Thursday, December 7, 2017

समुद्र कुणाचा? नाही कुणाच्या ….


समुद्र कुणाचा? नाही कुणाच्या ….?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

   दक्षिण चीन समुद्रात चीनने कृत्रिम बेटे तयार केली असून, तिथे क्षेपणास्त्रादी शस्त्रेही साठवली आहेत. याबाबत शंका बाळगायचे कारण माही. कारण सॅटलाईट व रडार यंत्रणांनी अशी बेटे उभारली असल्याची व तिथे उभारलेल्या वास्तूची सचित्र माहितीच पुरविली आहे. समुद्रात बेट बांधण्यासाठी चीनने तळापासून सुरवात केलेली नाही. ती बेटे रीफ वर बांधलेली आहेत. रीफ म्हणजे काय, ते भूगोलाच्या पुस्तकात सापडेल. पण आपण त्या भानगडीत पडूया नको. विषय समजून घेण्यासाठी आपण सोपी व्याख्या तयार करू. रीफ हा पाण्यात जेमतेम बुडालेला खडक(दगड) असतो. असे महाकाय खडक(दगड) समुद्रातही असतात, तसे ते दक्षिणी चिनी समुद्रातही आहेत. यापैकी एका खडकाचे(दगडाचे) नाव आहे मिसचीफ रीफ. चीनने हा दगड निवडला हा योगायोग म्हणायचा की स्वभाव धर्म व निवडलेल्या दगडाचे नाव यात साम्य शोधायचे, याही भानगडीत आपण पडूया नको. मिसचीफ रीफ किंवा असे समुद्रातील दगड निवडून चीनने आपली संरक्षणक्षमता (की आक्रमण क्षमता?) आपल्या किनाऱ्यापासून दूर समुद्रात नेऊन ठेवली आहे. यामुळे जी राष्ट्रे येथून माऱ्याच्या टप्प्यात आली आहेत, ती अर्थातच चिंताग्रस्त आहेत.
1982 ची नियमावली- ही काही आजची घटना नाही. मग याचा आज उल्लेख का करायचा? निमित्त आहे पंतप्रधान मोदींनी मनिला येथे केलेल्या एका भाषणाचे. या भाषणात मोदींनी केवळ याच नव्हे तर अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 1982 च्या नियमावलीचे पालन सर्वांनी करावे, असे सूचित केले आहे.
समुद्र कुणाचा? नाही कुणाच्या …समुद्र कुणाचा हा प्रश्न मानवाला काही शतकांपासून सतावतो आहे. आमच्या देशाच्या किनाऱ्यालगतचा समुद्र आमचा नाही तर कुणाचा, असा प्रश्न निरनिराळे देश विचारू लागले. याचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न बहुदा पहिल्यांदाच 1761 च्या सुमारास केलेला आहे व तसाच तो नोंद घ्यावा असाही आहे. पण तीन मैलच का? दोन किंवा चार का नाही? तर त्यावेळच्या तोफांचे गोळे तीन मैल पर्यंतच जात असत. म्हणून तीन मैल. हिशोब सोपा होता. आपल्या देशाच्या किनाऱ्यापासून तोफ डागा. गोळा जिथे पडेल तिथपर्यंतचा किनारा तुमचा. पण आज तोफांचे गोळे दूरदूरवर जाऊन पडतात. मग तोफ कोणती? ती की आजची? शिवाय असे की पृथ्वी गोल आहे. म्हणजे समुद्रही गोलाकारच असणार की. मग ३ मैल कोणते? सरळ रेषेतले की वक्राकार? यातल्या काही शंका आहेत तर काही कुशंका! पण हा प्रश्न सोडविण्याचे अनेक प्रयत्न  अनेक राष्ट्रांनी केले आहेत, हे मात्र खरे आहे. ते प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.
चीनने दगडांवर बांधली बेटे-  त्यापैकी 1982 सालचा मसुदा सर्वंकष स्वरुपाचा मानला जातो. 1982 चा युनायटेड नेशन्स कनव्हेनशन आॅन दी लाॅ आॅफ दी सी अशा लांबलचक नावाने ही नियमावली ओळखली जाते. (मुळात समुद्र मोठा, त्यामुळे नावही तसेच नको का?) या घडीला जगातील 150 देशांनी या नियमावलीवर मान्यतादर्शक स्वाक्षरी केलेली आहे. अशी नियमावली अमलात यायला 60 देशांनी स्वाक्षरी केली तरी पुरते.  या नुसार किनाऱ्यापासून 12 समुद्री मैल (नाॅटिकल माईल्स) म्हणजे 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल पर्यंतचा समुद्र त्या त्या देशाचा मानावा असे ठरले. पण किनारा कोणता? भरतीच्या वेळचा की ओहोटीच्या वेळचा? शेवटी सरासरी काढलेली बरी, नाहीका? पण किनारे सरळ रेषेत थोडेच असतात? ते असतात नागमोडी मग हा हक्काचा समुद्रही नागमोडी वळण घेणार यात शंका नाही. हे काहीही असले तरी जहाजांचे मार्ग/ जल मार्ग आखण्यासाठी याचा निश्चितच उपयोग आहे. तसेच या मर्यादेच्या आतील सागरी संपत्ती (सजीव व निर्जीव) ही सुद्धा त्या त्या देशाची ठरली. उरलेला समुद्र सर्वांचा. या सर्वांच्या समुद्रात रीफ म्हणजे जेमतेम बुडालेले महाकाय खडक(दगड) शोधून चीनने आपली बेटे तयार केली आहेत व तिथे शस्त्रास्त्रे नेऊन तयार ठेवली आहेत.
