Thursday, April 25, 2019

कथा आणि व्यथा दहशतवाद्यांच्या महिला आघाडीची

कथा आणि व्यथा दहशतवाद्यांच्या महिला शाखेची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  इसीसच्या या दहशतवादी संघटनेच्या ‘जिहादी गर्लपाॅवर सबकल्चर’ या नावाच्या महिलाशाखेच्या सदस्य असलेल्या तीन मुली पूर्व लंडनमधील बेथनल ग्रीन ॲकॅडेमी या नावाच्या व मुस्लिम बहुसंख्य मुले असलेल्या शाळेत शिकत होत्या. फेब्रुवारी 2015 मध्ये (पहिली) अमीरा अबासी, (दुसरी) शामिना बेगम आणि (तिसरी) काडिझा सुलताना या तिघी ब्रिटिश नागरिक असलेल्या तीन मुली घरून बेपत्ता झाल्या. त्या इसीस मध्ये दाखल झाल्या आहेत. (1ली) अमीरा अबासी, (2री) शामिना बेगम आणि (3) काडिझा सुलताना या तिघी ब्रिटिश नागरिक असलेल्या मुलीच केवळ नाहीत, तर पाश्चात्य देशातील अशा तब्बल 550 मुली (महिला) कोणती ना कोणती हिकमत वापरून आपल्या देशातून कोणालाही न सांगता निघून गेल्या व नंतर त्या इसीस मध्ये दाखल झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच या मुलींनी घरातील दागीने चोरून विकले व पलायनासाठी आवश्यक असलेला पैसा उभा केला हेही स्पष्ट झाले. अशा महिला गटाला जग जिहादी गर्ल पाॅवर सब कल्चर या नावाने ओळखते. अशा सर्व संबंधितांचे ब्रिटिश नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय ब्रिटिश शासनाने घेतला आहे. पण यातील अल्पवयीन व विद्यार्थिनी असलेल्या मुली जर परत आल्या तर आपण त्यांच्यावर खटला दाखल करणार नाही, असेही स्पष्ट केले.
  फूस लावणारी नामानिराळी 
   स्काॅटलंडमधील ग्लासगो येथील अक्सा महमूद या नावाच्या एका महिलेने या मुलींना यासाठी पढवून प्रवृत्त केले होते. ही महिला इलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे या मुलींच्या संपर्कात होती. ती स्वत: सध्या बेपत्ता असून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे अज्ञात स्थळावरून जाहीर केले आहे.
 गुप्तता भोवली?
  या अगोदर एक वर्ष म्हणजे 2014 मध्ये याच शाळेतील एक मुलगी (हिला आपण 4 थी म्हणू या) शर्मीना बेगम सीरियाला पळून गेली होती. (तसे पाहिले तर ही मुलगी कालक्रमाने विचार करता पहिली होती) पण या घटनेचा गाजावाजा त्यावेळी झाला नव्हता 
 नंतर मार्च 2015 मध्ये मात्र याच शाळेच्या पाच मुलींवर प्रवासबंदी बजावण्यात आली, कारण त्याही अशाचप्रकारे पळून जाण्याच्या बेतात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
चौघींच्या चार कथा
  (1ली) अबासीने 18 व्या वर्षी अब्दुल्ला एलमिर नावाच्या आॅस्ट्रेलियन दहशतवाद्याशी लग्न केले. तो हवाई हल्यात मारला गेला. आपले पहिले नवरे मेल्यानंतर बहुतेक मुलींनी दुसऱ्याशी निकाह करीत आणि त्या दुसऱ्या/तिसऱ्या नवऱ्याबरोबर राका येथे (सीरियातील इसीसचा तळ असलेले गाव) राहून जीवन कंठीत असत. अबासीनेही बहुदा त्यांचाच कित्ता गिरवला होता.
  (2 री) बेगमने एका अमेरिकन जिहादीशी लग्न केले. पुढे ती गरोदर राहताच त्याने तिला सोडून दिले. टाईम मासिकाच्या ॲंथनी लाॅईड नावाच्या वार्ताहराने बेगमला सीरियन निर्वासित कॅंपमध्ये शोधून काढले. तिने सांगितले की, ती गरोदर आहे. तिची ब्रिटनमध्ये परत येण्याची इच्छा आहे. तिला आपल्या मुलाला वाढवायचे आहे. इसीसमध्ये सामील होण्याच्या निर्णयाचा तिला पश्चाताप होतो आहे. पण ब्रिटिश सरकारने सांगितले की, आम्ही तिचे नागरिकत्व रद्द केले आहे. तिचे आईवडील मूळचे बांग्लादेशी होते. पण बांग्लादेशानेही तिला नागरिकत्व नाकारले. 2019 मध्ये तिने मायदेशी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चाताप होऊन परत फिरणाऱ्यांच्या बाबतीत कोणते धोरण अनुसरावे, या विषयावर ब्रिटनमध्ये बरीच उलटसुलट चर्चा झाली होती.
   (3री) सुलतानाने सोमाली वारसा असलेल्या दहशतवाद्याशी लग्न केले. तो मारला गेल्यानंतर तिला ब्रिटनला मायदेशी परत यायचे होते. पण ती सुद्धा रशियन विमानहल्यात मारली गेली. तिची वकील तस्नीम अकुंजीचे म्हणणे असे होते की, निसटण्याचा प्रयत्न करतांना ती अतिशय भेदरलेली होती. कारण समरा केसिनोव्हिक नावाच्या एका मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न करताच तिला मरेस्तो मारलेले तिने पाहिले होते. 
  (4थी) शर्मीनाने सीरियात पोचताच यागो रिजिक या नावाच्या मूळच्या डच असलेल्या व नंतर धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकरणाऱ्या दहशतवाद्याशी लग्न केले. तो सध्या जीव मुठीत धरून कुठेकुठे गुप्तपणे वावरत असतो. त्याच्यापासून शर्मीनाला तीन मुले झाली. पहिली दोघे जन्मानंतर लगेचच मेली. तिसऱ्याचा जन्म निर्वासितांच्या छावणीत झाला. पुढे तेही मूल अल्लाघरी गेले.
  2019 च्या फेब्रुवारी महिन्यात अॅंथनी लाॅईड या नावाच्या शोधपत्रकाराने (4थी) शर्मिना बेगमला युनोने चालविलेल्या निर्वासितांच्या छावणीत शोधून काढले. याबद्दल वृत्तसृष्टीने लाॅईडचा विशेष गौरव केला. त्यांच्या मते ही या दशकातील शोधपत्रकारितेतील पहिल्या क्रमांकाची शोधमोहीम होती. बेगमने आपण 9 महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. ब्रिटनमध्ये परत येऊन मुलाला जन्म देण्याची आणि वाढविण्याची आपली इच्छा आहे, असे ती म्हणाली. पण त्याचबरोबर आपण इसीसमध्ये सामील झालो याचा आपल्याला पश्चाताप होत नाही, असेही ती म्हणाली. इस्लामच्या शत्रूंचा शिरच्छेद होतांना आपण पाहत होतो पण आपले मन बिलकुल विचलित होत नसे, असे ती बनदिक्कत म्हणाली. पण इसीसला यश मिळणार नाही, असेही तिचे मत होते. याचे कारण तिच्या मते इसीसचे सदस्य भ्रष्टाचारी व दडपशाही करणारे होते. ब्रिटनने तिला ब्रिटनमध्ये परत घेण्याचे नाकारले. त्यानंतर तीनच दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला.
 पुढे बीबीसीनेही तिची मुलाखत घेतली. मला माफ करावे, अशी तिने विनंती केली कारण आपल्याला अजूनही काही ब्रिटिश मूल्ये मान्य आहेत, असे ती म्हणाली. ओलिसांचा शिरच्छेद होतानाचे व्हिडिओ पाहून मला इसीसमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली, असे तिने सांगितले. शिरच्छेद करणारे लोक खूपच चांगले होते. त्यांच्यासोबत राहून आपण चांगले जीवन जगू शकू, असे तिला वाटत होते. इसीसची सैद्धांतिक भूमिका आपल्याला मान्य आहे, तसेच त्यांच्या अत्याचाराचेही आपण समर्थन करतो, असे तिने स्पष्टपणे सांगितले. बलात्कार, खून आणि इतरांना गुलामासारखे वागविले जाते, याबद्दल तुला काय म्हणायचे आहे, असे विचारताच ती ताडकन म्हणाली, ‘शिया लोक इराकमध्ये दुसरे काय करताहेत?’. मग सुन्नींनी तेच केले तर त्यांचे काय चुकले? तिचे हे विचार ऐकून तिच्या वडलांना (अहमद अलींना) धक्काच बसला. आपल्याला आता पश्चाताप होतो आहे, एवढे जरी ती म्हणाली असती, तरी मला काहीसे समाधान वाटले असते, असे ते म्हणाले.
 बीबीसीने अथक प्रयत्न करून यागो रिजिकचीही (तिच्या डच नवऱ्याची) मुलाखत घेतली. आपण शर्मीनासह नेदरलंडमध्ये जाऊन राहू इच्छितो, असे तो म्हणाला पण नेदरलंडने त्या दोघांचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला आहे. सध्या ती दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहत आहेत. 
 ‘बुद्धिभेदाचे (ब्रेन वाॅशिंगचे) यापेक्षा भयंकर उदाहरण क्वचितच सापडेल. ही सगळी मुळात पोरसवदा वयोगटातील मुले असतात, हे लक्षात घेतले म्हणजे बुद्धिभेदाचे यापेक्षा बीभत्स, हिडिस व भयंकर स्वरूप दुसरे कोणते सांगता येईल? तसेच जी दुर्दशा या मुलींच्या वाट्याला आली, त्याबद्दलही काय म्हणावे?

