Tuesday, August 27, 2019

शिगेला पोचलेला हाॅंगकाॅंग आणि चीन मधील संघर्ष

तरूणभारत

शिगेला पोचलेला हाॅंगकाॅंग आणि चीन मधील संघर्ष
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

.
    सध्या हाॅंगकाॅंगबाबत प्रसारमाध्यमात जोरात चर्चा होऊ लागली आहे. हा चीनचा विशेष प्रशासित भाग (स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रीजन) आहे. हाॅंगकाॅंग म्हणजे दक्षिण चीन मधील पर्ल नदीच्या पूर्वेला वसलेला नैसर्गिक बंदरस्वरूप भूभाग. येथील पाऊण कोट लोकसंख्या जगातील सर्व देशातील लोकांची मिळून बनलेली आहे. हाॅंगकाॅंगचे क्षेत्रफळ जवळजवळ 1100 चौरस किलोमीटर म्हणजे सिंगापूरच्या दीडपट, वाॅशिगटनच्या सहापट आणि आपल्या मुंबईच्या जवळजवळ दुप्पट आहे.
 असे आहे आजचे हाॅंगकाॅंग
   1842 ब्रिटन आणि चीनमध्ये पहिले अफू युद्ध लढले गेले. तेव्हापासून हाॅंगकाॅंग ब्रिटिशांची वसाहत झाली. 1997 मध्ये एका करारान्वये हा प्रदेश चीनच्या स्वाधीन करण्यात आला. पण त्यावेळच्या अटीनुसार हाॅंगकाॅंगमधील प्रशासन व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार यावर मात्र चीनची सत्ता चालत नाही. म्हणूनच की काय, हाॅंगकाॅंगचे नागरिक स्वत:ला हाॅंगकाॅंगकर म्हणतात, ते स्वत:ला चिनी समजत आणि म्हणवत नाहीत.
      संपूर्ण जगभर हाॅंगकाॅंग नावाच्या या एका आणि एकट्या शहराचा प्रभाव पडतो, असे मानले जाते. पहिल्या क्रमांकाचे आर्थिक केंद्र, विकासाचा मापदंड, प्रखर पण निकोप आणि मुक्त आर्थिक केंद्र अशा पदव्या या शहराकडे चालत आल्या आहेत. गगनचुंबी इमारती,  नैसर्गिक बंदर, अत्युच्च विकास, सर्वोच्च आयुर्मान हे हाॅंगकाॅंगचे आणखी काही विशेष आहेत. या शहरातील 90 % नागरिक सार्वजनिक वाहतुकव्यवस्थेचाच वापर करतात. पण या सगळ्याला दृष्ट लागावी तशी एकच व्याधी या शहराच्यामागे हात धुवून लागली आहे. ती आहे चीनमधील प्रदूषणाची पसरती मगरमिठी.
   पूर्वतिहास
   आजच्या प्रश्नाची नीट उकल होण्यासाठी बरेच मागे जावे लागक्णार आहे. 1842 पर्यंत हाॅंगकाॅंगसकट सर्व चीनवर किंग घराण्याचे राज्य होते. पण पहिल्या अफू युद्धानंतर हाॅंगकाॅंग ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनले. पुढे याला काही सलग भूभाग जोडले गेले आणि आजचे हाॅंगकाॅंग अस्तित्वात आले. 1941 ते 1945 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हाॅंगकाॅंगवर जपानचा कब्जा होता.
   1972 मध्ये चीनला संयुक्त राष्ट्र संघात स्थान मिळाले. तोपर्यंत हाॅंगकाॅंगला संयुक्त राष्ट्रसंघात  नाॅन सेल्फ गव्हर्निंग टेरिटोरीजच्या यादीत (स्वराज्य नसलेले प्रदेश )मान्यता होती. ब्रिटन आणि चीनमध्ये वाटाघाटी होऊन 1984 च्या डिसेंबर महिन्यात असे ठरले की, 1 जुलै 1997 ला ब्रिटनने हाॅंगकाॅंगला समारंभपूर्वक चीनच्या स्वाधीन करावे. त्यानुसार 1992 चा हाॅंगकाॅंग पाॅलिसी अॅक्ट हा हाॅंगकाॅंगला स्वायत्ततेची हमी देणारा कायदा आजही अस्तित्वात आहे.
