Tuesday, July 19, 2016

शस्त्रनियंत्रणासाठी सैन्याचे अनुसरण करा
वसंत गणेश काणे
       अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील आंर्लॅंडो गावातील शंभरावर लोकांना जायबंदी करणारे व किमान शंभर लोकांचा बळी घेणारे हत्याकांड झाल्यानंतर अनेक मानसशास्त्रज्ञ, विचारवंत, शस्त्रास्त्रनिपुण व्यक्तींची मते प्रसार माध्यमाद्वारे जनतेसमोर येत आहेत. टाॅमस डेव्हिस हे एक सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह नागरिकांसाठी धरला तरी आंर्लॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. अशी हत्याकांडे का होतात, याचे सर्व तपशील कदाचित कधीच उघडकीला येत नसतात/ येणार नाहीत, हे जरी मान्य केले तरी त्यांचे संख्यात्मक प्रमाण व हानीची तीव्रता नक्कीच कमी करता येईल.
     शस्त्रास्त्रे वापरण्याच्या बाबतीत, बाळगण्याच्या बाबतीत जे निकष सैनिकांसाठी आहेत, जी बंधने आहेत, ती तरी नागरिकांसाठी असावीत की नाही? सैन्यातले लोक शस्त्रे उशाशी घेऊन झोपतात, अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती सपशेल चुकीची आहे. अर्थात सैन्य म्हटले की दारूगोळा आलाच, तसेच त्यांचा साठाही आसपासच असतो पण असे असले तरी शस्त्र ही एक धोकादायक वस्तू आहे आणि त्याबाबत थोडीशीही हयगय झाली तरी जिवावरही बेतू शकते, याची जाणीव सर्वांनाच असते. त्यातून व्यक्ती दारूच्या किंवा अन्य व्यसनाच्या अधिन असेल, तिचा मनाचा समतोल बिघडला असेल, किंवा तिच्या निष्ठेबद्दल शंका असेल तर तिच्या हातून गंभीर स्वरुपाची कृती होऊ शकेल हे गृहीत धरून दक्षता घेतली जाते.
   समाजात तर याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. श्स्त्र चालवण्याचे रीतसर शिक्षण ज्यांने घेतलेले नाही, त्याने तर शस्त्राला स्पर्शही करता कामा नये. ज्याने असे शिक्षण घेतले असेल त्याच्याजवळ शस्त्र वापरण्याचा परवाना असला पाहिजे. त्या शस्त्राची शासनाजवळ नोंद असली पाहिजे. दारूगोळा नियंत्रित असला पाहिजे. प्रत्येक गोळीचा हिशोब ठेवला गेला पाहिजे. संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची चिन्हे दिसताच त्याच्याजवळची शस्त्रे काढून घेतली पाहिजेत व मन:स्वास्थ्य ठीक झाल्याची खात्री पटल्यावरच त्या व्यक्तीला तिचे शस्त्र परत दिले गेले पाहिजे. या नियमांचे काटेकोर पालन जर आम्ही सैन्यात करतो तर हेच नियम नागरिकांना लागू का असू नयेत?
   सैनिकांच्या हाताशी सदैव शस्त्रे असतात, हा समज चुकीचा आहे. जे कामावर नसतात, त्यांच्याजवळ शस्त्रे नसतात. ती एका अलमारीत बंद असून ती अलमारी जमिनीला खिळवून ठेवलेली असते. त्या खोलीला दोन भक्कम दारे असतात व दारांना खास कुलपे लावलेली असतात. खोलीला अलार्म लावलेला असतो. याशिवाय तासातासाला सर्व जागच्याजागी आहे ना व संरक्षक यंत्रणा ठीकठाक आहे ना याची पाहणी केली जाते. सर्व सैनिकांचे मनस्वास्थ्य ठीक आहे किंवा नाही, याचा नित्य आढावा घेतला जात असतो.
   शस्त्र ही एक भयंकर वस्तू आहे. स्वयंचलित बंदूक तर खूपच भयंकर मानली पाहिजे. अल्पावधीत जास्तीत जास्त माणसे मारता यावीत, या दृष्टीने तिची रचना असते. आॅर्लॅंडोच्या हत्याऱ्याने अशीच बंदूक वापरली होती. पिस्तुल बाळगण्याचा परवाना असेल तर आठपेक्षा जास्त फैरी झाडता येऊ नयेत. रायफल असेल तर पाचपेक्षा जास्त फैरी झाडता येऊ नयेत. असे असेल तर सावजाला बचावासाठी काहीतरी हालचाल करता येईल व हत्याऱ्याला बंदुकीत पुन्हा गोळी भरण्याआधी अडवता येईल. देशातील हत्याकांडाची मालिका पाहता हा मुद्दा पटण्यास हरकत असू नये.

No comments:

Post a Comment