यस्थीबाबतचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. मोदी यांची ट्रम्प यांच्यासोबत सुमारे 35 मिनिटे फोनवर चर्चा झाली. भारताचे 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे, ते थांबलेले नाही', अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. मोदी आणि ट्रंप यांच्या  फोनवरील  चर्चेत, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 7 ते 10 मे दरम्यान झालेला संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी होता. 'या पूर्ण चर्चेदरम्यान भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तान यात अमेरिकेद्वारे मध्यस्थी अशा कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही,’ असेही भारताने स्पष्ट केले. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारत ‘गोळीस गोळ्याने  प्रत्युत्तर’ देईल, अशी भूमिका भारताने स्पष्ट केली. “भारत आणि पाकिस्तानच्या दोन अतिहुशार नेत्यांनीच संघर्ष पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला’,  ट्रंप यांच्या उद्गारावर भाष्य करण्याची आवश्यकता आहे काय?