   पण असे करतांना ब्रिटनने चीनकडून अनेक बाबतीत हमी घेतली. साररूपात सांगायचे तर तिथल्या लोकशाही व्यवस्थेला (स्वायत्ततेला) हात लावला जाऊ नये, असा आग्रह ब्रिटनने धरला आणि चीननेही तो मानला. त्यामुळे त्यावेळी आपण आपले वैशिष्ट्य कायम ठेवून  मायदेशाशी जोडले गेलो याचा आनंद अनेक हाॅंगकाॅंगवासियांना झाला.
   नव्याचे नऊ दिवस आटोपले आणि….
  पण नव्याचे नऊ दिवस ओसरताच हाॅंगकाॅंगवासियांचा भ्रमनिरास व्हायला सुरवात झाली. दळणवळणामुळे उभयपक्षी तणाव वाढत गेला. हाॅंगकाॅंग आणि मुख्यचीन यातील सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागल्या. मुख्य म्हणजे आता सर्वकाही आमच्यासारखेच व्हायला हवे असा आग्रह चीन धरू लागला. तर हे मूळ कराराशी विसंगत आहे असे हाॅंगकाॅंग म्हणू लागला. करार पाळण्याच्या बाबतीत चीनची कीर्ती फारशा चांगली नाही, हे आपण सर्वच जाणतो. अशाप्रकारे तेव्हापासून जी संघर्षाची ठिणगी पेटली, ती विजत नसून पुन्हा पुन्हा पेटतेच आहे.
   हाॅंगकाॅंगमध्ये परंपरा आणि नवतेचा सुरेख संगम
   चिनी संस्कृती जगातील एक अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. इथे परंपरेचा प्रभाव इतका आहे की पाश्चात्य संस्कृती अजूनही तिथे पुरतेपणी रुजली नाही. याउलट अनेक पाश्चात्य तसेच आधुनिक जीवनमूल्ये हाॅंगकाॅंगने मात्र स्वीकारलेली दिसतात. परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम हाॅंगकाॅंगमध्ये पहायला मिळतो. मुख्यचीनचे असे नाही. तिथे साम्यवादी हुकुमशाही आहे. तसेच दैनंदिन जीवनात जुने जरठपण जराही विरलेले नाही. त्यामुळे हाॅंगकाॅंग आणि मुख्यचीन यांच्या सांस्कृतिक पातळीत खूपच मोठा फरक आहे. सध्याच्या संघर्षाचे मूळ खरेतर यात दडलेले आहे.
    चीनला हाॅंगकाॅंगची गरज का व कशी?
   हाॅंगकाॅंगचे हे आगळेवेगळेपण चीन आत्ताआत्तापर्यंत जपत आणि जोपासत आला होता. ही बाब चीनच्या आजवरच्या कीर्तीशी मेळ खाणारी नाही. पण मग चीन असा का वागला? त्याचे कारण असे की, त्यावेळी चीनला जगात प्रतिष्ठा नव्हती, अर्थकारण आणि व्यापारातही पत नव्हती. कुणीही चीनशी व्यापार करण्यास फारसे धजत नव्हते. पण हाॅंगकाॅंगचे तसे नव्हते, तर अगदी उलट होते. व्यापारी भरभराटीमुळे तिथे येणाऱ्या सर्वप्रकारच्या सामग्रीची व माहितीची तस्करी चीनमध्ये घडवून आणून चीनने अघोषित जागतिक बहिष्कारावर मात केली. आज चीन सर्वदृष्ट्या सामर्थ्यवान आणि संपन्न झाला आहे. जगाशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यासाठी त्याला आता हाॅंगकाॅंगच्या खिडकीची फारशी गरज राहिलेली नाही पण ती गरज पुरतेपणी संपलेलीही नाही. म्हणूनच हाॅंगकाॅंगचे चीनमध्ये सर्वार्थाने व पूर्णपणे विलिनीकरण व्हावे असा आग्रह जरी  चीन धरतो आहे, तरी तो टोकाची भूमिका घेत नव्हता. तसेच हाॅंगकाॅंगवासियांनाही चीनमध्ये पूर्ण विलय नकोच आहे. चीनमध्ये पूर्णांशाने सामील होणे म्हणजे आपला सर्वनाश होणे असे हाॅंगकाॅंगला वाटते. कारण हाॅंगकाॅंगची स्वत:ची विधिपालिका (लेजिस्लेचर), कार्यपालिका ( एक्झिक्युटिव्ह) आणि न्यायपालिका (ज्युडिशिअरी) असून ती अत्यंत सक्षम, सजग आणि निपक्षपाती मानली जाते. याउलट या सर्व बाबतीत चीनमध्ये आनंदीआनंदच आहे.