आॅपरेशन रायबरेली आणि अमेठी सुद्धा!

आॅपरेशन रायबरेली आणि अमेठी सुद्धा! 
वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  2009 व 2014 या दोनवेळा श्रीमती सोनिया गांधी रायबरेलीहून  लोकसभेवर निवडून आल्या आहेत. उत्तरप्रदेशातील ठाकूर कुटुंबाने विशेषत: दिनेशप्रताप सिंग यांनी पराकोटीचे कष्ट घेऊन त्यांना निवडून येण्यास मदत केली होती, असे म्हटले जाते. तेच दिनेशप्रताप सिंग यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांच्याविरुद्ध रायबरेलीहून निवडणूक लढवीत आहेत. ठाकूर कुटुंब पाच भावंडांचे असून दिनेशप्रताप सिंग हे वयोज्येष्ठतेनुसार भावंडात दुसरे आहेत. ही पाचही भावंडे आपल्या भावाच्या समर्थनार्थ एकजुटीने उभी आहेत. पिठाची चक्की, सिमेंट संबंधित व्यापार आणि बांधकाम व्यवसायात ही भावंडे गुंतलेली आहेत.
   आम्ही पाच पांडव असून कौरवांचा पराभव करण्यास पुरेसे आहोत, असा त्यांचा विश्वास आहे. बड्या नामवाल्याच्या विरोधात बड्या कामवाल्याची ही लढाई असून आम्ही श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात तीन प्रमुख मुद्द्यांच्या आधारे लढा देत आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे. रायबरेलीचे अभिमानबिंदू, रायबरेलीचे तरूण आणि रायबरेलीचे किसान या तीन्ही बाबींकडे श्रीमती सोनिया गांधींनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच ‘नामदाराविरुद्ध कामदार’, असे हे रणशिंग आम्ही फुंकले आहे. हा लढा आॅपरेशन रायबरेली या नावाने संपूर्ण उत्तरप्रदेशात सर्वतोमुखी झाला आहे. विशेष असे की, दिनेशप्रताप सिंग यांची रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी अमेठीचे माजी आमदार डाॅ. मुस्लिम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
  तसा दिनेशसिंग यांनी भारतीय जनता पक्षात गेल्यावर्षीच पक्षाचे अध्यक्ष श्री. अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांचे तिघे भाऊ सुद्धा त्यांच्या सोबत होते. त्यावेळी अपवाद होता एका भावाचा. हरचंद राकेश सिंग हे उरलेले बंधू त्यावेळी उत्तरप्रदेश विधानसभेत आमदार होते. तेही आता आपल्या भावासोबत आहेत.
  प्रियंका गांधींनी यावेळी अगोदरच्या दोन निवडणुकांप्रमाणे केवळ रायबरेली आणि अमेठी या दोनच मतदार संघांवर आपले लक्ष केंद्रित न करता मोठी जबाबदारी स्वीकारावी हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे आणि नेमक्या याचवेळी दिनेशप्रताप सिंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 अमेठी बरोबरच केरळमधील वायनाड मतदार संघातूनही लढण्याचा निर्णय श्री राहूल गांधी यांनी घेतला तेव्हाच उत्तरप्रदेशात निरनिराळ्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या. काॅंग्रेस पक्षाचा दक्षिणेशी अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर अमेठीतून विजयाची  शाश्वती वाटत नसल्यामुळे सुरक्षित मतदार संघ म्हणून वायनाड हा केरळातील मुस्लिमबहुल मतदार संघ राहूल यांनी मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानंतर निश्चित केला, असे म्हटले जाऊ लागले होते. कारण श्रीमती स्मृती इराणी यांनी गेली पाच वर्षे अमेठी मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला असून त्या मतदार संघावरील आपली पकड चांगलीच पक्की केली आहे.
  अमेठी मतदार संघात जेव्हा राजीव गांधी उभे राहत असत तेव्हा हाजी महंमद हरून रशीद यांचे पिताजी हे त्यांचे प्रस्तावक असायचे. त्यांनीसुद्धा काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते राहूल गांधी यांच्याविरुद्ध उभे राहणार आहेत. 
 भारतीय जनता पक्षात सुन्नी व शिया या दोन्ही मुस्लिम पंथाचे नागरिक प्रवेश करीत आहेत, असे उत्तरप्रदेशातील सध्याचे चित्र आहे. तिहेरी तलाक बाबत मोदी सरकारची भूमिका मुस्लिमहिताची असून त्यामुळे मुस्लिम महिलांना फार मोठा दिलासा मिळणार आहे, असे त्यांचे मत आहे.

उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणे

उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणे
उत्तर प्रदेशातील सोशल इंजिनिअरिंग - छोट्या जाती/ जमातींचा प्रभाव किती?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 जातीपातीच्या राजकारणाला सोशल इंजिनिअरिंग हे गोंडस नाव प्रथमत: उत्तरप्रदेशात देण्यात आले, असे अनेकांचे मत आहे. 80 खासदार संसदेत व 403 आमदार विधानसभेत पाठवणारे उत्तर प्रदेश हे भारतातले सर्वात मोठे राज्य आहे! याशिवाय राज्यसभेतील 31 खासदार विधान परिषदेतील 100 आमदार वेगळेच!! पण या अजस्त्र उत्तरप्रदेशात असंख्य लहानलहान जाती आहेत. यादवांसारखी मोठी जातही  जशी आहे तसेच उच्चवर्णीयही चांगले 16 टक्के आहेत. तसेच जवळजवळ प्रत्येक चिमुकल्या जातीचा चिमुकला राजकीय पक्षही आहे. या चिमुकल्या मंडळींनीही अनेकदा बड्याबड्या राजकीय पक्षांना वेठीस धरले आहे, नमवले आहे, खुशामत करायला भाग पाडले आहे. सामान्यत: या मुद्द्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आले असून त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली आहे. या पक्षांची म्हणा किंवा जातींची म्हणा एकत्र मोट बांधण्याला ‘सोशल इंजिनिअरिंग’ असे भारदस्त नाव प्रथम उत्तर प्रदेशात दिले गेले असे म्हणतात. निवडणुकीचा काळ म्हणजे या पक्षांसाठी सुगीचे दिवस असतात. प्रत्येक पक्षाला या पक्षांची किंवा जातींची दखल घ्यावीच लागते. भारतीय जनता पक्ष, काॅंग्रेस, समजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष  हे पक्षही यातून सुटलेले नाहीत. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आणि 2017 साली विधानसभेच्या निवडणुकीत जातीय मेळ भारतीय जनता पक्षाने उत्तमरीत्या व न्याय्य प्रकारे साधला होता, असे मानले जाते.
 यावेळी 2019 मध्ये यादवांचा समाजवादी पक्ष व मायावतींचा बहुजन समाज पक्ष या अनुक्रमे बसप 22.2 % आणि सप  21.8 % जनाधार असलेल्या पक्षांची युती अमेठी व रायबरेली वगळता उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवीत आहे.
जातीनिहाय पक्ष 
1. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष किंवा जनवादी पार्टी (समाजवादी) ही नावे वाचल्याचे तरी आठवतंय का? सध्या पहिल्याशी भारतीय जनता पक्षाचे सूत जमले असून दुसऱ्याशी -जनवादी पार्टीशी (समाजवादी) - वाटाघाटी सुरू आहेत. नक्की काय होते ते लवकरच कळेल. 
2. अपना दल या नावाचा पक्ष एनडीए मध्ये सामील असून कुर्मी जातीच्या अनुप्रिया पटेल केंद्रात मंत्रिपद भूषवीत आहेत. भारतीय जनता पक्षात आपला पक्ष विलीन का करीत नाही, असा प्रश्न विचारला असता मंदस्मित करीत त्या म्हणाल्या आहेत, दोस्तीच बरी वाटते. या बरे वाटण्याचे कारण असे आहे की, त्यामुळे राजकीय सौदा अधिक किफायशीर होत असतो. अपना दल या पक्षातील एक गट पूर्व उत्तरप्रदेशात काॅंग्रेसच्या संपर्कात होता. पण काॅंग्रेस समाजवादी पार्टी आणि बसप यांच्या महागठबंधनात सामील होऊ न शकल्यामुळे आणखी मिलावट होणार किंवा नाही ते सांगता येत नाही. कृष्णा पटेल यांना मानणारा हा गट असून त्यांच्यात व अनुप्रिया पटेल गटात अधूनमधून धुसपुस सुरू असते तर कधी एकतेच्या आणाभाका घेणे सुरू असते.
  भारतीय जनता पक्षाने केंद्रियमंत्री अनुप्रिया पटेल यांना कुर्मी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी, योजिले आहे. १९९४ पर्यंत त्यांचे वडील सोनीलाल पटेल हे बसपाचे जनरल सेक्रेटरी होते. ओबीसीमध्ये यादवांचाच वरचष्मा असतो व म्हणून त्याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी चेतना रॅली आयोजित केली होती. सोनीलाल पटेल यांनी अपना दलाची स्थापन १९९५ मध्ये केली होती. अनुप्रिया ही त्यांची मुलगी ही मिर्झापूरहून लोकसभेवर निवडून आल्या नंतर तिला केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागे उत्तरप्रदेशातील राजकारण आहे, असे मानले जाते. अपनादलाने डझनभर जागांची मागणी भाजपकडे करून पाहिली, डिएन एतून बाहेर पडण्याची धमकी देऊन मागणीला बळ दिले. पण भारतीय जनता पक्षही कच्या गुरूचा चेला नाही, हे लक्षात आल्यावर ऊभय पक्षांनी दोन दोन पावले मागे घेत म्हणा किंवा परस्परांकडे  पुढे सरकत म्हणा, दोन्ही पक्षात मनोमीलन घडवून आणल्याचे सध्याचे चित्र आहे.
  याशिवाय 3. अनेक मुस्लिमांचा पाठिंबा असलेली पीस पार्टी, 4) कोळी व मासेमाऱ्याची निषाद पार्टी व 5) शाक्य, मौर्य आदींचे (महान दल नावाचे पण प्रत्यक्षात मात्र छोटेसेच असलेले) महान  दल यापैकी निषाद पार्टी एनडिएमध्ये सामील झाली असून योगींच्या गोरखपूरच्या जागी  पोटनिवडणुकीत निवडून आलेले प्रवीण निषाद सांसद भारतीय जनता पक्षाकडे वळल्याची वार्ता नुकतीच कानावर येत आहे. ते गोरखपूरहून उभे राहणार आहेत. निषाद पक्ष कोळी व मासेमारी करणाऱ्यांचा पक्ष असून हे लोक पूर्व उत्तर प्रदेशात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. निषाद पक्ष  भारतीय जनता पक्षप्रणित एनडिए सोबत आला आहे, त्यामुळे निदान 25 मतदार संघात एनडिएची ताकद वाढणार आहे.  मुस्लिम मतदारांचा पाठिंबा असलेल्या पीस पार्टी आॅफ इंडियाने 2012 च्या निवडणुकीत 200 जागा लढवून 4 जागा जिंकल्या होत्या. पण त्यावेळी या पक्षाला अपना दलाने पाठिंबा दिलेला होता. 2017 मध्ये हा पक्ष निषाद पक्षासोबत 403 म्हणजे सर्व जागा लढायच्या बाता मारीत  होता. पण हा इतिहास झाला. उरलेल्या दोन पक्षांनी म्हणजे पीस पार्टीने अजूनही आपले पत्ते पुरतेपणी उघड केलेले नाहीत. 
  पण महान दल काॅंग्रेसकडे वळेल, अशी चिन्हे आहेत. महान दल या नावाच्या छोट्याशा पक्षाची 2014 मध्ये काॅंग्रेसशी युती होती. ती 2019 मध्येही कायम राहील, अशी चिन्हे आहेत. बदायु, इटा, बरेली, शहाजहानपूर आणि फरुकाबाद या क्षेत्रात हा पक्ष प्रभावी आहे. शाक्य, मौर्य, कुशवाह, आणि सैनी या जातीचे लोक या पक्षाचे समर्थक आहेत. 
पिग्मी व्होट बॅंक
  उत्तर प्रदेशाले राजकारण म्हणजे जाती, उपजाती, उपउपजाती यांचे राजकारण आहे. सत्ताधारी पक्षाला हे छोट्या जातींचे राजकारण खेळणे तुलनेने सोपे जाते. 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तब्बल 17 मागास जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करून नवीन पिग्मी व्होट बॅंक तयार करण्याचा डाव टाकला होता पण विधानसभेच्या निकालात त्याचा अनुकूल परिणाम अखिलेश यादव यांना झालेला  दिसला नाही. ऐनवेळची मलमपट्टी कामी येत नाही, असे काहीसे झाले असावे.
पिग्मी बॅंक हा इलेक्शन स्टंट  होता काय? 
  बसपच्या मायावती अतिशय चतुर राजकारणी आहेत. त्यांच्यावतीने या 17 जातींसमोर ठेवलेले प्रलोभन उघड करून प्रतिक्रिया दिली नसती तरच आश्चर्य होते. बसपच्या (बहुजन समाज पक्ष) मायावतींनी 17 मागास जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा निर्णय म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून निवडणूक समोर ठेवून मतदारांना भुलवण्यासाठी योजलेला एक ‘इलेक्शन स्टंट’ आहे, असे म्हणून या निर्णयाची संभावना केली. अर्थात याच आशयाची शिफारस सत्तेत असतांना आपणही केली होती, हा मुद्दा त्या सोयीस्करपणे विसरत आहेत. आता बसप व सप एकत्र आले आहेत. आता या दोन्ही विषयांबाबत या दोन्ही पक्षांची भूमिका काय आहे, ते समोर आलेले नाही व येणारही नाही.
   या सतरा जाती एकेकट्या लहान असल्या तरी त्यातील  मतदारांची  एकत्रित संख्या अनुसूचित जातीच्या मतपेढीतली छोटी पण स्वतंत्र शाखा होऊन बसते, हे नाकारता येत नाही. पण आता बराच काळ लोटला आहे, त्यामुळे या किंवा अशा निर्णयाचा फायदा कोणाला किती होईल, हे सांगणे कठीण आहे.
  उत्तरप्रदेशात कोणत्या जातीचे किती? 
