Monday, April 24, 2023

 फिनलंडच्या सदस्यतेतून उठणारी वादळे 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २५/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.      

फिनलंडच्या सदस्यतेतून उठणारी वादळे 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

 नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन म्हणजेच नाटो ही 30 देशांची एक आंतरराष्ट्रीय युती असून ती 1949 साली 12 देशांनी मिळून स्थापन केली आहे. पुढे 1952 या वर्षी 2 आणि 1955 आणि 1982 मध्ये एकेक देश या युतीत सामील होत गेला.1999 यावर्षी 3, 2004 यावर्षी एकदम 7, 2009 यावर्षी 2, 2017 व 2020 मध्ये एकेक देश सामील झाला. युरोप, अमेरिका आणि आशियातील देश याचे सदस्य आहेत. या युतीच्या करारातील कलम 5 नुसार कुणाही एका देशावर झालेला हल्ला हा सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल आणि गरज भासल्यास ते सैन्यदलासह त्या एकाच्या साह्याला धावून जातील. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांच्या दोन गटात जगाची विभागणी झाली. रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या भीतीने बरेच देश अमेरिकाकेंद्रित ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनले. साम्यवादी रशियाच्या अरेरावीस विरोध करणे, साम्यवादाचा प्रसार रोखणे अशी करारात लिखित नसलेली उद्दिष्टेही ‘नाटो’  सदस्य देशांची आहेत, असे मानले जाते. 

  नाटोचा 31वा सदस्य फिनलंड

   अल्बामा, बेल्जियम, बल्गॅरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, डेनमार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलंड, इटली, लॅटव्हिया, लिथुॲनिया, लक्झेंबर्ग, मॅांटेनिग्रो, नेदरलंड्स, नॅार्वे, पोलंड, पोर्च्युगाल, रोमॅनिया, स्लोव्हॅकिया, स्लोव्हॅनिया, स्पेन, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि आता 2023 या वर्षी फिनलंड, असे 31 देश नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे (नाटोचे) सदस्य आहेत.

   रशियाने फिनलंडच्या नाटोप्रवेशावरून युद्ध भडकेल अशी  धमकी दिली आहे. युक्रेनच्या युद्धातच रशियाची पुरतेपणी दमछाक झालेली असतांना सुद्धा पुतिन यांनी युद्धाची भाषा वापरली आहे. कदाचित हे शब्द संतापाच्या भरात त्यांच्या तोंडून बाहेर पडले असतील. हे काहीही असले तरी फिनलंडचा नाटोत प्रवेश होणे ही बाब रशियाला अतिशय गंभीर बाब वाटते आहे, हे स्पष्ट आहे.

  लॅटव्हिया, इस्टोरिया, लिथुअॅनिया आणि पोलंड हे नाटो सदस्य देश असून यांच्या सीमा रशियाला स्पर्श करतात. या सर्वांची मिळून  रशियाला लागून असलेली एकूण सीमा 1,215 किलोमीटर भरते. एकट्या फिनलंडची रशियाला लागून असलेली सीमा 1,300 किलोमीटर आहे. त्यामुळे आता रशियाला लागून असलेली नाटो सदस्य राष्ट्रांची एकूण सीमा  2515 किलोमीटर इतकी होईल, म्हणजे जवळजवळ दुपटीने वाढेल.

  रशियाचा जळफळाट का? 

    3 लक्ष 37 हजार चौ. किमी क्षेत्रफळ असलेला फिनलंड (भारत 33 लक्ष चौ,किमी क्षेत्रफळ)  हा स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे.  रशिया हा क्षेत्रफळाने जगातला सर्वात मोठा देश असून त्याचे क्षेत्रफळ 1 कोटी 71 लक्ष चौरस किमी आहे. रशियाच्या तुलनेत चिमुकला असलेल्या फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही भाषा बोलल्या जाणाऱ्या फिनलंडची लोकसंख्या 50 लाखापेक्षा थोडीशीच जास्त आहे. ही विरळ लोकवस्तीही देशाच्या दक्षिण भागात राहते. असे असले तरीही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड उत्तम सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला देश आहे. या लहानशा देशाचा दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर रशियाने लचका तोडला आहे. पण त्यावेळी फिनलंडने  चांगलीच झुंज देत रशियाला जेरीस आणले होते. या युद्धाची तुलना आजच्या युक्रेन युद्धाशी करता येईल. हा अनुभव गाठीशी असल्यामुळेच फिनलंड नाटोचा सदस्य होतो आहे, ही बाब रशियाला का रुचलेली नाही, हे लक्षात येईल.

  टर्कीचा कोलदांडा

    दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंड आणि स्वीडन हे देश तटस्थ आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांना असुरक्षितता भेडसावत आहे. फिनलंड आणि रशिया यांच्यात तेराशे किलोमीटर लांबीची सीमा आहे. ही अन्य कोणत्याही नाटो सदस्य देशाच्या रशियाशी असलेल्या सीमेपेक्षा  जास्त लांब आहे. त्यामुळे फिनलंडला रशियन आक्रमणाची सर्वात जास्त भीती होती. म्हणून नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्यास फिनलंडमधले सर्व पक्ष एका पायावर तयार होते. पण फिनलंड आणि स्वीडनाला ‘नाटो’मध्ये प्रवेश देण्यास टर्कीचा विरोध होता. टर्कीचा आक्षेप असा होता की, टर्कीमधील बेकायदा आणि बंडखोर कुर्दिस्तान पीपल्स पार्टीच्या सैनिकांना फिनलंडने 1984 मध्ये आसरा दिला होता. या संशयित दहशतवाद्यांना फिनलंडमधून हाकलून देऊ असते आश्वासन फिनलंडने दिल्यानंतर टर्कीने आपला नकाराधिकार (व्हेटो) मागे घेतला आणि फिनलंडला नाटोत प्रवेश देण्यास सर्व म्हणजे 30 सदस्य राष्ट्रे तयार झाली. स्वीडननेही असेच आश्वासन दिले होते पण स्वीडनच्या न्यायालयाने स्वीडनचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि त्यामुळे स्वीडनचा नाटोमधला प्रवेश अडकून पडला आहे. नाटोच्या घटनेप्रमाणे प्रत्येक सदस्य देशाला, दुसऱ्या देशाला सदस्य करून घेण्याच्या प्रश्नाबाबत,  नकार देण्याचा (व्हेटोचा) अधिकार असतो. 

   सुखी, समाधानी आणि संमृद्ध फिनलंड, स्वीडन तर रशिया….

   फिनलंड हा लोकशाहीवादी देश आहे. त्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. नोकिया नदी फिनलंडमधली. या नदीच्या नावाने बाजारात आलेला नोकिया फोन फिनलंडचा आहे. फिनलंड, स्वीडन हे देश लोकशाहीवादी आहेत आणि तरीही त्यांनी उत्तम आर्थिक प्रगती केली आहे.  एकेक देश एकेका ब्रॅण्डसाठी ओळखला जातो. फिनलंडने नोकिया दिला, तर वोल्वो, बोफोर्स हे  स्वीडनचे ब्रॅंड आहेत. रशिया आणि फिनलंड मधल्या लांबलचक सीमेच्या एका बाजूला असलेला फिनलंड हा सुखी, समाधानी आणि संमृद्ध आहे. यातले एकही विशेषण सीमेच्या दुसऱ्या बाजूच्या असलेल्या रशियाला लागू होत नाही. असा हा फिनलंड आता नाटोत सामील झाला आहे.  युक्रेन यद्धामुळे रशियाची पार दमछाक झाली आहे. म्हणून मदतीसाठी आपल्या धाकट्या भावाचे म्हणजे चीनचे ज्येष्ठत्व मान्य करण्याची वेळ रशियावर आली. पण धाकटा भाऊ चांगलाच बेरकी आहे. त्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत अण्वस्त्रे दुसऱ्या देशात हलविण्याच्या रशियाच्या धोरणाला विरोध केला आहे.

