Saturday, January 14, 2017

उत्तर प्रदेश व पंजाब मधील रणसंग्राम
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

पंजाब व उत्तरप्रदेश या महत्त्वाच्या दोन राज्यात एकाचवेळी निवडणुका होत असल्या तरी दोन्ही राज्यांमधील परिस्थिती अगदी वेगळी आहे.  पहिले असे की, पंजाबात जात हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर उत्तर प्रदेशात जातीचा/ जातींचा विचार केल्याशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास पूर्ण होत नाही, असे म्हणतात व मानतातही. दुसरे असे की, पंजाबात मध्यमवर्गीय लोक जास्त आहेत, तर उत्तरप्रदेश हे एकप्रकारे गरीब प्रजा असलेले राज्य आहे. पंजाबला अमली पदार्थ (ड्रग्ज) आणि मद्य यांनी ग्रासले आहे, तर उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था यांचा अभाव आणि बलात्कार यापायी जनता भयांकित आहे. पंजाबात गेली दहा वर्षे शिरोमणी अकाली दल व भारतीय जनता पक्ष यांचे संयुक्त शासन राज्य कारभार करीत आहे. प्रस्थापित विरोध (ॲंटी इनकंबन्सी) निर्माण होण्यासाठी हा कालावधी पुरेसा असतो व तो निर्माण होऊ नये यासाठी ज्याप्रकारचे व ज्या गुणवत्तेचे शासन असावे लागते तसे पंजाबात व उत्तर प्रदेशात नाही/नव्हते, असे बहुतेक सर्व निरीक्षकांचे मत आहे.
गेली दहा वर्षे पंजाबात भारतीय जनता पक्ष हा लहान भाऊ तर शिरोमणी अकाली दल मोठा भाऊ असा सबंध या दोन पक्षात होता. लहान भाऊ मोठ्या भावाचा कल सांभाळून  वागत असे. आजमितीला मोठा भाऊ (शिरोमणी अकाली दल) विजयासाठी पूर्णपणे धाकट्या भावावर - नरेंद्र मोदींवर - अवलंबून आहे. शिरोमणी अकाली दलाच्या हातून निसटत चाललेली सत्ता ही दगडावरची रेघ आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा व वक्तृत्त्वच कायते शिरोमणी अकाली दलाला वाचवू शकेल.
उत्तर प्रदेशातील मुलायम(?) धक्के - उत्तर प्रदेशातील घडामोडींचा अभ्यास करायचा झाला तर आधुनिक यदु वंशाची माहिती असणे आवश्यक आहे मुलायम सिंग यांच्यापासून विचार करण्यास सुरवात केली तरी चालेल. नंतरचे बहुतेक यदुवंशीय राजकारणात आहेतच. उरलेले केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकतात व शकतीलही.
मुलायम सिंगांची पहिली पत्नी मालतीदेवी यांचे २००३ मध्ये निधन झाले.पहिल्या पत्नीपासूनचे अखिलेश हे चिरंजीव आताआतापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असून सून डिंपल (अखिलेश यांची पत्नी) कनौजहून लोकसभेवर खासदार आहे. अखिलेश
दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव प्रतीक यांची मुलायम सिंग व शिवपाल यादव (मुलायम सिंग यांचे बंधू) यांच्याशी विशेष जवळीक असून सून अपर्णा यादव २०१७ मध्ये विधान सभेची निवडणूक लढविणार आहे.
मुलायम सिंग यांचे बंधू - एकूण पाच भाऊ असून त्यातला एक चुलतभाऊ आहे.
१.अभय राम (दिवंगत). चिरंजीव धर्मेंद्र बदांऊचे खासदार तर कन्या संध्या जिल्हा परिषद अध्यक्षा
२. शिवपाल सिंग -  मुलायम सिंगाशी एकनिष्ठ बंधू, मंत्री व पक्षाध्यक्ष असून अमर सिंगांचे खास दोस्त, यांचे चिरंजीव आदित्य हे सहकार संघाचे अध्यक्ष आहेत.
३. रतन सिंग (दिवंगत) यांचा पुत्र रणवीर सिंग व कन्या मृदुला ही ब्लाॅक डेव्हलपमेंट काऊंसिलची सदस्या.
४. राजपाल इटावात वास्तव्य पत्नी व चिरंजीव पंचायतीत अधिकारी. नातू तेज प्रताप मैनपुरीचे खासदार असून यांचे अखिलेशशी विशेष सख्य आहे.
५. राम गोपाल - (चुलत भाऊ) राज्य सभा खासदार  पक्षातून हकालपट्टी  झालेली आहे. यांचेही अखिलेशशी विशेष सख्य आहे.
मुलायम सिंगांची बहीण - कमलादेवी यादव व त्यांचे यजमान अजंत सिंग (मुलायम सिंगांचे मेव्हणे) ब्लाॅक डेव्हलपमेंट काऊंसिलचे सदस्य आहेत.
