Sunday, May 4, 2014

Why are you afraid of Hindus? 04.05.2014 Tarunbharat



Top of Form

हिंदूंना का घाबरता? -मारिया वर्थ
 मारिया वर्थ ही जर्मन विदुषी हॅमबर्ग विद्यापीठातून मानसशास्त्राचा अभ्यास आटोपून भारतात सुट्टी घालवण्यासाठी आली होती. एप्रिलमध्ये तिने हरिद्वारच्या अर्धकुंभमेळ्याला भेट दिली. या काळात तिची आनंदमयी मां आणि देव्रराह बाबा या दोन विख्यात संतांची भेट झाली. त्यांचा कृपाप्रसाद पावून ती भारतात राहू लागली. भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरांचा तिचा परिचय होत गेला. आपली अनुभूती आपल्या मायदेशीच्या जर्मन वाचकांना ती लेख आणि पुस्तकांच्या साह्याने कळवीत असे. तिला वाटत होते की सर्व भारतीयांना आपल्या गौरवशाली वारशाची माहिती आहे, जाणीव आहे. पण काही दिवसांनी तिला जाणीव झाली की, आपला वारसा भारताने विसरावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. तेव्हापासून तिने भारताच्या संपन्न वारशाचा जगाला परिचय करून देण्यास प्रारंभ केला. हे लेख प्रसिद्ध होण्याची शक्यता न दिसल्यामुळे तिने ते आपल्या ब्लॉगवर टाकण्यास सुरवात केली.
प्रसारित होत असलेल्या चुकीच्या बातम्या
जर्मनीमधील न्युरेंबर्गच्या स्थानिक वृत्तपत्रात (जर्मन युद्धकैद्यांवरचे खटले याच शहरात चालवले गेले होते) जेव्हा जेव्हा भारताबद्दल काही माहिती प्रसिद्ध होई तेव्हा तेव्हा तिची आई मारियाला ही माहिती फोनवर वाचून दाखवीत असे. या बातम्यांत भारतासंबंधात अतिशय विकृत चित्रण असे. दिल्लीच्या रस्त्यांवर थंडीने गारठून मरून पडलेल्याची प्रेते ठिकठिकाणी पडलेली असतात, सतत सामूहिक बलात्कार होत असतात. अर्थात बातमी देणार्‍यांना आपल्या देशातील (जर्मनीतील) अशाच सामूहिक बलात्कारांचा सोयीस्कर विसर पडलेला तिला जाणवत असे. भारताच्या संदर्भात एक नवीन प्रकारचा शब्दप्रयोग तिला आढळून येऊ लागला. हिंदू मूलतत्त्ववादी (हिंदू फंडामेंटॅलिस्ट) हा तो शब्दप्रयोग होता. (फंडामेंटॅलिस्ट म्हणजे धर्मवेडा किंवा धर्मपिसाट) अशा व्यक्तींचा अध्वर्यू म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला जात असे.
मोदी, भाजपा आणि संघाबाबतचा अपप्रचार
भारतात हिंदू मूलतत्त्ववादी मोदी विजयी होण्याची शक्यता आहे... जर्मन वृत्तपत्रात छापून आलेली बातमी तिची आई मारियाला वाचून दाखवीत होती. हा माणूस भारताचे विभाजन करणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना नाझींशी करण्यात आली होती. इंग्रजी वृत्तपत्रांचाही सूर असाच होता. यामुळे केवळ भारतालाच नव्हे, तर सर्व जगाला धोका आहे, असे म्हणून काही ब्रिटिश वृत्तपत्रे तर एक पाऊल पुढे गेली होती. भारतातील काही वृत्तपत्रे देखील हिंदू मूलतत्त्ववादी आणि जातीयवादी नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास सेक्युलर भारतातील लोकशाहीला धोका निर्माण होईल, असे म्हणत होती.
मारिया वर्थ जेव्हा जर्मनीत परत जाई, तेव्हा तिच्या ओळखीची माणसे तिला विचारीत, हिंदू मूलतत्त्ववादी किती प्रभावी आहेत? मारिया त्यांना जीव तोडून सांगत असे, हा सगळी बकवास आहे/अपप्रचार आहे. हिंदुत्वाच्या मूलतत्त्वामुळेच मी भारतात आहे.
