Monday, June 29, 2020

महत्त्व ट्रायजंक्शन्सचे आणि खिंडींचेही!

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.

महत्त्व ट्रायजंक्शन्सचे आणि खिंडींचेही!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    जेव्हा तीन देशांच्या सीमा एकमेकींना एका बिंदूत स्पर्श करतात तेव्हा त्या स्थितीला (तिठा) ट्रायजंक्शन असे नाव आहे. तीन देशांच्या सीमांच्या संपात बिंदूवर उभी असलेली व्यक्ती एकाअर्थी एकाच वेळी त्या तिन्ही देशात उभी असते, असे म्हटले तर ते चुकीचे म्हणता येईल का? म्हणूनच हे बिंदू संघर्षप्रवण असतात. असे चार संपात बिंदू हिमालयात आहेत,
हिमालयातील ट्रायजंक्श्न्स आणि चिनी तंत्र
   हिमालयातील दिफु खिंड, डोकलाम, कालापानी/लिपुलेख खिंड व सियाचीन हिमनदी या चारही ट्राय- जंक्शन्सवर (तिठा) कसेही व काहीही करून भारताऐवजी आपला ताबा असावा, अशी चीनची इच्छा आहे. हवा असलेला प्रदेश हडपण्यापूर्वी, चीन सुरवातीला त्यासह इतर अनेक प्रदेशांवर आपला दावा ठोकतो, नंतर दबाव आणतो, मग हळूच घुसखोरी करतो आणि हटकताच खळखळ करीत, मुळात हव्या असलेल्या प्रदेशातून माघार घेतांना टाळाटाळ व वेळकाढूपणा करतो आणि शेवटी दुसरा देशच कसा हट्टी आहे, असा कांगावा करतो. जिथे गवताचं एक पातंही उगवत नाही, किंवा दऱ्या, टेकाडे, पठारेच आहेत, अशा भूभागाचेही सामरिक महत्त्व कसे व किती महत्त्वाचे आहे, हे जाणून घ्यायला जिज्ञासूंना नक्की आवडेल, असे वाटते.
खिंडी ईशान्य भारतातल्या
दिफु खिंड - 4,587 मीटर उंचीवर असलेली दिफु खिंड भारत, चीन  आणि म्यानमार यांना जोडते. या खिंडीतून अगोदर म्यानमार व तिथून ईशान्य भारतात प्रवेश करणे सोपे आहे. ही मॅकमहोन लाईनवर असून इथून अरुणाचल प्रदेशात प्रवेश करणे सोपे आहे. अरुणाचल प्रदेशाला चीन दक्षिण चीन म्हणतो. अरुणाचल प्रदेशची तिबेट लगत सीमा ही अत्यंत दुर्गम आणि उंच हिमशिखरांनी व्यापलेली आहे. हाच दुर्गम अरुणाचल प्रदेश ईशान्य भागातील मैदानी राज्यांसाठी एका संरक्षक भिंतीच्या स्वरुपात उभा आहे. दुर्गम अरुणाचल प्रदेशाून लष्करी आक्रमण करणे सोपे नाही. म्हणून भारतात प्रवेश करण्यासाठी अरुणाचलचा दुर्गम प्रदेशाला पर्यायी मार्ग शोधण्याची चीनची गरज आहे. ही गरज  दिफु खिंड पूर्ण करू शकते. दिफु खिंड अगोदर ताब्यात घ्यायची. अरुणाचलाला वळसा घालून आसामच्या मैदानी भागात घुसायचे. पुढे हळूहळू ईशान्य भारतातील राज्ये एकानंतर काबीज करणे चीनसाठी कठीण नाही. लष्करी भाषेत सांगायचे तर ज्या हाती दिफु खिंड तो ईशान्य भारतावर राज्य करील. म्हणूनच दिफु खिंडीसाठी भारताने भरभक्कम कवच उभारले आहे.
  याशिवाय जेलेप खिंड, बोमदिला खिंड व नाथुला खिंडीवरही नियंत्रण मिळावे म्हणून इकडेही चीनची वाकडी नजर आहेच. या तिन्ही खिंडी मात्र दोन देशांमधील खिंडी आहेत.
जेलेप खिंड - सिक्कीम (भारत) आणि तिबेट (चीन) यांना जोडणारी जेलेप खिंड 4,267 मीटर उंचीवर आहे. उंच पर्वत रांगांमध्ये वसलेली ही खिंड, भारत व तिबेटची राजधानी ल्हासा मार्गावर आहे.
बोमदिला खिंड- अरुणाचल ल्हासा मार्गावर दिफु खिंडीच्या जवळच पर्यायी मार्ग या नात्याने बोमदिला खिंड आहे. ज्यांना 1962 चे चीन-भारत युद्ध आठवत असेल, त्यांना बोमदिला खिंड हे नाव नव्याने सांगण्याची गरज पडणार नाही. ही खिंड भूतानच्या पूर्वेला आहे. ही खिंड वर्षातील बहुतेक दिवस वाहतुक आणि व्यापारासाठी खुली असते, हे हिचे खास वैशिष्ट्य आहे.
नाथुला खिंड - भारत आणि चीन यांना जोडणाऱ्या सिक्कीममधील 4,310 मीटर उंचीवरच्या नाथुला खिंडीचा वापर वाहतुक आणि व्यापारासाठी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. 9 मे 2020 याच भागात धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.