  उत्तरप्रदेशात ओबीसी 44 टक्के, दलित 21 टक्के, मुस्लिम तब्बल  19 टक्के व उच्च जाती 16 टक्के आहेत. यापैकी ओबीसी मधील एक मोठा टवका (15 टक्के) यादवांचा आहे. हे मोठेपण जसे संख्यात्मक आहे, तसेच ते प्रभाव म्हणूनही आहे.  पण यादवांमध्येही पोटजाती आहेत. मुलायम सिंग व बाबा रामदेव हे दोघेही यादव असले तरी बाबा रामदेव श्रेष्ठ यादव मानले जातात व ज्येष्ठ यादवांची संख्या नगण्य मानावी इतकी कमी नक्कीच नाही. तसेच रामदेव बाबांचा प्रभाव दोन्ही यादवांवर पडत असतो, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. रामदेवबाबांच्या भूमिकेला केवळ उत्तरप्रदेशातच नव्हे तर थोड्या प्रमाणात का होईना पण बिहारमध्येही महत्त्व आहे. हे योगगुरु सध्या उद्योगपतीही  झाले असून उद्योगपती सर्व पक्षांशी सारखेच संबंध ठेवून असतात.
  यादवेतर ओबीसीत बऱ्याच जाती आहेत. यांची संख्या यादवांच्या निदान दुप्पट आहे. याचाच अर्थ असा आहे की, 15 टक्के यादव तर 29 टक्के यादवेतर ओबीसी आहेत. यात कुर्मी, कीर, लोधी, जाट, सुनार या जाती येतात. तसेच 21 टक्के दलितात पासी व वाल्मिकी हे मोठे गट आहेत.
  माला जातीची टक्केवारी 4.5 टक्के आहे. हे मूळात मल्ल होते, असे म्हणतात. पण ही जात 27 उपजातीत विभागली गेली आहे. नद्यांना लागून असलेल्या 125 मतदार संघात उमेदवारांना पाडण्या किंवा जिंकवण्या इतकी ताकद या जातीची आहे. ह्या जाती एकगठ्ठा स्वरुपात एकापक्षाकडे वळतीलच असे नाही. असे झाल्यास विविध पक्षात विभागून त्यांचे मतमूल्य उणावेल.
राजभरांची सुहलदेव भारतीय सामाज पार्टी  
  पूर्व उत्तर प्रदेशात राजभर समाज मोठ्या प्रमाणात आहे. यात राजपूत, थारू, वैश्य राजपूत भारशिव, कल्हन, नागवंशी, पांडववंशी तोमर अशा अनेक उपजाती आहेत. इतिहास काळात किंवा कदाचित इतिहासपूर्व काळात सुद्धा भारतात कोणत्या ना कोणत्या कारणाने भारतात आलेल्या सर्व जातींचे प्रतिनिधित्व उत्तर प्रदेशात सापडते, असे जे म्हटले जाते, ते उगीच नाही. या जातीत आपापसातच बेटीव्यवहार व  रोटीव्यवहा होत असतात. सुहल देव हा या जातीचा मूळ व कर्तृत्ववान पुरुष मानला जातो. मोगलांचा पराभव करणारा हिंदू राजा अशी त्याची इतिहासातील ओळख आहे. सुहलदेव जयंतीनिमित्त उत्त्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला होता. मोदी सरकारने त्याच्या नावे टपाल तिकीटही काढले आहे. पूर्व उत्तर प्रदेशात राजभर समाजात प्रभाव असलेला सुहेलदेव भारतीय सामाज पार्टी या नावाचा पक्ष व भारतीय जनता पक्ष यात जागावाटपाबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ अजून तरी संपलेले नाही. मागणी केलेल्या 12 ऐवजी भाजपने या पक्षाला 8 जागा देऊ केल्या आहेत. या पक्षाला मानणारे राजभर समाजाचे लोक पूर्व उत्तप्रदेशातील अनेक मतदार संघात आहेत आणि ते एकगठ्ठा मतदान करतात, एवढेच सध्या नोंदवलेले बरे.
  बरेली व आसपासच्या भागात इत्तेहाद ए मिलाद काऊंसिल काही जागा लढविण्याच्या विचारात असून अजून तरी त्यांच्या कोणत्याही राजकीय पक्षाशी सल्लामसलत सुरू असल्याच्या बातम्या नाहीत.
ओबीसी भाजपाकडे ?
  उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रदेशअध्यक्षपदी  म्हणून केशव प्रसाद मौर्य यांची योजना करून व अपना दल मधील अनुप्रिया गटाला भाजप सोबत ठेवून यादवेतर ओबीसी मतदार भारतीय जनता पक्षाकडे वळावेत, असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. बसपचे माजी राष्ट्रीय सचिव स्वामीप्रसाद मौर्य यांनाही भारतीय जनता पक्षात आणून आणखी एका मौर्याला भाजपने साथीला घेतले आहे. मौर्यांच्या बरऱ्याच उपजाती आहेत. कच्छी, शाक्य, मौर्य, कुशवाह, कैरी आणि सैनी हे स्वत:ला मौर्यच म्हणवतात.
2014 साली भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशात अभूतपूर्व यश संपादन केले होते. यावेळी 42.3 टक्के मते भारतीय जनता पक्षाला मिळाली होती. तर समाजवादी पक्षाला 22.2 व बहुजन समाज पक्षाला 20 टक्के मते मिळाली होती. म्हणजे या दोन्ही पक्षांच्या एकत्रित मतांपेक्षा भारतीय जनता पक्षाला 0.1 टक्के मते जास्तच मिळाली होती.
 कुर्मी कुणीकडे?
  कुर्मी जातीत वर्मा व पटेल ही आडनावे आढळतात. कुर्मी, गंगवार व विणकर या  लहान असल्या तरी प्रभावशाली जाती आहेत. यादवेतर असूनही बेणीप्रसाद वर्मा यांची नाराजी दूर करून त्यांना मुलायम सिंग यादवांनी  राज्यसभेवर पाठविले ते उगीच नाही. सध्या समाजवादी पक्षात फूट पडली आहे. बेणीप्रसाद वर्मा यांनी शिवपाल यादवांकडे जाऊ नये म्हणून अखिलेश यादव त्यांची मनधरणी करीत आहेत. तिला यश येईल का? एक वेगळीच अडचण आहे. वेणीप्रसाद यादवांप्रमाणेच कुर्मी जातीचे असलेल्या नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडशी बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची युती आहे. निर्णय घेणे तसे सोपे नाही. बघूया पुढे काय व काय काय होते ते.
  उत्तरप्रदेशातील निरनिराळ्या जातींचे अस्तित्व लक्षात घेऊन बसपाने प्रत्येक जातीचा एक असे पाच नेते निवडून त्यात्या जातींची ‘काळजी’ घेण्यासाठी योजिले होते. जसे आमदार सुरेश कश्यप यांच्याकडे काश्यप व निषादांची जबाबदारी त्यांनी सोपविली होती. पण मायावतींचे हे सोशल इंजिनिअरिंग विधान सभा निवडणुकीत कामी आले नाही. अमित शहांचे सोशल इंजिनिअरिंग भारी पडले.
विणकर
 विणकरांचाही एक वेगळा गट असल्याचे अनेक राजकीय पक्षांना बरेच अगोदर  ओळखले होते. यात हिंदु (तांती व तांतुवे) व मुस्लिम (मोमीन) धर्माचे लोक असून ते जरी राज्यभर विखुरलेले असले तरी वाराणसीमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. वाराणसीत उस्ताद ‘योजना’ सुरू करून मोदींनी त्यांची दखल घेतलेली दिसते.
 उत्तर प्रदेशातील मुस्लिम डावपेचाचे मतदान (टॅक्टिकल व्होटिंग) करीत आले आहेत. कधी समाजवादी पक्ष तर कधी बहुजन समाज पक्ष यापैकी जो पक्ष भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकत असेल, त्याला ते मतदान करीत  आले आहेत. पण तिहेरी तलाक प्रश्नावर व प्रश्नामुळे मुस्लिम महिलांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल अनुकूल मत आहे. या प्रश्नावर स्पष्ट बोलणाऱ्या महिला फारशा नाहीत. पण तलाक बाबत अनुकूल भूमिका घेणारी महिला असेल का? रुढीप्रिय व मुल्ला मौलवींच्या प्रभावात असलेल्या महिलांनाही तिहेरी तलाक नकोच आहे.
 उत्तरप्रदेशातील ऊच्चवर्णीय 
 उत्तरप्रदेशात उच्चवर्णीय बऱ्याच मोठ्या प्रमाणात असून ते भारतीय जनता पक्षासोबत राहतील, असे दिसते.  सध्याचा कल पाहता उच्च जाती भारतीय जनता पक्षाला मतदान करतील असे वाटते. पण प्रियंका गांधींकडे या जातींना काॅंग्रेसकडे वळविण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 उत्तरप्रदेशात जर तिरंगी लढती झाल्या तर जिंकणाऱ्या पक्षाला निदान चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालीच पाहिजेत. छोट्या छोट्या असंख्य जातींचे महत्त्व वाढले आहे, ते यामुळेच. कोणतीही मोठी जात एकट्याने 40 चा टक्का पार करीत नाही. ही तूट भरून काढण्यासाठी राजकीय पक्ष लहान लहान जाती हातात भिंग घेऊन शोधून काढण्याच्या मागे दिसत आहेत व उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणात दिसणार आहेत.
 मोदींच्या नेतृत्वाची विशेषता 
 2014 व 2017 साली जातीपातीचीही जातीय समीकरणे बाजूला सारून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात  उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळविला. अमित शहा यांच्या सोशल इंजिनिअरिंगबाबतीतल्या कुशलतेलाही दाद दिली पाहिजे, हेही ओघानेच येते. एक गोष्ट मात्र नक्की आहे. या जातीपातीवर मात करण्याची क्षमता असलेले नरेंद्र मोदींचे नेतृत्व त्यांच्या गेल्या साडे चार वर्षातील कार्यामुळे, धडाडीमुळे, अहोरात्र कार्यरत राहण्याच्या वृत्तीमुळे सर्वत्र सारखेच लोकप्रिय आहे. नरेंद्र मोदींना प्रत्येक जातीत मतदान होत असते, ही फार मोठी जमेची बाजू आहे.

