Tuesday, July 19, 2016

यंत्रमानवाद्वारे हल्लेखोरांचा नि:पात - योग्य की अयोग्य?
वसंत गणेश काणे
डलास पोलिसांनी जाॅनसन नावाच्या माजी सैनिकाचा खातमा करण्यासाठी यंत्रमानवाचा उपयोग करून एक बॅांब त्याच्या जवळ नेला आणि तो माऱ्याच्या टप्प्यात येतात बॅांब उडवून त्याला ठार केले. या माथेफिरूने या अगोदर त्याने पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना ठार केले होते.
 त्याने शरण यावे म्हणून त्याचे मन वळ विण्याचा प्रयत्न  सतत दोन तास केल्यानंतर तो शरण तर येणार नाहीच पण आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांना मारण्याच्या विचारात आहे, हे कळताच त्याला अशाप्रकारे मारण्याचा निर्णय घेण्यात आला. ल्युसियाना आणि मिनेसोटा येथे पोलिस कारवाईत मारल्या गेलेल्या काळ्या माणसांच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या हेतूने जाॅनसन नावाच्या या कृष्णवर्णियाने हे कृत्य योजनापूर्वक केल्याचा पोलिसांचा दावा आहे. ‘काळ्यांच्या जीवालाही मूल्य आहे’, या आशयाच्या घोषवाक्याला अनुसरून सध्या अमेरिकेत एक चळवळ सुरू असून तिचा अध्यक्ष ओबामा यांनीही पुरस्कार केलेला असला तरी त्यांनी पोलिसांची अशाप्रकारे हत्या करण्याच्या या प्रकाराचा निषेध केला असून त्याला मारण्याची पोलिसांची कारवाई उचित ठरविली आहे.
 या घटनेवरून सध्या अमेरिकेत उलटसुलट विचार व्यक्त होत असून नैतिक दृष्ट्या पोलिसांची ही कारवाई योग्य की अयोग्य यावर मते व्यक्त होत आहेत. अशाप्रकारे यंत्रमानवाचा उपयोग करून हल्लेखोराला ठार करण्याची ही पहिलीच घटना आहे.गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी व निर्दोष व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी यंत्रमानवाचा व रिमोटचा आधार घेण्याचा पायंडा या प्रकरणाचे निमित्ताने पडतो आहे.
 अशा गुन्हेगारांनी शरण यावे म्हणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन वळवायचे की त्यांना यंत्रमानवाचा उपयोग करून ठार मारायचे? कोणकोणत्या परिस्थितीत यंत्रमानवाचा वापर उचित ठरवायचा? विशेष परिस्थिती कशी, केव्हा व कुणी ठरवायची?
दुसरे उपाय योजले असते तर इतर अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका पोचला असता, असे पोलिस प्रमुखांचे मत आहे. डलास शहराच्या महापौरांनी पोलिसांची कारवाई उचित ठरविली आहे. भविष्यातही असा प्रसंग गुदरला तर हाच उपाय योजावा, असे त्यांना वाटते आहे. पोलिसांचे जीव जपलेच पाहिजेत असे त्यांचे मत आहे.
यंत्रमानव, सैनिक व पोलिस - पोलिस आजवर यंत्रमानवाचा उपयोग संशयित बॅांब निकामी करण्यासाठी, ओलिसांना मुक्त करण्यासाठी व आग नियंत्रित करण्यासाठी वापरीत होते. इराकच्या युद्धात अमेरिकन सैन्यदलाने यंत्रमानवाचा उपयोग करून शत्रूची स्फोटक आयुधे निकामी केली होती. सैन्याची गरज भागल्यावर उरलेले यंत्रमानव त्यांनी पोलिसांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे सध्या पोलिसदलाजवळ निरनिराळ्या प्रकारचे यंत्रमानव उपलब्ध असतात.