उदार(?) बुद्धिमंतांचा कांगावा आणि दांभिकपणा
मारियाला माहीत आहे की, भारतातीलच नव्हे तर जगातील तथाकथित उदार बुद्धिमंत (लिबरल इण्टलेक्च्युअल्स) तिच्यावर तुटून पडतील. भारतात टीव्हीवरील चर्चेत इतका आरडाओरडा होत असतो की, मूळ विषयापासून चर्चा भरकटत जायची आणि साधे प्रश्‍नसुद्धा विचारणे अशक्य होत असे. हिंदू आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांना न्याय मिळावा या दृष्टीने या अपप्रचाराचा समाचार घेणे मारिया वर्थला आवश्यक वाटले.
नरेंद्र मोदी हिंदू मूलतत्त्ववादी कसे काय ठरतात? ते स्वत:ला हिंदू म्हणवतात म्हणून? २००२ च्या दंगली थोपवण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही, असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो त्यावरून? या निमित्ताने जगात आजवर कोणाचीही झाली नसेल अशी आणि इतकी चौकशी नरेंद्र मोदी यांची झाली. ही एक अभूतपूर्व घटनाच म्हणावी लागेल. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. आपण क्षणभर असे गृहीत धरू की, या प्रकरणी ते दोषी आहेत. रेल्वे बोगी जळीत कांडानंतर जी दंगल उसळली ती मोदी यांना आवरणे शक्य झाले नाही किंवा त्यासाठी त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. (मी याबाबत दोषी ठरलो तर मला माफ करू नका, अत्यंत कडक शिक्षा करा, फासावर लटकवा, असे नरेंद्र मोदी स्वत: म्हणत आहेत) असे असेल तर त्यांना कठोर शिक्षा व्हावी, पण यामुळे ते हिंदू मूलतत्त्ववादी कसे काय ठरतात?
हिंदूंना ओळखा- मारिया वर्थ
मारिया या निमित्ताने हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान किंवा सनातन धर्म या नावाने जो ओळखला जातो त्याचे स्वरूप स्पष्ट करू इच्छिते. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वकाही ही ईश्‍वराची निर्मिती आहे. या प्रत्येकात एकच दैवी तत्त्व वास करीत असते. ख्रिश्‍चन आणि मुस्लिम धर्माप्रमाणे मानवांचे ईश्‍वराचे आवडते आणि नावडते, असे वर्गीकरण असे हिंदू धर्म मानत नाही. जगाच्या पाठीवर हिंदू धर्म हा असा धर्म आहे की जो सर्व मानव एकमेकांचे बांधव आहेत, असे मानतो. असे मानणारे इतर कुणी फारसे सापडणार नाहीत. प्राणिमात्रांवर प्रेम करा आणि विनाकारण कुणाही जीवमात्राला मारू नका, अशी या धर्माची शिकवण आहे. इतर धर्मीयांना कमी प्रतीचे समजू नका. या उलट असे धर्म आहेत की जे असे सांगतात की, सत्य धर्माचे पालन न करणारे ईश्‍वराला आवडत नाहीत. हिंदू स्वभावत: जीवमात्रांबाबत दयाळू भूमिका घेणारे असतात. जगातील शाकाहारी माणसांमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदू कधीही जिहाद (धर्मयुद्ध) लढले नाहीत. तलवारीच्या आधारावर त्यांनी आपला धर्म इतरांवर लादला नाही. याउलट गेली हजार वर्षे त्यांच्यावरच आक्रमणे होत आली आहेत. हजारो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले आहे. हिंदू आहात म्हणून मारले गेलेल्यांची संख्या लाखात मोजावी लागेल.
हिंदू आणि अन्य धर्मीय यातील फरक