द दा व्हिन्सी कोड - एक वादग्रस्त कादंबरी

द दा व्हिन्सी कोड - एक वादग्रस्त कादंबरी 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 

   द दा व्हिन्सी कोड ही 2003 मध्ये प्रसिद्ध झालेली आणि डॅन ब्राऊन लिखित  कादंबरी ही एक गूढ, रोमांचक, रहस्यमय कलाकृती आहे. पॅरिसमधील जगातील सर्वात मोठ्या लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालयात (म्युझियममध्ये) झालेल्या खुनाच्या घटनेनंतर प्रतीकवादी राॅबर्ट लॅंगडन आणि सांकेतिक/कूटलीपीतज्ञ सोफी नेव्ह्यू यांना अनुसरून हे लेखकाचे  लिखाण आहे. सीन नदीच्या काठावर आणि पॅरिसच्या मध्यभागी असलेले हे जगातील सर्वात मोठे लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) ऐतिहासिक स्मारकही असल्याचे मानतात. 
   लिओनार्डो द व्हिन्सी आणि ऐझॅक न्यूटन या सारखे नामवंत सदस्य असलेली ‘प्रायोरी आॅफ सिआॅन’ नावाची एक गुप्त संघटना आणि ओपस डी नावाची कॅथोलिक संस्था यात भीषण युद्ध झाले होते.  द दा व्हिन्सी कोड या कादंबरीत जीझस ख्राइस्ट आणि मेरी मेंडलीन ही ज्यू महिला पतीपत्नी स्वरुपात दाखविले आहेत. चार अधिकृत ख्रिस्त कथानुसार मेरी मेंडलीन ही जीझसची फक्त शिष्या होती, पत्नी नव्हती. ती त्याच्यासोबत सतत असायची. ख्रिस्ताचे सुळावर चढविले जाणे, दफन आणि पुनरागमन या तिन्ही प्रसंगांची ती साक्षीदार होती.
   लिओनार्डो द व्हिन्सी या इटालियन चित्रकाराने मानवाची प्रमाणबद्ध आकृती (व्हिट्रुव्हिअन मॅन) रेखाटली असून या आकृतीसोबत एक गणितीय संदेश लिहिला आहे. तसेच त्या मानवाच्या छातीवर एक पंचकोनी ताराकृतीही त्याच्याच रक्ताने अंकित केली आहे. प्राचीनकाळी ग्रीस आणि बाबिलोनियामध्ये अशी पंचकोनी ताराकृती विश्वासाचे प्रतीक मानली जात असे. ख्रिश्चन लोकात जे स्थान क्राॅसला आहे, तसेच स्थान ज्यू लोकात या पंचकोनी ताराकृतीला आहे. हिलाच स्टार आॅफ डेव्हिड म्हणून संबोधले जाते. हिचा जादूटोण्याशी संबंध असल्याचे मानले जाते.
   द दा व्हिन्सी कोड या कादंबरीत एक पर्यायी धार्मिक सिद्धांत प्रस्तुत केलेला आहे. फ्रान्स देशाच्या इतिहासात मेरोव्हीच राजघराणे होऊन गेले आहे. यातील एक वंशज चेड्रिक हा अतिशय पराक्रमी होता, असे म्हणतात. याच्या पराक्रमाच्या कथा आजही वंशपरंपरेने सांगितल्या जातात. चेड्रिक इतका पराक्रमी होता की मेरोव्हीच या प्रदेशाशी सादृश्य असलेला भूभाग फ्रान्समध्ये आजही दाखविला जातो. या राजवंशाचे जीझस आणि मेरी मॅंडलीन या दांपत्याशी रक्ताचे नाते होते/आहे असे या कादंबरीत मानले आहे. पवित्र रुधिर आणि पवित्र कलश (होली ब्लड व होली ग्रेल) या ख्रिश्चन धार्मिकातील उल्लेखित बाबींचा उपयोग संशोधन सामग्री म्हणून या कादंबरीत  केलेला आढळतो.
   द दा व्हिन्सी कोड ही कलाकृती कादंबरी म्हणून अतिशय गाजली. पवित्र कलश आणि मेरी मॅंडलीन यांच्या विषयीच्या आख्याइकांना साहित्यक्षेत्रातच नाही तर जनसामान्यातही प्रचंड कुतुहल प्राप्त झाले. ख्रिश्चानिटीच्या इतिहासात या आख्याइकांचा नक्की प्रभाव किती हा विषय जगभर चर्चिला गेला. रोमन कॅथोलिक चर्चने मात्र या कादंबरीचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला आहे. तिच्यावर बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अनेक डुढ्ढाचार्य या विषयी मूग गिळून गप्प बसलेले आढळतात. या कादंबरीवर ऐतिहासिक व वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टींनी आक्षेप घेतलेले आढळून येतात, ही वस्तुस्थिती मात्र मान्य केली पाहिजे. हे लेखन किमानपक्षी चूक आहे, असे आक्षेपकांचे म्हणणे आहे. तरीही आजवर 44 भाषेत भाषांतर, 80 लक्ष प्रतींची विक्री, 9 आवृत्या (पायरेटेड वेगळ्या) हे साहित्यसृष्टीतील विक्रम या कादंबरीच्या खाती नोंदवलेले आढळतात.
  गुप्तचर कथा, गूढ, रोमांचक, रहस्यमय व कटकारस्थानयुक्त काल्पनिक कलाकृती अशी या कादंबरीची जातकुळी आहे. ब्राऊन या लेखकाची ही दुसरी कादंबरी आहे. या कादंबरीवरील चित्रपटही असाच गाजला/गाजतो आहे.
कथानक
  गुरु (टीचर) या नावाने आणि पदवीने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या वतीने सिलॅस या नावाचा ॲलबिनो कॅथोलिक मठवासी साधू /सन्यासी (माॅंक) लव्हर म्युझियममध्ये जॅक्वस साॅनीर या नावाच्या क्युरेटरवर एका रात्री जीवघेणा हल्ला करतो. म्युझियममधील कमानीतल्या मध्यवर्ती दगडाचा (कीस्टोनचा) शोध घेण्याचा ध्यास गुरुला लागलेला असतो. हा दगड सापडला (शोधता आला) तर पवित्र कलशाची माहिती मिळणे सोपे होईल, असे गुरुला वाटत असते.
   क्युरेटर जॅक्वस साॅनीरचे शव पोलिसांना सापडते ते व्हिट्रुव्हिअन मॅनच्या (मानवाची प्रमाणबद्ध आकृती) विशिष्ट मुद्रेच्या (आसनस्थ - पोज) स्वरुपात! हे कोडे उलगडण्यासाठी बेझू फॅचे हा पोलिस अधिकारी राॅबर्ट लॅंगडन नावाच्या संशोधक प्राध्यापकाला पाचारण करतो. राॅबर्ट लॅंगडन हा योगायोगानेच पण काही कामासाठी त्या गावी आलेला असतो. जॅक्वस साॅनीरने मरतामरता एका कूट/गुप्त/सांकेतिक लीपीत काही मजकूर लिहून ठेवला असतो. हा मजकूर आकड्यांच्या स्वरुपात असतो. 2, 4, 8, … ह्या अंकक्रमाला ‘फिबाॅनॅसी सिक्वेन्स’ असे म्हणतात. असाच अंकक्रम जॅक्वस साॅनीरने मरतामरता लिहिलेला असतो पण त्यातील मजकूर लगेच कळू नये म्हणून अंकांची क्रमवारी बदलून लिहिलेला असतो. हे कोडे उलगडून दाखविण्यासाठी राॅबर्ट लॅंगडन ला बोलविलेले असते.
   पोलिस अधिकाऱ्याचा समज असतो की जॅक्वस साॅनीरने मरतामरता आपल्या छाताडावर लिहिलेला हा अंकक्रम भूतपूजेशी संबंधित आहे. पण हे म्हणणे संशोधक राॅबर्ट लॅंगडन खोडून काढतो. तो सांगतो की, क्युरेटर जॅक्वस साॅनीर हा दैवी कलाकृतीतज्ञ होता. त्याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेली कलाकृती देवतेचा अप्रत्यक्ष उल्लेख करणारी आहे, ती दैत्याकृती असूच शकत नाही.
