Tuesday, May 31, 2016

चिनी युवराज 
वसंत गणेश काणे,  बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
२७२१ प्राईम रोज लेन नाॅर्थ , याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया    
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 
   भारतात युवराज हा शब्दप्रयोग नवीन नाही. आपल्या येथील राजकारणात ठायी ठायी युवराज आढळतील. त्यांच्या लीलांनी वृत्तपत्रांचे रकाने भरभरून वाहिलेलेही आपण  नित्य पाहतो. प्रसिद्धी माध्यमांचे टीआरपी वाढण्यासाठी यांची चांगलीच मदत होत असते. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमेही त्यांच्या लीलांच्या शोधात असतात. पण चीनमध्येही ‘युवराज’ हा शब्दप्रयोग रूढ असावा, हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. या शब्दाच्या उगमाशी दस्तूरखुद्द माओ त्से तुंग याचा संबंध अाहे, हे कळल्यावर तर खूपच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 
   माओचे तंत्र - चीनमध्ये माओने एक टीम उभी करून क्रांती घडवून आणली. ही गोष्ट १९४९ च्या आॅक्टोबर महिन्यातली. माओ हा त्याकाळी चीनचा सर्वेसर्वा होता. चीनची जुनी राजवट उलथून टाकूनच केवळ भागण्यासारखे नव्हते. जुन्या रीती, प्रथा, परंपरा, चालीरीती सर्वच बदलल्याशिवाय लाल क्रांती पूर्ण होणे शक्यच नव्हते. हा उद्देश समोर ठेवून माओने अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि त्या अत्यंत निष्ठूरपणे राबवल्या. पहिले लक्ष्य होते, चीनमधील जमीनदार वर्ग. त्यानंतर सर्व विरोधकांचा सफाया. यानंतर आले ‘ग्रेट लीप फाॅरवर्ड’, याकाळात चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडला. मोजून एक कोट लोक मृत्युमुखी पडले. 
सांस्कृतिक क्रांती - १९६६ मध्ये सांस्कृतिक क्रांतीचे पर्व (कल्चरल रिव्होल्यूशन) सुरू झाले. च्यु चाऊ हे अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहरातील याॅर्क काॅलेज आॅफ पेन्सिलव्हॅनिया मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १६ मे २०१६ ला वृत्तपत्रात बरोबर ५० वर्षांपूर्वी म्हणजे १६ मे १९६६ माओ त्से तुंग यांच्या आदेशानुसार झालेल्या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास कथन केला आहे. ते स्वत: या क्रांतीचे साक्षीदार व भुक्तभोगी आहेत. त्यामुळे त्यांच्या कथनाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.
क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे -   त्यावेळी माझे वय जेमतेम ११/१२ वर्षे असेल. या क्रांतीचा प्रारंभ शुद्धिकरणाने(पर्जिंगने) झाला. शुद्धिकरणाच्या नावाखाली भडकलेल्या धगधगत्या ज्वाळात क्रांतीचे विरोधक भस्मसात होत होते आणि 'अंतिम सत्य' असलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना होत होती. माओची पहिली गर्जना सर्वत्र निनादत होती, ‘क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे’. हजारोंच्या संख्येत लालदूतांचा (रेड गार्ड्स) सर्वसंचार देशाच्या कानाकोपऱ्यात हैदोस घालीत होता. अल्पावधीत  मूळच्या सत्ताधाऱ्यांशी असलेला भावी सत्ताधाऱ्यांचा संघर्ष समाज जीवनातील सर्व स्तरांपर्यंत पोचला. विनाश आणि हिंसा यांचे तांडव नृत्य सुरू झाले. ११/१२ वर्षांचा मी पार भेदरून गेलो होतो. तरीही आज ५० वर्षानंतर सुद्धा त्यावेळच्या आठवणी मला हादरून टाकतात. हे दु:स्वप्न माझी पाठ शेवटपर्यंत सोडणार नाही, असे वाटते.