उत्तर प्रदेशातील गृहकलह/गृहयुद्ध - उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षातील गृहकलहाचे/गृहयुद्धाचे चटके जनसामान्यांनाही आता चांगलेच जाणवू लागले आहेत, भाऊबंदकीचे असे उदाहरण क्वचितच आढळेल. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षातील एकछत्री अंमलाला दुसऱ्या कुणी नव्हे तर खुद्द त्यांच्या चिरंजीवानीच सुरुंग लावला आहे. ‘बापको बेटाही भारी’ पडण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशात चालली तर अखिलेशचीच जादू चालू शकेल. अगदी तीर्थरूपांनी हकलून दिल्यानंतर सुद्धा. चिरंजीव वेगळा पक्ष काढतील व काॅंग्रेसशी युती करतील, असे दिसते. गृहकलहासोबत बाप लेकातीलच नव्हे तर इतरही कौटुंबिक संघर्ष संभवतात.
राजकीय आखाड्यातील डावपेच - अखिलेशला नवीन पक्ष स्थापन करून नवीन चिन्ह मिळवावे लागेल. ह्या पक्षाला राज्यातील एकूण संख्येच्या तुलनेत बहुमत मिळाले नाही, समाजवादी पक्षाच्या तुलनेत जरी जास्त आमदार निवडून आणता आले तरी इतरांना आपल्याकडे खेचणे शक्य होईल. पण विधान सभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर काय करायचे?
काॅंग्रेसला वाटते आहे की अखिलेशच्या पक्षाशी गट्टी करता आली तर मुस्लिम मतपेढीचा मोठा हिससा आपल्याकडे वळवता येईल.
मयावतींना वाटते आहे की,मुस्लीम गठ्ठा मते आता आपल्याकडे वळतील. कारण भारतीय जनता पक्षाला आपला पक्षच टक्कर देऊ शकेल, असे मुस्लिमांच्या गळी उतरवता येईल.
मुलायम सिंग अखिलेला वारस म्हणून नाकारणार, हे स्पष्ट झाले. एकनिष्ठ अनुयायी, अमरसिंग, तसेच शिवपाल सिंग हा एकनिष्ठ बंधू यावर विसंबून आपलाच पुत्र असलेल्या अखिलेशचा सामना करावा लागणार, हे मुलायम सिंगांच्या लक्षात आले.
भारतीय जनता पक्षाला केंद्राची राजवट नको आहे. ती लादल्यास समाजवादी पक्षाच्या दुभंगाच्या प्रक्रियेची गती मंदावेल. एकजुटीच्या प्रयत्नांनाना बळकटी प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून तो पक्ष सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवून स्वस्थ बसला आहे.
आमदारांसमोर पेच!  - नेताजी ( मुलायम सिंग) की भैय्याजी (अखिलेश)? बहुसंख्य आमदार भैय्याजींकडे  वळणार. कारण पाच वर्षे सकारात्मक राजवटीसाठी प्रयत्न केले, असा समज; ग्रामीण पार्श्वभूमी असलेला तरूण; एक कर्ता कार्यकर्ता; अशी पुष्कळशी स्वच्छ प्रतिमा असलेला व तंत्रज्ञ मुख्यमंत्री ही जनमानसातील प्रतिमा अखिलेश याला खूपच उपयोगाची पडणार आहे. वडलांनी पक्ष सांभाळावा, मार्गदर्शन करावे व अखिलेशला राजशकट हाकू द्यावा, हा पायंडाच पुढे चालू रहावा ही बहुसंख्य आमदारांची इच्छा आहे. २०१४ मधील मोदीप्रणित त्सुनामीत फक्त मुलायम सिंग व त्यांचे ५ नातेवाईकच निवडून आले होते. शिवपाल यादव, रामगोपाल यादव, आझमखान व अमर सिंग यापैकी कोणीही ‘दंगल’ माजवू शकण्याची ताकद ठेवून आहेत. स्वत:ला मल्ल म्हणवणारे मुलायम सिंग यांच्यासमोर हे सर्व आजवर ‘छोरे’ ठरत आले आहेत. पण आता सिंव्हाचे दात पुरते पडले नसले तरी खिळखिळे नक्कीच झाले आहेत. अखिलेशने बापसे बेटा सवाई आहे, हे बापाला जाणवून दिले. उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न
उद्भवला तर काॅंग्रेस आपल्या सोबत राहील, त्याने बापाला(मुलायम सिंग यांना) जाणवून दिले.परिणाम असा झाला की, अखिलेशचे निलंबन मुलायम सिंग यांनी तूर्तास तरी परत घेतलेले दिसते आहे.
दोन टोकाची मते - पण तरीही एक मत असे आहे की, आजचा सुशासनाचा सैल निकष लावला तर पंजाब व उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची कारकीर्द अगदीच वाईट म्हणता यायची नाही. पण प्रस्थापित विरोधाला (ॲंटिइनकंबन्सी) मात देण्यासाठी एवढेच पुरेसे नसते. दुसरे मत मात्र अगदी वेगळे आहे. पंजाबात विद्यमान मुख्यमंत्र्यांनी उद्योगांची अक्षरश: वाताहत केली, स्वत:साठी गडगंज संपत्ती जमविली, स्वत:च्या मालकीच्या हाॅटेलपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधून घेतला, त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या आराम बस गाड्यांचा ताफा असून त्या रस्त्यांवरून अपघातांची तमा न बाळगता उडत असतात, स्वत:च्याच मालकीचे केबल नेटवर्क आहे, सर्व खाणी स्वत:च्या मालकीच्या आहेत, तसेच खाजगी विद्यापीठही आहे, दारूची दुकाने ही सुद्धा स्वत:च्याच मालकीची, अशी कीर्ती या मुख्यमंत्र्यांची आहे.
