Tuesday, June 6, 2017

काश्मीरमध्ये नक्की काय घडले/घडते आहे? 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
      भारताच्या भूमीत वास्तव्य करून भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून निधी स्वीकारणार्‍या फुटीरतावादी नेत्यांची आर्थिक नाकेबंदी करताना राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने नुकत्याच काश्मीर, दिल्ली आणि हरयाणातील एकूण २३ ठिकाणी धाडी घातल्या. यामुळे हुर्रियत नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे. 
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांना पाकमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवली जात असल्याचे वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाल्यानंतर एनआयएचे पथक काश्मिरात दाखल झाले होते. या पथकाने फारुख अहमद दार, नईम खान व जावेद अहमद बाबा ऊर्फ गाझीची चौकशी केली. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारावरच हे धाडसत्र राबविण्यात आले.
 काश्मीर खोर्‍यातील १४ आणि दिल्लीतील ७ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. या पथकाने ज्या ठिकाणांची झडती घेतली, त्यात हुर्रियत नेता सय्यद अली शाह गिलानीचा जावई अल्ताफ फंटूश, व्यावसायिक झहूर वताली, मिरवाईज उमर फारुखच्या अवामी कृती समितीचा नेता शाहिद उल-इस्लाम आणि अन्य हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय, जेकेएलएफच्या काही नेत्यांच्याही ठिकाणांची झडती घेण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील धाडसत्रात पथकाने सुमारे दीड कोटी रुपये रोख आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. १९९० च्या दशकात काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया सुरू झाल्यानंतर, या कारवायांचे समर्थन करणार्‍या फुटीरतावादी नेत्यांवर भारतीय तपास संस्थांनी केलेला हा पहिला आणि सर्वात मोठा आघात आहे. 
काश्मीर खोर्‍यात शांतता असावी, अशी बहुसंख्य काश्मिरींची इच्छा आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायचे आहे. देशाच्या अन्य राज्यांना सरकारकडून ज्या संधी उपलब्ध होतात, त्यापासून काश्मिरींना मुकायचे नाही आणि काश्मीरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भारतासोबत राहण्यातच शहाणपण आहे, हे काश्मीरमधील समंजस लोकांचे मत आहे. तोयबा, हिजबुलचे लेटरहेड फुटिरतावाद्यांची घरी कशी? - एनआयएच्या झाडाझडतीत फुटीरतावादी नेत्यांच्या घर आणि कार्यालयांमध्ये लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप सापडले आहेत.
 इकडे पाकिस्थाननेही काश्मीरमधील आपल्या रणनीतीत बदल केला आहे. हा स्वतंत्र काश्मीरसाठी काश्मिरी तरुणांचा स्वतंत्र उठाव आहे, बाहेरच्या घुसखोरांचे हे आंदोलन नाही, हे पाकिस्थानला दाखवायचे आहे. त्या दृष्टीने फारसे प्रशिक्षण न देता काश्मिरी तरुणांना कमांडर म्हणून नेमण्याचा हिजबुल मुजाहिद्दीन या पाकिस्थानस्थित काश्मिरींच्या संघटनेचा खटाटोप त्याला सोयीचा वाटतो आहे. असे ८ कमांडर हिजबुलने आजवर नेमले व बहुतेक सुरक्षा दलांकडून मारले गेले आहेत. सध्याची काश्मीरची स्थिती समजण्यासाठी यातले शेवटचे चार विचारात घेतले तरी चालण्यासारखे आहे. यातले बहुतेक भट हे आडनाव लावतात, याची नोंद घ्यायला हवी.
सुरवातीला बुरहान मुझफ्फर वाणी, नंतर झाकीर रशीद भट उर्फ झकीर मुसा व त्याच्या पदच्युतीनंतर, सबझार भट व त्याचा खातमा झाल्यानंतर झाकीर नायको अशी ही साखळी आहे. झाकीर नायको निदान आजतरी सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकलेला नाही.
  घोड्यावरचे काही रडत राऊत - 
(१)बुरहान मुझफ्फर वाणी किंवा बुरहान वाणी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. तो सोशल मीडियावर बराच क्रियाशील असल्यामुळे लोकप्रिय होता. दक्षिण काश्मीरमधील त्राल भागातील दादासरा हे त्याचे जन्मगाव होते. ८ जुलै २०१६ ला एका लहानशा तो चकमकीत मारला गेला.  तो एका घरात दडून बसला होता. मारला गेल्यानंतरच त्याची ओळख पटली. तो अतिशय लोकप्रिय असल्यामुळे त्यानंतर काश्मीरमध्ये सहा महिने असंतोष धुमसत होता. या काळात फार मोठी वित्त व जीवित हानी ( ९० मृत्यू, १५,००० मुलकी नागरिक जखमी) झाली. सतत ५३ दिवस कर्फ्यू होता.