   याच सुमारास फिनलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जगातील सर्वात तरूण महिला पंतप्रधान  सना मरीन यांचा पराभव झाला. खरेतर कोविड-19 ची हाताळणी आणि युक्रेनला पाठिंबा यामुळे त्यांची जगभर वाहवा झाली होती. पण त्यांची आर्थिक धोरणे मतदारांना पसंत पडली नाहीत. वाढलेली महागाई, पेंशन, शिक्षणासाठी वाढीव तरतूद आणि कर्जवाढ  ह्या बाबी मतदारांना आवडल्या नाहीत.

 युतीधर्माचे पालन करणारा फिनलंड

   2 एप्रिल 2023 ला झालेल्या निवडणुकीत फिनलंडच्या संसदेच्या 200 जागांसाठी मतदान होऊन बहुमत कुणालाच मिळालेले नाही. यात पेट्टेरी ऑर्पो यांच्या नॅशनल कोएलेशन या लिबरल कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाला पूर्वीच्या तुलनेत  10 जागा जास्त मिळून एकूण 48 जागा आणि 20.8% मते, रिक्का पुर्रा यांच्या फिन्स या उजव्या  पक्षाला पूर्वीच्या तुलनेत  7 जागा जास्त मिळून एकूण 46 जागा आणि  20.1%मते,   सना मरीन या मावळत्या पंतप्रधानांच्या एसडीपी या डावीकडे झुकलेल्या सोशल डेमोक्रॅट पक्षाला   पूर्वीच्या तुलनेत  3 जागा जास्त मिळून एकूण 43 जागा आणि  19.9%मते मिळाली आहेत. उरलेल्या 63 जागा सहा लहान पक्षांना मिळाल्या आहेत. 

  युक्रेनला पाठिंबा देणारे परंपरावादी अॅार्पो हे माजी अर्थमंत्री युतीचे सरकार स्थापन करतील. फिनलंडला युतीच्या कारभाराचे नावीन्य नाही. किमान सामायिक कार्यक्रम ठरवून युतीधर्माचे पालन करण्याची परंपरा फिनलंडमध्ये चांगलीच रुळली आहे. अशाप्रकारे त्रिशंकू स्थिती आणि पक्षोपपक्षांची बजबजपुरी असली तरी हे सर्व पक्ष फिनलंडने नाटोत सामील व्हावे, या मतावर मात्र ठाम आहेत, हे विशेष!


Saturday, April 22, 2023

 आक्रसणारा चीन आणि विस्तारणारा भारत, पण…?   

    आक्रसणारा चीन आणि विस्तारणारा भारत, पण…?   

रविवार,२२.०४. २०२३   तरूणभारत मुंबई

आक्रसणारा चीन आणि विस्तारणारा भारत, पण…?   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

     भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला दोन शतकानंतर मागे टाकले आहे, असे  युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफपीए) च्या डेटावरून दिसून आले आहे. यापुढे चीनची लोकसंख्या आक्रसत जाणार आहे, तर भारताची लोकसंख्या वाढत जाणार. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत 142.86 कोटींचा आकडा पार केला आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. आता जगातील दर पाच मनुष्यात एक भारतातील असेल. चीनला मागे टाकून आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. चीनच्या लोकसंख्येने गेल्या वर्षी उच्चांक गाठला होता. पण, आता मात्र चीनची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे, असे हा अहवाल स्पष्ट करतो आहे. तर दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढतेच आहे, कमी होत नाही.  पण भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 1980 पासून घसरत आहे. म्हणजेच भारताची लोकसंख्या जरी  वाढत असली तरी लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे.

     काही तुलनात्मक आकडे

  अ) भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0 ते 14,  तर चीनमध्ये 17 टक्के लोक 0 ते 14  वर्षे या वयोगटातील आहेत. 

  ब) भारतातील 18  टक्के लोक हे 10 ते 19  वयोगटातील आहेत, तर चीनमध्ये 12  टक्के 10 ते 19  वयोगटातील आहेत.  

 क) भारतात 26  टक्के 10  ते 24  वयोगटातील आहेत, तर चीनमध्ये 18 टक्के लोक 10  ते 24  वर्षे वयोगटातील आहेत.

  ड) भारतात  68  टक्के लोक 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहेत तर चीनमध्ये 69  टक्के 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहेत. 

  ई) भारतात  65 वर्षांवरील गटात 7 टक्के लोक आहेत तर चीनमध्ये  14  टक्के लोक 65  वर्षांवरील गटात आहेत. 

  तसेच एका अहवालानुसार, 18 व्या शतकात भारताची लोकसंख्या सुमारे 12  कोटी असावी, असे गृहीत धरले आहे. 1820 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 13.40 कोटी होती. 17  व्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या 23  कोटींच्या पुढे गेली. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 100  कोटींच्या पुढे गेली. सद्ध्या भारताची लोकसंख्या 140  कोटींच्या आसपास आहे. भारताची लोकसंख्या याच गतीने वाढत राहिली तर तर 2050  पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे 166  कोटी असेल, अशी शक्यता आहे.

   युएनएफपीएची उद्दिष्टे

    युएनएफपीएची उद्दिष्टे साररूपाने काहीशी अशी आहेत. स्त्रीला गर्भारपण हवेसे वाटले पाहिजे. प्रत्येक जन्म सर्वार्थाने सुरक्षित असावा, प्रजोत्पादन क्षमता असलेल्या प्रत्येक तरूण व्यक्तीला आपल्या या क्षमतेला वाव देता आला पाहिजे. लैंगिक आणि प्रजोत्पादक आरोग्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळावा. यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे. प्रसूती दरम्यानचे मृत्यू कमी झाले पाहिजेत. तरूण स्त्री पुरुषांचे जीवन सुखासमाधानात जावे, लिंग समानतेचा पुरस्कार केला जावा.  लोकसंख्या वाढीचा वेग, प्रजननक्षमता, मृत्यूदर, आणि स्थलांतर याबाबत मानवीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधली जाईल, हा हेतू समोर ठेवून धोरणे आखली जावीत, यावर युएनएफपीएचा भर आहे. थोडक्यात असे की लोकसंख्येचा विचार मानवीय भूमिकेतून व्हावा हे युएनएफपीए ला अभिप्रेत आहे.

  आपल्या देशाचा 1000 लोकांमधला जन्मदर 27.5 आहे व मृत्युदर 0.5 आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते आहे.  अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामुळे समाजाचा कल अधिक मुलांना जन्म देण्याकडे असतो. समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास तसेच इस्टेटीला वारस पाहिजे आणि तो मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात मुले जन्माला घातली जातात. परिणामी लोकसंख्या वाढते.

   असे होते चीनचे लोरसंख्याविषयक धोरण 

    लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनने 1979 साली ‘एक अपत्य धोरण’, स्वीकारले. प्रचंड लोकसंख्या हा विकासातला सर्वांत मोठा अडथळा मानला जात होता. त्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने हे केले गेले. ‘एक अपत्य धोरणामुळे’ चीनला सुमारे 400 दशलक्ष जन्म रोखता आले. हे धोरण कठोरपणे राबविण्यात आले. आर्थिक दंड आकारूनच अनेक श्रीमंत लोकांना अधिक अपत्यांना जन्म देण्याची अनुमती दिली गेली.  पण आज, या एक अपत्य धोरणाचे चिनी समाजावर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. चिनी सरकारने जन्मदर नियंत्रणात आणला खरा, परंतु, त्यामुळे लिंग गुणोत्तर बिघडले. आणि आज तर चीन अशा टप्प्यावर आहे की श्रीमंत  होणे तर दूरच राहिले पण चीनचा प्रवास मात्र वृद्धत्वाकडे सुरू झाला आहे. 