   सध्या सुरू असलेला संघर्ष
   सध्या हाॅंगकाॅंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. त्यात जसे पर्यटक आहेत, तसेच निदर्शकही आहेत. कारण विमानतळच सर्वांसाठी त्यातल्यात्यात सुरक्षित जागा आहे. तरुणांनी (विशेषत: विद्यार्थ्यांनी) रस्त्यावर उतरून अहिंसक आंदोलनाद्वारे पोलिसांशी दोन हात केले आहेत.
   आजची स्थिती
   विमानतळावरून होणारी दररोजची 200 ठिकाणी होणारी 1100  उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सतत 10 आठवडे दर शनिवार आणि रविवारी हाॅंगकाॅंगमध्ये निदर्शने होत आहेत. तर इकडे बेजिंगचा धमकीवजा प्रतिसाद उत्तरोत्तर अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. निदर्शक बैठा सत्याग्रह करीत आहेत तर चिनी प्रशासन त्यावर अश्रुधुराचा उपाय करीत आहेत. शेवटी बळाचा वापर करून निदर्शकांना आवर घालता येत नाही हे पाहूर चीनने फूट पाडण्याचे धोरण अवलंबिले आहे पण शासनकर्ते आणि नागरिक याच्यामधली दरी वाढतेच आहे. निदर्शकांच्या सर्वच मागण्या मान्य करणे चीनला मान्य आणि शक्य होणार नसले तरी मध्यममार्ग निघू शकतो, असे मत तटस्थ व्यक्त करीत आहेत.
  कधीनाकधी विलय होणे अपरिहार्य, पण...
   पण हे असे किती दिवस चालणार? एक देश दोन व्यवस्था चीनला आता मान्य नाहीत. चिनी प्रवासी हाॅंगकाॅंगमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामुळे आपल्या येथील सांस्कृतिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतो आहे, अशी हाॅंगकाॅंगची तक्रार आहेत. यामुळे चीनचा तिळपापड होतो आहे. आपला दरारा कायम ठेवण्यासाठी हाॅंगकाॅंगच्या अंतर्गत व्यवस्थेत चिनी हस्तक्षेप वाढतो आहे. हाॅंगकाॅंगवासी उद्धट, कृतघ्न आणि बेइमान आहेत, अशा शिव्या चीन हासडतो आहे तर मुख्यचीनमधील रहिवासी उर्मट, रीतभात नसलेले, अर्धशिक्षित आणि घाणेरडे आहेत, असा दावा हाॅंगकाॅंगवासियांचा आहे. तटस्थपणे विचार केला तर दोन्ही पक्ष आपापल्या परीने खरे सांगत आहेत, असे म्हणावेसे वाटते. कारण हाॅंगकाॅंगवासी सुसंस्कृत, सुसंपन्न आणि स्वाभीमानी आहेत तर चिन्यांची कीर्ती आहे अडदांड, आक्रमक, अत्याग्रही आणि आपमतलबी अशी. मनात आणले तर चीन हाॅंगकाॅंगला क्षणार्धात चिरडून टाकू शकेल. पण 30 वर्षांपूर्वीच्या टायनॅनमेन चौकातील हत्याकांडाची पुनरावृत्ती आता होणे नाही, हे चीन जाणतो. तसेच तस्करीचा अखंड स्रोत असलेली सोन्याची अंडी देणारी हाॅंगकाॅंगरूपी कोंबडी जपणे व जोपासणे ही चीनचीही निदान आजची तरी गरज आहे. त्यामुळे सबुरीपुरते शहाणपण चीनपाशी असेल, निदान असावे, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment