Tuesday, June 6, 2017

कहानीची कहाणी -एक संकलन
वसंत गणेश काणे

मी गेल्या अनेक वर्षापासून चित्रपट (घरी टीव्हीवर वा चित्रपटगृहात)पाहिलेले नाहीत.  दरम्यानच्या काळात चित्रपट निर्मितीचे तंत्र पार बदलले आहे. त्यामुळे कहानी हा चित्रपट मला धड समजला व कळलाच नाही. अगोदरच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील मंडळींना ही अडचण येत नव्हती. म्हणून हा चित्रपट मी तीन/चारदा पाहिला, तरी धड वपूर्ण कळला नाही. म्हणून या चित्रपटाच्या पटकथेपासून, निर्मिती व समीक्षेपर्यंतच्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याचे ठरविले.
पटकथा(कथानक)
कोलकाता मेट्रोच्या कंपार्टमेंटमध्ये विषारी वायूच्या सहाय्याने प्रवाशांना मारण्याचा कट यशस्वी होतो. दोन वर्षानंतर विद्या व्यंकटेश बाग्ची (विद्या बालन) नावाची व्यवसायाने साॅफ्ट इंजिनिअर असलेली गर्भवती महिला दुर्गा मोहोत्सवाच्या काळात लंडनहून कोलकाताला आपल्या बेपत्ता पतीच्या -अर्णव बाग्चीच्या- शोधात येते. पेललिस स्टेशनस्टेशनवरचा पोलिस आॅफिसर सत्यकी उर्फ राणा सिन्हा (परमव्रत चॅटर्जी) विद्याला मदत करण्याचे ठरवतो. नॅशनल डाटा सेंटरला (एनडीसी) सहाय्य करण्यासाठी अर्णव बाग्ची लंडनहून कोलकाताला आला होता,असे विद्या बाग्चीचे म्हणणे असते. पण पण सुरवातीच्या तपासात अशी कोणतीही व्यक्ती लंडनहून त्या दिवशीच्या विमानाने आलीच नसते, असे उघड होते.
नॅशनल डाटा सेंटरला (एनडीसी) ची मानव संसाधन विभाग प्रमुख अग्नेश डीमेलो (कोलीन बाग्ची) विद्याला सुचविते की, तिच्या नवऱ्यासारखा दिसणारा मिलन दामजी (इंद्रनील सेनगुप्ता) नावाचा एक माजी कर्मचारी असतो. पण त्याची माहिती असलेली फाईल बहुदा आता जुन्याएनडीसी आॅफिसमध्ये असावी. याबाबत काही अधिक माहिती अग्नेशकडून मिळण्याच्या आधीच बाॅब बिस्वास (सास्वत चॅटर्जी) नावाचा विमा एजंटच्या मिशाने नोकरी करणारा पण प्रत्यक्षात गुप्तपणे अतिरेक्यांना मदत  कामकरणारा हस्तक अग्नेश डिमेलोला मारून टाकतो. विद्या व पोलिस इन्सपेक्टर राणा एनडीसीच्या जुन्या आॅफिसमध्ये चोरकिल्लीने कुलूप उघडून प्रवेश करतात, मिलन दामजीची माहिती असलेला कागद फाईलमधून मिळवतात व बाॅब बिस्वासशी गाठ पडण्याआधीच जेमतेम बाहेर पडतात. तो हीच माहिती हस्तगत करण्यासाठी तिथे आलेला असतो. कोणीतरी मिलन दामजीची माहिती हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो आहे, ही माहिती इंटेलिजन्स ब्युरोच्या (आय बी) दिल्लीच्या कार्यालयातील डेप्युटी खान (नवाझुद्दिन सिद्दिकी) याला व मुख्याधिकारी भास्करन के. (धृतिमन चॅटर्जी) यांना कळते. खान कोलकाताला येतो व मिलन दाजी हा फितूर इंटेलिजन्स ब्युरो (आय  बी) एजंट असून त्यानेच मेट्रोमध्ये विषारी वायू वापरून हत्या केल्या आहेत,असे उघड करून विद्याला त्याचा शोध घेण्याच्या भानगडीत तिने पडू नये, असे तिला बजावतो. पण विद्या शोध चालूच ठेवते. अर्णव बाग्ची व मिलन दामजी यांच्यातील साम्यामुळे तो अडचणीत आला असावा असे तिला वाटते.