चीनमध्ये काय घडले?

   जगामध्ये सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश म्हणून चीनचा क्रमांक होता. चीनमध्ये स्वत:ला साम्यवादी म्हणवणारे सरकार आहे आणि त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केले, हे लक्षात घेतले पाहिजे. 1950 च्या दशकामध्ये चीनची लोकसंख्या ज्या दराने वाढत होती त्या दराने धान्याचे उत्पादन होत नव्हते. म्हणून चिनी सरकारने लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करायला सुरुवात केली. तरीही लोकसंख्या वाढ नियंत्रित होत नव्हती. हे लक्षात आल्यावर चीनने 1979 मध्ये 'एक मूल धोरण' जाहीर केले. यानुसार चीनमधील कुटुंबाला फक्त एकाच मुलाला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली. हे धोरण थोडीथोडकी नव्हे तर  जवळजवळ 35 वर्षे राबविण्यात आले. अलीकडेच 2015 मध्ये चीन खडबडून जागा झाला आणि हे धोरण बदलण्याचे सरकारने ठरविले. याचे कारण म्हणजे, हे धोरण लागू केल्यापासून, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लिंगगुणोत्तरात असमानता निर्माण झाली. मुलगी जन्माला येताच लोक तिला मारून टाकू लागले. उद्योगांना कामगार  मिळेनासे झाले. आणि वृद्धांची संख्या वाढत गेली. यामुळे चीन सरकारने 2015 नंतर या धोरणामध्ये बदल केला आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करणे हे धोरण सोडून देण्याचे ठरवले. लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण केली, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगितले आणि स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर केला तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते, हे चीनला खूप उशिराने कळले.

   1960 च्या दशकानंतर चीनमध्ये गेल्या वर्षी लोकसंख्येची वाढ सर्वांत कमी झाल्याचं दिसून येताच चीन सरकारने केवळ दोन मुलं असण्याचा नियम हटवला. चीनमध्ये एका जोडप्याला आता 2 ऐवजी 3 अपत्यांना जन्म देण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण आता अनेकांना मूलच नको असे वाटू लागले आहे.  ‘हम दो हमारे तीन’, ‘हम दो हमारे दो‘ किंवा ‘हम दो पर हमारा एकही’ आणि नंतर  आतातर ‘हम दो पर हमारा न कोई’ हे धोरण चिनी जनतेने मोठ्या प्रमाणावर  स्वीकारल्याचे दिसते आहे. 

    मूलच नको हा  दृष्टिकोन तरुण मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला आहे हे कळताच चिनी धुरिणांचे धाबेच दणाणले. लग्नाला तीन वर्षे उलटली तरी  बाळ जन्माला घालण्याचं जोडप्याच्या मनातही नसतो. 'बाळाची जबाबदारी आणि चिंता यांचं ओझे न बाळगता त्यांना जीवन जगणं जर शक्य असेल तर  तो लाभ का न घ्या, अशी जोडप्यांची भूमिका आहे. सुखोपभोग आणि अपत्यसंभव यांचा संबंधविच्छेद चिनी तरुणाईला चांगलाच भावला आहे. सद्ध्या चीनमध्ये शहरी भागातच मूल जन्माला घालण्याबाबतचा हा नवीन  दृष्टीकोन विशेष प्रमाणात आढळतो आहे. पण हे लोण खेड्यात पोचण्यास वेळ लागणार नाही, हे चिनी सरकारला चांगलेच ठावूक आहे. लोकसंख्या वाढीचा दर असाच कमी होत राहिला तर, चीनची लोकसंख्या नकारात्मक दृष्टीने घटत जाईल. म्हणजे देशातील तरुणांची लोकसंख्या कमी असेल आणि एक वेळ अशी येईल की देशात वृद्धांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. चीनमध्ये महागाईच्या काळामध्ये मुलांना वाढवणं आधीच अवघड होऊन बसलं आहे, कारण चीनमध्ये गेल्या काही दशकांमध्ये उदरनिर्वाह भागवण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने उत्पन्न वाढलेले नाही.

  चीनमध्ये लोक एखाद्या सरकारी धोरणामुळं मुलं जन्माला घालायला घाबरत नसून, बाळाच्या जन्मानंतर त्याचं पालन पोषण महागल्याने ते यासाठी धजावत नाहीत. चीनमध्ये आणि विशेषतः शहरी नागरिकांमध्ये तर यशस्वी जीवनाची व्याख्याच बदलली आहे. आता विवाह करणे किंवा मुलं जन्माला घालणे या पारंपरिक गोष्टींचा यशस्वी जीवनाशी संबंध लावला जात नाही. लोक सद्ध्या वैयक्तिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहेत. बहुतेक मुलामुलींना विवाहबंधन नको आहे आणि मुले तर नकोच आहेत. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ही प्रामुख्याने आईचीच आहे, असे चीन मानतो.

 तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेले शी जिनपिंग हे लिंगसमानतेचे खंदे समर्थक मानले जातात. पण सध्यातरी चीनमध्ये शासन आणि प्रशासनस्तरावर महिलांची भूमिका ‘चूल आणि मूल’ यापुरतीच सीमित असल्याचे मानले जात आहे. आज चीनमध्ये जन्मदर काळजी वाटावी इतका कमी झाला आहे तसेच विवाहितांच्या संख्येतही लक्षणीय घट होताना दिसते आहे. तरूण तरुणी तसेच सोबत राहू इच्छितात, हे पाहून शी जिनपिंग यांनी तर महिलांना उपदेश केला आहे की, त्यांनी नोकरी करण्याऐवजी कुटुंबातील बाल आणि वृद्धांची काळजी वहावी. तसेच लहान मुलांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित करावे.

   चीनमध्ये नव्या पिढीतील तरुणी मूल जन्माला घालण्यासाठी घाबरत आहेत. कारण  त्यांच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होईल, याची भीती त्यांना वाटत असते. अगोदरच महिलांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी चीनमध्ये कमी आहेत. त्यात ज्या महिला चांगली नोकरी करत आहेत त्यांना ती संधी गमावण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत कोणतीही मुलगी बाळाचा विचार कसा बरे करील? चीनमध्ये पुढील पाच सहा वर्षांपर्यंत मुलं जन्माला घालण्याबाबत काहीही निर्बंध नसतील, असा धोरणात्मक बदल चीनने केला आहे. पण त्याचा आता फारसा उपयोग शहरात होण्याची शक्यता दिसत नाही. उलट या धोरणामुळे खेड्यात लोकसंख्येचा स्फोट होण्याची भीती नाकारता येत नाही. यातून बेरोजगारी आणि गरिबी यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी देशाने स्वीकारावी. अशाप्रकारे कुटुंबांवरचं मानसिक ओझं कमी करावे. यालाही  खूप उशीर झाल्यास हा उपायही परिणामकारक ठरणार नाही, असे या विषयाच्या अभ्यासकांचे मत आहे. यासाठी ते जपान आणि फ्रान्सचे उदाहरण देतात. या देशांची लोकसंख्या सतत कमी होत असून तो देशासमोरचा बिकट प्रस्न होऊन बसला आहे. मुले असलेल्या कुटुंबांवर फ्रान्स, सवलती आणि पारितोषकांचा वर्षाव करीत असतो. पण वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मोकळीक यांच्या जोडीला जबाबदारीशिवाय सुखोपभोग याचे आकर्षण एवढे जबरदस्त ठरले आहे की, या प्रलोभनांचा तेथील जनतेच्या मनावर परिणाम होतांना दिसत नाही. 

   लोकसंख्या शाप की वरदान? 