(२) झाकीर रशीद भट उर्फ झकीर मुसा हा हिजबुल मुजाहिद्दीनचा काश्मिरी अतिरेक्यांचा कमांडर होता. बुरहान वाणीचा खातमा झाल्यानंतर त्याची नियुक्ती हिजबुलने केली होती. श्रीमंत सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या झाकीर मुसाने चंदिगड येथे शिक्षण घेतांना अतिरेक्यांच्या संपर्कात येऊन प्रथम तो हिजबूलमध्ये दाखल झाला व नंतर मात्र हिजबुलचा त्याग करीत झाकीर मुसाने काश्मीरला इस्लामिक स्टेट घडवण्याचा विडा उचलला व स्वत:चा स्वतंत्र गट उभा केला. त्यामुळे हरकत -उल-मुजाहिद्दीन व काश्मिरी तालीबान या दोन्ही संघटनांचा त्याला पाठिंबा आहे.
झाकीर रशीद भटचा जन्म दक्षिण काश्मीरमधील त्राल भागातील नूरपोरा येथे झाला आहे. त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण चंदिगडमध्ये सुरू असतानाच तो हिजबुव मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला.
 खरेतर बुरहान वाणीच्या हत्येनंतर हिजबुलने महमूद गझनवीची नेमणूक केली होती, असे म्हणतात. पण मग हा महमूद गझनी कोण? बहुदा हेच झाकीर रशीद भटचे दुसरे नाव असावे. ही हिजबुलची नवीन उच्चशिक्षित पिढी असावी.
भारतीय लष्कराने सुरू केलेल्या धडक कारवाईत काश्मीरमध्ये आतापर्यंत ८ दहशतवादी नेते ठार झाले आहेत. यात सबझार अहमद याचाही समावेश आहे. लष्कराने श्रीनगरच्या ३६ किमी परिसरात नुकतीच शोध मोहिम सुरू केली आहे. या परिसरात मुजाहिद्दीनचे दहशतवादी दडल्याची माहिती समोर आल्यानंतर ही शोधमोहिम राबवण्यात येत आहे.
 २अ) सबझार भट ने झाकीर रशीद भट उर्फ मुसा पदच्युत झाल्यानंतर त्याची जागा घेतली होती. सबझार भट्ट ‘सब डॉन’ या नावानेही ओळखला जात होता. बुरहान वाणीचा उजवा हात म्हणून त्याची ओळख होती. तो बुरहानचा बालपणीचा मित्र असल्याचेही समजते. बुरहान वाणीचा मोठा भाऊ खालीदला ठार करण्यात आल्यानंतरच्या निषेधाचे वेळी बंदुक हिसाकावून घेण्यात सबजार भटला यश आले होते. त्यानंतर सबझार भट हिजबुलमध्ये सामील झाला होता. 
  झाकीर रशीद भट उर्फ मुसाच्या पदच्युतीनंतर नेमलेला सबझार अहमद भट हा एक भित्रीभागुबाई होता, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. त्याला सैन्याने त्राल भागात घेरले असता तो सतत १० तास एकही गोळी न झाडता दडून बसला होता. लोकांनी हातात दगड घेऊन सैन्यावर चालून जावे व त्याला सुटकेसाठी मार्ग तयार करून द्यावा, असे आवाहन तो सतत करीत होता.
 सैन्याने सबझार व त्याचा साथीदार फैजान जिथे दडून बसले होते, त्या एकालाएक लागून असलेल्या तीन घरांना वेढा घालून  सैन्याने त्यांना शरण येण्यास सांगितल्यावर हूं की चू न करता हे दोघे  तसेच बसून राहिले. म्हणून सैन्याने धूर करून बिळातून उंदरांना बाहेर काढण्याची पद्धत वापरली. पण तरी ते बाहेर येईनात. तीन घरे एकाला एक लागून होती. तिसऱ्या घरालाही पेट्रोल टाकून पेटवताच ते बाहेर निघाले व पळून जाऊ लागले व गोळ्या लागून मेले. खरेतर केवळ एके ४७च नव्हे तर आधुनिक इनसास रायफल्स व प्रचंड दारूगोळा त्यांच्याजवळ होता. पण दारूगोळा स्वत: लढत नसतो. एके ४७ व इनसास पेलणारे मनगटही असावे लागते व त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे हिंमत असावी लागते. ती यांच्याजवळ नव्हती त्यांना वाटत होते दगडफेकणाऱ्यांची झुंड येईल व आपल्याला सुटण्यास खिंडार पाडून देईल. या आशेवर ते शेवटपर्यंत जीव मुठीत धरून एका घरातून दुसऱ्या व नंतर तिसऱ्या घरात जात राहिले व शेवटी चकमक धडपणे सुरू होण्यापूर्वीच  मारले गेले. 
  सबझार आपले सैनिकी वेशातले निरनिराळ्या पोझमधले फोटो सोशल मीडियावर टाकीत असे. त्याच्या फैरी स्मार्टफोनमधूनच बाहेर पडत.  सोबत असलेली कॅलॅश्निकोव्ह बंदूक खांद्याला टेकवून फैरी झाडणे त्याला माहीतच नव्हते. सातव्या वर्गापर्यंत जेमतेम शिकलेल्या सबझारचे इतर रंगढंगात मात्र नैपुण्य होते. तो महिलांना फशी पाडण्यात वाकबगार ( वूमनायझर) होता. तसेच ड्रग्जचे सेवन करूनही तो तर्र असायचा. बुरहाना वाणीचा खातमा झाल्यानंतर ती जागा सबझारला मिळावी हे हिजबुल मुझाहिद्दीनच्या नेतृत्वाची बौद्धिक दिवाळखोरी समजायची की अपरिहार्यता?
