Monday, February 3, 2020

गणतंत्रदिनी, असे विदेशी अतिथी येती घरा!


गणतंत्रदिनी, असे विदेशी अतिथी येती घरा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

    प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला भारतात सर्वत्र गणराज्य दिन संपन्न होत असतो. दिल्ली येथील कार्यक्रमाचे आयोजन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने केले जाते. या निमित्ताने आयोजित संचलनात भारताची संरक्षण सिद्धता, सांस्कृतिक व सामाजिक वारसा यांचा परिचय आपला आपल्याला व सर्व जगालाही होत असतो. या दिवशी 1950 मध्ये भारतीय जनतेने एक अभूतपूर्व राज्यघटना स्वत:प्रति समर्पित केली आहे. या निमित्ताने देशभर कवाइती, उद्भोदनपर भाषणे व  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत असतात आणि शाळकरी मुलांना खाऊ वाटला जात असतो. या दिनाचा आणखीही एक खास विशेष आहे. हे निमित्त साधून परदेशातील गणमान्य व्यक्तींना, नेत्यांना, राष्ट्रप्रमुखांना दिल्ली येथील संचलनाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले जाते. अशी प्रथा नियमितपणे सुरू ठेवणारा भारत हा जगातला मोठा असा बहुतेक एकमेव देश असावा.
    26 जानेवारीला व दिल्लीतच पण...
   हा खास कार्यक्रम दिल्लीत संपन्न होत असतो. पण दिल्ली ऐवजी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे डेन्मार्कचे पंतप्रधान विगो कॅम्पमन हे 1962 मध्ये याच निमित्तने उपस्थित होते. 1967 मध्ये अफगाणिस्तानचे राजे झहीर शहा हे 28 जानेवारीला आले होते (गणतंत्रदिनाचे कार्यक्रम 4 दिवस सुरू असतात). 1970 मध्ये बेल्जियमचे राजे बोडोईन हे फक्त शेवटच्या म्हणजे 29 जानेवारीच्या बीटिंग रिट्रिटलाच उपस्थित होते. बीटिंग रिट्रिटने चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांची सांगता 29 जानेवारीला होत असते. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने जी सैन्य दले आपल्या बराकीतून बाहेर पडून दिल्लीत आलेली असतात, त्यांनी परत आपल्या बराकीत जाण्याचा हा कार्यक्रम असतो.
     पाहुण्यांसोबतच्या अन्य गणमान्य व्यक्ती
    अनेकदा प्रमुख पाहुण्यासोबत इतर गणमान्य व्यक्तीही सोबत आलेल्या असतात. 1959 या वर्षी ड्यूक ॲाफ एडिंबरो - फिलिप स्वत: निमंत्रित होते तर 1961 मध्ये इंग्लंडच्या राणी क्वीन एलिथाबेथ यांच्यासोबतही ते आले होते. 1964 च्या 26 जानेवारीला इंग्लंडचे चीफ ॲाफ डिफेन्स स्टाफ लाॅर्ड लुईस माऊंटबॅटन हे प्रमुख पाहुणे होते. परतंत्र भारताचे शेवटचे व्हॅाईसराॅय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल असलेले असलेले लुईस माऊंटबॅटन 26 जानेवारीला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित होते. या वरून तत्कालीन भारतीय नेत्यांच्या मनात त्यांना किती मानाचे स्थान होते, हे स्पष्ट होते. लेडी एडविना माऊंटबॅटन यांचेही दोनदा प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन झाले होते.
    भेटींचे राजकीय, आर्थिक व सामरिक महत्त्व
   भारतासाठी गणतंत्रदिवसाचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. 1950 पासूनच भारत या दिनाने निमित्त साधून विविध देशांच्या प्रमुखांना / गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करीत आला आहे. 1950 मध्ये पहिल्या गणराज्यदिनी इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो हे प्रमुख पाहुणे होते. परदेशी पाहुण्यांच्या भेटींचे राजकीय, आर्थिक व सामरिक महत्त्व सहज लक्षात येण्यासारखे आहे. 1957 मध्ये रशियाचे संरक्षण मंत्री, झुकॅाव्ह प्रमुख पाहुणे होते. क्वचितच एखाद्या मोठ्या देशाचा प्रतिनिधी या निमित्ताने पाहुणा म्हणून आला नसेल. जपान व इंग्लंडचे राष्ट्रप्रमुख वा गणमान्य नेते तर आजवर 5 दा; रशिया व भूतानचे 4 दा; ब्राझील, इंडोनेशिया व  माॅरिशसचे  3 दा; दक्षिण आफ्रिका, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, नायजेरिया, नेपाळ, श्रीलंका, युगोस्लाव्हिया, पाकिस्तान (हो पाकिस्तान सुद्धा!) यांचे  2 दा; आणि चीनसकट इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख वा गणमान्य नेते एकदा, गणराज्य दिनाचे निमित्ताने भारतात पायधूळ झाडते झाले आहेत. 1956 साली ब्रिटन बरोबर जपानचेही  खास प्रतिनिधी (म्हणजे एकाच वेळी दोन पाहुणे) गणराज्य दिन समारोहाला उपस्थित होते. तसेच 1968 साली रशिया व युगोस्लाव्हियाचे नेते आले होते, तर 1974 साली श्रीलंका व युगोस्लाव्हियाचे नेते आले होते. 1974 मध्ये युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष टिटो व श्रीलंकेच्या पंतप्रधान सीरीमावो बांदारनायके यांना आमंत्रण होते. 2018 मध्ये तर भारताने कमालच केली. यावेळी दी असोसिएशन ॲाफ साऊथ इस्ट एशियन नेशन्सच्या (एसियन स्टेट्स - ब्रुनई, इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, मलायाशिया, म्यानमार, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएटनाम) 10 राष्ट्रप्रमुखांना एकाच वेळी निमंत्रित केले होते.
