भारताचा भर द्विपक्षीय संबंधांवर!
तरूण भारत ०३.०४.२०२५
भारताचा भर द्विपक्षीय संबंधांवर!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड. एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
मॉरिशस हे बेट हिंदी महासागरात आफ्रिका खंडाजवळ आहे. हे बेट लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडे यांनी व्यापलेले आहे. लगून म्हणजे एक उथळ खारेजलक्षेत्र (खारकच्छ) होय. ते एखाद्या महाकाय जलक्षेत्राला लागून असते. एक अरुंद भूपट्टी (बहुदा प्रवाळाची) लगूनला या जलाशयापासून वेगळे करते. मॅारिशसमध्ये वेगवेगळ्या जाती-जमातीमध्ये सामाजिक सौहार्द आहे. येथे आशिया, युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.
जगातले बहुतेक सर्व महत्त्वाचे देश म्हणजे ब्रिटन, अमेरिका सारखे देश तसेच चीन, रशिया, इराण हे सुद्धा मॉरिशसशी संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत. याच्या मुळाशी मॉरिशसचे महत्त्वाचे भूराजकीय स्थान आहे. मॅारिशसमध्ये दहा वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांचे अभूतपूर्व स्वागत झालेले आपल्याला दिसले आहे, ही नोंद घ्यावी, अशी बाब आहे. भारत आणि मॉरिशसचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. मॉरिशससारखे भारताशी जवळीक असणारे देश फार कमी असतील. हिंदी महासागरातल्या या बेटवजा देशाची ‘पोर्ट लुई’ ही राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्च 2015 मध्ये मॉरिशसच्या दौऱ्यावर गेले होते. 2025 ची ही भेट विशेष द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी आणणारी ठरणार आहे.
आज हिंदी महासागरातील पश्चिमेकडल्या या बेटांचे भूराजकीय महत्त्व नव्याने आणि वेगाने वाढू लागले आहे. राजनैतिक प्राथम्यक्रमात हिंदी महासागराला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे ही जाणीव भारताला होतीच. युरोप, रशिया, चीन, आखाती देश आणि तुर्की यांनाही या प्रदेशात अधिक प्रभाव हवा आहे. भारताचे मॉरिशसशी असलेले मजबूत वांशिक नातेसंबंध भविष्यात पुरेसे ठरणार नाहीत. उभयपक्षी आदानप्रदान झाल्याशिवाय भारत-मॉरिशस संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकणार नाही, हे भारत जाणून आहे.
चागोस द्वीपसमूहाला वगळून मॉरिशसला 1968 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी चागोसच्या त्यांच्या ताब्यातील भागाला ‘ब्रिटिश हिंदी महासागर प्रदेश’ असे नाव दिले. या भागापैकी ‘दिएगो गार्सिया’ हे बेट ब्रिटनने अमेरिकेला भाडेतत्त्वावर दिले. अमेरिकेने या दिएगो गार्सिया बेटावर मोठा लष्करी तळ उभारला आहे. गेली काही दशके मॉरिशस चागोसवरील आपले सार्वभौमत्व परत मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर मोहीम राबवतो आहे. अखेर अलीकडेच म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये, ब्रिटन आणि मॉरिशस यांच्यात ‘चागोस करार’ झाला. कायदेशीर दृष्टिकोनातून, हा करार चागोसवरील मॉरिशसच्या सार्वभौमत्वाला मान्यता देतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही (आयसीजे- इंटरनॅशनल कोर्ट अॅाफ जस्टिस) 2019 मध्येच या द्वीपसमूहावरील मॉरिशसचा दावा मान्य केला होता. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस या युनोच्या न्यायशाखेची स्थापना 1945 मध्ये झाली आहे. नेदरलंडची राजधानी अॅमस्टरडॅम हे शहर 25 किलोमीटर लांबीच्या कृत्रिम कालव्याने हेग शहराला जोडले आहे. हेग शहरातील पीस पॅलेसमध्ये न्यायशाखेचे कार्यालय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद ही न्यायशाखा निकालात काढते. पुढे मॉरिशसने ब्रिटनशी वाटाघाटीत आणखी कणखर भूमिका घेतली आणि चागोस द्वीपसमूहवरील आपला अधिकार ब्रिटनकडून नव्याने मान्य करून घेतला.
दिएगो गार्सिया हेही हिंदी महासागरातील हे दुर्गम बेट आहे. निळ्याशार पारदर्शक पाण्याने वेढलेले हे बेट निसर्गसुंदर गर्द, हिरवी झाडी आणि पांढऱ्या स्वच्छ वाळू असलेल्या किनाऱ्यांनी वेढलेले आहे. मात्र हे पर्यटन स्थळ नाही. नव्हे या बेटाला पर्यटन स्थळ होऊ दिले गेले नाही. इथे कुणालाच जाण्याची परवानगी नाही. कारण अमेरिका आणि ब्रिटन यांचा अत्यंत गुप्त असा संयुक्त लष्करी किंवा सागरी तळ या बेटावर अनेक दशकांपासून आहे. या बेटाचे हिंदी महासागरातील भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बेट मालदीवच्या दक्षिणेला आणि मॉरिशसच्या उत्तरेला आहे. लंडनहून या बेटाचा कारभार चालतो. ब्रिटन आणि मॉरिशस यांच्यात दीर्घकाळापासून चागोस बेटासंदर्भात जो वाद सुरू आहे त्यात दिएगो गार्सिया बेट हा वादातील एक मुख्य मुद्दा आहे. नुकताच ब्रिटनने या बेटाला सार्वभौमत्व प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही मोजके लोक या बेटावर जाऊ शकतात. चागोस आर्किपेलागो म्हणजे जलक्षेत्रात विखुरलेल्या बेटांचा समूह आहे. यालाच ब्रिटनने ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी म्हटले आहे. दिएगो गार्सिया हे याच बेटसमूहातील एक बेट आहे. 1965 साली ब्रिटिशांनी या द्वीपसमूहाला मॉरिशसपासून वेगळं केले होते.
मोदींनी 2015 मध्ये मॉरिशस भेटीत ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ अर्थात ‘सागर’ या धोरणाची घोषणा केली होती. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी 2015 च्या मनोदयााची आठवण ठेवीत 2025 मध्ये तब्बल दहा वर्षांनी ‘ग्लोबल साउथ’च्या विकासाचे नवीन उद्दिष्ट मांडले. आपल्या मुक्कामात त्यांनी स्थानिक भारतीयांसमोर भोजपुरीमध्ये भाषण केले. ते ऐकून श्रोत्यांनी जल्लोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला. मॅारिशसला मिनी बिहार म्हणतात. भारतीयांनी तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा सोबत घेऊनच मॅारिशसमध्ये प्रवेश केला आहे. मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांना बिहारमधील लोकप्रिय मखाना भेट दिला. मॅारिशसमध्ये एकूण 12 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. त्यातले बहुतेक लोक भोजपुरी बोलतात. मॉरिशसमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बांधणीचाही आवर्जून उल्लेख केला. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
विकासाच्या उद्दिष्टाला मोदींनी ‘म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रिजन्स’ अर्थात ‘महासागर’ असे नाव दिले. हिंदी महासागरात चीनने आपला प्रभाव निर्माण करण्याची खटपट चालविली आहे. तिला पायबंद घालण्याचा हा प्रयत्न आहे. मोदींनी द्विपक्षीय संबंधांवर विशेष भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदी यावेळी 2025 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाला मुख्य अतिथी होते. यावेळी भारताच्या सुरक्षा दलातील एक तुकडी, नौदलाची एक युद्धनौका व हवाई दलाचे ‘स्काय डायव्हिंग’ पथकही कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारत आणि मॅारिशस यातील करारातील प्रमुख मुद्दे असे आहेत.1) तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानातून सहकार्य 2) सवलतीच्या दराने कर्जे आणि अनुदाने 3) मॉरिशसमधील नव्या संसदेच्या इमारतीच्या उभारणीमध्ये सहकार्य 4) मॉरिशसच्या तटरक्षक दलाला आवश्यक ती सर्व मदत 5) मॉरिशसमध्ये राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र आणि पोलिस अकादमी स्थापन करण्यासाठी सहकार्य 6) स्थानिक चलनात परस्पर व्यापार 7) मेट्रो एक्स्प्रेस, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, आरामदायी निवासासाठी सामाजिक गृह आणि ईएनटी रुग्णालय उभारण्यासाठी सहकार्य. मुक्त, खुला, संरक्षित आणि सुरक्षित हिंदी महासागर ही चतु:सूत्री स्वीकारून भारत आणि मॉरिशस यांनी वाटचाल सुरू केली आहे. म्हणूनच दोन्ही देशांतील सामरिक भागीदारीमध्ये सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य यावरही भर असणार आहे.