बुरहान वाणी व सबझार या दोघांचाही मागोवा सैन्याने आधुनिक तांत्रिक पाळत ठेवून घेतला होता. फारशी चकमक न होताच हे दोघेही मारले गेले आहेत, एवढेच साम्य या दोघांमध्ये सध्यातरी दिसते आहे. पण सबझार  दडून बसल्याची जशी पक्की माहिती होती, तशी बुरहान वाणी बद्दल नव्हती.  कोणीतरी मोठा अतिरेकी दडून बसला आहे, एवढेच माहीत झाले होते. तो मारला गेल्यानंतरच तो बुरहान वाणी आहे, अशी त्याची ओळख पटली.
स्थानिक अतिरेकी नेतृत्व हे घाईघाईत घोड्यावर बसविलेल्या रडत राऊताप्रमाणेच आढळून आले आहे. प्रचारतंत्र वापरून त्यांचे नेतृत्व उभे केलेले दिसते. त्यांना पाकिस्थानस्थित घुसखोरांप्रमाणे धड प्रशिक्षणही मिळालेले नसते. त्यांना धड बंदूकही हातात धरता येत नसते. त्यांचा वापर पाकिस्थानी अतिरेकी बळीच्या बकऱ्यासारखा - बाजारबुणग्यांसारखा - (कॅनन फाॅडर) करताना दिसत आहेत.
(३) रियाझ नायकोची नेमणूक व डावपेचातील बदल - सबझार भट मारला गेल्यानंतर रियाझ नायकोची नेमणूक हिजबुवने कमांडर म्हणून केली. रियाझ नायको मात्र स्वत: उच्चशिक्षित असून त्याची बुद्धिमान तरुणात चलती आहे. सद्दाम पद्देर व अलताफ कचरू हे दोघे सुद्धा श्रेष्ठ व ज्येष्ठ प्रतीच्या अतिरेकी गटातील मानले जातात. अल्ताफ कचरूवर तर माहिती देणाऱ्यासाठी  तर १२ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
सबझार भटची रियाझ नायकोशी तुलना करणे उपयोगाचे ठरेल. सबझार भटने शिक्षण मध्येच सोडले होते, तर रियाझ नायको हा उच्चशिक्षित आहे. दक्षिण काश्मीरमध्ये त्राल नावाचा हिजबुलप्रभावित भाग आहे. सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत सबझार भटचा खातमा झाला. त्याची बुद्धिमान जगतात प्रतिमा व प्रतिष्ठा नव्हती. हिजबुलला ही मोठीच उणीव  वाटत असे. ती आता रियाझ नायकोच्या नियुक्तीने दूर झाली आहे.
रियाझ नायकोने आजवर अनेकदा सुरक्षा दलाच्या हातावर तुरी ठेवल्या आहेत व तो गेली तीन वर्षे सापडलाच नाही. सुरवातीला एकदा त्याला पब्लिक सिक्युरिटी ॲक्टखाली अटक झाली होती. सुटल्यावर तो अतिरेक्यांना जाऊन मिळाला. सध्या खुनाच्या अनेक गुन्ह्यांसाठी तो पोलिसांना हवा आहे. तो बुऱ्हान वाणीचा जवळचा मित्र होता. 
 सबझर भट उर्फ अबू झरार मारला गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हिजबुल मुजाहिद्दीन ने त्याच्या जागी रियाझ नायकू या २९ वर्षीय व सध्या जिवंत असलेल्या अतिरेक्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची काश्मीर मध्ये कमांडर म्हणून नेमणूक केली आहे.
रियाझ नायकू हा तंत्रज्ञान क्षेत्रातील, अतिरेक्यातील सौम्य मानला जाणारा व काश्मीरमध्ये धर्मावर आधारित भेदभाव केले जाऊ नयेत, असे मानणारा व झाकीर मुसापेक्षा अगदी वेगळ्या विचाराचा माणूस आहे.
काही महिन्यांपूर्वी त्याने काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये बोलावले होते. ‘ते आमच्याच ‘राष्ट्राचे’ घटक आहेत, आम्ही त्यांचे संरक्षक आहोत, वैरी नाही’, अशा आशयाचे त्याचे अपील होते. पण एकाही काश्मिरी पंडिताने या आवाहनावर विश्वास ठेवला नाही. कारण असे असते तर मुळातच त्यांच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ का आली असती?
