Monday, June 22, 2020

असे हे आपले (सख्खे?) शेजारी!

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात  https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल.तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात

https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल.

असे हे आपले (सख्खे?) शेजारी!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    ज्या दोन देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात, ते दोन देश परस्परांचे नैसर्गिक शत्रू असतात, असे एक वचन आहे. सर्व सीमा या परमेश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित, परंपरेनं चालत आलेल्या व ज्याच्या मनगटात जोर त्याच्या म्हणण्यानुसार बदलणाऱ्या  असतात.  भारत आणि चीन तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर नेहमीच तणावाचं वातावरण असतं. त्यात आता नेपाळचीही भर पडली आहे. अफगाणिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका अशा 5 शेजारी देशांच्या सीमाही  विचारात घेतल्या तर एकूण आठ देश आपले शेजारी आहेत.
                                भारत - पाकिस्तान
      जगातल्या सर्वात जास्त तणावग्रस्त आंतरराष्ट्रीय सीमांच्या यादीतील ही सीमा 3323 किलोमीटर्स लांब आहे. या सीमेला भारतातली गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू - काश्मीर ही 4 राज्ये लागून आहेत. यातील 1225 किलोमीटर्सची सर्वात मोठी  सीमा ही एकट्या जम्मू काश्मीर राज्याला लागून आहे. हिला त्त्या राज्यानुसार वेगवेगळी नावे आहेत. लाईन ॲाफ कंट्रोल ही सीमा काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरला वेगळे करते, वाघा बॉर्डर भारतातील पंजाब आणि पाकिस्तानी पंजाबला जोडते, तर झिरो पॉईन्ट ही सीमा राजस्थान आणि गुजरातला पाकिस्तानी सिंधपासून वेगळी करते. याच सीमा ओलांडून अवैध तस्करीबरोबर घुसखोरी आणि दहशतवादी कारवायाही सुरू असतात. हा धोका भारताला सर्वाधिक त्रासदायक ठरतो आहे.
                                 भारत - चीन
   भारत आणि चीन यातील 4056 किमी लांब सीमा लडाख (जम्मू - काश्मीर), उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि  अरूणाचल प्रदेश, या भारतीय राज्यांना लागून आहे. तसेच भूतानकडून पश्चिमेकडची सीमा 890 किमी, तर पूर्वेकडची 260 किमी. लांब आहे. भारतातील अरूणाचल व तिबेट (आजचा चीन) यादरम्यान करारबद्ध असणार्‍या या सीमारेषेलाच मॅकमोहन रेषा म्हटलं जातं. तिबेट हे सार्वभौम राष्ट्र नसल्यामुळे तिबेटला असा करार करण्याचा अधिकार नव्हता, तसेच यावेळच्या सभेला चीनचा प्रतिनिधी गैरहजर असल्याची निमित्ते पुढे करीत आज चीनकडून या सीमारेषेबद्दल विवाद निर्माण केला जातो आहे. तसेच अक्साई चीन हा लडाखचा उत्तरटोकाचा प्रदेश आपला असल्याचा चीनचा दावा आहे. आज मुख्यत: हीच सीमा चीनच्या नृशंस व दगलबाज हल्यामुळे धगधगते आहे.
                                        भारत - नेपाळ
    भारत आणि नेपाळ दरम्यान असणारी सीमारेषा ही 1236 किलोमीटर्स लांबीची आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि सिक्कीम या राज्यांना लागून ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि ती दोन्ही बाजूंनी ये-जा करण्यासाठी सताड खुली असलेली जगातील बहुदा एकमेव सीमा असावी. आज मात्र चीनच्या चिथावणीवरून साम्यवादी राजवटीतील नेपाळने नकाशायुद्ध सुरू केले आहे. पण भारतीय व नेपाळी जनतेत सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक स्तरावरील स्नेहसंबंधांची वीण घट्ट असून ती उभयपक्षी जपण्याची आवश्यकता आहे.            
                                  भारत - अफगाणिस्तान