मिलन दामजीचा पत्ता हस्तगत केलेल्या कागदावर असतो. विद्या व राणा पत्याच्या शोधात एका मोडकळीस आलेल्या फ्लॅटपर्यंत पोचतात. जवळच्याच चहावाल्याचा नोकर पोल्टू (रिद्धी सेन) एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) हा मिलन दामजीला वारंवार भेटायला येत असे, असे सांगतो. बाॅब बिस्वास विद्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण असफल होतो, राणा त्याचा पाठलाग करीत असतांनाच बाॅब एका कार खाली येऊन मरतो. बाॅबच्या मोबाईलमध्ये विद्या व राणाला विद्याला मारण्याच्या सूचना देणारा आयपी ॲड्रेस मिळतो. ते एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) याच्या आॅफिस कर्मचाऱ्याला - एन डीसीतील कर्मचारी सप्ना हिला (पामेला भुटोरिया)- वश करून शिरतात. व आयपी ॲड्रेसचा शोध घेतात पण ही माहिती इलेक्टाॅनिकली श्रीधरला कळते. झटापटीत श्रीधर विद्याच्या हातून मारला जातो. यामुळे गुन्हेगाराला जिवंत पकडण्याची खानची इच्छा असफल होते व तो चिडतो.
एनडीसी चा चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) याच्या काॅम्प्युटर डेटामध्ये भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी) चा फोन नंबर मिळतो.विद्या भास्करन ला फोन करून सांगते की, तिच्या हाती काही अतिसंवेदनशील माहिती लागली आहे, तिच्या बदल्यात भास्करने तिला आपला नवरा शोधण्याचे कामी मदत करावी. पण भास्करन तिला स्थानिक पोलिसांची मदत घेण्यास सांगतो. विद्याला एका अज्ञात क्रमांकावरून फोन येतो. तिला आपला नवरा जिवंत हवा असेल तर तिने ती कागदपत्रे फोन करणाऱ्याच्या स्वाधीन करावीत. खानला वाटते की फोन करणारा मिलन दामजीच असावा.
  विद्या मिलन दामजीला भेटायला जाते. तिच्या पाठोपाठ खान व राणाही तिच्या न कळत जातात. मिलन आपला नवरा स्वाधीन करू शकेल का, अशी शंका विद्या व्यक्त करताच मिलनला ती संवेदनशील माहिती देऊ शकेल वाटत नाही व तो परत फिरतो. विद्या त्याला अडवते. झटापटीत मिलन मिलन तिच्यावर पिस्तूल रोखतो. विद्या आपल्या पोटावरची कृत्रिम फुगीर पिशवी काढून ती मारून मिलनला नि:शस्त्र करते. आपण गर्भवती आहोत, हे दाखवण्यासाठी ती ही कृत्रिम पिशवी धारण करूनच कायम वावरत असते. आपली हेअर स्टिक वापरून त्याला जखमी करते व त्याच्याच पिस्तुलाने त्याला ठार मारते. पोलिस पिस्तुलाचे आवाज ऐकून धावत येतात. पण विद्या पळून निसटते व दुर्गा देवीच्या मिरवणुकीत दिसेनाशी होते. जाताजाता राणासाठी थॅंक्यू नोट व श्रीधरच्या काॅंम्प्युटर वरील डेटा असलेली पेन ड्राईव्ह ठेवून जाते. तिच्या आधारे भास्करनला अटक करणे शक्य होते. राणाला कळून चुकते की कुणी विद्या बाग्ची नसते किंवा कुणी अर्णव बाग्चीही नसतो.आपला हेतू साध्य करण्याकरिता विद्या पोलिस व आयबीचा उपयोग करून घेत असते.
   शेवटी आपल्या लक्षात येते की, अरूप बासू (अबीर चॅटर्जी) हा आयबी अधिकारी असतो. मिलन दामजी हा त्याचा सहकारी असतो. अरूप बासू (अबीर चॅटर्जी) मेट्रो विषारी  वायू हल्यात मरतो. विद्या आपल्या नवऱ्याचे -अरूप बासू (अबीर चॅटर्जी)- प्रेत पाहते व बेशुद्ध पडते व तिचा गर्भपात होतो. ती आपला नवरा व जन्माला न आलेला मुलगा यांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याच्या निश्चयाने कोलकात्याला येते. तिला सेवानिवृत्त आयबी अधिकारी कर्नल प्रताप बाजपेयी (दर्शन जरीवाला) मदत करतो. त्याला संशय असतो की, या प्रकरणी कुणीतरी वरिष्ठ अधिकारी सामील असला पाहिजे. तो आयबीचा मुख्याधिकारी भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी) हाच असतो.

मध्यवर्ती कल्पना, कोलकाताची पृष्ठभूमी, पात्रे व त्यांची निवड
सुजय घोष यानी कादंबरीकार व स्क्रिप्ट रायटर अद्वैत काला यांना चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना सांगितली. काला याना कोलकोतामधील अनुभवांनी उत्साहित केले होते. भाषेची अडचण, मोठ्या शहरातील गजबज व दारिद्र्य असले तरी गावातील वातावरण स्नेहयुक्त होते.त्यचे प्रत्यंतर चित्रपटात अनुभवाला येते. दिल्लीतील राॅ सारखी खाती, त्यांचा कारभार माहीत करून घेतला. अन्य माहिती नजरेखालून घालून संहिता तयार केली.
सुजय घोष यांनी अनेक सादरकर्त्यांच्या पायऱ्या झिजवल्या. पण तीन मुद्यांवर घोडे अडले. नायिका चित्रपटभर गर्भारपणी वावरणार, गौणपात्रे बंगाली असणार आणि कोलकाताची पृष्ठभूमी असणार.
प्रसन्नजित चॅटर्जी या बंगाली नटाने कोलकातमध्येच चित्रिकरणाचा आग्रह धरला. कोलकाताची निवड पुढील कारणास्तव झाली
१. निर्देशक कोलकाताशी परिचित होता.
२. शहरात नव्याजुन्याचा संगम होता.
३. कोलकाता मुंबई व दिल्लीपेक्षा स्वस्त होते.
घोष यांचे अगोदरचे दोन चित्रपट अल्लादीन व होम डिलिव्हरी फ्लाॅप गेले होते. कहानी ही शेवटची संधी होती. त्याने मित्राला कथानक वाचायला दिले होते. त्याने सीन्स चुकून मागेपुढे लावून स्क्रिप्ट परत केले. यातूनच कहानीतील ट्विस्ट आकाराला आला आहे.
चित्रपटातील पात्रे
विद्या व्यंकटेश बाग्ची (विद्या बालन)
सत्यकी - राणा सिन्हा (परमव्रत चॅटर्जी)
ए खान(नवाझुद्दिन सिद्दिकी)
मिलन दामजी(इंद्रनील सेनगुप्ता)
भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी)
बाॅब विस्वास (सास्वत चॅटर्जी)
कर्नल प्रताप बाजपेयी (दर्शन जरीवाला)
अरूप बासू (अबीर चॅटर्जी)
एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी)
कालीघाट पोलीस स्टेशनचा कनवाळू इन्स्पेक्टर (खराज मुखर्जी)
अग्नेश डीमेलो (कोलीन बाग्ची)
गेस्ट हाऊसचा मालक,  दास (नित्य गांगुली)
गेस्ट हाऊसमधील नोकर विष्णू (ऋतुव्रत मुखर्जी)
एन डीसीतील कर्मचारी सप्ना (पामेला भुटोरिया)
मूर्तिकार कामगार व खबऱ्या परेश पाल- कल्याण चॅटर्जी
पोल्टू चहावाल्याचा कामगार- (रिद्धी सेन)
एन डी सी मधील सिस्टीम सुपरवायझर, रसीक त्यागी (मसूद अख्तर)

विद्या बालनला नायिका म्हणून घोष यांची पहिली पसंती होती. विद्या बालनने रूपरेषा ऐकून सुरवातीला नकार दिला. संपूर्ण कथानक ऐकल्यावर मात्र होकार कळवला.