झकीर मुसाला पदच्युत करून पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूर येथील  रियाझ नायको या सौम्य प्रकृती व प्रवृत्तीच्या व तंत्रशास्त्र प्रवीण व्यक्तीची नियुक्ती करण्यामागे हिजबुल मुजाहिद्दीनच्या नेतृत्वाचा विचार काय असावा, याबाबत दोन कारणे संभवतात. एकतर झकीर मुसाने सरळसरळ खिलापतचा पुरस्कार करून काश्मीरमध्ये शरियत लागू करण्यासाठी हा संघर्ष आहे, असे म्हटले होते. हिजबुल मुजाहिद्दीनच्या घोषित भूमिकेत असा स्पष्ट उल्लेख नाही. सध्या पाकिस्थानस्थित हिजबुलच्या नेतृत्वावर पाकिस्थानी गुप्तहेर एजन्सीचा दबाव फार प्रमाणात वाढला आहे. तसेच काश्मीरमधील काश्मिरींचा संघर्ष हा काही राजकीय कारणास्तव आहे/असावा, हे आयएसआय ला मान्य नाही. हिजबुलला मात्र आपला लढा राजकीय स्वातंत्र्यासाठी आहे, इस्लामिक स्टेटच्या निर्मितीसाठी नाही, हे जगाला भासवून द्यायचे आहे. त्यामुळे मुसाची भूमिका त्यांना मान्य होणे शक्यच नव्हते.
रियाझ नायकोला नेमून हिजबुलने झकीर मुसाचे महत्व कमी केले आहे. झकीर मुसा आपल्या वक्तव्यांमुळे कट्टरवाद्यांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत चालला होता. आतातर, झकीर मुसाशी हिजबुलने आपला संबंध तोडल्यासारखेच जाहीर केले आहे, असे हिजबुलचा प्रवक्ता सलीम हाशमीच्या वक्तव्यावरून वाटते.
बाॅनेटवीर फारुक दार - ह्या हालचाली घडत असतांनाच बाॅनेटवीर फारुक दारचे प्रकरण घडले. त्यामुळे देशातील सेक्यलर व सहिष्णुतावाद्यांची अंत:करणे विदीर्ण झाली असून त्यांचा आक्रोष काही केल्या थांबतांना दिसत नाही. ही हकीकत खुद्द संरक्षण दलाच्या प्रमुखांकडूनच माहीत करून घेतलेली बरी. 
 भारतीय सेनादल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सध्या काश्मीरात सैन्याला अत्यंत गलिच्छ प्रकारच्या युद्धाला कसे सामोरे जावे लागत आहे, हे स्पष्ट केले आहे. निदर्शकांनी दगडाऐवजी शस्त्रे हाती घेतली असती तर सैन्याचे काम सोपे झाले असते. त्यामुळेच दगडफेक करण्यांना नमवण्यासाठी सैन्याला वेगळा उपाय शोधून काढावा लागतो आहे. 
दगडफेकणाऱ्यांवर मात - दगडफेक करणाऱ्यांचा म्होरक्या फारूख दारला जीपच्या बाॅनेटला बांधून मानवी कवच (ह्यूमन शील्ड) सैन्याने वापरले व दगडफेक करणाऱ्या तरूणांच्या तावडीत सापडलेले निवडणूक अधिकरी, त्यांची चमू, व त्यांच्या सोबत असलेले पोलिस दलातील सुरक्षा कर्मी यांना दगाफटका होऊ न देता जसे सुखरूप बाहेर काढले तसेच दगडफेक करणाऱ्यांनाही इजा होऊ दिली नाही. सैन्यदलाच्या तुकडीसमोर तीन पर्याय होते. काहीही न करता स्वस्थ बसणे व निवडणक कार्याशी संबंधित अधिकारी, त्यांची चमू व त्यांचे  सुरक्षाकर्मी असा निदान १२/१५ लोकांचा बळी जाऊ देणे, हा पहिला पर्याय हाेता. शस्त्रांचा वापर करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करणे, यात उभयपक्षी मिळून १०/१२ व्यक्तींचे प्राण गेले गेले असते. अशी काही युक्ती योजणे की ज्यामुळे दगडफेक करणे अशक्य होऊन सर्वप्रकारची हानी टाळणे. मेजर लितूल गोगई यांनी तिसरा पर्याय निवडला. दगडफेक्यांच्या म्होरक्याचा ढालीसारखा वापर करून परिस्थिती हाताळली.
मानवतावाद्यांचा आक्रोश - तथाकथित मानवतावाद्यांनी ऊर बडवायला सुरवता केली. पण पहिला पर्याय स्वीकारला असता व सैन्याने काहीच केले नसते  तर कर्तव्य बजावणारे कर्मचारी बळी पडले असते. अर्थात अशा परिस्थितीत या मानवतावाद्यांच्या डोळ्यातून एक टिपूसही बाहेर आले नसते. शस्त्रांचा वापर केला असता तर उभयपक्षी प्राणहानी झाली असती, अशा परिस्थितीत मानवतावाद्यांचा अश्रूपात फक्त दगडफेक करणाऱ्यांसाठीच झाला असता, कंठातून दु:खाचे उसासे फक्त त्यांच्यापुरतेच बाहेर आले असते. सध्याच्या किंकाळ्या या दगडफेक्याला बाॅनेटला बांधल्यामुळे जे घृणास्पद (?) कृत्य घडले त्यासाठी आहेत. जेव्हा सैनिकांची मुंडकी छाटून नेली जातात तेव्हा, किंवा अतिरेक्यांना वाचवण्यासाठी स्वत:च आपले कवच पुरवणाऱ्यांच्या स्थानिकांच्या देशविघातक कृत्यांसाठी यांच्या तोंडून निषेधाचा एक शब्दही कधी बाहेर पडत  नाही.