   ‘सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढीत आहे!' अशा स्वरूपाची शीर्षके असलेले लेख आपल्यापैकी अनेकांनी वाचली असतील. भारतात  हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. लोकसंख्या वाढ हेच सर्व समस्यांचे मूळ आहे, हा निष्कर्षही  या लेखांमध्ये काढलेला आढळतो. आपण हे लक्षातच घेत नाही की कुशल मनुष्यबळ असेल तरच आर्थिक विकास साधता येईल आणि आर्थिक विकासातूनच सर्वंकष विकासाची गंगा या भूतलावर आणता येईल. आर्थिक विकासातून दोन महत्त्वाची साधने उपलब्ध होऊ शकतात. पहिले साधन आहे कुशल मनुष्यबळ आणि दुसरे साधन आहे उद्योजक! पण यासाठीही जाणीवयुक्त दृष्टिकोन आणि नियोजन आवश्यक आहे.  लोकसंख्या वाढ ही केवळ संख्यात्मक असेल तर ती अनेक समस्यांना जन्म देईल. पण लोकसंख्येसोबत गुणात्मकताही निर्माण होत असेल तर? अशी लोकसंख्या तर वरदान ठरू शकेल. बालक म्हणजे केवळ आ वासून उभे असलेले तोंड नाही. लोकसंख्येची वाढ केवळ  संख्यात्मक असेल, तर ही समस्या निर्माण होऊ शकेल; पण ती जर गुणात्मक असेल, तर ते देशासाठी वरदान ठरू शकेल. याचा अर्थ असा की, कौशल्य, ज्ञान, आरोग्ययुक्त व्यक्तिमत्त्व आणि सकारात्मक भूमिका असलेले नागरिक हे कोणत्याही देशासाठी वरदानच सिद्ध होतील. अशांची संख्या जेवढी जास्त तेवढे वरदानही मोठे असेल.

   लोकसंख्या नियंत्रणाचा  मानवीय मार्ग  

   लोकसंख्या नियंत्रणासाठीचे अतिरेकी उपाय अनेक उपप्रश्नांना जन्म देत असतात. त्यातून  स्त्री पुरुष समतोल बिघडतो, समाजातील वृद्धांची संख्या वाढते, विकासासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. हे प्रश्न आता चीनला भेडसावू लागतील. याउलट बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल अशा आरोग्यसुविधा निर्माण कराव्यात. नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सार्वजनिक स्तरावर बालसंगोपन व्यवस्था उभ्या कराव्यात. लोकांचे आयुर्मान वाढावे यासाठी वृद्धांची काळजी वहावी, प्रजनन दर कमी करण्यासाठी स्त्री शिक्षणाला महत्त्व द्यावे, जोडीला करमणुकीची सकारात्मक साधने निर्माण करावीत. चांगले आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचतील असे पहावे. लोकसंख्या नियंत्रणाचा हा मानवीय मार्ग आहे. विकासातून लोकसंख्या नियंत्रण आपोआप घडत असते, 

   भारताची लोकसंख्या आता सर्वाधिक झाली आहे, याची आम्ही दखल घेत नसल्याचे चीनने म्हटले आहे. संख्या नाही तर दर्जा महत्त्वाचा अशी टिप्पणी चीनने केली आहे. चीनजवळ 90 कोटींचे कुशल मनुष्यबळ आहे, अशी प्रौढी चीनने मिरविली आहे. चीनची ही प्रतिक्रिया अपेक्षित अशीच आहे.

   भारताचे लोकसंख्याविषयक धोरण 

    तसे पाहिले तर भारत हा जगातला लोकसंख्याविषयक धोरण स्वीकारणारा पहिला देश आहे. 1952 साली भारताने हे धोरण स्वीकारले. पण नीट अंमलबजावणी आणि जनतेचे 100% प्रबोधन होऊ न शकल्यामुळे संपूर्ण जनतेने हे धोरण मनापासून स्वीकारले नाही. ‘खाणारे तोंड एक असते पण राबणारे हात दोन असतात’, हा विरोधकांचा मुद्दा शासनाला पुरतेपणी समजला आणि खोडता आला नाही. ‘खाणारे तोंड निरोगी असावे आणि राबणारे हात काटक्यांसारखे नसावेत, तर ते बलवान बाहू असावेत’, ही जोड आपण मुखाला आणि हातांना देऊ शकलो नाही. आणीबाणीत तर कुटुंब नियोजनाची बेछुट अंमलबजावणी झाली त्यामुळे तर या योजनेचे ‘कुटुंब नियोजन’ हे शीर्षकच गाळण्यात आले आणि त्याऐवजी ‘कुटुंब कल्याण’ असा शब्दप्रयोग करावा लागला. अशाप्रकारे एका राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नाची दुर्दशा झाली.

    भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, हे खरे आहे. पण या बाजारपेठेचे रहाणीमान आणि जीवनमान संमृद्ध असण्याची आवश्यकता आहे, हा प्राथमिक निकष आपण नजरेआड केला. भारतीय तरूण सुशिक्षित, सुसंस्कारित, सुपोषित, कुशल, निरोगी आणि बुद्धिचापल्ययुक्त असण्यावर आपला भर यापुढे असला पाहिजे, हे आपण वेळीच ओळखले हे बरे झाले. 

  मूल होणे किंवा न होणे हे ठरविण्याचा  हक्क फक्त पुरुषांचा असून स्त्रीने  तो हक्क पुरुषांना बजावू दिला पाहिजे, ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कारण लोकसंख्यावाढीचे हे एक प्रमुख कारण आहे. निम्म्या लोकसंख्येला म्हणजे महिलांनाही समान संधी, समान अधिकार आणि समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हेही आपण ओळखले आहे. म्हणून तर पंतप्रधान निवास योजनेतील घरे गृहिणीच्या नावे नोंदविली जात आहेत. जगाचा फक्त 2.5% टक्के भूभाग पण 18% लोकसंख्या असे विषम परिमाण आपल्या वाट्याला आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आपण कौशल्यविकासाचा भारतव्यापी कार्यक्रम हाती घेऊन विशाल कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आरोग्य सुविधा सर्व गरजूंना उपलब्ध व्हावी यासाठी आपण भारतव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाचे बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे. आता आपल्याला आवश्यक असलेले अन्नधान्याचे सर्व प्रकार देशातच निर्माण होतील, यावर आपला भर असला पाहिजे.

    15 ते 24 वयोगटातील 25 कोटीपेक्षाही जास्त तरुणाई जर सुशिक्षित, सुसंस्कृत, सुदृढ, बलवान, सुबुद्ध या गुणांची परिचायक सिद्ध झाली तर शाश्वत कुशल मनुष्यबळाचा अक्षुण्ण सागर असे भारताचे स्थान जगात निर्माण होईल. भारताचे एकेकाळचे हे ‘पूर्वदिव्य’ होते. त्यामुळे यात अशक्य असे काहीही नाही. आज भारतात जसे पुरेसे रोजगार उपलब्ध नाहीत, तसेच अशा रोजगारांसाठी आवश्यक असलेले कौशल्यधारीही तयार व्हावयाचे आहेत. नोकऱ्यांची संख्या आणि रोजगारांचा दर्जा यातही समान वाढ झाली पाहिजे. भारताचे सेवाक्षेत्र जसे आज प्रगतीपथावर आहे, तशीच कारखानदारी आणि त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न दुप्पट वेगाने करावे लागणार आहेत. यातूनच भारतात ‘रम्य भावीकाळ’ निर्माण होणार आहे. 









 










Monday, April 17, 2023

 पाकिस्तान से जिंदा भाग!