पंजाबातील जमेची बाजू - पण विरोधकात एकजूट नाही, विरोधकांना एकमेकांविरुद्ध लढवत ठेवण्याचे अद्वितीय कौशल्य मुख्यमंत्र्यांचे ठायी ठासून भरलेले आहे, जोडीला नरेंद्र मोदींचे वक्तृत्त्व व करिष्मा या बळावर युती सत्तारूढ होईलही, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.  ही युती भारतीय जनता पक्षासाठी ओढणे होऊन बसली आहे. पण पक्षासमोर सध्यातरी वेगळा पर्याय उपलब्ध नाही.  उत्तर प्रदेशातील स्थिती फारशी वेगळी नाही. त्यात गुंडाराजाची भर कायती पडलेली दिसते.
भारतीय जनता पक्ष - या उलट भारतीय जनता पक्षाची स्थिती दोन्ही राज्यात मजबूत आहे. नोटाबंदीचे आजवर जनतेने सहर्ष स्वागत केले आहे. विरोधकांच्या आक्षेप व आरोपांकडे दुर्लक्ष करीत, फारसे न बोलता पण ठामपणे नाकारले. लोकांनी त्रास सहन केला, गैरसोय सहन केली, रांगेत तासन् तास उभे उभे राहिले. आता मात्र परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. खते व जंतुनाशकांची गरज सहजपणे पूर्ण व्हावी /होईल, या अपेक्षेत व प्रतीक्षेत शेतकऱीवर्ग आहे. अन्य ग्रामवासीयांचीही अडचण दूर व्हावयास हवी आहे. ‘अघटित घडले, विनाश अटळ आहे’, ही विरोधकांची भविष्यवाणी ऐकूनही जनतेचा मोदींवरचा विश्वास अढळ राहिला आहे.
महागठबंधनाची शक्यता नाही - बिहारप्रमाणे महागठबंधन संभवनीय दिसत नाही. कारण समाजवादी, बहुजन समाज पक्ष व काॅंग्रेस यांच्या परंपरागत मतपेढ्या आहेत. हे तीन शक्तिशाली गट एकत्र येणे कठीणच आहे. तीन काडी पहिलवानांची एकजूट व्हायला अडचण जात नाही. यादव व मुस्लिमांमुळे समाजवादी पक्ष, दलितांमुळे बहुजन समाज पक्ष व जुन्या पुण्याईमुळे व शीला दीक्षितांमुळे ब्राह्मण मतदार साथ देतील या अपक्षेत काॅंग्रेस पक्ष वीस/पंचेवीस टक्के मतांची मजल गाठण्याची खरी खोटी आशा/अपेक्षा बाळगून आहेत. एमआयएम (मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन) ची जादू बिहारमध्ये चालली नाही. मुस्लिमांनी डावपेचाचे/व्युव्हाचे राजकारण (स्ट्रॅटेजिक व्होटिंग) करून भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, अशाप्रकारे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान केले. असेच राजकारण शिवसेनाही जरा वेगळ्या करू शकेल.
राजकारणातील एकच मर्द गडी - या सर्व कोलाहलात एक मुद्दा वादातीत आहे. पण सर्वांसाठी नरेंद्र मोदी हा एकच मर्द गडी (ही मॅन ) आहे.भ्रष्टाचारी व काळा बाजारवाल्यांशी मुकाबला करण्याची क्षमता जर कुणा एकात असेल तर ती फक्त एकट्या नरेंद्र मोदीमध्येच आहे, असे जनता मानते. जे जे विरोधक आहेत, ते पराकोटीचा विरोध करून विरोधभक्ती करीत आहेत. नरेंद्र मोदींचा उल्लेख न करता कुणााही विरोधकाचे भाषण पूर्ण होत नाही. नोटाबंदीमुळे अनेक ‘बनिये’ दुरावले/दुखावले असले तरी त्यांच्या दृष्टीनेही नरेंद्र मोदींचा प्रामाणिकपणा वादातीत आहे.
२०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिल्ली व बिहार मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी वाढलेलीच दिसते. या निवडणुकीत पंजाब व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात २०१४ सालच्या लोकसभेच्या निकालातील  ४२ टक्के मतांची बेगमी कमी होण्याची शक्यता नाही, उलट ती वाढण्याचीच शक्यता आहे. समजा ती काहीशी कमी होईल, असेही गृहीत धरले तरीही भारतीय जनता पक्ष उत्तरप्रदेशात चांगले बहुमत मिळवू शकेल, अशी आजची स्थिती

No comments:

Post a Comment