 कोर्ट आॅफ इन्क्वायरी - सैन्याच्या प्रथेप्रमाणे संबंधित प्रकरणी कोर्ट आॅफ इनक्वारी  आटोपली. लितूल  गोगईला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य पार पाडणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर तर मानवतावाद्यांनी पुन्हा ऊर बडवायला सुरवात केली आहे, सहनशीलतेची व मानवतेची हत्या(?) झाल्यामुळे ते सुतक पाळीत आहेत.
प्राॅक्सी वाॅर -  सध्या काश्मिरात चालू आहे ते प्राॅक्सी वाॅर आहे. शिखंडीच्या आडून तीर मारण्यासारखे हे डावपेच आहेत. हा युद्धातील गलिच्छ प्रकार समजला जातो. याचा सामना नेहमीच्या युद्धतंत्राचा वापर करून करता येत नाही. याचा सामना करण्यासाठी चाकोरी बाहेरचे/अभिनव/ नावीन्यपूर्ण (इन्नोव्हेटिव्ह) तंत्र वारावे लागते. 
सैनिकांना मरायला सांगू का? - लोक दगडफेक करीत आहेत, पेट्रोल बाॅम्ब फेकून मारीत आहेत. अशा परिस्थतीत तुकडीचा प्रमुख या नात्याने मी काय करावयास हवे? काय म्हणावयास हवे? ‘वाट पहा आणि मरा? मग आम्ही तुमच्यासाठी छानशी शवपेटी आणू. तिच्या भोवती  राष्ट्रध्वज गुंडाळू? मग ती इतमामाने तुमच्या गावी पाठवू. तोफांची सलामी देऊ, सैन्यदल प्रमुख या नात्याने मी जर असे म्हणू लागलो, तर सैन्याचे मनोबल टिकेल का?’, अशा आशयाचा जळजळीत सवाल जनरल बिपिन रावत यांनी विचारला आहे. अहो, ‘दगडफेक्यांच्या हाती दगडांऐवजी शस्त्रे असती तर आमचे काम खूपच सोपे झाले असते’. 
संयमी सैन्यदल - ‘शत्रूला सैन्यदलाची भीती वाटली पाहिजे आणि देशातील गुन्हेगारांनाही सैन्याची भीती वाटली पाहिजे. एरवी सैन्याचे जनतेशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. पण जेव्हा कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल व सैन्याला मदतीसाठी पाचारण केले जाईल, तेव्हा मात्र सर्वांनाच सैन्याचा धाक वाटला पाहिजे. अशा परिस्थितीतही भारतीय सैन्य काश्मीरात अतिशय संयमानेच वागत आले आहे’.
ब्रिटिशांनी वापरलेली अशीच एक युक्ती - एका जुन्या कथेचे स्मरण या निमित्ताने होते आहे. १९४७ पूर्वी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात रेल्वे आडवण्यासाठी पुरुष रुळावर झोपले, तर ब्रिटिश सैनिक त्यांना मारहाण करीत, त्यांना ओढून नेत. यावर उपाय म्हणून महिलांच्या एका पथकाने रेल्वे रुळावर जाऊन झोपावे, असे ठरले. आता ब्रिटिश अधिकारी काय करतात, याची सर्व लोक वाट पाहत थांबले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्याने  सैनिकांना आज्ञा दिली की, प्रत्येक महिलेच्या शेजारी जाऊन एकेका सैनिकाने नुसते झोपावे. सैनिकांनी तसे करताच सर्व महिला ताबडतोब उठून जागा सोडून  पळाल्या व आगगाडी सुरळीतपणे पुढे गेली.  भवानी जंक्शन नावाच्या एका चित्रपटात हे दृश्य दाखवण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अॅव्हा गार्डनर हिने या चित्रपटात एका ॲंग्लो इंडियन तरुणीची (बाप ब्रिटिश व आई भारतीय) भूमिका वठवली आहे. ब्रिटिश बापासोबत इंग्लंडला जावे, तर तो देश कितीही झाले तरी परका, भारतात रहावे तर इथले लोक तिच्या शीख प्रियकरासह आपला स्वीकार करतील का, अशी या नायिकेची द्विधा मनस्थिती दाखविली आहे.
मेजर गोगई यांनी योजलेला उपाय याच जातकुळीचा म्हणावा लागेल. त्यांनी बंदुकीचा वापर न करता परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळली आहे.