यंत्रमानवाचा वापर - जमिनीवर चालणारे यंत्रमानव आम्ही शत्रूच्या सैनिकांना मारण्यासाठी कधीच वापरत नाही, असे संरक्षण विषयाच्या तज्ञांचे म्हणणे आहे. बाॅंबचा शोध घेऊन तो निकामी करण्यापुरताच आणि या प्रकारे जीवितहानी टाळण्यापुरताच आम्ही त्यांचा वापर करतो. रणांगणावरही टेहेळणी करण्यासाठीच त्यांचा वापर केला जात असतो, हल्ला करण्यासाठी नाही. मात्र आकाशात उडणाऱ्या यंत्रमानवांचे (उदाहरणार्थ ड्रोन) बाबतीत असे नसते. नुकतेच ड्रोन वापरून अमेरिकेने शेकडो सैनिक व मुलकी नागरिक यांना ठार केले आहे.
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले विविध प्रकारचे यंत्रमानव -  सर्व यंत्रमानवांची स्फोट घडवून आणण्याची क्षमता एकसारखी नसते. आकारही लहानमोठे असतात.पाळीव कुत्र्यांना चाळा म्हणून म्हणा  किंवा आणखी एखाद्या कारणास्तव म्हणा एक कृत्रिम हाड चघळायला देतात, असे ऐकले आहे. त्याचा आकार हाताच्या बोटाएवढा असतो, असे म्हणतात. या आकारापासून एखाद्या अजस्त्र ट्रक एवढ्या आकाराचे यंत्रमानव उपलब्ध आहेत. एखाद्या वाहनाला कॅमरा असलेली व उभय दिशेने ध्वनि वाहून नेणारी हातासारखी रचना असते. ती दृश्ये टिपते, तसेच उभय पक्षी/दिशांनी संदेश वहनाचेही काम करू शकते. एखादा लहानसा स्फोट घडवून समोरच्याला तात्पुरते बलहीन करणारा यंत्रमानवही असू शकतो. संशयित वस्तू स्फोट घडवून निकामी करणारी यंत्रणाही उपलब्ध आहे. डलास येथील  हल्लेखोरासाठी कोणती यंत्रणा वापरली याचा खुलासा पोलिस तशा अर्थाची विनंती केल्यावरही करीत नाहीत. बाॅंब उडवून हल्लेखोराला ठार करण्याचा निर्णय का घेतला असावा? सामान्य उपाय लक्षात येऊन तो सावध झाला असता आणि पोलिसदलातले आणखी काही अधिकारी हताहत झाले असते, असाही विचार पोलिसांनी केला असू शकतो.
 यंत्रमानव विरुद्ध मानव हा विषम संघर्ष - या विषयाच्या तज्ञांचे हे पक्के मत आहे की, डलास प्रकरणी आपण कोणता उपाय करीत आहोत, त्याचे परिणाम काय होतील, याची पोलिसांना नक्की कल्पना असलीच पाहिजे. यंत्रमानवाचा देशांतर्गत प्रयोग करण्याचे हे पहिलेच उदाहरण असले तरी इराकच्या युद्धात असा वापर सर्रास केला गेला होता, असे तेथील युद्धात सहभागी झालेले सैनिक सांगतात.
मुळात यंत्रमानवाची निर्मिती जीवितहानी वाचावी या हेतूने करण्यात आली आहे, असे तज्ञ सांगतात. डलासमधील निर्णयामुळे अन्य पोलिस अधिकारी किवा आजूबाजूला असलेल्या अन्य निर्दोष व्यक्ती यांचे जीव वाचले याचे समाधान असले तरी भविष्यात काय होईल, हे कुणी सांगावे? वाटाघाटी करून हल्लेखोराचे मन शरण येण्याचे केव्हा थांबवायचे व त्याला नि:प्रभ करण्यासाठी डलास प्रकरणी जसा निर्णय घेतला तसा निर्णय केव्हा घ्यायचा? ही लक्ष्मणरेषा कशी आखायची याबाबतची चर्चा अमेरिकेत अनेक दिवस होत राहील, असे दिसते.

No comments:

Post a Comment