राणाच्या भूमिकेसाठी चंदन राॅय सन्यालचे नाव होते पण व्यस्तपणामुळे त्याने नकार दिला व परमव्रत चॅटर्जीचे नाव राणाच्या भूमिकेसाठी पक्के करण्यात आले.

ए खानच्या भूमिकेसाठी नवाझुद्दिन सिद्दिकीची निवड झाली. प्रथमच भिकाऱ्याचा रोल करावा लागणार नाही, याचा त्याला आनंद झाला.
बाॅब विस्वासच्या भूमिकेसाठी सास्वत चॅटर्जीची होताच काॅनट्रॅक्ट किलर म्हणून रोल मिळाल्याचा त्यालाही आनंद झाला. हिंदी  चित्रपट सृष्टीत आपल्यापेक्षा चांगलेनट असतील, असे त्याचे मत होते पण घोष यांना त्याचा अभिनय आवडला होता.
विद्याच्या नवऱ्यासाठी बाॅलिवडमधील नट वगळून त्यांनी अबीर चॅटर्जीची निवड केली. बंगाली फिल्म व  टीव्ही कलाकारांची इतर भूमिकांसाठी निवड केली. घोष यांच्या अगोदरच्या दोन फिल्म्स फ्लाॅप गेल्यामुळे बाॅलिवुडचे प्रतिथयश कलाकार भूमिका करण्यास उत्सुक नव्हते.
कहानीची कहाणी -एक संकलन (भाग२)
व्यक्तिचित्रण
विद्या बालन - गर्भवती विद्या बाग्चीची भूमिका साकारण्यासाठी कृत्रिम पिशवी बांधून विद्या बालनने खोटे गर्भारपण धारण करण्याचा सराव केला. महिला डाॅक्टर व गर्भार महिलांच्या भेटी घेऊन तिने गर्भारपणातील जीवनशैली व मळमळ यांची माहिती करून घेतली. त्याचबरोबर गर्भारपणासंबंधीच्या पत्थ्यांची व समजुतींचीही माहिती करून घेतली. काॅलेजमध्ये शिकत असतांना तिने गर्भार बाईची भूमिका वठविली होती, हा अनुभव कामी आला.
बाॅब बिस्वास - सास्वत चॅटर्जीला बाॅब बिस्वासची सरावलेल्या खुन्याची भूमिका वठवायची होती. त्याने सभ्यपणाच्या सर्व सवयी आत्मसात केल्या.नखं घासण्याची सवय त्याने चाळा (मॅनेरिझम) म्हणून स्वीकारली होती. असे केल्याने टक्कल पडत नाही, अशी समजूत आहे. (हे फार उशिरा कळते आहे) ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. ‘नोमोश्कार, आमी बाॅब बिस्वास...एक मिनीट’, हा संवाद लोकप्रिय झाला.
राणा - परमव्रत चॅटर्जी मूळचा शहरातला आहे. त्याला राणाची ग्रामीण पृष्ठभूमी आहे. त्याने पोलिस स्टेशन्सना भेटी दिल्या.त्यांचे काम, मानसिक घडण आणि आनुषंगिक सवयी समजून घेतल्या.
खान - एक क्रूर/कठोर/ निर्दयी, अहंमन्य/उद्धट, बेदरकार, मग्रूर व अर्थशून्य बडबड करणारा असा हा अधिकारी आहे. आपल्या बोलण्यावागण्याचा इतरांच्या भावनांवर काय परिणाम होईल, समाजावर काय परिणाम होतीय याची त्याला परवा नसते. दिसायला काडी पहिलवान, पण मनोनिग्रह, निष्ठा व देशभक्ती त्याच्या ठायाठायी भरलेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या पदावरचा अधिकारी गोल्डफ्लेक सारख्या सिगरेटचा मामुली व स्वस्त ब्रॅंडचा शौकीन कसा? पण हाच ब्रॅंड त्याचा प्रारंभापासूनचा आहे. तो चित्रपटातही त्याने कायम ठेवला आहे, असे म्हणतात.