डोकलामचे वेगळेपण
    भारत, भूतान व चीन (तिबेट) या तिन्ही देशांच्या सीमा, उंच पठारावरील डोकलाम पठारावर भूतानमध्ये मिळतात. भूतानचे संरक्षण भारताने करावे, असा उभयपक्षी करार झालेला आहे. 4,653 मीटर उंचीचे व 89 चौरस किमी क्षेत्रफळाचे हे पठार व खोल दरी यांनी हा प्रदेश युक्त असून चीनच्या बाजूने चुंबा दरी तर भूतानच्या बाजूने पूर्वेला आणि सिक्कीमच्या बाजूने पश्चिमेला हा या एकाक्षरी नावाची दरी आहे. भूतानच्या नकाशातील डोकलामवर चीनने आपला दावा ठोकला आहे. भूतान व चीनमध्ये आजवर चर्चेच्या अनेक निषफळ फेऱ्या पार पडल्या आहेत. जुलै 2017 मध्ये भारतीय सैन्याने डोकलाम पठारावर रस्ता बांधण्यासाठी आलेल्या चीनच्या सैन्याला अडविले, थोपवले व रस्ता बांधण्याचे काम थांबवले.
   तिबेटच्या (चीनच्या) चुंबी दरी पासून केवळ 22 किलोमीटर रुंद  असलेला सिलिगुडी कॉरिडॉर (जोडमार्ग) उर्फ चिकन नेक पश्चिम बंगालमध्ये आहे. याच्या बाजूला नेपाळ बांग्लादेश व भूतान हे देश आहेत. हा जोडमार्ग ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडतो. चुंबी दरीतून सैन्य डोकलाममध्ये घुसवले की सिलिगुडी जोडमार्ग ताब्यात घेणे कठीण नाही. असे केले की संपूर्ण ईशान्य भारत चीनला ताब्यात घेता येऊ शकेल, अशी चीनची योजना आहे.
कालापानी / लिपुलेख खिंडीचे खास महत्त्व
   भारत-नेपाळ-चीन यांच्या सीमा 5,200 मीटर उंचीवरील कालापानी ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. इथून चीनच्या लष्करी हालचाली टिपता येतात. नेपाळने चीनच्या इशाऱ्यावर भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिंफीयादुरा, या ३९७ चौ.किमीच्या ट्राय-जंक्शनयुक्त भूभागावर अवैध दावा ठोकला आहे. लिपुलेख ते दिल्ली हे अंतर फक्त 416 किमी. आहे. यावरून याचे सामरिक महत्त्व लक्षात येईल.  
                             काश्मीरचे कवच, सियाचीन हिमनदी
   भारत-पाकिस्तान-चीन यांच्या सीमा फक्त ७६ चौ.किमी क्षेत्रफळ असलेल्या 5,400 मीटर उंच सियाचन ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. पृथ्वीचा तिसरा ध्रुव मानले जाणारे व -60 शतांश उष्णतामान असलेले सियाचीन हे जगातले बहुदा सर्वांत उंच युद्धक्षेत्र असावे. 13 April 1984 साली ऑपरेशन मेघदूतद्वारे भारतीय सेनेने सियाचीन ताब्यात घेतले आहे. याचाच बदला म्हणून पाकिस्तानने 1999 ला कारगिल युद्ध भारतावर लादले होते. सियाचीन ही हिमनदी, पाकच्या अवैध ताब्यातील काश्मीर व चीनच्या अवैध ताब्यातील अक्साई चीन यांना एकमेकापासून दूर ठेवते. त्यामुळे भारत प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवू शकतो. सियाचीन हिमनदी भारताच्या ताब्यात नसेल तर  चीन आणि पाकिस्तान यांच्या कात्रीत लडाख सापडेल.
   बर्फ का पेटतोय?
  हे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन सर्व ट्रायजंक्शन्सशी व खिंडींशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी, रेल्वे व बारमाही रस्ते यांचे जाळे, अवकाशात सक्षम टेहेळणी यंत्रणा, जवळपासच राखीव शिबंदी असे त्रिविध उपाय पूर्णत्वाला नेण्यास भारताने सुरवात करताच चीन अस्वस्थ झाला. कोरोनाप्रकरणी झालेली बदनामी; भारत, जपान, ॲास्ट्रेलिया व अमेरिका यांची जवळीक; जी 7 या शक्तिशाली व संपंन्न राष्ट्रगटाची भारताला देऊ केलेली सदस्यता यामुळे चीन चवताळला आणि सर्व आंतरराष्ट्रीय नियम व संकेत पायदळी तुडवीत चीनने आपली नेहमीची खेळी खेळायला सुरवात केली आणि बर्फ पेटला!

No comments:

Post a Comment