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १८/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    भारत आणि पाकिस्तान हे देश 1947 मध्ये दोन स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. आज भारत कोणत्या स्थितीत आहे आणि पाकिस्तानची अवस्था काय आहे, हे आपण सर्व जाणतो. 1947 मध्ये पाकिस्तानमध्ये घोषणा दिली जायची ‘पाकिस्तान जिंदाबाद’. आज म्हणजे 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये घोषणा दिली जाते आहे, ‘पाकिस्तान से जिंदा भाग’. हे विडंबन आहे. अन्नान दशा झालेल्या पाकिस्तानमधील त्रस्त आणि भ्रमनिरास झालेल्या आणि मृत्यूच्या दिशेने वादळाच्या गतीने जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या मुखातून बाहेर पडलेलं!! समोर मृत्यू दिसत असल्यामुळे हताश झालेल्या नागरिकांच्या मुखातून याही अवस्थेत बाहेर पडते आहे,‘भाग पाकिस्तान से जिंदा भाग’! ‘

जिनांचे स्वप्न 

      पाकिस्तान हे एक कायद्याने चालणारे राज्य असेल, प्रत्येक पाकिस्तानी नागरिक हा एक जबाबदार नागरिक असेल, पाकिस्तानच्या प्रगतीसाठी प्राणपणाने झटेन असा त्याचा निर्धार असेल, पाकिस्तानी नागरिक सचोटीने वागणारे असतील, सहिष्णुता हा त्यांचा गुणविशेष असेल, पाकिस्तानमध्ये बहुपक्षीय लोकशाही असेल, वेगवेगळी मते बाळगून मुक्तपणे वावरणारे राजकीय पक्ष असतील, सुप्रशासनावर पाकिस्तानी नागरिकांची निष्ठा असेल. असे जिनांच्या स्वप्नातले पाकिस्तान होते. हे त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांमधून स्पष्ट झाले होते. पण यातले पाकिस्तानमध्ये काहीही का घडले नाही? 

    14 ऑगस्ट 1947 हा पाकिस्तानचा जन्मदिवस आणि 11 सप्टेंबर 1948 ला पाकिस्तानचे जन्मदाते जिना अल्लाला प्यारे झाले. पाकिस्तानला आपल्या इच्छेप्रमाणे घडविण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. त्यामुळे संधी मिळाली असती तर काय झाले असते, असा विचार करण्यात अर्थ नाही. मुळातच चुकीच्या आधारावर झालेल्या निर्मितीनंतर लगेचच म्हणजे 16 ऑक्टोबर 1951 ला पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकतअली खान यांचा तर खूनच झाला. लियाकत अली खानांच्या हत्येनंतर सत्तेची सूत्रे तर अशा व्यक्तींच्या हाती गेली की ज्यांच्या कारकिर्दीत  लष्कर आणि नोकरशहा यांचा वरचष्मा निर्माण झाला. जन्मानंतर 9 वर्षेपर्यंत पाकिस्तानला स्वत:ची घटनाच नव्हती. पहिली घटना 1956 साली अस्तित्वात आली. मग 9 वर्षे पाकिस्तान कोणत्या दिशेने आणि कोणती उद्दिष्टे समोर ठेवून चालला होता? उद्दिष्ट फक्त एकच होते. भारतद्वेश. बरे पुढे तरी 1956 सालच्या घटनेनुसार चालावे ना? तर तेही नाही. ही घटना अल्पजीवी ठरली. ती दोनच वर्षांनी रद्द करण्यात आली. दुसरी घटना अस्तित्वात यायला 1962 साल उजाडावे लागले. अशा स्थितीत पाकिस्तानने 1947 ते 1958 या 11 वर्षात एकूण 7 नामधारी पंतप्रधानांची पण खऱ्या अर्थाने लष्कराची जुलमी राजवट सहन केली. 

  जिनांच्याा स्वप्नातील पाकिस्तानचे आयुष्य पक्त 25 वर्षे

  1971 मध्ये भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तान बांगला देश या नावाने वेगळा होऊन  अस्तित्वात आला. यावेळी झालेल्या युद्धात पाकिस्तानचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. याचा अर्थ असा की जिनांच्या पाकिस्तानचे आयुष्य फक्त 25 वर्षाचेच होते.

  दुसऱ्या देशाच्या द्वेशाच्या आधारावर राष्ट्र उभे राहू शकत नाही. पाकिस्तानी राजकारण्यांना, नोकरशहांना आणि लष्करशहांना भारतद्वेशाशिवाय दुसरे काही दिसतच नव्हते. काहीही करून काश्मीर गिळंकृत करायचे, हे एकमेव उद्दिष्ट समोर होते. याच काळात भारत एक जागतिक मान्यतापात्र राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. पाकिस्तानात 1947 ते 1958 या काळात 7 पंतप्रधान झाले तर भारतात असे झाले नाही. 

पाकिस्तानच्या दुर्दशेला चार प्रमुख कारणे आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

1)संघटित गुन्हेगारी(माफिया) आणि गटतटांचा वरचष्मा - यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद, घराणेशाही यांचे चांगलेच फावले. पाकिस्तानात पहिला बळी पडला तो गुणवत्तेचा. सरंजामशाहीमुळे बुद्धिमान मागे पडले, दूरदर्शित्वाचा ऱ्हास झाला आणि सुसंस्कृतपणा संपला. बंगाली बुद्धिमान आणि संख्येनेही जास्त होते, ते मुसलमान होते तरी त्यांची संस्कृती प्रामुख्याने बंगाली होती. ते कट्टरतावादी नव्हते. पंजाबी मुसलमान आणि बंगाली मुसलमान यांचे जुळेनासे झाले. बांगलादेश निर्मितीमागचे हे एक प्रमुख कारण होते.

2) जिनांची पाकिस्तानबाबतीतली कल्पना  नंतरच्या भुरट्यांना मानवली नाही. भ्रष्टाचार, घराणेशाही, कुप्रशासन, बेजबाबदार वृत्ती, सत्तापिपासूपणा, संधिसाधूपणा यांनी पाकिस्तान ग्रासले गेले. शिक्षण,  सुरक्षा आणि विकास या आघाड्यांवर पाकिस्तान नेहमीच निम्न स्तरावर राहिले आहे. चांगल्या राष्ट्राचा एकही गुण जसा पाकिस्तानात औषधाला सुद्धा नव्हता तसा वाईट राष्ट्राच्या एकाही अवगुणापासून पाकिस्तान दूर नव्हते.

3) पाकिस्तानला लोकशाही मूल्ये कधीच मानवली नाहीत. नोकरशाही आणि लष्कर यांच्या दुष्ट युतीच्या टाचेखली पाकिस्तान सतत खितपत होता. हुकुमशाही राजवटीत शिक्षण, आरोग्य आणि वाहतुक यासारख्या सामाजिक क्षेत्रांचा पाकिस्तानात सतत ऱ्हासच होत गेला. गेल्या 75 वर्षात पाकिस्तानात 30 वर्षे लष्करी राजवट होती. तर उरलेल्या 45 वर्षात लोकशाही यंत्रणेची शेंडी लष्कराच्याच हाती असे. अराजकीय शक्ती पाकिस्तानातील क्षीण लोकशाही राजवट मनात येईल तेव्हा उलथून टाकीत असत.

4) देशाच्या उभारणीसाठी एका स्पष्ट राजकीय दृष्टीकोनाची आवश्यकता असते. एक निश्चित आर्थिक भूमिका असावी लागते. एक सर्वसमावेशी परराष्ट्र धोरण स्वीकारावे लागते. या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानची फरपट झालेली दिसते. त्यामुळे आज पाश्चात्य गट, साम्यवादी गट आणि खुद्द इस्लामी राष्ट्र गट यापैकी कुणालाही पाकिस्तानचा भरवसा वाटत नाही. पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवरील पेचप्रसंगांना तोंड देता देता  पाकिस्तानच्या नाकीनव आले, ते यामुळे. 

   अन्नानदशा कशामुळे ?