कहानीचे चित्रण
चित्रिकरणात चित्रपटात महिला एकमेकींच्या चेहऱ्यावर कुंकू फासतांना दाखवल्या आहेत. याला सिंदूर खेला असे नाव आहे. दुर्गा पूजेच्या मिरवणुकीत सवाष्ण महिला एकमेकींच्या चेहऱ्याला सिंदूर (कुंकू) फासतात. विद्याला स्वत:ची ओळख पटू नये यासाठीची ही विनासायास मिळालेली सोय होती. या मिरवणुकीत पाठवून दिग्दर्शकाने वेषांतराचा हेतू कोणताही कृत्रिम मार्ग न स्वीकारता साध्य केला आहे. यावेळचे शूटिंग (चित्रिकरण) गनिमी पद्धतीने केले आहे. मिरवणुकीत सहभागी महिलांना याचा पत्ताही नसतो. काही नट/नट्या यात बेमालुमपणे सामील झालेल्या दिसतात. कृत्रिम प्रकाशयोजनेला चित्रपटाच्या चित्रिकरणात फाटा दिलेला आहे. चित्रपटात कृत्रिम प्रकाशयोजना नाहीच, असे म्हटले तरी चालेल.
गेस्टहाऊस १० दिवसांसाठी ४०,००० रुपयांना भाड्याने घेतले होते. चित्रिकरणाचा सुगावा कर्मचाऱ्यांनी कुणालाही लागू दिला नाही. मोनालिसा हाऊस हे एक झिरो स्टार गेस्टहाऊस फाटक्या रजिस्टरसह साकारले आहे.
कथानकाची विशेषता - विद्या बालनची ही चौथी नायिकाप्रधान कथा आहे. पुरुषप्रधान समाजात एक महिला आपला स्वतंत्र प्रभाव निर्माण करते, हे आपण पाहतो. पण तिचे स्त्रित्व कायम आहे. आपल्या मातृत्वाचा (त्याच्या अभावाचा सुद्धा) तिला विसर पडलेला नाही.
  राणा व विद्या यातील संयमित शृंगार(रोमान्स) हे चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या धावत्या हजेरीची पखरण अनेकदा दिसते. पण त्यायोगे रसहानी किंवा औचित्य हानी होत नाही.पुरुष गर्भार स्त्रिच्याही प्रेमात पडू शकतो तर! विद्याचे संगणक नैपुण्य पाहून राणाला वाटणारे आश्चर्य, कौतुक प्रगट करण्यास त्याचे विस्फारलेले डोळेच पुरेसे आहेत.
   पिवळ्या टॅक्स्या व गर्दी कोलकात्याचा विसर पडू देत नाहीत. गर्दीतील नागरिक आस्था विसरत नाहीत. बंगाल म्हटले की, बाॅलिवुड उच्चारणावर विनाकारण जोर, शंखध्वनि, रसगुल्ला (निदान मिस्टी तरी) यांचा अवाजवी वापर असतो. यात तसे नाही.  कोलकाताचे जनजीवन, रस्ते, वाहतुक (मेट्रो, मानवी रिक्षा, प्वळ्या टॅक्सीज, बोळी बोळकंडी) व राहणीमान यांचे यथातथ्य चित्रण पहायला मिळते.
चित्रपटात दुर्गापूजेलाही महत्वाची भूमिका आहे. महिशासुराचा वध करणाऱ्या दुर्गेप्रमाणे  मिलन दामजीला शासन करणारी विद्या  यातील साम्यही जाणवते. एक अवतार कार्य संपताच जलाशयात परत जाते तर दुसरी जनसागरात लुप्त होते.