   क्युरेटर जॅक्वस साॅनीरची नात सोफी नेवी ही पोलिस खात्यातील सांकेतिक लीपी तज्ञ असते. ती संशोधक राॅबर्ट लॅंगडनच्या कानात सांगते की, ती क्युरेटर जॅक्वस साॅनीरची दुरावलेली नात आहे. तसेच पोलिस अधिकारी बेझू फॅचेला मनातून वाटते आहे की, संशोधक राॅबर्ट लॅंगडन हाच साॅनीरचा खुनी आहे, हेही ती राॅबर्ट लॅंगडनला हळूच सांगते. तिला असे का वाटते? कारण तिच्या आजोबाच्या संदेशातील तिच्यासाठी लिहिलेली शेवटची ओळ पोलिस अधिकारी बेझू फॅचेने लॅंगडन येण्यापूर्वीच खोडून टाकलेली असते. काय असते या ओळीत? ‘संशोधक राॅबर्ट लॅंगडनचा शोध घ्या’, अशी ती ओळ असते. सोफी नेवी आजोबा क्युरेटर जॅक्वस साॅनीरची एक आठवण सतावत असते. काय असते ती आठवण? आजोबा क्युरेटर जॅक्वस साॅनीर ही दुसऱ्या धर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती (पगन) असते, हे तिला माहीत असते. पण तिला खात्री असते की आपल्या आजोबाच्या मनात संशोधक राॅबर्ट लॅंगडनने सांकेतिक लीपीतील अर्थ उलगडून सांगावा, असेच असले पाहिजे. या अर्थानुसार पोलिस बॅंक आॅफ झूरिचच्या पॅरिसमधील शाखेतील एका सेफ डिपाॅझिट बाॅक्सपर्यंत येऊन ठेपतात. झूरिच शहर स्वित्झरलंडमधील एक जागतिक महत्त्वाचे बॅंकिंगचे आणि अर्थकारणाचे केंद्र आहे.
   सोफी नेवी आणि लॅंगडन पोलिसांची नजर चुकवून बॅंकेत प्रवेश करतात. तिथे एका सेफ डिपाॅझिट बाॅक्समध्ये त्यांना एका पेटी ठेवलेली असते. त्या पेटीला टेलिफोनच्या डायलप्रमाणे दिसणारे पण अंकांऐवजी अक्षरे असलेले गुप्त/कूट कुलुप लावलेले असते. अक्षरांची योग्य जुळवणी करताच/होताच ते कुलुप उघडते. व परवलीचा शब्द (पासवर्ड) कळतो. पण जोर लावून उघडल्यास मात्र व्हिनेगार असलेली कुपी फुटून त्यातील द्रवात समुद्र लव्हाळ्यावर लिहिलेला मजकूर विरघळून जात असतो. सोफी नेवी आणि लॅंगडन यांना ही पेटी परवलीच्या योग्य शब्द शोधून काढतात. योग्य अक्षर जुळवणी होताच तयार होणारा शब्द असतो ‘सोफी’. म्हणजे साॅनीरने आपल्या नातीचे ‘सोफी’ हे नाव परवलीचा शब्द म्हणून योजले असते. परवलीच्या शब्दाच्या आधारे पेटी उघडण्यात लॅंगडन व सोफीला यश येते. या पेटीत कमानीतील मध्यवर्ती दगड (कीस्टोन) ठेवलेला सापडतो.
  ती दोघे हा दगड घेऊन लॅंगडनच्या मित्राकडे सर ली टीबिंगकडे जातात.  हा  पवित्र कलशतज्ञ असतो. त्याला प्रायोरीची आख्याइका माहीत असते. तो सांगतो की कलश म्हणजे एक कप नसतो. ते एक थडगे असते. यात मेरी मॅगडलीनच्या अस्थी ठेवलेल्या असतात. 
   पोलिसांच्या हातावर तुरी देऊन टीबिंगच्या खाजगी विमानाने पळून जातात.  पेटी उघडल्यानंतर त्यांना आणखीही एक गुपित कळते. त्याच्या आधारे ते तिघे लंडनमधील वेस्टमिनीस्टर ॲबे येथे येऊन पोचतात. इथे असलेल्या ऐझॅक न्यूटनच्या  थडग्यापाशी ते येऊन पोचतात.
  विमानात आपापसात बोलतांना सोफी आपल्यात व आपला आजोबा साॅनीर यात दहा वर्षांपूर्वी दुरावा का निर्माण झाला ते सांगते. एके दिवशी ती विद्यापीठातून अचानक आजोबांच्या घरी आली असतांना तळघरात विवाहोत्तर प्रजोत्पादनविषयक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. ती आडून हा कार्यक्रम पाहते. यावेळी तिचे आजोबा साॅनीर काही महिला आणि पुरुष उपस्थित होते. काही महिलांनी बुरखा घातला होता व त्या देवतेची स्तुतीपद्ये गात होत्या. ती त्वरेने घरातून बाहेर पडते आणि आजोबांशी कायमचा संबंधविच्छेद करते. लॅंगडन तिला समजावूनसांगतो की, हा गैरप्रकार नसून तो एक पवित्र विवाह समारंभाचा कार्यक्रम होता.
   ते वेस्टमिनीस्टर ॲबेपर्यंत येत असतांना उघड होते की, ली टीबिंग हाच गुरु असतो व सिलॅस त्याच्याच साठी काम करीत असतो. टीबिंगला पवित्र कलशाचा उपयोग करयाचा असतो. त्याच्या समजुतीप्रमाणे हा कलश म्हणजे एक दस्तऐवज असतो. त्यातील माहितीनुसार या कागदपत्रावरून हे उघड होणार असते की, जीझस ख्राईस्टचे मेरी मॅगडेलीनशी विवाह झालेला असतो आणि त्यांना मुलेही असतात. हे रहस्य उघड होताच व्हेटिकन शहरातील रोमन कॅथोलिक चर्चची दुष्कीर्ती होऊन तो नष्ट होईल. पिस्तुलाचा धाक दाखवून टीबिंग त्याला दसरा परवली शब्द उकलण्यास भाग पाडतो. लॅंगडनच्या लक्षात येते की परवलीचा दुसरा शब्द ॲपल हा आहे. तो वापरून लॅंगडन ती पेटी टीबिंगला कळू न देता उघडतो. त्यातील सामग्री काढून घेतो आणि ती रिकामी पेटी फेकून देतो.
   इन्सपेक्टर फेच टीबिंगला अटक करतो. लॅंजडन निर्दोष असल्याची त्याला आता खात्री पटलेली असते. बिषप ॲरिंगोरोझा हा ओपस डी नावाच्या कॅथोलिक संस्थेचा प्रमुख  व सिलॅसचा मार्गदर्शक असतो. सिलॅसचा वापर निर्दोष व्यक्तींची हत्या करण्यासाठी झाल्याचे कळताच त्याला पकडून देण्यासाठी तो पोलिसांना मदत करण्यासाठी धावून जातो. सिलॅस ओपस डी च्या केंद्रातच लपून बसलेला असतो. हीे लोक आपल्याला मारण्यासाठीच आले आहेत, अशी कल्पना करून घेऊन तो केंद्रातून बाहेर पडतो व चुकून आपल्या मार्गदर्शकालाच - बिषप ॲरिंगोरोझालाच- गोळी घालतो. या जीवघेण्या हल्यातून बिषप ॲरिंगोरोझा सुखरूप बाहेर पडतो पण खुद्द सिलॅसच गोळीबारात मारला जातो.
   ॲपल हा परवलीचा शब्द सोफी व लॅंगडन यांना रोझेलीन चॅपेल (ख्रिस्ती देऊळ) पर्यंत नेऊन पोचवितो. तिथला शिक्षक सोफीचा बेपत्ता झालेला भाऊ असल्याचे त्यांना कळते. लहानपणी झालेल्या कार अपघातात सोफीच्या आईवडलांसोबत हाही मेला, असे मानले गेले होते. रोझेलीन चॅपेलच्या पालक मारी चाॅवेल सेंट क्लेअर ही सोफीची आजवर बेपत्ता असलेली आजी असल्याचे उघड होते. यावरून खुलासा होतो की, सोफी आणि तिचा भाऊ ही दोघे जीझस ख्राइस्ट आणि मेरी मॅगडलीन यांचे वंशज आहेत. प्रायोरी आॅफ सायाॅन यांनी ही माहिती जिवाच्या भीतीने दडवून ठेवली होती.