  पाकिस्तानमधला पंजाब हे तर अन्नधान्याचे कोठार होते. कोविड-19 च्या प्रकोपाच्या कचाट्यात सर्व जग सापडले होते. पाकिस्तान यातून पुरतेपणी बाहेर येऊ शकला नाही. त्यातच महापुरात 80% पीक वाहून गेल्यानंतर तर पाकिस्तानचे कंबरडेच मोडले. रशियाने गहू पुरवला पण तो बाजारत न येता मध्येच साठेबाजांनी हस्तगत केला. खुल्या बाजारात धान्य पोचलेच नाही. काळ्या बाजारातील दराने गरीब जनता ते घेऊ शकत नाही. परतफेड न केलेल्या कर्जाचा बोजा इतका वाढला आहे की, नवीन कर्ज जुन्या कर्जावरील व्याज देण्यासाठीच वापरावे लागत आहे. पैसा उभारण्यासाठी करवाढ केली, सबसिडी बंद केली तर महागाई गगनाला जाऊन भिडली. तुटवड्याची आणि महागाईची झळ नोकरशहा आणि लष्कराला मात्र पोचत नाही, हे पाहून जनतेत असंतोषाचा आगडोंब उसळला. जे भारताच्या नरेंद्र मोदीला साधले ते आपल्या ‘निकम्म्या’ नेत्यांना का साधत नाही, असा प्रश्न देशातील तरुणाई विचारते आहे. पाकिस्तानमधील अगदी सामान्य माणसाच्या तोंडीही मोदींचे नाव असते. तो मोदींची स्तुती आणि आपल्या नेत्यांची निंदा करीत असतो. 

  पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. आण्विक तंत्रज्ञान त्याने चोरीच्या मार्गानेच मिळविले आहे आणि ते इतर देशांना चोरून विकून पैसेही मिळविले आहेत. पण अण्वस्त्रे पोटाची भूक भागवू शकत नाहीत.  दहशतवादी गट वाटेल ती किंमत देऊन अण्वस्त्रे विकत घ्यायला तयार आहेत. पण असे होऊ नये याबाबत पाश्चात्य आणि साम्यवादी अशा दोन्ही गटात एकमत आहे आणि ते अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडू देणार नाहीत. 

  पाकिस्तानची निर्मिती मुळातच चुकीच्या आधारावर करण्यात आली होती.  पाकिस्तानची आजची दशा करंट्या, भ्रष्ट, स्वार्थी आणि लालची राजकारण्यांमुळे आलेली आहे. म्हणून एकेकाळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ हा नारा पाकिस्तानात दिला जात असे, त्या ऐवजी आता ‘पाकिस्तान से जिंदा भाग’, असा नारा उद्वेगाने दिला जाताना आढळतो आहे. कारण जिंवत रहायचे असेल तर हा एकच मार्ग पाकिस्तानी जनतेला दिसतो आहे! स्वीडनने आपली पाकिस्तानातील वकिलात बंद केली आहे. ही भविष्यात होऊ घातलेल्या अनेक घटनांची नांदी ठरणार आहे.

Monday, April 10, 2023

 

 

अमेरिकन पत्रकाराच्या दृष्टीतून भाजप आणि संघ 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ११/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

अमेरिकन पत्रकाराच्या दृष्टीतून भाजप आणि संघ  

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 



 ‘अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि अमेरिकेबाहेरचा राजकीय पक्ष भाजप  आहे. मात्र त्या पक्षाबद्दल अमेरिकेला असलेली माहिती अतिशय मर्यादित आहे’, अशा आशयाचा टिप्पणीवजा लेख वॅाल्टर रसेल मीड यांनी वॅाल स्ट्रीट जर्नल या प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्रात लिहिला आहे. ते वॅाल स्ट्रीट जर्नल मध्ये स्तंभ लेखक म्हणूनही लेखन  करीत असतात. ‘दी वल्डस् मोस्ट इंपॅार्टंट पार्टी’, या लेखात सुरवातीला ते जागतिक दृष्ट्या भाजप का महत्त्वाचा पक्ष आहे, हे स्पष्ट करतात. भाजप 2014 मध्ये तसेच 2019 मध्येही सत्तेवर आला आणि आता 2024 मध्येही सत्तेवर येणार आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. अशाप्रकारे भारतीय राजकारणावर या पक्षाने आपली पकड पक्की बसविली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.  या काळातच भारत ही एक  उभरती आर्थिक सत्ता म्हणूनही पुढे येत आहे. जपानसह भारत अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीला योग्य मार्गावर स्थिर ठेवतो आहे. नजीकच्या भविष्यकाळात चीनबाबत अमेरिका जो समतोल प्रस्थापित करू इच्छिते, तो भाजपच्या मदतीशिवाय शक्य नाही, असेही ते पुढे बजावत आहेत.

   अभारतीयांना भारत नीटसा का समजत नाही

   अनेक अभारतीयांना भारत नीटसा का समजत नाही, हे स्पष्ट करीत ते म्हणतात की, भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक पृष्ठभूमीविषयी बहुतेक अभारतीय अपरिचित असतात. काही भारतीय विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी एका वेगळ्या हिंदू मार्गाने आधुनिकतेकडे मार्गक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय पुनरुत्थानाची ही चळवळ प्रारंभी जगासाठी अस्पष्ट आणि मर्यादित स्वरुपाची होती. मुस्लीम ब्रदरहूडप्रमाणे भाजप सुद्धा पाश्चात्य उदारमतातील अनेक कल्पना आणि अग्रक्रम नाकारतो. पण तरीही त्याने आधुनिकतेची महत्त्वाची वैशिष्ट्ये स्वीकारली आहेत, याची ते जाणीव करून देतात. भारताने एक महासत्ता व्हावे असे भाजपला चिनी साम्यवादी पक्षाप्रमाणे वाटते, असे स्पष्ट करीत  मीड यांनी भाजपची तुलना इस्रायलच्या लिकुड पक्षाशी केली आहे. या पक्षाप्रमाणे भाजपही बाजारपेठेला अनुसरत आर्थिक धोरणे स्वीकारतांना दिसतो आहे. पण तो लोकप्रीय आणि परंपरागत मूल्यांचा उदोउदोही करीत असतो. त्यांच्या मते जागतिकीकरण, पाश्चात्य संस्कृती आणि राजकीय नेते यामुळे दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झालेल्या व नाराज झालेल्या घटकांचा राग शमविण्यासाठी भाजप परंपरागततेकडे वळतांनाही दिसतो, हे खरे आहे. 

   भारत आणि डेन्मार्क

   काही उदारमतवादी  अमेरिकन विश्लेषक नरेंद्र मोदींचा भारत  डेन्मार्क सारखी भूमिका का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा हा मुद्दा मीड यांना अप्रस्तूत वाटतो. पण त्यांची भूमिका पूर्णांशाने चूक नाही, असेही मीड यांचे मत आहे. सत्ताधाऱ्यांवर  टीका करणाऱ्या पत्रकारांना भारतात त्रास दिला जातो. धार्मिक अल्पसंख्यांक हिंदुत्वाभिमान्यांवर नाराज असतात, हिंदुत्व हा तर भाजपचा आधारच आहे, धर्मांतरविरोधी कायद्याखाली कठोर कारवाईला अल्पसंख्यांकांना सामोरे जावे लागते. त्यांना झुंडशाहीलाही बळी पडावे  लागते, या आरोपांची दखल मीड यांनी घेतली आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशभर पसरलेल्या कडक राष्ट्रवादी संघटनेशी भाजपचे जवळचे संबंध आहेत, हेही ते नाकारत नाहीत. ही सर्व विधाने करतांना मीड यांच्यासमोर इस्रायल आणि नेतान्याहूंचा लिकुड पक्ष आहे. इस्रायलपेक्षा वेगळे असे उदाहरण मीड आणि अन्य पाश्चात्य विश्लेषकांसमोर नसल्यामुळे अशी तुलना केली जात आहे, हे यावरून स्पष्ट होते.

   भाजपवरील आक्षेप आणि वस्तुस्थिती 

   पण याचवेळी भारतातले वातावरण इस्रायलच्या तुलनेत कितीतरी वैविध्यपूर्ण आहे, हेही ते मानतात. भारताच्या पाश्चात्य विश्लेषकांना ते एक प्रश्न असाही विचारतात की तुमचे आक्षेप जर खरे असतील तर ख्रिश्चनबहुल ईशान्य भारतात भाजपला नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकींमध्ये विजय कसा काय मिळतो? उत्तर प्रदेश हे भारतातले फार मोठे राज्य आहे. या राज्यात बहुसंख्य शिया मुस्लीम भाजपला पाठिंबा देतात, याची संगती कशी लावायची? जातिभेदाविरुद्ध देशभरात लढा उभारणाऱ्यांच्या मागे संघ ठामपणे उभा असतो, हे कसे? अशाप्रकारचे प्रश्न जेव्हा मीड उपस्थित करतात, तेव्हा मुस्लीम ब्रदरहूड आणि  संघ व भाजप यांची तुलना करणे योग्य नाही, हे त्यांना जाणवत असले पाहिजे. मीड म्हणतात की त्यांनी स्वत: भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली आहे, तसेच भाजप आणि संघाच्या विरोधकांची बाजूही त्यांनी ऐकून घेतली आहे. यानंतर अमेरिकन आणि पाश्चात्य टीकाकारांनी भारतातील संघासारख्या अत्यंत प्रभावी आणि व्यामिश्र चळवळीचा अधिक गांभीर्याने आणि सखोल विचार करण्याची गरज आहे, अशी मीड यांची खात्री पटली आहे. म्हणजेच या सर्व विरोधी भूमिका घेणाऱ्यांनी अगदी वरवरचा विचार केला आहे, असेच ते सुचवीत आहेत. एकटे पडलेले मोजके बुद्धिमंत आणि (काही) धार्मिक नेते यांचे मत बाजूला ठेवले तर संघ जगातील अत्यंत प्रभावी नागरी संघटना आहे, हे त्यांना जाणवते. भारतातील खेडी असोत वा शहरे, दोन्ही ठिकाणी संघाची विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना जागृत केले जात आहे, संघाचे कार्यकर्ते जीवनातील सर्व स्तरातून आले आहेत. त्यांनी राजकीय जागृती घडवून आणली आहे. आपली शक्ती त्यांनी भारतातील लक्षावधी नागरिकांवर केंद्रीत केली आहे. ही चळवळ आज अशा स्तरावर पोचली आहे की तिच्यासमोर आता (समाजहितासाठी काम करण्याचे) अनेक पर्याय उभे आहेत, असे मीड यांचे मत आहे. आपण ‘उत्तर प्रदेशातील हिंदू साधू आणि मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथांची’  प्रत्यक्ष भेट घेतली असल्याचे नमूद करीत मीड यांनी काही निरीक्षणे नोंदविलेली आहेत, ती अशी. योगी हे एक जहाल नेते मानले जातात. अनेक त्यांना मोदींचे उत्तराधिकारीही मानतात. आमची चर्चा भांडवली गुंतवणूक आणि उत्तर प्रदेश राज्याचा विकास या मुद्यांशी संबंधित होती. तसेच ‘मी मोहन भागवत’ यांचीही भेट घेतली आहे असे मीड म्हणतात. ते संघाचे ‘आध्यात्मिक नेते’  आहेत, असे आपले मत मीड नोंदवतात. भारताची आर्थिक प्रगती आणखी वेगाने व्हायला हवी आहे, असे मत भागवतांनी आपल्याशी बोलतांना नोंदविले, असे मीड सांगतात. अल्पसंख्यांकांचे कोणतेही नागरी अधिकार नाकारले जावेत, हे आपल्याला पूर्णांशाने अमान्य असल्याचे  भागवतांनी आपल्याला सांगितले, असे मीड यांनी स्पष्ट शब्दात नोंदविले आहे.

   शीर्षस्थ नेत्यांची मते तृणमूलस्तरापर्यंत कशी झिरपणार?

  भाजप आणि संघाच्या शीर्षस्थ नेत्यांची मते आणि भूमिका तृणमूल स्तरापर्यंत कशी झिरपत जाणार, याबाबत भविष्यवाणी  करता येणार नाही, असे मीड पुढे म्हणाले आहेत.  पण आपल्याला काय जाणवले हे मीड यांनी स्पष्ट शब्दात नोंदवले आहे. ते म्हणतात, या संघटना एकेकाळी उपेक्षित (मार्जिनलाईज्ड) होत्या. मात्र आज त्यांनी स्वत:ला एका उभरत्या शक्तीच्या पातळीला आणले आहे. आपला राजकीय आणि सामाजिक पाया कायम ठेवीत त्यांना बाह्यजगाशी सखोल (डीप) आणि उपयुक्त (फ्रुटफुल) संबंध प्रस्थापित करायचे आहेत.  

   भाजप आणि संघाला समजून घ्या 

   संपर्क साधण्याचे भाजप आणि संघाचे निमंत्रण नाकारणे अमेरिकेला परवडणार नाही. अमेरिकेचे चीनशी असलेले संबंध दिवसेदिवस अधिकच चिघळत जाणार आहेत. अशावेळी भारताची आर्थिक आणि राजकीय साथ ही अमेरिकेची गरज आहे. ज्यांना भारताशी स्थायी स्वरुपाचे रणनीतीविषयक (स्ट्रॅटेजिक) संबंध प्रस्थापित करायचे आहेत, त्यांनी हिंदूंच्या राष्ट्रीय चळवळीमागची तात्त्विक भूमिका आणि तिचा प्रक्षेप पथ/भरारीमार्ग (ट्रॅजेक्टोरी) समजून घेतला पाहिजे. हा मुद्दा  व्यावसायिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी जसा महत्त्वाचा आहे तसाच तो राजकारणी आणि धोरण निर्धारणकर्ते यांच्यासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे.


Monday, April 3, 2023

युक्रेन युद्ध आणि चीन-रशिया संबंध

वसंत गणेश काणे

   अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेली राष्ट्रे आता  युक्रेनला अधिक उघडपणे मदत करू लागली आहेत. याचा अर्थ असा होतो की, असे साह्य मिळाल्याशिवाय रशियाची युक्रेनमधली आगेकूच थांबवणे त्याच्या सध्या हाती असलेल्या शस्त्रांच्या आणि विद्यमान सैन्यबळाच्या आधारे थोपविता येणार नाही, हे युक्रेनला कळून चुकले आहे. 

   रशिया आपल्या ठेवणीतील एकाहून एक प्रभावी शस्त्रास्त्रे वापरून युक्रेनचा हवा तो आणि हवा तेवढा भूभाग मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. पण चीनने आजवर तरी हात आखडला घेतला असून बरीचशी पाठराखण तोंडीच करण्याची कूटनीती अवलंबिली आहे.  

