Sunday, September 21, 2014

एका हिंदूस पत्र लिहिणारा लिओ टॉलस्टॉय 20 Sep 2014

इतिहास

तारीख: 20 Sep 2014 23:54:41

एका हिंदूस पत्र लिहिणारा लिओ टॉलस्टॉय

लिओ टॉलस्टॉय एक विश्‍वविख्यात साहित्यिक आणि चिंतक म्हणूनही ओळखला जातो. टॉलस्टॉयच्या कादंबर्‍यांचे विश्‍वसाहित्यात अमर स्थान आहे. मानवाच्या मनाच्या नेणिवेतील मनोव्यवहारांचे वर्णन करण्याची त्याची क्षमता केवळ वादातीतच नाही, तर आजही ते स्थान तसेच कायम आहे आणि भविष्यातही ते तसेच राहणार आहे.
त्याचे एका हिंदूस लिहिलेले पत्र तर आम्हा भारतीय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कदाचित या पत्रामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे. वयाच्या तीस वर्षांनंतर टॉलस्टॉयच्या जीवनाला नैतिक आणि धार्मिक आधिष्ठान प्राप्त झाले. दुष्टाव्याचा विरोध अहिंसक मार्गाने करण्याच्या त्याच्या भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते, असे मानतात. या दोन महापुरुषांमधील संबंधाची सुरवात कशी झाली, ते पाहणे रंजक तसेच बोधप्रदही आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला टॉलस्टॉय यांचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती करणारे पत्र तारकनाथ दास यांनी त्यांना पाठविले होते. या पत्राला उत्तर म्हणून डिसेंबरमध्ये टॉलस्टाय यांनी पाठविलेल्या पत्राचे शीर्षक आहे- ‘एका हिंदूला पत्र.’ यात जुलमी परकीय सत्तेविरुद्ध लढताना सशत्र लढ्याला शांततामय मार्गाचा- अहिंसक सविनय कायदेभंग- हाच पर्याय असू शकतो, असे टॉलस्टॉय यांनी प्रतिपादन केले आहे. या पत्रात त्यांनी जसा स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे, तसाच तिरुकुरलचाही उल्लेख आहे. तमीळ विचारवंत तिरुवलवार यांनी तिरुकुरल म्हणजेच तमीळ मराई (तमीळ वेद) नावाची रचना सिद्ध केली आहे. यालाच चिरंतन शब्द असेही म्हटले जाते. टॉलस्टॉयचे पत्र ‘फ्री हिंदुस्थान’ नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ते आफ्रिकेत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी (त्या वेळी ते महात्मा नव्हते) यांच्या वाचनात आले. या पत्राने महात्मा गांधी खूपच प्रभावित झाले. त्यांनी टॉलस्टॉयला पत्र लिहून या पत्राचा गुजराती भाषेत अनुवाद करण्याची अनुमती मागितली. यानंतर महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यात पत्राने विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. महात्मा गांधींच्या राजकीय भूमिकेवर टॉलस्टॉय यांच्या विचारांचा ठसा उमटला होता, असे मानले जाते.

