Tuesday, May 27, 2014

Nigeria and terrorists

निर्नायकी नायजेरिया आणि बेमुर्वतखोर बंडखोर  

                                                                                         वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
नायजेरिया हा आफ्रिका खंडातील एक प्रचंड क्षेत्रफळ असलेला देश आहे. अटलांटिक महासागराचा विस्तीर्ण  समुद्र किनारा या देशाला लाभलेला आहे. अटलांटिक महासागर हा सतत खवळलेला असतो. या महासागराचा गुण आणि वाण हे दोन्ही या देशाची साथ आणि सोबत करीत आहेत, असे वाटते. या देशातील सर्वच लोक कृष्णवर्णीय असले तरी ख्रिश्चन आणि मुस्लीम अशा दोन धर्मांमध्ये विभागलेले आहेत.
देशाचे महाकाय स्वरूप
या खंडप्राय देशाची राजधानी अबुजा असून लोकसंख्या जवळ जवळ १७ कोट इतकी आहे. या देशाची अधिकृत  भाषा इंग्रजी असून अध्यक्षीय प्रणाली असलेले हे एक  छत्तीस राज्यांचे मिळून बनलेले एक खंडप्राय संघराज्य आहे.
बोको हराम ह्या मुस्लिम संघटनेचा प्रमुख अबुबकर शेकाऊ याने चिबक जमातीच्या जवळ जवळ दोनशे ख्रिश्चन धर्मीय मुलींना पळवून नेले असून बोको हराम संघटनेच्या अतिरेकी सदस्यांना कैदेतून सोडविण्यासाठी ओलीस म्हणून ठेवले आहे. या मुलींपैकी काहींनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे कैद्यांची मुक्तता आणि धर्म प्रसार असे दोन्हीही उद्देश या अपहरणाद्वारे साध्य करण्याचा हेतूही साध्य होताना दिसतो आहे. असे म्हणतात की, या पुढचा जागतिक संघर्ष ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये धर्म प्रसाराच्या निमित्ताने होणार आहे. केवळ आपल्या धर्माच्या पालनानेच ईश्वराप्रत जाता येणे शक्य आहे, असा या दोन्ही धर्मियांचा आग्रह असल्यामुळे संघर्षाला पर्याय दिसत नाही, असे मत जगभर व्यक्त केले जात आहे.
सुटकेच्या प्रयत्नांना अतिरेक्यांचे मग्रूर उत्तर  
अर्थात सध्याचा संघर्ष या निमित्ताने नसून या मुलींना शाळेतून  पळवून नेण्यामागचा हेतू त्यांना ओलीस म्हणून ठेवणे हाच प्रामुख्याने आहे. नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी या प्रकाराचा निषेध केला असून २०,००० सैनिक शोध मोहिमेसाठी मुक्रर केले आहेत. ब्रिटिश, अमेरिकन आणि इस्रायली फौजा सुद्धा शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. या घटनेने नायजेरियाच्या शासन व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. खरेतर या देशाच्या अर्थव्यवस्थेने कूस बदलली असून ती आफ्रिका खंडातली एक मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. आसपासची राष्ट्रे या प्रश्नाचा विचारआणि कृती  करण्यासाठी एकत्र आली आहेत हे कळताच बाको हराममच्या नेतृत्वाने कामेरुनाच्या सरहद्दीलगत काम करणाऱ्या चिनी कामगारांचे अपहरण करून उत्तर दिले आहे. बंदी लोक कुठे आहेत, याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणे मुळातच कठीण मानले जाते. त्यातून या प्रकरणात थोड्याथोडक्या नव्हेत तर दोनशे मुली अडकल्या आहेत. बोलणी चालू असतांना  सर्व प्रसार माध्यमे प्रतिक्षणी साक्षीला असणार आहेत. त्यामुळे गुप्त खलबते अशक्य आहेत.
असे प्रकार का घडतात?
हा पेचप्रसंग असा बिकट होण्यासाठी स्वत: अध्यक्ष जबाबदार आहेत, असे मानतात. त्यांच्या बोटचेप्या  आणि डळमळीत धोरणाचा हा परिणाम आहे, असे मानले जाते आहे. अध्यक्षांची पत्नी स्वत: एक महिला असूनही पुढच्या  वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीवर या घटनेचा काय परिणाम होईल, याचाच विचार करीत आहे, असे म्हणतात. या प्रकरणाचा शेवट सुखद होईल, असे आता वाटेनासे झाले आहे. पण यात बिचाऱ्या मुलींचे नशीब अडकलेले आहे, ही या सर्व प्रकारची भीषण आणि क्लेशदायक शोकांतिका आहे.  बहुदा या मुलींचे वेगवेगळे गट करण्यात आले असावेत. त्यामुळे त्यांचा शोध लावणे आणि आणि त्यांची सुटका करणे या दोन्ही गोष्टी बिकट झाल्या आहेत. अमेरिकेने हवाई सैनिकांची मदत केली आहे, ती याच कारणास्तव. अटकेतील कैदी(अतिरेकी) आणि ओलीस ठेवलेल्या मुली यांची अदलाबदल किंवा भली मोठी रक्कम या दोन्ही शक्यतांचा विचार चालू आहे. अतिरेकी सर्व मुलींना सोडायला तयार होतील असे वाटत नाही. ते काहींना सोडतील आणि मग आपल्या मागण्यात वाढ करतील. बळाचा वापर केला तर सर्वच किंवा निदान काही मुलींची हत्या नक्की होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भ्रष्ट राजवटीत दुसरे काय होणार?

जसजसे दिवस जात आहेत, तसतशी मुलींची शांततामय मार्गाने सुटका होण्याची शक्यता कठीणच नव्हे तर अशक्य होत चालली आहे. नायजेरियाचे स्वरूप आणि महत्व पाहता, त्या देशाचे सैन्यबळ बलशाली आणि कार्यक्षम  असावयास हवे होते. पण प्रत्यक्षात अगदी उलट स्थिती आहे. त्यामुळे केवळ बळाच्या साह्याने हा लढा जिंकता येणार नाही, हेही नक्की आहे. सैन्य आणि देश हे दोन्ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले आहेत. सैन्यासाठी तरतूद केलेली रक्कम सैन्यापर्यंत पोचतच नाही. केवळ नायजेरीयालाच नव्हे तर आफ्रिकेतल्या केनियालाची सुद्धा हीच स्थिती आहे. अतिरेक्यांच्या मागण्या सर्वथा आयोग्य आहेत, यात शंका नाही ,पण बलशाली आणि मग्रूर अतिरेक्यांपुढे तर्क, न्याय आणि समजूतदारपणाच्या गोष्टी आजवर कुठेही, कधीही टिकू शकल्या नाहीत, नायजेरिया तरी याला अपवाद कसा असणार?        

No comments:

Post a Comment