मी हिंदू आहे, असे मोदी म्हणतात एवढ्याने ते मूलतत्त्ववादी ठरत नाहीत. उलट भारताचा विकास व्हावा आणि सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे, असा ध्यास त्यांनी घेतला आहे, असे दिसते आहे.
आपलाच धर्म श्रेष्ठ आहे, असे मानणारे ख्रिश्‍चन किंवा मुस्लिम कोणत्याही मार्गाने इतर धर्म मानणार्‍या लोकांचे कोणत्याही मार्गाने धर्मांतर करणे आपले कर्तव्य समजतात. जे याला नकार देतील, त्यांचा द्वेष करतात, त्यांना मारण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. जगाच्या इतिहासात या रक्तरंजित प्रकारची उदाहरणे जागोजागी सापडतात. त्यामुळे एखादा युरोपियन किंवा अमेरिकन राजकारणी जेव्हा स्वत:ला ख्रिश्‍चन म्हणवतो तेव्हा तो ख्रिश्‍चन मूलतत्त्ववादी ठरत नाही. असेच मुस्लिम राजकारणी पुरुषांचे बाबतीतही म्हटले जाते. मग ते अगदी ख्रिश्‍चन किंवा मुस्लिम राष्ट्र का असेना.
हिंदुत्व आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा करीत नाही. अमुक एकच सत्य आहे, बाकी अन्य असत्य आहे, अशी हिंदुत्वाची शिकवण नाही. इथे पारखण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदुत्वाची मूलतत्त्वे सुदृढ पायावर उभी असून ती चारित्र्य निर्मितीसाठी पोषक आहेत. उलट या मूलतत्त्वांचे पालन करण्यातच विश्‍वाचे कल्याण आहे.
नरेंद्र मोदी यांची ग्वाही
हा देव आणि तो देव, असा फरक आम्ही करत नाही. हा देश असे मानत नाही. ईश्‍वर एक असून ईश्‍वरप्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत (असू शकतात), असे आम्ही मानतो. या आशयाचे विचार नरेंद्र मोदी यांनी आपकी अदालत, या टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना काढले होते. तुमच्या राज्यात ख्रिश्‍चन जनता आणि त्यांची चर्चेस सुरक्षित राहतील का? असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. भारतीय राज्य घटनेनुसार सर्व पंथ समादराची भूमिका त्यांच्या पक्षाची राहील. जातीय उद्रेकाला भारताच्या प्रगतीच्या आड येऊ दिले जाणार नाही.
सहा कोटी लोकसंख्येच्या गुजराथ राज्यात गेल्या बारा वर्षांत जातीय दंगल झालेली नाही. या काळात गुजराथ राज्याचा विकास झाल्याचे प्रमाणपत्र तटस्थ माध्यमांनी दिले आहे. इतर राज्यांना या गोष्टीचा हेवा वाटतो आहे. आपण भ्रष्टाचारी नाही तसेच अत्यंत सक्षम आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
जगाने धसका घेतला असेल, पण कशाचा?
असे असताना मोदी हिंदू मूलतत्त्ववादी आहेत अशी ओरड जगातील प्रसार माध्यमे का करीत आहेत? त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न का करीत आहेत? आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली भारताचा धसका तर पाश्‍चात्य राष्ट्रांनी घेतला नाही ना? म्हणूनच तर मोदींना हिंदू मूलतत्त्ववादी ठरवून त्याचा हत्यारासारखा उपयोग तर ते करीत नाहीत ना? भारतावर मात करण्याचे हे एक षडयंत्र तर नाही ना?
असे प्रश्‍न उपस्थित करून मारिया वर्थ म्हणतात की, हिंदुत्वाची मूलतत्त्वे जगाला समजावून सांगण्याची वेळ आली आहे. बहुदा जग ही मूलतत्त्वे समजून घेण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येईलही.
वसंत गणेश काणे
Bottom of Form





No comments:

Post a Comment