Thursday, January 20, 2022

लहानपणं देगा देवा.२०. ०१. २०२२ आमची वस्त्रप्रावरणे आणि अभ्यंगस्नान वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? आमच्या लहानपणी मी आणि बंडू हे दोघे सख्खे भाऊ आणि मनू आणि उषा (मनोहर आणि उषा केळकर) मावस भाऊ बहीण असे एकत्र वाढलो. माझ्या आणि बंडूच्या नावाची खरंतर अदलाबदल व्हायला हवी होती. कारण बंडू सरळ स्वभावाचा, सज्जन, शांत, अभ्यासू, कामसू, आज्ञाधारक असा होता. तर मी याच्या अगदी उलट होतो. पण मी वसंताच राहिलो आणि तो मात्र नारायणाचा बंडू झाला. हे कोडे मला कधीही उलगडले नाही. पण आमच्या आईबापांना आमचे पाय पाळण्यात नेमके कसे आहेत हे न दिसल्यामुळे ही नावांची अदलाबदल झाली असेल तर त्यांना तरी दोष कसा देता येईल? . गोरेपणात माझी अन्य भावंडे उजळ होती. माझ्यात गोरेपणाचा किंचित (?) अभाव होता. पण तरीही ह्याला सोनूताईने (माझ्या आईने) कुणातरी बाईला पायलीभर ज्वारी देऊन घेतलेला दिसतो, असे म्हणून, समजून आणि मानून मला लहानपणी गोंड्या म्हणत असत. दसऱ्याच्या अगोदर आम्हाला नवीन कपडे शिवले जायचे. प्रत्येकी दोन हाफ शर्ट आणि दोन हाफ पॅंट (चड्ड्या) शिवले जायचे. केव्हातरी आम्हा तिघांना वडील कापडाच्या दुकानात घेऊन जात. कुणाला कोणत्या रंगाचे कापड ‘शोभून’ दिसेल, याचा निर्णय बहुदा तो कापड दुकानदारच करायचा. वडलांचा आग्रह एकच असे. कापड स्वदेशी हवे. जपानी कापड चांगले दोन आणे स्वस्त असे. पण आम्ही ते कधीही घेतले नाही. आमच्यासारखी विक्षिप्त मंडळी दुकानदाराला माहीत झाली होती. त्यामुळे त्यानेही कधी विदेशी कापड घेण्याचा आग्रह धरला नाही. कापड घेऊन झाले की तिथून आम्ही तडक शिंप्याकडे जात असू. तो मापे घ्यायचा. आठ दिवसांनी या म्हणायचा. इतके दिवस कशाला लागतात म्हणून विचारले तर म्हणायचा, हे कापड तुम्ही धुवून आणलेलं नाही. ते मला अगोदर धुवावे लागेल. धुतल्यानंतर ते आटेल. मग कापून शिवीन. तसेच कापड न धुता शिवले तर कपडे लांडे होतील. सॅनफोराईज्ड कापड हा प्रकार आम्ही नागपूरला आल्यानंतरच मला कळला. सुरवातीला कापड सॅनफोराज्ड आहे किंवा कसे ते विचारून किती घ्यायचे ते विचारून किती घ्यायचे ते ठरवीत असू. सॅन फोराइज्ड कापड धुतल्यानंतर आटत नसे. आता सगळीच कापडं सॅनफोराइज्ड असतात. त्यामुळे शिंप्यांचा किंवा घरच्या मंडळींचा कोरे कापड अगोदर पाण्यातून काढून वाळवण्याचा खटाटोप वाचला आहे. त्याकाळी सुताच्या गुंड्या लावल्या जायच्या. सुरवातीला त्या काज्यात बसत नसत. पुढे वारंवार धुतल्या गेल्यामुळे आक्रसून किंवा झिजून काज्यात टिकत नसत. गुंड्या पुन्हापुन्हा लावायची वेळ सारखी यायची. कारण थोड्याच वेळात त्या काज्यातून पुन्हा बाहेर यायच्या. चड्डीच्या बाबतीत लक्ष राहिलं नाही की फजितीची वेळ यायची. पण पुढे लगेच नवीन वर्षाचा दसरा यायचा. एक वर्ष पूर्ण झालेलं असायचं. एक चक्र पूर्ण होते ना होते तोच आम्ही पुन्हा कापडाच्या दुकानाच्या पायऱ्या चढायचो. ही अशाप्रकारे नवीन चक्राची सुरवात व्हायची. यावेळी आत्ताच्या गुंड्या नुकत्या कुठे व्यवहारात यायला लागल्या होत्या. ‘तू त्या का लावीत नाहीस?’, असे आम्ही काहीसे रागावून शिंप्याला विचारले. यावर तो म्हणाला की, जुना स्टॅाक संपायचा आहे आणि आमच्या घरीच सुताच्या गुंड्या तयार होतात, त्यांचे काय करायचे?’. पुढे काय झाले ते सांगत नाही. पण त्यानंतर निदान आमच्या कपड्यांना आजच्या गुंड्या लावल्या जाऊ लागल्या. पण त्या तुटायच्या. कपडे धुणे हा एक कार्यक्रम असायचा. शाईचे डाग कपड्यावर पडले की ते निघता निघत नसत. कपाळावरून ओघळलेल्या तेलामुळे चेहरा तेलकट दिसत असे. आणि मानेवरून ओघळलेल्या तेलामुळे सदऱ्याची कॅालर आणि पाठ तेलकट होऊन धूळ बसून काळे डाग पडत. ते साबणानेही लवकर निघत नसत. त्यासाठी वॅाशिंग सोडा वापरला जायचा. स्वदेशी आणि विदेशी असे साबणांचे दोन प्रकार असायचे. अंगाला लावायचा हमाम आणि कपड्यांसाठी वापरायचा तो 501 साबण हे स्वदेशी होते. तर (बहुदा) लक्स हा विदेशी साबण अंगाला लावण्यासाठी आणि सनलाईट हा विदेशी साबण साबण कपड्यांसाठी वापरला जायचा. महाग असून सुद्धा आमच्या घरी स्वदेशी साबण वापरला जाई. वारंवार घासल्यामुळे कापड झिजायचे, विरायचे शेवटी फाटायचे सुद्धा, पण अनेकदा डाग मात्र निघायचे नाहीत. त्या काळी आमच्यासाठी सणासुदीला घालण्यासाठी जरीच्या टोप्या घेतल्या जायच्या. तिची जर काढण्याचा मला छंद होता. ‘पुढच्या वेळेला तुला जरीची टोपी घेतेका बघ ’, असे आईचे धपाटा घालतांना म्हटलेले वाक्य दरवेळी ऐकल्यामुळे लक्षात राहिले आहे. धपाटा घालतांना आईच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायचा. तो मला सवयीने आवडू लागला होता. रोजच्या वापरासाठी पुठ्ठा घातलेल्या काळ्या टोप्या असत. त्यातल्या पुठ्ठ्याचा ताठरपणा आम्ही खपवून घेत नसू. त्यामुळे तो पुठ्ठा शरणागती पत्करून लवकरच लुळा पडायचा. डोक्यवरचा घाम आणि पचापचा लावलेले तेल यामुळे टोपीचा डोक्याला स्पर्श करणाऱ्या वर्तुळाकृती भागावर एक तेलकट आणि धूळ खाल्लेली काळपट पट्टी तयार व्हायची. टोपी न घालता बाहेर गेल्यास, ‘कारे, तुमच्या घरचं कोणी गेलं वाटतं?’, असे हटकले जायचे. त्याकाळी चपला घेतल्या जायच्या पण चपला घातल्यानंतरच्या कोणत्याही संस्मरणीय आठवणी नाहीत. चपलेनी किंवा बुटांनी चावल्याच्या आठवणीही नाहीत. त्या पुढे अंजनगावहून नागपूरला आल्यानंतरच्या आहेत. दिवाळीत मात्र उटणं लावून आंघोळी व्हायच्या. पण आमच्या वेळी आमच्यापैकी कोणतेही बालरत्न, ‘उठा, उठा; दिवाळी आली, कार्तिक स्नानाची वेळ झाली’, असे सभ्य, सुसंस्कृत आणि सुमधुर आवाज ऐकून उठल्याचे स्मरत नाही. ज्या आठवणी आहेत, त्या सांगण्यासारख्या नाहीत.

No comments:

Post a Comment