कादंबरीकार टॉलस्टॉय

लिओ लिओ टॉलस्टॉय हा आपल्या भावंडातला चौथा मुलगा. आईबापाचे निधन त्याच्या लहानपणीच झाल्यामुळे तसा अनाथ म्हणूनच आपल्या मावश्यांकडे तो वाढला. बालपण, किशोर वय, तारुण्य (चाइल्डहूड, बॉयहूड आणि यूथ) अशी तीन वेगवेगळी आत्मचरित्रे त्याने त्या त्या काळात लिहिली आहेत.
त्याचे प्राथमिक शिक्षण शाळेत न जाता घरीच झाले. तो हुशार विद्यार्थी कधीच नव्हता. विद्यापीठाची पदवी त्याला संपादन करता आली नाही. तो शेतीसुद्धा नीट करू शकला नाही. पण, तो कायम आणि सतत लिहीत राहिला. कन्टेम्पररी या त्या काळाच्या प्रसिद्ध नियतकालिकात त्याचे लेख प्रसिद्ध होत असत.
‘वॉर ऍण्ड पीस’ ही कादंबरी लिहायला प्रारंभ त्याने १८६१ साली केला. ही कादंबरी त्याने अनेक भागात लिहून प्रसिद्ध केली. १८६९ मध्ये शेवटचा भाग लिहून त्याने ही कादंबरी पूर्ण केली. नेपोलियनकालीन युद्धाच्या कालखंडावर आधारित ही कादंबरी खूप गाजली. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेली तसेच वास्तव चित्रण असलेली काल्पनिक पात्रे, हे या कादंबरीचे वैशिष्ट्य होते. ते रसिकांना खूपच भावले. ऐतिहासिक घटना आणि त्या काळातले नीतिनियम याबद्दलचे वक्रोक्तियुक्त निबंधवजा लिखाण, हा या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हटला जातो. आपले दैनंदिन व्यवहार कसे आहेत, यानुसार आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. उक्तीपेक्षा कृती कशी, यावर त्याचा भर असल्याचे जाणवते. ना कॅरेनिनाचे लेखन नंतरचे. या कादंबरीला पार्श्‍वभूमी होती, रशिया आणि तुर्कस्तानमधील युद्धाची. ‘वॉर ऍण्ड पीस’प्रमाणेच या कादंबरीत टॉलस्टायचे जीवनानुभव साकारले आहेत, असे मानतात. विशेषत: यातील प्रियाराधनाला टॉलस्टाय आणि सोफिया यांच्यातील प्रणयप्रसंगांची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे, असे म्हटले जाते. या कादंबरीचे प्रारंभीचे वाक्य वाचकांच्या स्मरणात कायम स्थान ग्रहण करून आहे, अशी नोंद त्या काळी केलेली आढळते. सर्व सुखी दाम्पत्यांचा जीवनपट सारखाच असतो. पण, प्रत्येक दु:खी कुटुंबाचे दु:ख मात्र वेगवेगळे असते. ही कादंबरीसुद्धा हप्त्याहप्त्यानेच चार वर्षांत पूर्ण प्रसिद्ध झाली. या कादंबरीने टॉलस्टायला अफाट प्रसिद्धी आणि अमाप पैसा मिळवून दिला.

कल्पित कथांना वेगळेच वळण

नंतरच्या लिखाणात त्याच्या कल्पित कथांनी वेगळेच वळण घेतले. ‘द डेथ ऑफ इव्हान लिंच’ या त्याच्या गाजलेल्या तिसर्‍या कादंबरीत कल्पिताला नैतिकतेची आणि वास्तवाची बैठक प्राप्त झालेली दिसते. क्षुल्लक बाबींना महत्त्व देऊन आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा कालखंड वाया घालवला, हे नायकाला- इव्हान लिंचला- जेव्हा कळते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण त्या वेळी तो मृत्यूच्या छायेत जीवन जगत असतो. ‘फादर सर्गिअस’ या छोट्याशा कादंबरीत टॉलस्टायने आपल्या नवीन आध्यात्मिक मतांची चर्चा केलेली आढळते, तर ‘रीसरेक्षन’ या कादंबरीचा कॅन्‌व्हास पहिल्या दोन कादंबर्‍यांसारखाच मोठा असूनही ती रसिकांना फारशी भावली नाही. ‘द लिव्हिंग कॉर्प्स’ हे त्याचे वक्रोक्तिपूर्ण नाटक त्याने लिहिले. ‘हाजी मुराद’ या कादंबरिकेचा शोध त्याच्या मृत्यूनंतर लागला.

मी कसा?

आपल्या आयुष्याचा आढावा घेताना तो म्हणतो, ‘‘मी युद्धात अनेकांना यमसदनी पाठविले आहे, द्वंद्व युद्धात अनेकांचा खात्मा केलेला आहे, जुगार खेळलो आहे, शेतकरी आणि श्रामिकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत, वेश्यागमन केले आहे, लोकांना फसवले आहे, चोरी, लांडीलबाडी, पराकोटीचे मद्यपान केले आहे, खून, मारामार्‍या केल्या आहेत, मी केला नाही असा एकही गुन्हा नसेल. माझ्या आयुष्याची दहा वर्षे अशी गेली आहेत. तरीही माझे समवयस्क माझी गणना नैतिक पुरुषात करतात.’’

युद्धातील एक क्रूर सैनिक- टॉलस्टाय

शेतीतील आपल्या धाकट्या भावाची प्रगती पाहून त्याच्या मोठ्या भावाने त्याला आपल्याप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. काही काळ त्याने क्रिमियन युद्धात भाग घेतला. याच वेळी त्याने ‘सेव्हास्टोपल टेल्स’ या नावाची पुस्तके लिहिली. यात त्या काळात नवीनच असलेल्या एका लेखन प्रकाराचा त्याने वापर केला. संज्ञाप्रवाह (स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस) या नावाने हा लेखन प्रकार ओळखला जातो. एका सैनिकाच्या मनातील विचारांचा मागोवा या निमित्ताने त्याने चित्रित केला आहे.
बराचसा हेकेखोर आणि काहीसा उद्धट असल्यामुळे तो कोणत्याच प्रकारच्या लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला नाही. विद्रोही म्हणून स्वत:ला घोषित करून तो पॅरिसला गेला. तिथे जुगारात सर्व गमावून बसला आणि मायदेशी परत आला. याच वेळी त्याने आपल्या आत्मचरित्राचा तिसरा खंड ‘तारुण्य’ (यूथ ) प्रसिद्ध केला. याच काळात एका डॉक्टरच्या मुलीशी- सोफियाशी- त्याचे लग्न झाले.

विद्रोही आणि वेगळाच टॉलस्टाय

कादंबरीलेखनातून टॉलस्टॉयला भरपूर पैसा मिळाला, पण आध्यात्मिकदृष्ट्या टॉलस्टॉय अतिशय अस्वस्थ होता. जीवनाचा अर्थ काय, हे त्याला पडलेले कोडे होते. प्रारंभी तो ऑर्थोडॉक्स चर्चकडे वळला. पण, त्याचे समाधान होत नव्हते. उलट, सर्व चर्चेस भ्रष्ट आहेत, या निष्कर्षाप्रत तो पोचला. जर सर्व मानव ईश्‍वराची लेकरे आहेत, असे म्हटले आहे, तर युद्ध आणि हिंसा यांना आपल्या जीवनात स्थान असूच कसे शकते, हा त्याला पडलेला प्रश्‍न होता. प्रस्थापित धर्ममतांच्या ऐवजी त्याने आपली मते ‘मेडिएटर’ नावाचा ग्रंथ लिहून मांडली. चर्चला हे सहन होणे शक्यच नव्हते. त्याला बहिष्कृत करण्यात आले. त्याच्या पाळतीवर गुप्त पोलिससुद्धा राहू लागले. आपल्या नवीन धर्ममतानुसार आपण संपत्तीचा त्याग केला पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण, त्याची बायको सोफिया हिने या विचाराला कडाडून विरोध केला. विवाहबंध तुटेपर्यंत ताणले गेले. शेवटी टॉलस्टॉयने आपल्या सर्व मिळकतीचे स्वामित्व पत्नीकडे सोपवले आणि तणाव तुटेपर्यंत ताणू दिला नाही.
उत्तरायुष्यात टॉलस्टॉयला खूप आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पण, सोफियाला मात्र त्याचे जीवनविषयक सिद्धांत बिलकूल मान्य नव्हते. त्याला भेटायला येणार्‍या-जाणार्‍या शिष्यांचा ती पाणउतारा करीत असे. शेवटी टॉलस्टॉय वैतागला. या गोष्टीचा बभ्रा इतका झाला की, टॉलस्टॉय आणि त्याची कन्या अलेक्झांड्रा तीर्थयात्रेला निघून गेले. अलेक्झांड्राने आपल्या पित्याची मनोभावे सेवा आणि शुश्रूषा केली. आपली ही तीर्थयात्रा खाजगी आणि गुप्त राहावी, तिचा गाजावाजा होऊ नये, अशी त्या दोघांची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. त्यांची ही तीर्थयात्रा खूपच खडतर ठरली. शेवटी अस्टापोव्हो गावच्या स्टेशनमास्तरने त्यांना आश्रय दिला. ‘वॉर ऍण्ड पीस’, ‘ना कॅरेनिना’ आणि ‘डेथ ऑफ इव्हान लिंच’ या कादंबर्‍या लिहिणारा लेखक लिओ टॉलस्टाय आजही जगातील मोजक्या प्रमुख लेखकांपैकी एक मानला जातो. नऊ सप्टेंबर १८२८ रोजी जन्मलेल्या या लेखकाच्या वाट्याला ८२ वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले होते. तो २० नोव्हेंबर १९१० रोजी रशियातील ऍस्टापोव्हो या गावी एका स्टेशनमास्तरने दिलेल्या खोपट्यात मृत्यू पावला आणि त्याने चिरनिद्रा घेतली.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०

No comments:

Post a Comment