शेवटच्या संदेशाचा अर्थ असा होतो की, लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालयाखाली पवित्र कलश पुरला गेला आहे. हे वस्तुसंग्रहालय काचेच्या उलट्या पिरॅमिडसारखे असते. याला धूर जाण्यासाठी धुरांडी असतात. प्रकाश किरण येऊ शकावेत असे मार्ग असतात. लॅंगडन यांचा मागोवा घेत दगडी शवपेटीपर्यंत पोचतो. यातच मेरी मॅगडलीनचे शव असते. त्याच्यासमोर लॅंगडन नतमस्तक होतो.

समीक्षा
इतिहास म्हणून समीक्षा
या ग्रंथावर सडकून टीका झाली. ख्रिस्तीधर्माचे चुकीचे वर्णन, सांकेतिक लीपीचे सदोष उकलन, युरोपियन कला, इतिहास आणि शिल्पशास्त्राचे वपर्यस्त वर्णन आदी विशेषणे असलेला ग्रंथ अशी या ग्रंथाची संभावना करण्यात आली. पण समीक्षक हीएक कल्पित कादंबरी आहे हे विसरले, असेही उत्तरादाखल म्हटले गेले. सर्वच ख्रिस्ती पंथांना यातील गृहीत बाबी अमान्य झाल्या. घोर फसवणुकींनी युक्त निरर्थक लिखाण व खोटेपणा यावर कादंबरीचा डोलारा रचलेला आहे, अशा शब्दात ताशेरे ओढण्यात आले आहेत.
  इतिहासाचे विकृतिकरण व बनाव यावर आधारित लिखाण, विकृत कल्पनाविलास यांची रेलचेल यात आहे. ऐतिहासिक कादंबरीचे लिखाणही मुख्यत:  व मूलत: ऐतिहासिक संशोधन वाटावे, या प्रमुख तत्त्वाला या कादंबरीत हरताळ हरताळ फासला गेला आहे.
  ऐतिहासिक घटनांचे उघडउघड पुनर्लेखन, उलगडा आणि खुलासा  करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.
   प्रत्यक्ष लेखकाने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. ऐतिहासिक दस्तऐवज, धार्मिक विधी व कर्मकांड, संकल्पनांचे सुसंघटन, कलाकृती आणि शिल्पकला यांच्याशी प्रतारणा केली, असे एकही उदाहरण या कादंबरीत दाखवता येणार नाही, असे लेखक म्हणतो आहे. इतिहासात असेच घडले असावे, असे तुला वाटते का, असा प्रश्न केला असता, हे असेच घडले असावे, याची मला खात्री वाटते, असे तो म्हणाल्याची नोंद आहे.
साहित्यकृती म्हणून समीक्षा 
याबाबतही दोन मते आहेत. साहित्याने सुद्धा इतिहासाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असा आक्षेपकांचा प्रमुख मुद्दा होता.
इतिहासातही कूटस्थळे असतातच, ती उलदडून दाखवतांना व रोमांचकारी व रहस्यमय लिखाण करतांनाही ते आनंददायक असावे, हे पथ्य लेखकाने पाळले आहे.
कहानिमे ट्विस्ट हा प्रकार कादंबरीत अनेकदा आला आहे. त्यामुळे कादंबरीची  रंजकता वाढली आहे.
कायदेशीर समीक्षा 

या कादंबरीच्या लेखकावर वाङ्मयचौर्याचाही आरोप करण्यात आला होता. पण ते दावे न्यायालयात टिकले नाहीत.

चीन मसूदची इतकी पाठराखण का करतो?