'माओचा दुसरा आदेश, हिंसक व्हा' -  लाल दूत/लाल सैनिक (रेड गार्ड्स)तसे पोरसवदाच होते. त्यांचे ब्रेन वाॅशिंग झालेले असल्यामुळे ते वयस्कांपेक्षा अधिकच कडवे झाले होते. हे गुंड कुणाच्याही घरात घुसत, कुणावरही हल्ला करीत, त्याचा मरेपर्यंत छळ करीत. हे सर्व क्रांतीच्या नावे सुरू होते. ‘हिंसक व्हा’, माओचा दुसरा आदेश विद्यार्थी दशेतील या लाल सैनिकांना होता. परिणामत: लवकरच विरोध मावळला. 'माओ म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे माओ' हे समीकरण दृढ झाले. 
भेकड लाल सैनिक - ती १९६६ सालची काळरात्र होती. लाल सैनिक आमच्या वसतीत शिरले. ते बिनदिक्कत निरपराध्यांना धाक दाखवीत, घरातील चीजवस्तू धुंडाळीत, लूट करीत विरोधकांची रस्त्यावरून धिंड काढीत. चहूकडून आक्रोश, आरोळ्या, किंचाळ्या, याचना याशिवाय दुसरे काहीही कानावर पडत नव्हते. लाल सैनिकांच्या दृष्टीने देशाचे तीन दुश्मन, म्हणजे मी, माझी बहीण आणि माझे वडील हे होतो. माझे वडील तर फार मोठे गुन्हेगार होते. खरेतर त्यांनी दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी गाजविली होती. चांग काई शेखच्या आधिपत्त्याखालील चीनच्या हवाई व्याघ्र ( फ्याईंग टायगर्स) ते एक बिनीचे शिलेदार होते. पण ते आता प्रतिक्रांतिवादी (काऊंटर रिव्होल्युशनरी) ठरले होते. त्यांची प्रकृती आता पार बिघडली होती. आजारी, विकलांग व असहाय्य अवस्थेत सुद्धा त्यांनी गनीमी काव्याने त्या पोरसवद्या गुंडांना चकवले. ते म्हणाले ‘बघा, मला क्षयरोगाची बाधा झाली असून तो पराकोटीचा संसर्गजन्य आहे. नंतर तुम्हाला काही झाले तर मला दोष देऊ नका’. त्यांचे हे शब्द कानावर पडले आणि परक्रमी लाल सैनिकांनी त्याच पावली पाय लावून पोबारा केला.
  या क्रांतिपर्वात वीस लाख लोकांचा बळी गेला. सर्व प्रकारच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्था उलथून टाकून  माओने  1976  मध्ये इहलोकीची यात्रा आटोपती घेतली आणि परलोकात बहुदा अशीच क्रांती करण्यासाठी प्रस्थान ठेवले.
  आजचा चीन - आजचा चीन विकसित देशांमध्ये सुद्धा श्रीमंत आणि बलाढ्य समजला जातो, पण आता पुन्हा  इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. असे नसते तर जुन्या गोष्टी उकरून काढण्याचे कारण नव्हते. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची मोहीम विद्यमान अध्यक्ष  शी जिनपिंग यांनी हाती घेतली आहे. देशांतर्गत विषय म्हणून या विषयाकडे दुर्लक्ष करता आले असते. पण चीनमध्ये जे घडेल ते चीनपुरतेच असणार नाही. त्याचा जगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बाब विचारात घ्यायला हवी आहे.