   नरम गरम संबंध

   रशिया आणि चीन हे दोन्ही देश स्वत:ला साम्यवादी देश म्हणवत असले तरी या दोन देशात आपलेपणाचे संबंध किती आहेत, याचा शोध घेण्याचीही आवश्यकता आहे. 1949 साली रशियाची भूमिका ही ज्येष्ठ भावाची आणि नवीन प्रजासत्ताक चीनची भूमिका कनिष्ठ भावाची असणार हे ओघानेच येते. पण असा ‘बंधुभाव’ या दोन देशात नावालाच होता. पण चारचौघात मैत्रीचे नाते दाखवणेच भाग होते. म्हणून वरून आणि वरवर रशियाशी दोस्ती कायम ठेवीत माओने अमेरिकेला रशियाविरुद्ध मदत मागितली. खात्री पटल्यावरच माओला मदत करण्याचे अमेरिकेने मान्य केले. पण अगोदर चीनमघ्येच आपली पकड पक्की करू मग रशियाचे काय करायचे ते ठरवू असा व्यावहारिक शहाणपणाचा आधार घेत माओने अमेरिकेला सोबत घेण्याचा विचार थंड्या बस्त्यात ठेवला. पुढे 1972 मध्ये अमेरिकन अध्यक्ष  रिचर्ड निक्सन आणि त्यांचे मार्गदर्शक आणि सल्लगार  हेन्री किसिंजर ही  जोडी चीनच्या भेटीवर आली. रशिया आणि चीन या दोघात रशिया जास्त सशक्त आणि हानिकारक म्हणून रशियाविरुद्ध चीनला मदत करून अनुकूल करून घेण्याचा घाट या दुक्कलीने घातला होता. चीन त्याकाळी जगात एकटा पडला होता. म्हणून माओने अमेरिकन जोडगोळीचे मनापासून स्वागत केले. अमेरिका आणि चीनचे सूत जमले आणि माओचा हा निर्णय इतका बरोबर ठरला की आजच्या सामर्थ्यशाली चीनच्या उभारणीत हे सख्य खूप उपयोगाचे ठरले, असे इतिहास सांगतो. आज सीमावादाचा निकाल चीनने आपल्याला हवा तसा लावून घेतला आहे, हे पाहिले म्हणजे माओची चाल किती योग्य होती, याची खात्री पटते. आज रशियाऐवजी चीन विस्तारवादी मानला जातो. चीन आणि अमेरिका यांनी आणखी काही देश सोबतीला घ्यावेत आणि रशियाविरुद्ध आघाडीच उघडावी अशी माओची इच्छा होती. पण यावेळी नियती पुन्हा आडवी आली. माओचा भूतलावरचा अवतारच संपला. पुढे अमेरिकेकडून तांत्रिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सहाय्य मिळविण्यवरच लक्ष केंद्रित केले. एक नेता जाऊन दुसऱा त्याच विचाराचा नेता सत्तेवर आला तरी तीच धोरणे पुढे रेटली जात नाहीत, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. पहिला क्रमांक कोणाचा चीनचा की रशियाचा याबाबतीत ते एकमेकांचे स्पर्धकच आहेत. 

   रशियाला युक्रेन का हवा?

   रशियात पुतिन यांची राजवट आली त्यांनी रशियाला पूर्वीचे स्थान प्राप्त करून देण्याचा निर्धार केला. सोव्हिएट रशियापासून अलग झालेले काही देश पाश्चात्यांकडे वळले तर काही साम्यवादी स्वरुपातच राहिले. युक्रेन यातलाच एक देश होता. तो खनिजसंपन्न आणि पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत कोठारासारखा होता. युक्रेन रशियाला जोडून घ्यावा, असे झाले तर रशियाला काळ्या समुद्रात आणि पुढे भूमध्य समुद्रात प्रवेश करता येईल, असे पुतिन यांच्या मनाने घेतले पण युक्रेनला नाटोचे सदस्य व्हायचे होते हे तर रशियाला साफ नामंजूर होते. कारण तसे झाले असते तर युक्रेनची रशियाला लागून असलेली सीमा ही एका नाटो देशाची सीमा ठरली असती. पण झेलेन्स्की ऐकेना म्हणून रशियाने युक्रेनमध्ये फौजा घुसवल्या.

    पण युक्रेन रशियाला वाटले त्यापेक्षा बराच टणक निघाला. युद्धात रशियाचीही चांगलीच दमछाक झाली. आज रशियाला युद्धबंदी हवी आहे पण जिंकलेला सर्व भूभाग ताब्यात ठेवूनच. युक्रेनलाही युद्धबंदी हवी आहे पण आपला रशियाने ताब्यात घेतलेला सर्व भूभाग परत मिळत असेल तरच. भारताने युद्धबंदी व्हावी असा प्रयत्न केला. उद्या युद्धबंदी घडवून आणण्यात भारताला यश मिळाले तर ते चीनला कसे सहन होणार? यद्धबंदी घडवून आणण्याचे श्रेय आपल्याला मिळावे, भारताला मिळू नये, यासाठी शी जिनपिंग यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

    शांतताप्रस्थापनासाठीचे चिनी प्रयत्न 

   शी जिनपिंग यांनी आपले स्थान बळकट होताच रशियाला भेट दिली आहे. भेटीत या दोन देशांत व्यापार, तंत्रज्ञान, सुरक्षा इत्यादी विषयांवर 12 द्विराष्ट्रीय करार झाले, एवढेच या भेटीचे महत्त्व नाही.  शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन या दोघांनीही  बंधुभावाची साक्ष काढीत आपापसात मैत्रीचा करार केला. तर रशियाला वाढत्या प्रमाणात मदत देण्याचा ग्वाही चीनने दिली. युक्रेनबाबत रशियाची कड घेणारा 12 कलमी शांतता कराराचा प्रस्ताव तयार केला. ह्या कराराचा मसुदा एकतर्फी आहे. पण याचवेळी दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान सर्वांना ठेवला पाहिजे, अशा आशयाचे एक सूचक वाक्य शी जिनपिंग यांनी उच्चारले आहे. ते युक्रेनला आवडणारे आहे. या वाक्याने सूचित होते त्याप्रमाणे  उद्या चीनने प्रस्ताव मांडला की युक्रेनने नाटोत सामील न होण्याचे आश्वासन द्यावे, रशियाला काळ्या समुद्रात उतरता येईल, अशी सोय उपलब्ध करून द्यावी आणि रशियाने युक्रेनमधून माघार घ्यावी, तर रशियाला या प्रस्तावाला नाकारणे कठीण होईल. कारण आज रशियाला शस्त्रास्त्रांची नितांत गरज आहे.  इराण आणि बेलारस थोडीफार मदत रशियाला करीत आहेत, हे खरे आहे पण ती पुरेशी पडण्यासारखी नाही. म्हणजे अशावेळी हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी चीन रशियावर नक्कीच दबाव आणू शकेल आणि युक्रेनबाबत तडजोड करण्यास रशियाला भाग पाडू शकेल, हे उघड आहे.  पण मग हाच न्याय तैवानला का लागू होत नाही, हे दाखवण्यासाठी चीनला ‘वन चायना पॅालिसी’ हा एकच मुद्दा आधारासाठी शिल्लक राहील. पण हा मुद्दा जगाने यापूर्वीच स्वीकारला आहे. युक्रेनप्रकरणी चीनला यश मिळाले तर  तर रशिया आणि चीन यात चीन मोठा भाऊ ठरेल. तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाऊ पाहणारा संघर्ष उभयपक्षी समाधान वाटेल असा सुटेल, चीनला अक्खे जग धन्यवाद देईल, चीनचे आजच्या जगातले एकटेपण दूर होईल आणि एक शांतिदूत म्हणून चीनची प्रतिमा जगात उजळेल. मुख्य म्हणजे एरवी जे श्रेय भारताला मिळाले असते ते चीनला मिळेल. शतकानुशतके निरनिराळ्या कारणास्तव टक्केटोणपे खाल्यामुळे चिनी माणसाचा चेहरा इतका मख्ख झाला आहे की, त्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता कुणालाही लागत नाही, असे म्हटले जाते. हे काहीही असले तरी चीनची पावले मात्र या दिशेने पडतांना दिसत आहेत. खरे तर जवळपास अशाच आशयाचा प्रस्ताव भारताकडूनही युक्रेन आणि रशियाकडे अगोदरच गेला असणार. कारण अमेरिकादी पाश्चात्य राष्ट्रे यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत अगोदर पासूनच भारताला आग्रह करीत आहेत. प्रत्यक्षात काय घडेल, कुणास ठावूक? पण एक मात्र नक्की आहे, ते हे की राजकारणात शाश्वत मैत्री किंवा वैर असे काहीच नसते. शाश्वत असतात ते हितसंबंध!  ते कुणाला काय करायला लावतील याचा नेम नसतो. तत्त्व वगैरे बोलायच्या गोष्टी असतात हो!