  अतिशय लहान म्हणजे 106 किमी लांबीची ही सीमा पाकव्याप्त काश्मीर व अफगाणिस्तानला जोडते. सध्या जरी हा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असला तरी हा भारताचाच भाग असल्याचा पुनरुच्चार गृहमंत्री श्री अमित शहा यांनी संसदेत नुकताच केला आहे. त्यातच अक्साई चीन हा चीनने 1962 मध्ये बळकावलेला भाग येत असल्यामुळे चवताळलेल्या चीनचे आजचे उपद्रव सुरू केले असावेत. अशांत अफगाणिस्तानातील शांतता चर्चेतून भारताला वगळण्यात चीन व पाक ही दुक्कल यशस्वी झाली आहे.                                    
                                   भारत - बांग्लादेश
    भारत आणि बांग्लादेशदरम्यान सुमारे 4016 किमी. लांब भूसीमा आहे. पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम या भारतीय राज्यांना जोडून ही सीमारेषा येते. यापैकी सर्वाधिक 2216 किलोमीटर्स लांबीची व जगातील अति विचित्र सीमा ही पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. भारतातून गंगा, ब्रम्हपुत्रासोबतच पात्रे बदलणाऱ्या जवळपास ५४ नद्या बांग्लादेशमध्ये जातात, आणि यापैकी बहुतेक नद्यांना सीमेचाच दर्जा दिलेला आहे. पण नदीपलीकडचा काही छोटासा भाग काही ठिकाणी भारतात तर काही ठिकाणी बांग्लादेशात आहे. त्यामुळे या एवढ्याच भागातील प्रशासन दोन्ही देशांसाठी अडचणीचे झाले आहे. या सीमेवरही घुसखोरी, अवैध तस्करी आणि दहशतवादी कारवाया होत आल्या आहेत. बांग्लादेशात नागरिकत्वाच्या मुद्दय़ावरही भारताविरोधी वातावरण तापवणे सुरू आहे. पण आज बांग्लादेशात शेख हसिना पंतप्रधानपदी आहेत. त्या बांगलादेशाचे संस्थापक आणि भारताचे मित्र, शेख मुजिबूर रहमान यांच्या कन्या असल्यामुळे त्यांची राजवट भारतासाठी यासाठी अनुकूल आहे.                                  
                                     भारत - म्यानमार
   भारत आणि म्यानमार दरम्यान 1643 किमी. लांब सीमारेषा आहे आणि ती अरूणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मणीपुर आणि मिझोरम या राज्यांना लागून आहे.  बंडखोर, उपद्रवी, तस्करी करणारे व दहशतवादी लोक भारतात उपद्रव करून सीमा ओलांडून म्यानमारमध्ये पळून जात असतात. त्याला सध्या बऱ्याच प्रमाणात आक्ळा बसला आहे.
                                भारत - श्रीलंका
   जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय सीमांपैकी ही एक आहे. रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडणारा हा 30 किलोमीटर लांबीचा रामसेतू आहे. त्यालाच ॲडम्स ब्रिजही म्हटलं जातं. भौगोलिक रचनेनुसार चुनखडीने बांधलेला हा सेतु एकेकाळी भारत आणि श्रीलंकेला जोडणारा दुवा होता. तो आज पाण्याखाली गेलेला दिसतो. तमिळ-सिंहली वाद, नेतृत्वावरील साम्यवाद्यांचा प्रभाव आणि चिनी कर्जाची मगरमिठी यांच्या  झळा भारतालाही कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे सहन कराव्या लागत आहेत.
                                   भारत - भूतान
    भारत आणि भुतानदरम्यानची सीमा ही 699 किलोमीटर्स लांबीची आहे, जी सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांलगत येते. यापैकी सर्वाधिक लांबीची 267 किमी. सीमा ही आसामची आहे. भूतानचे जगातील 52 देशांशीच राजकीय संबंध आहेत. यात चीन नाही. या व इतर सर्व देशांशी असलेल्या भूतानच्या संबंधांची जपणूक भारताकरवी होत असते. डोकलामप्रकरणी भारताने ही जबाबदारी किती चोखपणे पार पडली, हे सर्व जगाने पाहिले आहे.
    सध्या पाकिस्तान, चीन, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ अशा अनेक सीमांवर भारताला त्रासदायक ठरणाऱ्या हालचाली होत असतात. पण तरीही आपला देश शांततापूर्ण मार्गाने प्रत्येक शेजारी देशांशी बरोबरीचे व सलोख्याचे संबंध जोडून समर्थपणे उभ्या राहण्याच्या प्रयत्नात आहे. भारत भविष्यात जसजसा अधिकाधिक समर्थ होत जाईल, तसतशा या सीमा शांत होतील. दुसराही एक मार्ग आहे, समजुतदारपणाचा. पण आपल्या बहुतेक सख्या (?) शेजाऱ्यांमध्ये आजतरी तो अभावानेच आढळतो आहे.

No comments:

Post a Comment