कुणाच्या वाट्याला किती समुद्र? - ही 12 समुद्री मैलांची किंवा 22 किलोमीटरची रेषा म्हणजे काही लक्ष्मण रेषा नाही. ती ओलांडण्याची अनुमती परदेशी जहाजांना असते. पण उचापती मात्र करता येणार नाहीत. जसे शस्त्रांची चाचपणी, हेरगिरी, तस्करी (स्मग्लिंग), प्रदूषण होईल अशी कृत्ये, मासेमारी वगैरे. अशी कृत्ये न करणारे जहाज बिचारे ( इनोसंट) मानले जाते. ते या कुणाच्या तरी किंवा कुणाच्याही मालकीच्या समुद्रातून जा ये करू शकते. तसेच सामुद्रधुन्यांचाही असाच वेगळा विचार केला जातो. जसे जिब्राल्टर, मांडेब, हाॅर्मूज, मलाक्का या समुद्रधुन्या उदाहरणादाखल देता येतील. दोन मोठ्या समुद्रांना जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीला समुद्रधुनी असे नाव आहे. ब्रिटन व स्पेन मध्ये जिब्राल्टरची समुद्रधुनी, येमेन व डिबूटी(जिबुटी?) मध्ये मांडेबची सामुद्रधुनी, पर्शियन गल्फ व ओमनचा गल्फ यात हाॅर्मूजची सामुद्रधुनी व मलाया व इंडोनेशिया यात मलाक्काची सामुद्रधुनी अशा काही सामुद्रधुन्या सांगता येतील. यांची लांबी, रुंदी व खोली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. तिथेही ही 12 समुद्री मैलांची किंवा 22 किलोमीटरची रेषा म्हणजे काही लक्ष्मण रेषा अर्थातच नसते/नाही.
आसियानमध्ये मोदी - बेटे निर्माण करण्याच्या व अन्य प्रकारच्या चीनच्या दंडेलीला मोदींनी आडव्या हाताने घेतले आहे. दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित संरक्षण संरचना उभी करण्यासाठी भारत ‘आसिआन’ संघटनेच्या सदस्य देशांना मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
   2010 मध्ये आसिआन (असोसिएशन आॅफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स) मध्ये दहा सदस्य देश होते. पण 8 आॅगस्ट 1967 मध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर व थायलंड मध्ये आसिआन ची स्थापना झाली तेव्हा तेव्हा हे पाचच देश होते. आता 2017 मध्ये ब्रुनाई, दारूसलाम, कंबोडिया, लाओस, व व्हिएटनाम यांची भर  पडून आज आसिआनची सदस्य संख्या दहा आहे. यात पापुआ न्यूगिनी हा निरीक्षक म्हणून उपस्थित असतो. यावेळी तर चीन, रशिय, म्यानमार, भारत यांच्यासह एकूण वीस देश या निमित्ताने फिलिपीन्समध्ये येणे अपेक्षित होते. सदस्य देशांइतकेच निमंत्रित पाहुणेही फिलिपीन्स मध्ये उपस्थित होते.
 मोदींची परखड भूमिका -फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे मंगळवारी 14 नोव्हेंबरला झालेल्या आसिआन-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना मोदींनी ही ग्वाही दिली. तसेच दहशतवाद व कट्टरतावाद ही सध्या या प्रदेशासमोरील सर्वात मोठी आव्हाने असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरजही मोदींनी या वेळी व्यक्त केली. आसिआनने भारताला या परिषदेला बोलवावे हे भारताच्या या भागातील वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे.
  मनीलात दोन परिषदा - तशा फिलिपीन्समध्ये येथे 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान ‘आसिआन’ आणि ‘ईस्ट एशिया’ या शिखर परिषदा अशा दोन परिषदा पार पडल्या. ‘आसिआन’ परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य होते, तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, शस्त्रास्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयांवरही चर्चा झाली. भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर होता. दक्षिण चीन समुद्रातील चीनची दंडेली आणि उत्तर कोरियाची वाढती व वेडी अण्वस्त्रसिद्धता यावरही परिषदेत विचार झाला.
    मात्र अमेरिकेचे अधयक्ष डोनाल्ड ट्रंप आपला दौरा मध्येच आवरता घेत वाॅशिंगटनला निघून गेल्यामुळे 20 देशांसोबतच्या मीटिंगमध्ये ते नव्हते. याच्या बऱ्यावाईट परिणामांची चर्चा विश्लेषक करीत आहेत.
 चीनची दंडेली - गेल्या काही वर्षांपासून चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर अधिकार सांगत आहे. या प्रदेशात चीन समुद्रात जेमतेम बुडालेल्या महाकाय दगडांवर भराव घालून कृत्रिम बेटे तयार करत आहे. मिसचीफ हे त्यातलेच एक बेट आहे. अन्य देशांचे या प्रदेशातील दावे फेटाळून लावत मुक्त नौकानयनाला आडकाठी करीत आहे. या प्रश्नावर मोदींनी चीनचा थेट उल्लेख टाळत भाष्य केले. दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित संरक्षण संरचना उभी करण्यासाठी भारत ‘आसिआन’ संघटनेच्या सदस्य देशांना मदत करेल, असे मोदी म्हणाले. दक्षिण चीन समुद्रातील वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा आणि 1982 चा संयुक्त राष्ट्रांचा सागरी सीमांबाबतचा करार यांचा आधार घेतला जावा, या भारताच्या भूमिकेचा मोदींनी पुनरुच्चार केला. ‘आसिआन’ देशांना सहकार्याचे नि:संदिग्ध आश्वासन दिले.
   दहशतवाद व कट्टरतावाद ही सध्या या प्रदेशासमोरील सर्वात मोठी आव्हाने असून त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरजही मोदींनी या वेळी व्यक्त केली.
फिल्पीन्सची स्वागताची आगळी पद्धत. फिलिपीन्सची राजधानी मनीला येथील अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव आहे मॅलाकांग पॅलेस. या इमारतीवर स्पॅनिश बांधकामशैलीची छाप आहे.
मनीलातील तीन डिझाईनर्स अलबर्ट ॲंड्राडा, राजो लाॅरेल आणि रॅंडी ओर्टिस यांनी पाहुण्यासाठी खास अांगरखे(पण बटने असलेले) बेतले होते. महिलासाठीही डगले शिवले होते. फिलिपीन्सचे अध्यक्ष डुटर्टे (तुतर्ते) यांनी हे आंगरखे व डगले पाहुण्यांना भेट देऊन त्यांचा आगळ्यावेगळ्याप्रकारे सन्मान केला. अलबर्ट ॲंड्राडा,यांनी या आंरख्याला बॅराॅंग असे नाव दिले आहे. पाईनॲपल (अननस) च्या टरफलापासून मिळणाऱे तंतू विणून हे कापड तयार करतात. या कापडाला सुंदर लकाकी असते. बॅराॅंग वर हाताने एम्ब्राॅयडरी करतात. एकेका बॅराॅनची किंमत 200 डाॅलर असते. बॅराॅनच्या बटनांवर आसियानचा लोगो होता. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वानुसार बॅराॅंगची नावे होती. जसे डोनाल्ड ट्रंप यांच्या बॅराॅंगचे नाव होते मॅटिपुनो म्हणजे रोबस्ट (दणकट), पुतीन यांच्या बॅराॅंगचे नाव होते मारंगल (सन्माननीय), मोदींना भेट दिलेल्या बॅराॅंगचे नाव कळले नाही ते कणखर किंवा असे काहीसे असायला हरकत नव्हती. डोनाल्ड ट्रंप यांचा बराॅंग त्यांना लहान होत होता. अंग आक्रसून घेत ते बिचारे डाव्या उजव्या बाजूच्या नेत्यांशी हात मिळवत त्रासलेल्या चेहऱ्याने साखळी तयार करतांना टिपले गेले.
  या दोन परिषदांच्या निमित्ताने आशियातील लहान मोठे देश एकजूट करून उभे राहिले आहेत. याचवेळी सोबतीला अमेरिका, जपान, भारत व आॅस्ट्रेलिया यांची दुसरी परिषदही भरली होती. राजकीय सारिपटावरील ही नवीन मांडणीची नांदी ठरणार किंवा कसे यावर राजकीय पंडितांचा खल सुरू झाला आहे. या निमित्ताने आमच्या विरोधात काहीही शिजले नसेल अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. चीनला काय म्हणायचे आहे, हे सांगायलाच हवे का?








No comments:

Post a Comment