विश्वासाला तडा जाता कामा नये - जनरल रावत म्हणतात, सैन्यदल प्रमुख या नात्याने सैन्याचे मनोबल कायम राखणे हे माझे कर्तव्य आहे.मी स्वत: युद्धभूमीपासून दूर असतो. प्रत्येकवेळी तिथे काय करावे, हे मी इथून सांगू शकत नाही. एक मात्र मी त्यांना नेहमी सांगू शकतो. सैनिकहो, मी तुमच्या सोबत आहे. युद्धभूमीवर एखादी गोष्ट वेडीवाकडी घडेलही, पण जोपर्यंत तुम्ही दुष्ट हेतू मनात बाळगून एखादी कृती केलेली नसेल, तोपर्यंत, विश्वास ठेवा, मी तुमच्या सोबत असेन. 
सैनिकी दल व मुलकी पोलिस दल व शासकीय कर्मचारी यात एक परस्पर विशवासाचे वातावरण असते/असावे लागते. मेजर गोगई यांनी कोणत्याही कारणास्तव पोलिस वा अन्य अशाच कुणाला संरक्षण देण्यास नकार दिला असता, तर या विश्वासाला तडा गेला असता. शत्रूला हेच हवे होते. नव्हे याचसाठी हा बनाव होता.
उद्या अनंतनागमध्ये निवडणुका होतील. त्यावेळीही कदाचित असेच काहीतरी घडू शकेल. अशावेळी सैन्याने नागरी दलांच्या हाकेला ओ दिली नाही तर जनतेचा पोलिस व सैन्यावरचा विश्वासच उडेल. सैन्यदलप्रमुख या नात्याने मी असे कधीही होऊ देणार नाही. अतिरेक्यांना हेच व्हायला हवे आहे. सैन्य व अन्य संरक्षक दलात  त्यांना दरी निर्माण करायची आहे.
 सैन्याला स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का? मेजर गोगई दगडफेक करणाऱ्यांवर केव्हाही गोळ्या झाडू शकले असते. पण त्यांनी तसे कले नाही.   
फारूक दार म्हणतो की, तो दगडफेक करणाऱ्यांपैकी नव्हता. तो अतिरेकी नाही. तो ‘बिचारा’ मतदान कररून परत येत असतांनाच त्याला उचलण्यात आले. त्याला शारीरिक इजेचा व मानसिक त्रास होतो आहे. त्याला बाॅनेटला बांधून त्याच्या गळ्यात दगडफेक्यांसाठी इशारेवजा पाटी लटकवण्यात आली होती. पण असे असते तर तो ज्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी मतदान केल्यानंतर असायचे कारण नव्हते.
चुकीचे चित्र -  जनरल रावत यांनी केलेली शेवटची टिप्पणी अतिशय महत्त्वाची आहे. दक्षिण काश्मीरमधील फक्त चार जिल्ह्यात गडबड होतांना दिसते आहे. उरलेले काश्मीर खोरे शांत आहे. सगळे काश्मीर खोरेच अशांत आहे, असे जे चित्र उभे केले जाते आहे, ते साफ चुकीचे आहे.
सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला हवी आहे. सैन्याची भूमिका ही आहे की, कुठेही हिंसाचार घडायला नको. दंग्याधोप्यात सहभागी नसलेल्या सामान्य माणसाचे संरक्षण झाले पाहिजे. यासाठी घुसखोरी व अतिरेकी कारवायांविरुद्ध अधिक कडक उपाययोजना करायला हवी. रजेवर असलेल्या एका तरूण लष्करी अधिकाऱ्याची - उमर फैय्याजची - क्रूर हत्या झाली त्यावेळी निषेधाचा एक चकार शब्दही न उच्चारणाऱ्यांना आता मात्र कंठ का फुटतो आहे? 
काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडग्याचा प्रयत्न करणे हा आमचा प्रांत नाही. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. पण त्याचा अनुभव काय सांगतो? कारगीलचे उदाहरण आपल्या समोर आहे. पाकिस्तानशी मर्यादित का होईना पण युद्ध होईल, असे आपल्याला वाटत नाही, असे जनरल रावत शेवटी म्हणाले.
कुलगाव, अनंतनाग, पुलवामा आणि शोपेन हे दक्षिण काश्मीरमधील चार जिल्हे व श्रीनगरचा काही भाग वगळता काश्मीरमधील अन्य जिल्हे शांत आहेत.  या चार जिल्ह्यात जरी भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिलेल्या आढळत असल्या तरी इथेही दैनंदीन व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत, हेही जाणवते. विद्यार्थी महाविद्यालयातील वर्गात उपस्थित राहू लागले आहेत. फेरीवाले दशेरी आंबे आणि नागपुरी संत्री विकतांना दिसतात. महिलावर्ग उन्हाळ्यासाठी कपडे खरेदी करायला घराबाहेर पडतो आहे.
२०१६ मध्ये बुरहान वाणी मारला गेल्यानंतर  जानेवारी ते मे या ५ महिन्यांच्या काळात संपूर्ण काश्मीरमध्ये २५ जवान शहीद झाले आहेत तर  तेवढेच नागरिकही प्राणाला मुले आहेत. यापैकी १५ दक्षिण काश्मिरातील आहेत. २०१६ मध्ये कुलगाव, अनंतनाग, पुलवामा आणि शोपेन या जिल्ह्यातील वातावरण खूपच गंभीर झाले होते. 
अतिरेक्यांच्या रडारवर पी डी पी -  पी डी पीच्या पुलवामा जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाची हत्या अतिरेक्यांनी नुकतीच केली, पण यावेळी जनजीवन इतके विस्कळीत झाले नाही. अधिक चोख सुरक्षा व्यवस्था व दरम्यानच्या काळात सुरक्षा यंत्रणेने केलेला १४ अतिरेक्यांचा खातमा, हेही एक प्रमुख कारण यामागे आहे. असे असले तरी सावध राहण्याची आवश्यकता आहे. अतिरेकीही या काळात जुळवाजुळव करून पुढील बेत आखण्यासाठी थांबले असतील. पण म्हणूनच या काळात व्यापारी व दुकानदार आपल्या धंद्याला आंदोलनकाळात बसलेली खीळ भरून काढण्याचा खटाटोप करीत आहेत. यावरून हे स्पष्ट व्हावे या अशांत काश्मीरमधील सामान्य लोक शांतमय वातावरणातच राहू इच्छित आहेत. 
अतिरेक्यांची वर्गवारी - सध्या दक्षिण काश्मीरमध्ये ८८ च्या जवळपास नोंद असलेले  अतिरेकी क्रियाशील असतील, असा पोलिसयंत्रणेचा अंदाज आहे. यात हिजबूल मुजाहिद्दिन या  काश्मिरी दहशतवादी गटाचे  ६० तर पाकिस्थानस्थित लष्कर - ए- तोयबा गटाचे उरलेले २८ असावेत. बुरहान वाणीचा उत्तराधिकारी म्हणून झकीर मुसाची घोषणा अतिरेकी केंद्रीय नेतृत्वाने केली आहे. त्याने सरळसरळ जिहादचीच घोषणा केली असून हिजबूलपेक्षा भिन्न भूमिका घेतली आहे. लष्करचा नेता अबू दुजाना हा आहे. आताआतापर्यंत लष्कर व हिजबूल यांत मतभेद होता. पण मुसाचा गट हिजबूलमधून फुटून लष्करला मिळाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मात्र झकीर मुसा व लष्करचा कमांडर अबू दुजामा यात जुने वैर आहे. ते या दोघांनाही विसरावे लागेल.
डोके फिरलेले काश्मिरी व प्रशिक्षित अतिरेकी - अतिरेक्याचे आणखीही एका प्रकारे वर्गीकरण करता येईल पहिला वर्ग डोके फिरलेल्या काश्मिरी तरुणांचा व दुसरा प्रकार सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या प्रशिक्षित अतिरेक्यांचा. यांना रीतसर सैनिकी प्रशिक्षण मिळालेले असते. यातही काश्मीरमधून पाकिस्थानात जाऊन अर्धवट प्रशिक्षण घेतलेले मूळचे काश्मिरी असलेले तरूणही असतात. तर उरलेले प्रशिक्षित पाकिस्थानी असतात. एक प्रश्न असाही विचारला जातो की, घुसखोरी तर दूर सीमेपलीकडून होत असते मग दक्षिण काश्मीरमधील या चार जिल्ह्यातच एवढी अशांतता का? 
दक्षिण काश्मीरची वेगळी स्थिती-  या भागात खूप अगोदरपासूनच एक वेगळी राजकीय परिस्थिती होती. एक वेगळी चळवळ साम्यवादी नेता एम वाय तारीगामी याच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. याला प्रतिक्रिया स्वरुपात जमाते -ए-इस्लामी हा उजवीकडे झुकलेला गट निर्माण झाला. याचे पी डी पी शी सख्य होते. पी डी पी हा पक्षही तसा काहीसा फुटिरतेकडे झुकल्लाच पक्ष होता. 
पी डी पी व भाजप यांची आघाडी झाली आणि अतिरेकी व असंतुष्ट यांनी आपला मोर्चा पी डी पी चे बलस्थान असलेल्या दक्षिण काश्मीरकडे वळवला, असे पी डी पी च्या मुखंडांचे म्हणणे आहे. यामुळे पी डी पी व भारतीय जनता पक्ष यातील आघाडी एकतर फुटेल किंवा निदान या दोघात तणाव तरी वाढीस लागेल, अशी ही रणनीती असल्याचे पी डी पी चे परिस्थितीचे निदान आहे. यामुळे मोदी शासन युती टिकावी म्हणून आणखी नवीन सवलती काश्मीरसाठी जाहीर करील, असे त्यांना वाटते. असे नसते तर त्यांनी उत्तर काश्मीरात नसता का धुमाकूळ घातला? आता हा युक्तिवाद खरा मानायचा की आणखी सवलती पदरात पाडून घेण्यासाठी पी डी पीनेच रचलेली ही कथा आहे? याचे उत्तर नजीकच्या भविष्यकाळात मिळण्याची शक्यता कमीच आहे.