चीन मसूदची इतकी पाठराखण का करतो?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैशे-ए-महंमदने स्वीकारल्यानंतर त्या संघटनेचा मुख्य  असलेल्या मौलाना मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करावे, अशा आशयाच्या फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी सुरक्षा समितीत मांडलेल्या ठरावाला तसं पाहिलं तर मंजूर व्हायला काहीच हरकत नव्हती. पण चीनने आपला(व्हेटो) नकाराधिकार वापरून तो पारित होऊ दिला नाही. 
बडे पाच व्हेटोचे अधिकारी   
   हे वृत्त कानावर पडताच याच चीनला सुरक्षा समितीचा सदस्य करून घ्यावे, यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे स्मरण झाल्यावाचून राहणार नाही. तेव्हा चीनमध्ये माओने साम्यवादी क्रांती घडवून राष्ट्रीय चीनच्या चॅंग- काई-शेखच्या क्युमिनटाॅंग पक्षाची राजवट उलथून टाकली होती. सुरक्षा समितीत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व  चॅंग काई शेखचा राष्ट्रीय चीन (नॅशनॅलिस्ट चायना) हे पाच देश स्थायी सदस्य होते व त्यांना नकाराधिकार होता. हा अधिकार वापरून या 5 पैकी कोणताही एक देश कोणताही विषय चर्चेविना थोपवून धरू शकत होता. 
   हेचि फल काय मम तपाला?
  चीनमध्ये क्रांती झाल्यानंतर व राष्ट्रीय चीनची जागा साम्यवादी चीनने घेतल्यानंतर ही जागा साम्यवादी चीनच्या राजवटीला मिळावी, असे अमेरिका, ब्रिटन व फ्रान्य या देशांना वाटत नव्हते. ही जागा त्यांनी भारताला देऊ केली असता, ही जागा मुळात चीनची असल्यामुळे, आपण त्या प्रस्तावाला विरोध करून ह्या जागेसाठी चीनचाच आग्रह धरला होता. तोच चीन आज भारताची प्रत्येक बाबतीत कोंडी करतो आहे. पाकिस्तान व मसूद अझर संबंधात तर चीनने त्यांची कधी ठराव थोपवून आणि शेवटी (व्हेटो) नकाराधिकार वापरून पाठराखण केली आहे. मार्च 2016, आॅक्टोबर 2016, डिसेंबर 2016, फेब्रुवारी 2017 व मार्च 2019 इतकेदा चीनने पाकिस्तानची व मसूद अझरची कड का घ्यावी, हे समजण्यासाठी बरेच मागे जावे लागेल. तसेच चीनची बाजू घेऊन आपण आपल्या पदरी काय पाडून घेतले, तेही समजून घ्यावे लागेल.
  भारतद्वेशाचे कारण 
    तिबेटमधून परागंदा होऊन भारतात आश्रयाला आलेल्या दलाई लामाला भारतात आसरा दिला ही बाब चीनला खूपच खटकली आहे. तसेच आपल्या वाढत्या स्वामित्वाला व विस्तारवादाला जर उद्या कुणी वेसण घालू शकणार असेल, तर निदान आशियात तरी, तो भारतच असणार आहे, हेही चीन पक्केपणी जाणून आहे. म्हणून भारताच्या प्रगतीत अडथळा आणण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करत असतांना स्वत:साठी मात्र सर्व सूक्तासूक्त मार्गांचा अवलंब करीत चीनने आर्थिक, राजकीय, सैनिकी व वैज्ञानिक क्षेत्रात बरीच मोठी मजल मारली आहे. 
  चीन आणि अन्य देश 
  गेल्या काही वर्षात अमेरिका व चीन यांच्यात व्यापारविषयक असंतुलन व अन्यप्रश्नांवरून ‘तू तू, मै मै’ झाले पण शेवटी मात्र आता दोघेही एकमेकांशी  गुरगुरत का होईना, पण जुळवून घेत आहेत. चीनमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते आहे, हे सर्व जाणतात पण त्याबद्दल खडसावण्यास कोणीही पुढे येत नाही. ब्रिटनने तर संसद सदस्यांसमोर भाषण करण्याचा बहुमान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला. चीनच्या शिनज्यांग प्रांतातल्या तुर्की मुस्लिमांच्या मुस्क्या आवळल्या जात असूनही जगाततील 57 पैकी 56 मुस्लिम देश मूग गिळून गप्प बसले आहेत. एकट्या तुर्कस्थाननेच कायतो चीनचा निषेध केला आहे. फक्त निषेधच. यानंतर त्यानेही गप्प बसणेच पसंत केले. नैतिकतेचा पुरस्कार केला जावा, मानवी हक्कांची बूज राखली जावी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, अत्याचाराचा निषेध करावा आणि दहशतवादाची दखल घेतली जावी व धिक्कार व्हावा याबद्दल जगात दुमत नाही. पण म्हणून एवढ्याशा (?) कारणावरून चीनशी वैर पत्करण्यास कुणीही तयार नाही. कारण प्रत्येकाला आपल्या हिसंबंधांना जपायचेच असते. त्यांना  बाधा येईल असे काहीही करायला ते तयार नसतात.
 मोदी टच 
   नरेंद्र मोदी गुजराथचे 12 वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी परराष्ट्रांशी संबंध जोडतांना स्वत:ची अशी शैली अमलात आणली. या खासीयतीला परसनल टच किंवा मोदी टच असे संबोधले जाते, राष्ट्रप्रमुखांशी वैयक्तिक आपुलकीचे संबंध प्रस्थापित करण्यावर त्यांनी भर दिला. विरोधकांनी हेटाळणीवजा शब्दात या प्रयत्नांची चेष्टा केली आहे. पण याला फळ मिळाले. दुबई व सौदी अरेबियांनी दडून बसलेल्या गुन्हेगारांना भारताच्या स्वाधीन केले. पुलवामा हल्याला उत्तर म्हणून पाकिस्थानातील बालाकोट प्रशिक्षण छावणीवर भारताने हवाई सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा 57 पैकी फक्त एका मुस्लिम राष्ट्राने म्हणजे तुर्कस्थाननेच भारताचा निषेध केला.
   पाकिस्तानला वाचविणे भाग 
  पण सुरक्षा समितीत फ्रान्स व मित्र राष्ट्रांनी मांडलेला ठराव निरस्त करून चीनला मझूरला नव्हे तर पाकिस्तानला वाचवावयाचे होते. पाकिस्तानचा चीनला एवढा पुळका का, हेही समजून घेतले पाहिजे. चीनचे खरे मित्र दोनच. एक उत्तर कोरिया व दुसरा पाकिस्तान. अमेरिका आणि उत्तर कोरियातील वाटाघाटी फिसकटल्या असल्या तरी उत्तर कोरियाच्या अमेरिकेविषयीच्या धोरणात भविष्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, हे चीनच्या लक्षात आले असणारच. मग उरतो पाकिसतानच.या देशात चीनचे हितसंबंध प्रचंड प्रमाणात गुंतले आहेत. चीन-पाकिस्तान एकाॅनाॅमिक काॅरिडाॅरला पाकिस्तानने सहकार्य देऊ केले आहे. याउलट  भारताने  वन बेल्ट वन रोड या योजनेत सहभागी होण्यास आता दुसऱ्यांदा नकार तर दिला आहेच पण एवढेच करून न थांबता चीन- पाकिस्तान एकाॅनाॅमिक काॅरिडाॅरलाही विरोध केला आहे. कारण हा रस्ता ज्या भागातून जातो आहे, तो पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे, म्हणजेच पर्यायाने भारताचा भाग आहे. दुसरे असे की, या भागात चीनची साधन संपत्ती व  कर्मचारीही आहेत. मसूदने मनात आणले तर तो या भागात उपद्रव निर्माण करून चीनला त्रास देऊ शकतो, याचीही चीनला जाणीव असलीच पाहिजे. मसूदला चुचकारणे ही चीनची गरज आहे, ती यामुळेच. आणि म्हणूनही चीनला मसूद बद्दल कळवळा आहे, हे उघड आहे. जवळजवळ 50 अब्ज डाॅलरची गुंतवणूक चीनने पाकिस्तानात केलेली आहे, ग्वादार बंदराचा वापर  करून पॅसिफिक महासागरात उतरायचे आहे. हे सर्व सुरळीतपणे पार पडायचे असेल तर पाकिस्तानी जनता, सरकार, लष्कर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांचेही सहकार्य चीनला हवे आहे. पण नकाराधिकार वापरून मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यास प्रतिबंध करून चीनने घेतलेली भूमिकाही नोंद घेण्यासारखी आहे. हा प्रश्न एक घाव दोन तुकडे करीत निकालात न काढता लटकत ठेवला आहे. हा प्रश्न वाटाघाटीने सुटू शकेल, आम्हाला या विषयाचा अभ्यास करण्यास वेळ हवा आहे, असा साळसूदपणाचा आव चीनने आणला आहे, तो यामुळेच.

  पण भारतही इरेला पेटला आहे. पाश्चात्य राष्ट्रेही मसूदच्या मुस्क्या आवळण्याचा पर्यायी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत