Monday, September 5, 2022

चिनी माल स्वस्त का असतो? तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०६/०९/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. चिनी माल स्वस्त का असतो? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? कच्च्या मालाची स्वस्तात उपलब्धता, किनाऱ्यालगतची जमीन, स्वत:चे तंत्रज्ञान (सर्वच चोरलेले नसते), वीज, पाणी व कमी पैशात मिळणारे कुशल व कामसू मनुष्यबळ, सांडपाण्याचा निचरा सहज होऊ शकेल अशी व्यवस्था, कायदेशीर साह्य उपलब्ध करून देण्याची तयारी, दप्तर दिरंगाईऐवजी तत्परता असल्यामुळे चिनी वस्तू स्वस्तात तयार होतात. त्यामुळे चीनला वस्तू इतरांच्या तुलनेत स्वस्तात विकून सुद्धा भरपूर नफा सुटतो, असे मानले जाते. जमीन, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ या बाबतीत चीन इतर देशांच्या तुलनेत उजवा आहे. त्यामुळे उद्योजक चीनमध्ये येण्यास उत्सुक असतात. वस्तू तयार करण्याच्या दोन पद्धती : वस्तू दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे, वापरा व फेका आणि दुसरे म्हणजे, पुन्हापुन्हा वापरा. अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू चीनमध्ये तयार होतात. प्लॅस्टिकचे मणी वितळवून तो द्रव साच्यात टाकायचा म्हणजे ती वस्तू तयार होते. अशा पद्धतीने कमी वेळात खूप वस्तू तयार करता येतात. या वस्तूंचे पॅकिॅगही स्वयंचलित मशीनद्वारे केले जाते. या प्रक्रियेत कामगाराची गरज फारशी लागत नाही. उदा. चमचे, वाट्या, भांडी आदी. एकाचवेळी खूप वस्तू तयार होत असल्यामुळे (मास प्रॅाडक्शन) स्वस्तात तयार होतात आणि इतर प्रकारे तयार केलेल्या अशाच वस्तूंपेक्षा स्वस्तात विकूनही नफा मिळवता येतो. याउलट काही वस्तू तयार करण्यासाठी त्या वस्तूचे निरनिराळे घटक/हिसे/भाग वेगवेगळे तयार करावे लागतात. यानंतर ते थोडे वितळवून जोडावे लागतात, किंवा गोंदासारखा पदार्थ वापरून चिकटवावे लागतात किंवा छिद्रे पाडून नटबोल्ट वापरून जोडावे लागतात. यावेळी अनेक ठिकाणी कुशल मानवी संसाधन (कुशल कामगार) वापरावे लागते. 70 % खर्च कामगारांवरच करावा लागतो. पण चीनमध्ये श्रममूल्य कमी असल्यामुळे अशा वस्तूही स्वस्तात तयार होत असतात. श्रममूल्य 20 % पासून 70 % पर्यंत असू शकते. याप्रकारचे उत्पादन आपल्या देशात करतो म्हटले तर अगोदर कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल. भारताला नुसते कुशल वेल्डर्सच 2 लाख लागतील. म्हणूनच भारताने कुशल मनुष्यबळ तयार करण्याची जंगी मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या प्रकारच्या वस्तू तयार करणारे कारखाने उभारणे सोपे असते. ती ती यंत्रसामग्री एका देशातून दुसऱ्या देशात कमी वेळात हलविणे, नेणे सोपे आहे. त्यामुळे चिनी कंपन्या इतर देशात उत्पादन करू शकणारे कारखाने इतर देशांच्या तुलनेत लवकर, कमी श्रमात आणि चांगल्या गुणवत्तेचे तयार करू शकतात. औद्योगिक क्रांती कशी घडते? औद्योगिक क्रांती ही एखाद्या निर्वात पोकळीसारख्या ठिकाणी होणारी प्रक्रिया नाही. ती एक शृंखला असते. तिच्या जोडीला व साथीला पुरवठादारांचे जाळे असावे लागते, सक्षम कारखानदारी असावी लागते, वितरक असावे लागतात, सहाय्यक आणि नियामक शासकीय यंत्रणा असाव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक असावे लागतात. उत्पादन क्रियेत सहभागी असू शकणारे घटक असावे लागतात, स्पर्धेत टिकाव धरू शकतील असे सहयोगी असावे लागतात, तसेच परस्पर सहकार्याची भावना असावी लागते. धंद्यासाठीही एक पर्यावरण असावे लागते. चीनने गेल्या 30 वर्षात धंद्याचे हे पर्यावरण निर्माण/विकसित केले आहे. याशिवाय कुशल मनुष्यबळ असावे लागते कारण ते असेल तर आणि तरच उत्पादित वस्तू उत्तम गुणवत्तेची असेल व किफायशीर होईल. नित्य सिद्ध पुरवठा शृंखला: नैसर्गिक स्रोतातून मिळवलेला कच्चा माल व अन्य घटक यापासून तयार माल तयार करणे व तो ग्राहकांपर्यंत पोचविणे, अशी ही श्रृंखला असते. चीनची पुरवठा श्रृंखला अद्ययावत असून ती लवचीकही आहे. याबाबत कोणताही देश चीनच्या पुढे नाही. दुसरे असे की आवश्यक सर्व कच्चा माल चीनला देशातच उपलब्ध असतो/आहे. खाजगी व शासकीय घटक हे दोघेही यात गुंतलेले असतात. चीनमध्ये हाही एक स्वतंत्र उद्योग असून नजरचूक न होऊ देता सतत नजर ठेवत यांचाही सक्रिय सहभाग असतो. कच्चा माल परवडणाराही असला पाहिजे त्यामुळेही उत्पादन खर्च कमी होतो. स्थानिक पुरवठाकार व कारखानदार यांचा किमत कमी करण्याच्या कामी महत्त्वाचा सहभाग असतो. आपल्या इथले वाहनेनिर्मिती कारखाने चिपची/ सेमीकंडक्टरची आयात मंदावताच बंद पडण्याच्या पंथाला लागले होते, हा इतिहास ताजा आहे. निर्यातीवर सूट - 1985 पासून चीन निर्यातीवर सूट देत आला आहे. यामुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन स्पर्धात्मकता वाढते. जगात 150 पेक्षा जास्त देश व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (व्हॅट) पद्धतीचा वापर करतात. वाढवलेल्या किमतीवरच हा 13 ते 17 टॅक्स/ कर आकारतात. ज्या वस्तूंची निर्यात होते त्या वस्तूंवरचा टॅक्स एकतर रिफंड होतो किंवा किंवा आकारलाच जात नाही. अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर चीनमध्ये कर आकारला जातो. चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेत मात्र आजवर तसा आणि तेवढा कर आकारला जात नसे. त्यामुळे चिनी कारखानदार वस्तूगणिक कमी नफ्यावर धंदा करू शकतात. कार्यक्षम पायाभूत सोयी सुविधांच्या उत्तम नियोजनावर औद्योगिकरणाची गती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सुरवातीला चीनने मोठमोठी बंदरे बांधली, रस्ते व रेल्वेचे अक्षरश: जाळे विणले. हे जाळे तर लहान खेड्यापर्यंत पोचले आहे. उद्योग व कारखानदारी असेल तर आणि तरच आदर्श व्यवस्था असते. प्रत्येक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी होणारा खर्च चीनमध्ये अत्यल्प आहे. भारतात मात्र काहीशी याउलट स्थिती आहे. देशातल्यादेशात मालाची वाहतुक करण्यापेक्षा परदेशातून बोलविणे कमी खर्चाचे ठरावे, असे अनुभव आपल्या गाठी आहेत. अनुदानित सोयीसुविधा आणि त्यांची उपलब्धता - चीनमध्ये पाणी व वीज बिलांवर 30 % सूट, सवलतीच्या दराने जमीन अशा तरतुदींच्या आधारे स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून देतात. याचाही परिणाम उत्पादन खर्च कमी होण्यात होतो. फक्त ठराविक काळच वीज मिळणार असेल तर कारखाने 24 तास आणि पूर्ण उत्पादन क्षमतेसह कसे उभे होतील? सक्षम चिनी नोकरशाही - चीनमध्ये प्रवेश मिळविणे फारसे कठीण नाही. अनेक फॅार्म भरायचे असले तरी ती प्रक्रिया जटिल नाही. संबंधित खाती जवळजवळच असतात. एकूण रचनाच अशी असते की लाच द्यावी लागत नाही. भ्रष्टाचार मुळीच नाही, असे नाही. पण सही शिक्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. नवीन उद्योजक यावेत ही चीनची राजकीय गरज आहे. त्यामुळे नोकरशाहीचे फारसे चालत नाही. धंदा, उत्पादन व सेवा यासारखे कोणतेही क्षेत्र असो, चीनमध्ये भर अडचणी दूर करण्यावर असतो. आपणही एक खिडकी योजना सुरू करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वेळ आणि मानवी श्रम यांची बचत: तंत्रज्ञान, मानवी परिश्रम व वेळ यांची बचत व्हावी यासाठी वापरावयाची यंत्रे किंवा पद्धती आणि कुशल मनुष्यबळ चीनने विकसित केले आहे. तंत्रज्ञानाचा विकास साधल्याशिवाय उत्पादनक्षमता वाढणार नाही आणि उत्पादनाची गुणवत्ताही वाढणार नाही. या दोन घटकांची सदैव साथसंगत असते. चीनमध्ये उच्च कोटीचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असते. क्षमतेत वाढ व विकास करण्याची शक्यता जेवढी जास्त तेवढी तयार होणाऱ्या वस्तूची किंमत कमी असेल. चीनची लोकसंख्या जशी खूप आहे, तशीच तिथे विशेष कौशल्य असलेल्यांची संख्याही खूप आहे. विशेष कौशल्यधारी जेवढे जास्त असतील त्या प्रमाणात वस्तूचे उत्पादन मूल्य कमी राहण्याची शक्यता वाढती असेल. चीनने विशेष कौशल्यधारी मनुष्यबळ निर्माण केले आहे. त्यामुळे उद्योजक या मुद्याबाबत निश्चिंत असतात. स्वस्त कुशल मनुष्यबळ - तथाकथित विकसित देशांच्या तुलनेत चीनमध्ये कुशल मनुष्यबळ स्वस्त आहे. युरोप व अमेरिकेमध्ये जेवढे वेतन द्यावे लागते त्याच्यापेक्षा कमी वेतनात त्याच गुणवत्तेचे मनुष्यबळ चीनमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे कोणताही उद्योग उभारण्याची इच्छा असणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती चीनला असे/असते. त्यामुळेही उत्पादित वस्तूचे मूल्य कमी व्हायला मदत होते. जगाच्या तुलनेत चीनमधील मनुष्यबळ सर्वात स्वस्त नाही, तसेच अतिशय महागही नाही आणि गुणवत्तेत मात्र उजवे आहे. दुसरा मुद्दा हा आहे की सर्वच मनुष्यबळाने रीतसर प्रशिक्षण घेतलेले नासते. हाती घेतलेले काम करीत करीत प्रावीण्य मिळविणारेही (लर्निंग बाय डूईंग) खूप आहेत. रुळलेली वाट (ट्रॅक) सोडून दुसरी वाट धरण्याची वेळ आली तर तिथले कामगार नवीन काम शिकून घेतात. याचा परिणाम असा झाला आहे की, जगातले (आऊटसोर्सिंग मार्केट) तयार वस्तू करून पाठविणे, तसेच मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सारख्या क्षेत्रात चीनची मक्तेदारी निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाची भूमिका - स्थानिक प्रशासन व्यवस्थेसारखी शासनव्यवस्थाही चीनमध्ये नियुक्त असते, आपल्या सारखी निवडून आलेली नसते. उद्योगाला साह्य करून ठरावीक मुदतीत ठरावीक काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली असते. तसेच तिथे आपापसात स्पर्धाही असते. उद्योग आपल्या क्षेत्रात यावेत यासाठी स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील असते. त्यासाठी ते स्वस्तात जमीन देऊ करतात, रस्ता, वीज व पाण्याची सोय करून देतात. कर्मचाऱ्यांसाठी घरे व शाळा उपलब्ध करून देतात. अधिकारी मुलाखती घेऊन पारखून नियुक्त केलेले असल्यानुळे (निवडून आलेले नसल्यामुळे) त्यांची तत्परता आणि कार्यक्षमताही जास्त असते. या निमित्ताने आपल्या येथील जैतापूर वीज निर्मिती प्रकल्प, नाणारमध्ये प्रस्तावित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प, आरे कारशेड प्रकल्प यांना वेळ का लागतो आहे, हे सांगायलाच हवे का? भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे तर चीनमध्ये एकाधिकारशाही आहे, हे विसरून चालणार नाही. फसलेले नियोजन, प्रत्येक प्रश्नी अरेरावी आणि कोविड महामारीची चुकीची हाताळणी यामुळे चीनची आज सर्वच बाजूंनी कोंडी होत आहे, हेही खरे आहे. असे असले तरीही आपल्या स्पर्धकाची सर्व शक्तिस्थाने माहीत असतील तरच उपाय करणे सोयीचे होईल, म्हणून हा लेखनप्रपंच.

No comments:

Post a Comment