ध्यास स्वतंत्र बलुचिस्तानचा!
तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक ०५/०६/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
ध्यास स्वतंत्र बलुचिस्तानचा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 942280443
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
1948 पर्यंत बलुचिस्तान स्वतंत्र होता. मात्र पाकिस्तानने या देशावर कब्जा करून पाकिस्तानमध्ये विलीन केले होते. तेव्हापासून बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा 48% भूभाग व्यापला आहे. क्वेटा ही बलुचिस्तानची राजधानी आहे. बलुचिस्तानची लोकसंख्या 1 कोटी तर क्षेत्रफळ 3 लक्ष 47 हजार चौकिमी आहे. पंजाब प्रांताची लोकसंख्या 12 कोटी 70 लक्ष तर क्षेत्रफळ 2 लक्ष चौकिमी आहे. सिंधची लोकसंख्या 5.5 कोटी तर क्षेत्रफळ 1लक्ष 41 हजार चौकिमी आहे. खैबर पख्तुन्ख्वाची लोकसंख्या 3 कोटी 55 लक्ष तर क्षेत्रफळ 1 लक्ष चौकिमी आहे. फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाची (एफएटीए) लोकसंख्या 50 लक्ष तर क्षेत्रफळ 27 हजार किमी. आहे.
याशिवाय पाकिस्तानने 1948 पासून बळकवलेले भूभाग असे आहेत. गिलगिट व बाल्टीस्तान याची लोकसंख्या 18 लक्ष तर क्षेत्रफळ 73 हजार चौकिमी आहे. पाकव्याप्त काश्मीरची लोकसंख्या 40 लक्ष 45 हजार तर क्षेत्रफळ 13 हजार चौकिमी आहे.
बळकावलेला भूभाग वगळला तर उरलेले सर्व भूभाग मिळून आजचा लांबुळका व रुंदी कमी असलेला पाकिस्तान तयार होतो.
मीर यार बलोच यांनी बलुचिस्तान देश हा स्वतंत्र झाल्याची घोषणा नुकतीच म्हणजे 10 मे 2025 रोजी केली आहे. अशाप्रकारे बलुचिस्तान हा एक देश नव्याने उदयाला येऊ पाहतो आहे. पण स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीच्या मार्गात आंतरराष्ट्रीय मान्यतेसारख्या अनेक अडचणी आहेत. बलुच लोक आजूबाजूच्या देशातही विखुरलेले आहेत. जसे की, इराणमधील सिस्तान प्रांतात बलुच लोक बहुसंख्येत आढळतात. ऐतिहासिक दृष्ट्या हा प्रांत बलुचिस्तानचा भाग आहे. आजही या प्रांतातील बलुचांचे बलुचिस्तानमधील बलुचांशी संबंध आहेत. हा संपूर्ण भाग अविकसित आणि दरिद्री आहे. अफगाणिस्तानमध्येही निमरोज प्रांतात बलुच लोक बहुसंख्येने राहत आहेत. हेलमंद, फरयाब, तखर, हेरात, कंधार, बदख्शा आदी प्रांतातही बलुचांची संख्या भरपूर आहे. हे सर्व भाग मिळून विशाल बलुचिस्तान निर्माण व्हावा अशी आकांक्षा बलुच नेते बाळगून आहेत.
बलुचिस्तानातील मराठे म्हणजे 1761 च्या तिसऱ्या पानिपत युद्धानंतर कैद झालेल्या मराठा सैनिकांचे वंशज आहेत. बलुचिस्तानमध्ये ते युद्धकैदी म्हणून आले होते. त्यांनी तिथे आपली संस्कृती व भाषा जतन केली आहे. हे मराठे बुग्ती जमातीत मिसळून गेले म्हणून त्यांना बुग्ती मराठे असेही म्हणतात. या मराठ्यांच्या एकूण 20 जाती तिथे आहेत. त्या भारतातील मराठ्यांच्या जातींशी साम्य राखून आहेत. एका जातीचे नाव तर पेशवाई आहे. आपण पेशव्यांचे वंशज आहोत, असे ते मानतात. 1761 मध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धानंतर, मराठा सैनिकांना मोठी संख्येत अहमदशाह अब्दालीच्या सैन्याकडून कैद करण्यात आले होते. या कैद्यांना बलुचिस्तानमध्ये नेण्यात आले आणि तिथे ते अनेक वर्षे राहत आहेत. या मराठ्यांच्या वंशजांना 'रॉड' किंवा 'रोअर मराठा' म्हणूनही ओळखले जाते. बलुचिस्तानात मराठा कौमी इत्तेहाद नावाची मराठा संघटना आहे. बलुचिस्तानमधील हा मराठा समुदाय, आजही भारतासोबत राजकीय संबंध ठेवून आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाल्याचा मुहूर्त साधत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. हा बलुच जनतेने घेतलेला राष्ट्रीय निर्णय (नॅशनल व्हर्डिक्ट) आहे, असे ते म्हणाले. बलुच नेते मीर यार बलुच यांनी रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या निर्मितीची घोषणा करीत हा नवीन देश पाकिस्तानपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर बलुच संघटनेने दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे. जागतिक पटलावर भारतासह अन्य देशांनी आपल्याला साथ द्यावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पाकिस्तान बलुचांचा वंशविच्छेद करीत आहे, पाकिस्तान बलुच लोकांना युद्धबंदी मानते, त्यांना बलुच संस्कृतीच नष्ट करायची आहे, असा गंभीर आरोप बलुच नेते मीर यार बलुच पाकिस्तानवर केला आहे.