  अगोदरचे इतर चित्रपट व कहानी यात काही साम्यस्थळेही समीक्षकांच्या नजरेतून सुटलेली नाहीत. रनिंग हाॅट वाॅटर, विद्याच्या गेस्ट हाऊसमधील हालचाली, स्वच्छतेचे निमित्त साधून आपल्या वावराच्या खुणा पुसणे, कुठेही स्वत:ची स्वाक्षरी येऊ न देणे (हाॅटेलमध्ये खोली बुक करतांना व एफ आयआर दाखल करतांना), खोटे गर्भारपण या गोष्टी नव्यानेच व प्रथमच याच चित्रपटात आल्या आहेत, असे नाही. पण दरवेळी विद्यासोबत प्रेक्षकांना आपणही तिच्या सोबत प्रवास करीत असल्याचा अनुभव येईल, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.
संगीत व ध्वनिमद्रण
चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. ती तीन निरनिराळ्या गीतकारांती आहेत.बंगाली ढंगाने जाणारी गाणी सारखीच वाटतात. उषा उत्थप, विश्वेश कृष्णमूर्ती, जावेद बशीर, श्रेया घोषाल हे काही गायक सांगता येतील. अमिताभ बच्चनने गायलेले एकला चलो रे हे गाणे व विद्याची एकटीची धडपड यातील साम्य जाणवते.  शब्दांच्या अर्थाला भावनिक उभारी मिळावी म्हणून ध्वनीचा आधार घेतला जातो. पण कधीकधी मूळ शब्दच ऐकू येत नाही. तसेच पात्रांचे रडणे व बोलणे एकाचवेळी असू नये असेही वाटते. एकतर बोलून मग ढसाढसा रडावे किंवा रडून झाल्यावर बोलावे, असे मला नेहमीच वाटते.
वितरण व व्यवस्थापन
कहानी ९ मार्च २०१२ ला महिला जागतिक दिनी जनतेच्या भेटीला आली.पोस्टरवरीव विद्याचे गर्भवती रूप नायिकेचे शृंगारिक रूप नसूनही रसिकांना भावले. उशी पोटाशी धारण करून विद्या प्रचार कार्यक्रमात जायची, रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी फेरफटका मारायची,आपल्या मृत नवऱ्याचा फोटो दाखवून, ‘आपण यांना पाहिलत का?’, म्हणून विचारायची. मध्येच एक नवीनच भानगड समोर आली. विद्याला मेट्रोखाली ढकलण्याच्या दृश्याचे वाईट परिणाम होतील, असा आक्षेप मेट्रोने घेतला. म्हणून ट्रेलरमधून हे दृश्य कापण्यात आले. पण चित्रपटात सहज चालून गेले.
कहानीचा पहिला प्रयोग ‘हाऊस फुल्ल’ झाला नाही. पण तोंडी प्रसिद्धीने (माऊथ पब्लिसिटी) प्रतिसाद वाढत गेला.
पारितोषिके
फिल्म फेअर ॲवाॅर्ड्स ५ अ) बेस्ट ॲक्ट्रेस - विद्या बालन, ब) बेस्ट डायरेक्शन - घोष
अशी अनेक पारितोषिके खेचून आणली.
परिणाम
चित्रपट सृष्टी कोलकाताकडे वळली.
मेट्रो, ट्रॅम्स, मानवाने ओढायच्या रिक्षा,गल्ल्लया व बोळी, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, टोलेजंग इमारती, मोडकळीला आलेली घरे,गंगा घाट, हावरा ब्रिज, कालिघाट मंदीर, कुमोर्तुली हा शिल्पे तयार करणारा भाग, मोनालिसा गेस्ट हाऊस परिचित झाले
रिमेक्स
कहानीचे तेलगू, तमिळ व इंग्रजी भाषेत रिमेक्स झाले आहेत.
 (हे मुख्यत: संकलन आहे. काही माझ्याही टिप्पण्या आहेत. पण त्या तशा खूप महत्वाच्या नाहीत. हे संकलन वाचणाऱ्यांनी पुन्हा एकदा कहानी पहावा, अशी शिफारस आहे. अधोरेखित करव्यात, अशा इतर आणखी अनेक जागा नक्कीच सापडतील.)

No comments:

Post a Comment