    अपवाद
   शीत युद्धाच्या काळात, अलिप्ततावाद्यांचा बोलबाला असतांना किंवा जागतिक वातावरण तापलेले असतांना सुद्धा (1952, 1953 व 1966 चा अपवाद वगळता) आपण पाहुण्यांची सरबराई करण्यास चुकलो नाही. 1952,1953,1966 मध्ये मात्र कोणीही परदेशी नेता पाहुणा म्हणून आलेला नव्हता. पैकी 11 जानेवारी 1966 ला पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचा ताष्कंदला दु:खद अंत झाला होता. श्रीमती इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून शपतविधी 24 जानेवारी 1966 ला झाला होता. दोनच दिवसांनी प्रजातंत्रदिन होता. बहुदा म्हणून पाहुण्यांना निमंत्रण देणे शक्य झाले नसावे.
     सोहळा कुठे कुठे ?
   गणतंत्रदिनाचे संचलन दिल्लीत कुठे व्हावे, हे सुरवातीला निश्चित नव्हते.1950 ते 1954 या काळात लाल किल्ला, रामलीला मैदान, किंग्ज वे, इर्विन स्टेडियम या जागी संचलन  झाले आहे. 1955 पासून मात्र राजपथावर संचलन होत आले आहे. गणतंत्रदिनाच्या संचलनात सलामी घेण्यासाठी दर वर्षी राष्ट्रपती उपस्थित असतातच. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण होते. फक्त 1955 मध्ये सर्वंपल्ली  डॅा राधाकृष्णन प्रकृती अस्वास्थ्यामुळे संचलनात सलामी स्वीकारण्याय उपस्थित राहू शकले नव्हते.
पाहुणे म्हणून आले पण नंतर...
   1958 मध्येच भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. तरीही पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मार्शल यी जिएनिंग यांना प्रजासत्ताकदिनी निमंत्रित केले होते. भारत व चीन यात शांतता असावी, असा या निमंत्रणामागचा हेतू असावा. पण चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलेच. तसेच 1965 साली पाकिस्तानचे अन्न व शेतकी मंत्री राणा अब्दुल हमीद यांना परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा या हेतूने निमंत्रित केले होते पण पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही व पुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.  
 पाहुण्यांना का बोलवायचे?
   निरनिराळ्या देशांचे प्रतिनिधी व नेते नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात. असा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी 2014 नंतर भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशी संपर्क दौरे करून विशेष प्रयत्न केलेले आढळतात. इतर देशांच्या प्रतिनिधींनाही भारतात वेळोवेळी पाचारण केले. त्यामुळे विरोधकांनी मोदींवर टीकास्त्रही सोडले होते. सत्ताधाऱ्यांच्या सर्वच भूमिकांवर विरोधकांनी टीका करायची असते, असे गृहीत धरून ही टीका बहुदा केलेली असावी. काही थोड्यांना संपर्क नीतीचे महत्त्व कळलेले नसणेही अगदीच अशक्य नाही.
  पण एखादी भेट वेगळी ठरते
   काही भेटी विशेष महत्त्वाच्या असतात. तशीच 2020 ची  ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांची भेट त्यातलीच एक म्हटली पाहिजे. ही भेट प्रजातंत्रदिनाचे निमित्त साधून झाली आहे. ब्राझीलचे अध्यक्ष गणराज्यदिनी विशेष पाहुणे या नात्याने उपस्थित होते. साखर उद्योगाला भारत देत असलेले अनुदान (सबसिडी) आंतरराष्ट्रीय निकषांना धरून नाही, अशी तक्रार ब्राझीलने डब्ल्यूटीओ (वर्ल्ड ट्रेड ॲार्गनायझेशनकडे) केली होती तरीही हे निमंत्रण आपण दिले आहे यानिमित्ताने भारताने आपण ब्राझील या देशाशी असलेल्या संबंधांना किती महत्त्व देतो, हे न बोलता त्यांना जाणवून दिले आहे. या वेळेचे दुसरेही एक महत्त्व आहे, ते असे की, या दोन्ही देशांचा आर्थिक विकास सध्या मंदावला आहे. व्यापारात वाढ करून दोन्ही देश आपापल्या अर्थकारणाला गती देऊ शकतात, हे वास्तव दोन्ही देशांना पटले आहे, हा मुद्दाही या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. चीन आणि अमेरिका यात सुरू असलेले व्यापार युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून त्या युद्धाच्या झळा सर्व जगाला बसत आहेत. दोन रेड्यांची टक्कर होते, त्यांच्यात तुंबळ युद्ध होते. कुणीतरी एक हरतो आणि मागे वळतो व निघून जातो. तसेच याहीवेळी होईल असे गृहीत धरले तरीही या लढतीच्या निमित्ताने अनेक लहानसहान प्राणी चिरडले जातात व नष्ट होतात, ही वस्तुस्थिती आहे. भारत व ब्राझील हे दोन्ही देश असे क्षुल्लक नक्कीच नाहीत. पण त्यांच्यासाठी सुद्धा चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध चांगलेच हानिकारक ठरते आहे, हे वास्तव मान्य केले पाहिजे. बहुदा हे मनात ठेवूनच यजमान भारत व पाहुणा ब्राझील यांचे नेते एकत्र येत आहेत, ही बाब नोंद घेण्यासारखी नक्कीच आहे. या निमित्ताने दोन्ही देशांच्या अर्थकारणाच्या गतीला आणखी वेग येईल व अशा प्रकारचे सहकार्याचे नवनवीन पूल आकाराला येण्याची प्रक्रिया प्रारंभ होईल, अशी अपेक्षा बाळगूया.

No comments:

Post a Comment