फारूक अब्दुल्ला ज्या पोटनिवडणुकीत निवडून आले त्यावेळी असंतोष निर्माण करणाऱ्यांचा हेतू पी डी पी समर्थक मतदार घाबरून घरीच बसण्यात झाला, हे मात्र खरे आहे. असे झाले नसते तर पी डी पीचा उमेदवार निवडून आला असता का? याबद्दल मतभिन्नता असली तरी मतदानाचे प्रमाण नक्कीच वाढले असते (ते पूर्वीइतके वाढले नसते तरी) व जिंकणाऱ्या आणि हारणाऱ्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांतील फरक इतका मोठा राहिला नसता. यावर मात्र सर्व निरीक्षकांचे एकमत आहे.
दक्षिण काश्मीरची हेतुपुरस्सर निवड - काही निरीक्षकांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, जमात -ए- इस्लामीची हिजबूल ही शसत्रधारी शाखा आहे. तिचे उगमस्थानही दक्षिण काश्मीरमध्येच आहे. त्यामुळे दक्षिण काश्मीरमध्येच ती जास्त वरचढ असणार, हे उघड आहे. जमात- ए - इस्लाम सध्या पाकिस्थानशी संधान साधून आहे. त्यामुळे घुसखोरांना सूचना असते की, अगोदर कसेही करून दक्षिण काश्मीरमध्ये जा. तिथे तुम्हाला स्थानिक स्तरावर मदत मिळेल. दक्षिण काश्मीरची ही स्थिती लक्षात घेऊनच लक्षात घेऊन पाकिस्थानने दक्षिण काश्मीरात प्रभावी संपर्क व्यवस्था उभारली आहे. म्हणूनच दक्षिण काश्मीरमध्ये होणाऱ्या आंदोलनात एकसुसूत्रता आढळते. मग तो दगडफेकीचा प्रकार का असेना. पण यासाठीही पैसे मोजूनच मोर्चेकरी जमवावे लागतात, हेही चूक नाही. पण मूळ योजना आखणारे मात्र कट्टर समर्थक आहेत, हेही विसरून चालणार नाही.
दक्षिण काश्मीरकडे विशेष लक्ष द्यायला हवे - दक्षिण काश्मीरमधील शासकीय सुरक्षा यंत्रणा आता खूपच खिळखिळी झाली आहे. ती पुन्हा उभी करायची हे कष्टाचे व वेळखाऊ काम आहे. तोपर्यंत असंतोषाचे लहानमोठे भडके दक्षिण काश्मीरमध्ये उडतच राहतील, याची भारतीय लष्कराला व भारत सरकारला जाणीव आहे.
जमाते - इस्लामीचा भ्रमनिरास - जमाते इस्लामीचा होरा मात्र काहीसा चुकलेला आहे. त्यांना वाटत होते की, पी डी पी मूळची आपल्यासारखीच फुटीरवादी आहे/होती. ती दगडफेक करणाऱ्याच्या बाबतीत भारतीय फौजांना कठोर कारवाई करू देणार नाही. शेवटी फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे भारताला भाग पडेल. शेवटी पाकिस्थानशीही चर्चा करावी लागेल. पण घडले वेगळेच पी डी पीला भारताची भूमिका सौम्य करणे जमले नाही. उलट भारताच्या कठोर कारवाईचेच समर्थन करावे लागले. म्हणूनही अतिरेक्यांचा पी डी पी वर विशेष रोष आहे. पी डी पी ने त्यांचा भ्रमनिरास केला आहे, त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. पी डी पीच्या पुलवामा जिल्ह्याच्या प्रमुखाच्या  हत्येमागचे हेही एक कारण असावे. यापुढे अशा हत्यांचे प्रमाणही वाढतांना दिसेल, अशी भीती निरीक्षकांना वाटते आहे. 
गृहमंत्र्याची ग्वाही - जटिल अशा काश्मीर प्रकरणी स्थायी तोडगा शोधण्यात शासनाला यश आले असून, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याबाबत कुठलीही तडजोड न करता विकास व शांततेच्या मुद्यावर फुटितावादी वगळता कोणाशीही चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ काय? सैन्यात/ पोलिस दलात भरती होण्यासाठी काश्मिरी तरुणांची चढाओढ, सैन्याने चालविलेल्या शेकडो शाळात आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून उडणारी काश्मिरी पालकांची झुंबड काय सांगते? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीरबाबत बोलताना ‘इन्सानियत, कश्मिरीयत, जम्हुरियत’ अशी त्रिसूत्री मांडली होती. तिचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही तिची आठवण काढावीशी वाटली. ही जी कश्मिरीयत आहे, तिचे नाते इस्लाममधील सूफी परंपरेशी आहे, तिची नाळ आजही कायम आहे. आजही काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिकाची नाळ या सूफी संप्रदायाशी जुळलेली आहे. या ‘कश्मिरीयत’चा लढा निदान आता तरी सरकार किंवा लष्कराशी उरलेलाच नाही. तो इसीसच्या क्रूर आक्रमणाशी आहे. कारण त्यांना फक्त इस्लामिक स्टेट हवे आहे. त्यात ‘इन्सानियत, कश्मिरीयत, जम्हुरियत’ यांना स्थान नाही.

No comments:

Post a Comment