मीर यार बलोच हे एक लेखक तर आहेतच तसेच ते स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणा-या बलुच लिबरेशन आर्मीचे नेतृत्वही करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांतीसेना बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या नवीन सीमेच्या आतच राहण्यास सांगावे, अशीही मागणीही त्यांनी केली आहे. वरवर पाहता हे सर्व साद्ध्य होणे कठीण दिसते. पण जिद्दी बलुच समाजाचा स्वातंत्र्यासाठीच्या प्रभावी लढ्याचा इतिहास खूप जुना आहे, हेही विसरता येणार नाही. बलुच लोक पराक्रमी आणि लढवैय्ये मानले जातात. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना माघार घेण्यास आणि क्वेटा सोडण्यास भाग पाडले, हेही नजरेआड करता यायचे नाही. या पूर्वी 2025 च्या मार्च महिन्यात नैऋत्य पाकिस्तानमध्ये तर बलुच बंडखोरांनी एका ट्रेनचेच अपहरण करून प्रवाशांना सुमारे 36 तास ओलीस ठेवले होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या 1947 च्या कायद्यानुसार भारताची फाळणी करण्यात आली भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्यात आले. या दोन देशांवरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. बलुच लोकांची इच्छा नसतांनाही बलुचबहुल प्रदेश पाकिस्तानमध्ये यावेळी सामील करून घेण्यात आला. तेव्हापासून स्वतंत्र होण्यासाठी बलुच लोकांचा पाकिस्तान शासनाशी सतत संघर्ष सुरू आहे.
एक धर्म एक असेल तर तेवढ्या भरवशावर एक राष्ट्र उभे होत नाही/ करता येत नाही. युरोप हे जुने उदाहरण आहे. युरोपमध्ये कितीतरी छोटी राष्ट्रे आहेत. ती सगळी बहुतांशी ख्रिश्चन राष्ट्रे आहेत. तर पाकिस्तान हे त्यातल्यात्यात नवीन उदाहरण आहे. मुस्लिम धर्मी सिंधी, पंजाबी, बलुची, पख्तून व बंगाली (तरी बरे की हे सर्व बहुतांशी सुन्नी आहेत) यांचे एक राष्ट्र झाले नाही/ होणार नाही. बांग्ला देश निर्माण झाला यामागचे हेही एक कारण आहे. उद्या सिंध व बलुचिस्तान आणि पश्तूनबहुल वेगळे झाले तर त्यामागचेही हेच एक प्रमुख कारण असेल. मग उरेल फक्त आजचा वरचढ व उद्दाम पंजाब!
ग्वादार बंदर बांधण्यासाठी चीन आपले वित्तबळ, मनुष्यबळ व तंत्रबळ देऊ करतो आहे. बलुचिस्तानातून या बंदराच्या साह्याने चीनला अरबी समुद्रात प्रवेश हवा आहे. शिवाय बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक वायू, खनिजे, कोळसा, गंधक, क्रोमियम, लोह आणि हिऱे सापडले आहे. म्हणून चीनला जसा बलुचिस्तानमधून जाणारा चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हवा आहे पण म्हणूनच बलुचिस्तानला तो नको आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भारताचे पारडे चार बाबतीत वरचढ झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर, सिंधू जलवाटप करार, बलुचिस्तान आणि पाकिस्तानचे अण्वस्त्र साठवण केंद्र. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानुकूल वारे वेगाने वाहू लागले आहेत. उद्या पाकव्याप्त काश्मीर भारतात आले तर भारताचा अफगाणिस्तान मार्गे बलुचिस्तानशी संपर्क प्रस्थापित होऊ शकेल. आज भारत आणि बलुचिस्तानच्या सीमा एकमेकींना स्पर्श करीत नाहीत. ही अडचण दूर झाली तर भारत बलुचिस्तानसाठी खूपकाही करू शकेल. पाकिस्तानला रुंदी/खोली नाही. तो लांबुळका आहे. बलुचिस्तान वेगळा झाला तर पाकिस्तानचा नकाशा एखाद्या अस्थिपंजर व्यक्तीसारखा दिसू लागेल. युद्धात गरज पडल्यास मागे सरकायला पुरेशी भूमी असावी लागते. हा मुद्दा दुसऱ्या महायुद्धात रशियाला जर्मनीबरोबर लढतांना कामी आला होता. उद्या सिंधूचे पाणी पाकिस्तानला आजच्या सारखे मिळाले नाही तर पाकिस्तानची पंचाईत होणार आहे. पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याची धमकी भारताला देत असतो. या युद्धात ज्या ठिकाणी ही पाकिस्तानने साठवून ठेवली आहेत त्या बोगद्याच्या दोन्ही तोंडाशी भारताने बॅाम्ब हल्ले करून मोठाली भगदाडे पाडून ती त्याच बोगद्यात बंदिस्त केली आहेत, अशा वार्ता पाकिस्तानातूनच बाहेर आल्या आहेत. गलितगात्र पाकिस्तानच्या विभाजनाची उलटी गिनती (काऊंट डाऊन) सुरू झाली आहे, असे म्हणतात ते उगीच नाही.
पाकिस्तानचे फक्त बाकीस्तान होणार काय?
बाकीस्तान (फक्त पंजाब)
आज ना उद्या पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडणार?
१.सिंध २.बलुचिस्तान ३. पश्तूनबहुल भाग
No comments:
Post a Comment