 चिनी युवराज - च्यु चाऊ यांच्याप्रमाणे जिनपिंग हे स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा "कल्चरल रेव्होल्युशन‘ मध्ये पोळलेले आहेत. त्यांचे वडील हे खरेतर माओच्या खास विश्वासातले. पण काय बिनसलं कुणास ठावूक, त्यांना पदच्युत करून त्यांना माओने ग्रामीण भागात मजूर म्हणून पाठवले आणि त्यांच्या शिक्षणाची नव्याने सोय केली. हे पुनर्शिक्षण घेण्यास माओने आपल्या अशाच चार सहकाऱ्यांना भाग पाडले. पण नशिबाचा किंवा योगायोगाचा भाग असा की, ज्यांच्या तीर्थरूपांना पुनर्शिक्षण घेऊन पुन्हा संस्कारित व्हावे लागले अशा चौघांची मुले आजच्या पोलिट ब्युरोची सदस्य आहेत. यात विद्यमान पंतप्रधान केकियांग हे सुद्धा आहेत.
   अशा सर्व चिरंजीवांना चिनी जनतेने ‘युवराज’ ही पदवी दिली आहे. पित्यांना यातना भोगाव्या लागल्या हे खरे पण तरीही या मुलांभोवती एक वलय निर्माण झाले होतेच. त्यामुळे सत्तासोपान चढणे त्यांना इतरांच्या तुलनेत सोपे गेले. याची दखल चिनी जनतेने घेतली आणि त्यांना युवराज ही पदवी बहाल केली.
सर्वसत्ताधारी जिनपिंग - अध्यक्षपदी विराजमान झालेले जिनपिंग हे पहिले बहुदा युवराज असावेत. जिनपिंग अध्यक्ष होतात न होतात तोच  त्यांना आणखी अशाच  एका युवराजाचा - बो शीलाई - यांचा सामना करावा लागला. पण पित्याच्या वाट्याला अनुभव बाळकडू सारखा त्यांना मिळाला होता. त्यांनी बो शिलाई यांच्यावर भ्रष्टाचारासह  अनेक आरोप ठेवले. एवढेच नव्हेतर  बो व सोबत त्यांच्या पत्नीचीही बोळवण केली. पण एवढ्याने सत्तेची सर्व सूत्रे हाती येणार नव्हती. त्यासाठी बाकीच्या बरोबरच्यांची व त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही उचलबांगडी करण्यात आली. चीनचा अध्यक्ष हा कम्युनिस्ट पक्षाचा व सैनिकी आयोगाचाही प्रमुख असतो. पण जिनपिंग यांना एवढेही पुरेसे वाटेना. त्यांनी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन ते आता संयुक्त आॅपरेशन कमांडचे प्रमुख झाले आहेत. आता सर्व प्रकारचे राजकीय, लष्करी व आर्थिक अधिकार त्याच्या हाती एकवटले आहेत. कदाचित एवढीसत्ता यापूर्वी फक्त माओच्याच हाती एकवटली असेल. यामुळे दोन गोष्टी प्रामुख्याने नजरेत भरतात.आपल्या वडलांना पदच्युत करून देशोधडीला लावणाऱ्या माओ इतकीच सत्ता हस्तगत करून त्यांनी आपल्या वडलांवर झालेल्या अन्यायाचा वचपा काढला आहे. पण असे करत असतांना स्वत: माओचाच कित्ता गिरवला आहे. 
चीनसमोर आज वेगळीच आव्हाने आहेत.आर्थिक व सामरिक आव्हाने तर आहेतच पण त्याच्या जोडीला  आता सामाजिक आव्हानही आकाराला येते आहे. १९८९ मध्ये तियानामेन चौकात हजारो विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. हे आंदोलन अतिशय निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले होते. गोळीबारात १०००(हजार) विद्यार्थी ठार झाले, १० हजारावर विद्यार्थ्यांना अटक झाली आणि हे वादळ शमले. पण २०१६ म्हणजे १९८९ नव्हे, याची जाणीव ठेवून युवराजांनी (जिनपिंग) सबूरीचे धोरण स्वीकारले आहे. यातून एकतर शांततामय मार्गाने परिवर्तन घडण्यास सुरवात होईल पण असे झाले नाही तर यावेळी निर्माण होणारा उद्रेक चिरडता येणार नाही. कारण आज समाजाचे सामर्थ्य १९८९ च्या तुलनेत कितीतरी वाढले आहेत.

No comments:

Post a Comment